Friday, September 4, 2020

ज्ञानमहर्षी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर1888 या दिवशी तिरुपतीजवळील असणाऱ्या तिरुत्तानी नावाच्या तीर्थक्षेत्रात झाला. त्यांचे वडील एका जमीनदाराच्या पदरी लेखनिक होते. वडिलांचे नाव वीरस्वामी तर आईचे नाव सिताम्मा होते.त्यांची राहणी साधी आणि घरची परिस्थिती बेताची होती. मूळचेच हुशार असलेल्या राधाकृष्णन यांचे प्राथमिक, माध्यमिक  शिक्षण गावीच तर महाविद्यालयीन शिक्षण वेलोर आणि मद्रास येथे झाले. स्वामी विवेकानंद यांच्या सर्वधर्म परिषदेतील विजयवार्तेने राधाकृष्णनदेखील भारावून गेले. त्यांनी हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा तर्कशुद्ध पद्धतीने अभ्यास करावयाचे ठरवले. यासाठी त्यांनी 'तत्त्वज्ञान' विषय निवडला. त्यांनी एम. ए.च्या प्रबंधासाठी 'वेदान्तातील नीतिशास्त्र' हा विषय निवडला. त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा त्यांचे वय अवघे वीस वर्षांचे होते. 

पुढे 1909 मध्ये त्यांची नियुक्ती मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाचे सह-प्राध्यापक म्हणून झाली. मात्र त्यांच्यासारख्या बुद्धिमान विद्यार्थ्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात जाऊन अधिक अध्ययन करावे, असा काही मित्रांचा आग्रह होता. परंतु घरची आर्थिक परिस्थिती आणि नोकरीची गरज यामुळे त्यांना तिकडे जाता आले नाही,पण पुढे याच विद्यापीठात त्यांचे 'हिंदूंचा जीवनविषयक दृष्टिकोन' या विषयावर व्याख्याने झाली. पुढे ती ग्रंथरुपाने प्रसिद्धही झाली. याच सुमारास त्यांची देशात ,परदेशात अनेक ठिकाणी व्याख्याने होत होती. पुढे कलकत्ता विद्यापीठाने तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांना पाचारण केले. म्हैसूर विद्यापीठानेही त्यांचा प्राध्यापक म्हणून गौरव केला. 

1931 मध्ये राधाकृष्णन आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू झाले. सुमारे सहा वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी विद्यापीठास शिखरावर नेले. 1939 मध्ये बनारस विद्यापीठाचेही कुलगुरू झाले. विशेष म्हणजे दोन विद्यापीठाचे कुलगुरू असतानादेखील त्यांनी प्राध्यापक पदाचा त्याग केला नाही. ऑक्सफर्ड, कोलकत्ता, बनारस आदी विद्यापीठामध्ये अध्यापन चालूच होते. भारत स्वतंत्र झाला. 1947 मध्ये त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली. एक संत आणि एक तत्त्वज्ञ या उभयतांचा सुखद संवाद झाला. यापूर्वी1915 मध्ये मद्रास येथे दोघांची भेट झाली होती. तेथील एक आठवण दोघांच्याही स्मरणात होती. तेव्हा महात्मा गांधी राधाकृष्णन यांना म्हणाले होते," दूध पिऊ नका.गाईच्या अस्थि-मज्जेपासून ,रक्त-स्नायूपासून ते तयार होते. गाईचे दूध पिणे म्हणजे गोमांस-भक्षण होय." यावर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते," या न्यायाने आईचे दूध पिणारा नरमांसभक्षक ठरेल." महात्माजी तेव्हा मनोभावे म्हणाले,"याला म्हणतात तर्कशास्त्राचा प्राध्यापक."

सर्वपल्ली यांची योग्यता जगातील जाणत्यांनी ओळखली होती. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' पुरस्कार देऊन गौरव केला. त्यापूर्वी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापीठानी त्यांना डॉक्टरेट ही पदवी दिली. जगातील अनेक विद्यापीठांनी त्यांचे अनुकरण केले. 1952 ते 62 या काळात सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे उपराष्ट्रपती होते. 1962 मध्ये ते राष्ट्रपती झाले. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती झाले. या बाह्य उपाधीपेक्षा त्यांचे अंतरजीवन अधिक सतेज होते. त्यांच्या उतुंग बुद्धिमत्तेचे आणि ग्रंथकर्तृत्वाचे कौतुक सर्व खंडातून होत होते. 

'परमेश्वर साकार होण्यासाठी मानवी कुडीचा आश्रय घेतो, तो सुख-दुःखाची वसने परिधान करतो',असे सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत. त्यांच्या जीवनाकडे पाहिले म्हणजे ते खरे वाटते. अशा या महान व्यक्तीस प्रदीर्घ आयुष्य लाभले. 17 एप्रिल 1975 या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

No comments:

Post a Comment