Tuesday, September 8, 2020

हिंदी भाषेला दिवस आले चांगले


अलीकडच्या काही वर्षांत हिंदी भाषा मृत्यूपंथाला लागली आहे असं काहीसं बोललं जात होतं. पण आज चित्र फार वेगळं आहे. लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर एकवटलेल्या या विश्वात हिंदी भाषेचा वापर वाढला आहे, ही एक  हिंदी भाषेसाठी सकारात्मक गोष्ट म्हटली पाहिजे. गुगलच्या नेक्स्ट बिलियन युजर्स अँड पेमेंट्सचे व्हाइस प्रेसिडेंट सीजर सेनगुप्ता यांनी इंटरनेट युजर्सच्या बाबतीत सांगताना म्हटले आहे की, आजचा युवावर्ग डेडस्टॉक किंवा लॅपटॉपपेक्षा स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटवर अधिक काळ घालवत आहे.आणि व्हॉइस फिचरचा अधिक वापर करत आहे.इंटरनेटचा वापर वाढल्याने साहजिकच ई-कॉमर्सचा बिझनेस वेबसाईटची संख्याही वाढली आहे.आणि पेमेंट ऍप्सचा विचार केला तर असं लक्षात येईल की, पेटीएम, गुगल पेसारख्या ऍप्सनी हिंदी भाषेचाही अंतर्भाव केला आहे. हिंदी बोलणाऱ्या आणि लिहीणाऱ्या आपल्या ग्राहकांची संख्या वाढावी, हा त्यामागचा उद्देश आहे.एवढेच नव्हे तर मनोरंजन जगतात आपले स्थान बळकट करणाऱ्या नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम यांनी हिंदी भाषेसाठी स्वतंत्र कंटेंट बनवली आहे.सोशल मीडियावरदेखील फेसबुक, व्हॉटस अप,ट्विटरवरसुद्धा हिंदी भाषा वाढताना दिसत आहे.फेसबुक तर अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहेत शिवाय गुगल इंडिक आणि फोनेस्टिकवर आधारित अशा की-बोर्डची निर्मिती केली आहे की, हिंदी भाषा सहजगत्या टाइप करता येते.हिंदी आता बाजारची भाषा बनली आहे.

आज प्रत्येक मोठा मीडिया हाऊस हिंदी भाषी वर्तमानपत्र किंवा अन्य नियतकालिके काढत आहेत, त्याचबरोबर त्याचे डिझिटल म्हणजेच इ-संस्करण काढत आहेत. जेणेकरून जगातल्या कानाकोपऱ्यात वसलेला हिंदी भाषिककडून ते वाचलं जावं.आज कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठमोठी प्रिंट मीडिया बंद चालली असली तरी त्यांचे डिझिटल संस्करण मात्र जोरात सुरू आहेत. शिवाय नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून डिझिटल संस्करण आणखी डेव्हलप करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माणसेही आज वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक, मासिके  विकत घेऊन वाचण्यापेक्षा मोबाईलवर वाचण्यावर भर देत आहेत. भारतातल्या बारा भाषाअंमधील लेखक आणि वाचकांना जोडण्याचा यशस्वी प्रयत्न करणाऱ्या डिझिटल प्लॅटफॉर्म प्रतिलिपी कम्युनिटी मॅनेजर वीणा वत्सल सिंह यांनी सांगितलं आहे की, डिझिटल प्लॅटफॉर्मवर सध्या 30 हजार लेखक लिहीत आहेत. आणि  हिंदी भाषेचे वाचक सात लाखांवरून  दहा लांखांवर पोहचले आहेत.पूर्वी कॉम्प्युटर, फोन किंवा लॅपटॉपवर हिंदीमध्ये टाइप करताना लोकांना अडचणी येत होत्या, मात्र आता गुगलच्या फोनेटिक्स ऍपमुळे टाइप करणं सोपं झालं आहे. त्यामुळे लिहिणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.पूर्वी हिंदी लेखकांना फारसं ओळखलं जात नव्हतं. मात्र आता सोशल मीडियावर त्यांची स्वतःची एक ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे हिंदी भाषिक लेखकांची 'गरीब गाय' ही ओळख पुसली गेली आहे. त्यांचे साहित्य इंटरनेटवर वाचायला मिळत आहे आणि जागीच प्रतिक्रियाही मिळत आहे.आता प्रकाशन क्षेत्रात  क्रांती घडू लागली असून लेखकांची कादंबरी, कथा, प्रवासवर्णन आदी साहित्य पुस्तकरुपात म्हणजेच प्रिंटबरोबरच डिझिटलमध्येही स्वस्तात उपलब्ध होऊ लागली आहेत. अनेकांना एकादे पुस्तक मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत होती.मात्र आता इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तके कुठे मिळतात, याचा पत्ता मिळत आहे. अनेक प्रकाशनांनी आपल्या वेबसाईट काढल्या असून त्यावर पुस्तके आणि त्यांच्याविषयी माहिती प्रसिध्द करत आहेत. अमेझॉनबरोबरच काही प्रकाशक पुस्तकांचे घरपोच इ-मार्केटिंग करत आहेत.जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून पुस्तकांची मागणी करू शकतो. भारतातील हिंदी भाषिक पुस्तके आता फक्त हिंदी भाषिक राज्यांमध्येच नव्हे तर देशात आणि परदेशात कुठेही आपली पुस्तके पाठवू शकतात. 

हिंदी भाषेत युनिकोड फॉन्ट आल्याने एक क्रांतीच घडली आहे. पूर्वी भाषा टायपिंग करण्यासाठी विशिष्ट लिपीचा की-बोर्ड आत्मसात करावा लागत होता. मात्र आता युनिकोडमध्ये लिहिलेले लेखन  कोणत्याही सॉफ्टवेअर कीबोर्डमध्ये कनव्हर्ट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे आणि टायपिंग करणेही सोपे झाले आहे. त्यामुळे कुणीही आता फोन किंवा लॅपटॉपवर लेखन करू लागले आहे. त्याचबरोबर हिंदी लिपीमध्ये लिहिणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सोशल मीडियावर याची प्रचिती दिसून येत आहे.

हिंदी भाषा वाचक वाढत आहेत, हाच इथे मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी डिझिटल प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. कित्येक साहित्यिक एकत्र येऊन नवोदित लेखकांना लिहिण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत. प्रसिद्ध लेखिका जयंती रंगराजन यांनी लेखकांना 30 दिवसांत कादंबरी लिहून घेण्याचा उपक्रम राबविला होता आणि त्याला चांगले यश मिळाले होते. अनेक लेखकांना प्रसिध्द प्रकाशन मिळत नव्हते किंवा पुस्तक काढण्यासाठी स्वतःच पैसे खर्च करावे लागत होते. मात्र आता ही समस्या संपली आहे. डिझिटल प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी देवदूत म्हणून अवतरला आहे. कित्येक संस्था  लेखकांना आता ई-बुक उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ई-बुक (पुस्तके) उपलब्ध होत आहेत. त्यामुळे साहजिकच लेखकांना अनायासे वाचक मिळत आहेत. फक्त इथे एक अडचण अशी आहे की, अजूनही लेखक आर्थिकदृष्ट्या गरीबच राहिला आहे. भाषेबरोबरच लेखकाचीही आर्थिक प्रगती होत राहिल्यास खऱ्या अर्थाने भाषा समृद्ध झाली, असे म्हणावे लागेल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment