Tuesday, July 23, 2013

रस्त्यांवरच्या अपघातांमुळे मरण झाले स्वस्त

    
     गाणगापूरच्या श्री दत्तात्रयाचे दर्शन येऊन परत असताना विजापूर-चिक्क शिंदगी हाय-वे वर एका वळणावर झालेल्या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातल्या जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या आठरा भाविकांवर काळाने घाला घातला. क्रूझर आणि ट्रॅव्हल बस यांच्यात ही समोरासमोर धडक झाली होती. ही धडक इतकी भीषण होती की, क्रूझरमधील २३ पैकी १८ भाविक जागीच ठार झाले. त्यांच्या शरीराचा आणि चेहर्‍याचा अगदी चेंदामेंदा झाला होता. मृतदेह ओळखू येत नव्हते, इतकी भयानकता घटना स्थळावर दिसत होती. वाहनांचा वेग आणि तो नियंत्रणात आणता न आल्याने हा भीषण अपघात घडला. मात्र एका वाहनात किती माणसे कोंबून न्यायची याला काही मर्यादा आहेत. वाहनचालकासह तब्बल २४ माणसे क्रूझरमधून प्रवास करत होती.
     या हृदयद्रावक आणि भीषण घटनेने पून्हा एकदा रस्ते अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक पैसा मिळवण्याच्या नादात खासगी वाहन मालक-चालक अक्षरशः जनावरांसारखे माणसांना गाडीत कोंबून प्रवास करीत असतात. शिवाय वेगाने नेल्यास आणखी एखादी ट्रीप करता येते, या आणखी एका लालसेपोटी वाहने वेगाने चालवतात. एकूण काय , तर लोकांना स्वतःच्या, दुसर्‍याच्या जीवापेक्षा पैसा प्यारा झाला आहे. त्याच्यासाठी 'वाट्टेल ते' करण्याची तयारी आज खासगी वाहतूक करणारे तयार आहेत.
     अशा घटना  माणसाचे मरण स्वस्त असल्याचे  सांगताहेतमाणसाच्या अनमोल आयुष्याची कदर कोणालाच राहिली नाही. ना वाहनमालक अथवा चालकाला ना शासन-प्रशासनाला! लोभापायी ही यंत्रणा बिघडत चालली आहे.  " मनावर ब्रेक, उत्तम ब्रेक" अथवा "अति घाई जीव नेई' अशा सूचनांचा भडीमार  असूनही ना चालक त्याकडे लक्ष देतो, ना प्रवाशी. सगळे वेळेला मागे टाकत पैशाच्या मागे लागले आहेत. अशा वाहनातून प्रवास करणारे प्रवाशीदेखील एसटीपेक्षा कमी पैसे द्यावे लागतात, थोडी फार आपली सोय होते, म्हणून खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. गाणगापूर देवदर्शनाला गेलेले हे सगळे भाविक-प्रवाशी जत व कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विविध ग्रामीण भागातून आलेले होते. याच मार्गावर नियमितपणे वाहतूक करणार्‍या वाहनाचा पर्याय त्यांनी निवडताना आपली सोयच पाहिली होती. मात्र इतक्या अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेत देवाच्या दर्शनाची आस घेतलेल्या या भाविकांना चार पैसे कमी देता येतील आणि जागोजागी गाड्या बदलता येणार नाहीत, आणि वेळेत परत येऊयाचेच समाधान होते.
      पण वेळेवर मात करायची ही कसली  जीवघेणी स्पर्धा म्हणायचीकसला हा बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा म्हणायचा? ज्या जीवाच्या सुखासाठी धावधाव धावायचं आणि तोच जीव असा किड्यामुंग्यांसारखा सहज मृत्यूच्या हवाली करायचा याला काय म्हणायचे?  याचा  विचार का करत  नाही? सोमवारी झालेल्या या अपघातातील क्रूझर चालकाचा आपल्या वाहनावरचा ताबाच सुटला होता. समोरून येणारी ट्रॅव्हल बसदेखील वेगात होती.  खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांही  आपसातील स्पर्धांमुळे वेगावर नियंत्रण ठेवायला तयार नसतात.  त्यात बेदरकार चालकांच्या निष्काळजीपणा अशा अपघाताला कारणीभूत ठरतात.   
    अलिकडे रस्त्यांवरील वाढत्या अपघातांच्या भीषण घटना आपल्याकडे मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणसाचे मरण स्वस्त असल्याचे या घटना सांगताहेत. असे अपघात फक्त वाहन चालक-मालकाच्या किंवा प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होतात, असे नाही. याला   शासन, वाहनमालक, चालक आणि प्रवाशी याचबरोबर आणखीही काहींच्या अप्रत्यक्ष चुका आणि निष्काळजीपणा कारणीभूत  आहेत. अर्थात केवळ या अपघातामध्ये नव्हे तर घडणार्या प्रत्येक अपघाताला अनेकांचा निष्काळजीपणा जबाबदार असतो. चालकांचा निष्काळजीपणा, वाहनांचा प्रचंड वेग, वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष, आपल्याकडील सुमार रस्ते, डागडुजीबद्दल निष्काळजीपणा असे अपघात घडतात आणि यामुळे अशा  अनेक निष्पापांचे   बळी जाताहेत.
    आपल्या देशातल्या  सुमार रस्त्यांचा, डागडुजीबद्दलच्या निष्काळजीपणाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आहे.  महामार्गावरील खड्डे निष्पाप प्रवाशांच्या मृत्यूचे निमंत्रक बनले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम कधीच वेळेवर होत नाही. रस्त्यांच्या कामांच्या दर्जेबाबत तर विचारायची सोयच राहिलेली नाही. एक पावसाळा सुखाने जात नाही. लगेच खड्डे पडलेच म्हणून समजा. रस्ते म्हणजे देशांची वाहिनी आहे. पण त्याकडे कोणीच गांभीर्याने पाहात नाही. टक्केवारीला सोकावलेले लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यामुळे ठेकेदार आपल्या सोयीने रस्त्यांची कामे करतो  त्याला रस्त्याच्या क्वालिटीशी काही देणे-घेणे नसते. त्याचा परिणाम म्हणून जागोजागी खड्डे दिसतात. बरे खड्डे पडले ते पडले,  ते बुजवण्याचे कामही वेळेवर होत नाही. परिणाम काय तर हे असले अपघात दिसत राहतात.
     वाहन चालवण्याला एक मर्यादा आहे. शासनानेही त्याला मर्यादा आखून दिली आहे. साधारणतः द्रुतगती महामार्गावर ८० कि.मी. वेगमर्यादा आहे. पण पाळतो कोण? अशा वेगाचे, कायद्याचे उल्लंघन सतत होत असते. त्याला आवर कधी घातल्याचे ऐकिवात नाही. माणसाने आजच्या घडीला आपल्यापेक्षा वेळेला अधिक महत्त्व दिले आहे. कामाला दिवस पुरत नाही म्हणून रात्रीचाही धावधाव धावतो आहे. अलिकडच्या काळात रात्रीच्या प्रवासाला निघण्याचा ओढा कमालीचा  वाढला आहे. आपल्या देशात सकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान रस्त्यावर जी वाहतूक असते, त्यापेक्षा कमी वाहतूक रात्री असते. मात्र तरीही रात्रीचा अपघात हा दिवसाच्या अपघातापेक्षा आठपटीने जास्त आहे. रस्ता मोकळा आहे, म्हणून चालक भरधाव वाहने चालवित असतात. रात्रीचा काळ वास्तविक निसर्गनियमाने झोपेसाठी राखीव असतो. पण माणूस ही निसर्ग चक्रे आपल्या सोयीनुसार फिरवीत आहेमात्र शरीर आणि मन त्याला साथ द्यायला हवे ना! साथ मिळाली नाही तर अनर्थ घडतोच.
     एक तर अलिकडच्या वीस वर्षात वाहनांची संख्या बेसुमार वाढली आहे. वेळेच्या पुढे जाण्याच्या घाईत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला फाटा दिल्याने रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. गरिबांच्या देशात ही वाहनांची गर्दी सामान्यांच्या मुळावरच उठली आहे. खासगी वाहतूक, बेकायदा वाहतूक वाढली आहे. मर्यादेपेक्षा अधिक माणसे गाडीत अक्षरशः कोंबली जातात. चालकाला वाहन नीट चालवता येत नाही, तरीही गर्दी केली जातेच. चार पैसे जास्त मिळवन्याच्या नादात सगळेच त्याच्या मागे लागले आहेत. अशा वाहतुकीला आळा घालणारी पोलिसी यंत्रणासुद्धा चिरीमिरीसाठी अभय देत राहते.  सगळी दुनिया पैसा खाते. मग मी थोडा खाल्ला म्हणून थोडच आभाळ कोसळणार आहे, अशी या यंत्रणेची  मानसिकता बनली आहे.
     आपल्याकडे आपल्या जीवाची हमी घेणारे  एस.टी. महामंडळ आहे, मात्र या महामंडळांकडील गाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शिवाय सीमाभागात वैगेरे या वाहनांना मर्यादा पडतात. माणसांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात  म्हणावी अशी महामंडळाची वाहतूक यंत्रणा पुरेशी नाही. त्याचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे एकमेकाच्या पायावर पाय ठेऊन , दाटीवाटीने आणि लोंबकळत लोक प्रवास करतात. असा प्रवास नको म्हणून  उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व गरजू प्रवासी खासगी वाहतूकीकडे आपसूकच धाव घेतातखासगी वाहन मालक अशा  प्रवाशांच्या मानसिकतेचा बरोबर फायदा घेतात आणि  त्यांना हवे तसे लुटण्याचा सतत प्रयत्न करतातत्यात खासगी वाहतूकदारांमध्येसुद्दा स्पर्धा प्रचंड वाढली आहे. तू पुढे की मी या नादात आपल्यासह दुसर्याचा जीव धोक्यात घालत आहेत. पैसा मिळवण्याच्या मोहापायी वाहनमालक वाहन फक्त हाकीत असतात. त्याची  देखभाल करत नाहीत. जी रोजीरोटी देते, तिची काळजी घ्यायला हवी, देखभाल करायला हवी. परंतु तसे करताना दिसत नाहीत. निष्काळजीपणा नडतो. . चालकांच्या शारीरिक, मानसिक व परिवहन क्षमतेकडेही काणाडोळा केला जातो.
    प्रवास सुखकर, सुरक्षित व्हावा, यासाठी कायदे करण्यात आले आहेत. त्याचे व्यवस्थितरित्या पालन केल्यास, वेळेपेक्षा जीव महत्त्वाचा मानल्यास आणि  वेळेवर पोहचण्यासाठी थोडे लवकर निघण्याची मानसिकता ठेवल्यास भीषण अपघात टाळता येतील. प्रवासादरम्यान चालकाने मद्यप्राशन करू नये, यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आरटीओ व पोलिसांनी याबाबत दक्ष राहायला हवे. प्रवास सुखकर व्हावा, दळणवळण वाढावे म्हणून रस्ते बांधण्यात आले आहेत, त्यांची वेळचेवेळी दुरुस्ती व्हायला हवीपण विचारात घेतो कोण, असा प्रश्न आहे. ज्यांनी याची काळजी घ्यायला हवी, त्यांना तरी कुठे   सवड आहे?  त्यामुळे फक्त  धावधाव धावण्याच्या स्पर्धेत आजचे अपघात कालचे होऊन जाताहेत.

Saturday, July 20, 2013

बालकथा बक्षीस

     श्रावणपूर गावात एक लाकूड काम करणारा कारागीर राहत होता. त्याचं नाव बुद्धिराम. त्याच्याजवळ एक सुंदर घड्याळ होतं. त्याच्या वडिलांनी एक दिवस आपल्या तिन्ही मुलांना बोलावून घेऊन प्रत्येकाला लाकडी घोडा बनवायला सांगितला होता. सगळ्यात चांगला, सुंदर घोडा बनवल्याबद्दल वडिलांनी बुद्धिरामला घड्याळ दिलं होतं. त्याने ते घड्याळ फार सांभाळून ठेवलं होतं.
     बुद्धिरामलादेखील तीन मुलगे होते. ते ज्या ज्या वेळी एकत्र असत, त्या त्या वेळी आपसात भांडत असत. एके दिवशी भांडण इतके विकोपाला गेले की, त्यांच्यात हाणामारी झाली. थोरल्याने धाकट्याला जोराचे ढकलून दिले. तो दगडावर आपटल्याने डोक्याला मोठी जखम झाली. बुद्धिरामला कळून चुकलं की, आपण याला वेळीच आवर घातला नाही तर पुढे फार मोठे परिणाम भोगावे लागतील.
     एक दिवस त्याने तिघांना लाकडाचे छोटे छोटे तुकडे दिले आणि त्याचे म्हणाला," मी दुकानात जाऊन ये ईपर्यंत जो कोणी सुंदर बदक बनवेल, त्याला आजोबाचे किंमती घड्याळ बक्षीस म्हणून दे ईन." तिघांनाही फार आनंद झाला. थोड्या वेळाने थोरला मधल्या भावाला म्हणाला," बघच, मीच सगळ्यांपेक्षा सुंदर बदक बनवतो." त्यावर मधला म्हणाला," नाही, सगळ्यात सुंदर बदक मीच बनवणार." बघता बघता दोघांमध्ये भांडण लागले. एकमेकांना अद्वातद्वा बोलू लागले.
     बुद्धिराम घरी आला, तेव्हा पाहतो काय तर थोरला आणि मधला मुलगा एकमेकांशी भांडताहेत. धाकटा मन लावून बदक बनवतो आहे. वडिलांना पाहिल्यावर दोघेही गप्प झाले. तो दोघांना म्हणाला," मी तुम्हाला काम सांगितले होते, झाले का?"
     तेव्हा थोरला म्हणाला," बाबा, मी कामच करत होतो, पण हा पहिल्यांदा या मधल्यानेच भाम्डायला सुरूवात केली."
     तेवढ्यात मधे पडत मधला म्हणाला," नाही बाबा, दादानेच भांडणाला सुरूवात केली. मी तर आपला मुकाट्याने काम करत होतो." मग दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागले. आपलेच बरोबर आहे, सांगू लागले. इतक्यात धाकट्याने बदक बनवून बुद्धिरामच्या हातात दिले. बुद्धिरामला तो सुंदर बदक पाहिल्यावर वाटले की, हाच आपला खरा वारस. हाच आपले नाव कमावेल.
     तो दोन्ही मुलांकडे पाहात म्हणाला," आजपासून हे धाकट्याचे झाले. तुम्ही दोघेही सगळा वेळ भांडणात घालवलात. कामावर आपली श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा असेल तर कोणतेही काम सुंदर होतं. तुम्हाला या तुमच्या धाकट्या भावासारखं धैर्यानं काम करायला हवं. तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी हो ऊ शकता."
वडिलांचे हे बोल ऐकल्यावर दोघांच्याही माना खाली झुकल्या. आपली चूक त्यांच्या लक्षात आली.

Friday, July 19, 2013

मध्यान्ह भोजनची ऐशी की तैशी

     खरं तर तामिळनाडूच्या शाळांमधून १९६० मध्ये 'मध्यान्ह भोजन' योजनेला सुरूवात झाली. पण ही योजना १९९५ मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर नेली. या मागे काही हितावह उद्देश होते, विद्यार्थ्यांना मोफत पौष्टीक अन्न मिळावे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृद्धी व्हावी आणि त्यांना शाळेत नियमितपणे येण्यासाठी प्रेरित केलं जावं. केंद्र सरकारची ही योजना अनेक राज्यांनी पैशांची चणचण असल्याचे सांगून गांभिर्याने घेतली नाही. पण २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या चांगल्या योजनेला संपूर्ण देशभर राबवण्याबाबत आदेश दिला.
     तामिळनाडूमध्ये ही 'मध्यान्ह भोजन ' योजना लागू करण्याबाबत त्यावेळी एक मोठी रोचक अशी घटना घडली होती. झालं असं होतं की, १९६० मध्ये के. कामराज त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. एकदा ते एका गावावरून जात असताना त्यांना तिथे काही मुलं गुरे राखत असताना दिसली. त्यांनी त्या मुलांना विचारलं," तुम्ही शाळेला का जात नाही?" त्यातल्याच एका मुलाने पटकन विचारलं," शाळेत गेल्यावर तिथे आम्हाला भोजन मिळेल का? ही गुरं राखल्याने आम्हाला पोटाला काही फार मिळतं." यानंतर कामराज यांनी संपूर्ण राज्यात 'मध्यान्ह भोजन' योजनेची सुरूवात केली.
     या योजनेच्या विस्ताराचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने याच दृष्टीकोनातून दिला होता, गरीब मुलांना पौष्टीक भोजन मिळेल आणि त्यांची कुपोषणातून सुटका होईल. शिवाय शिक्षणाचाही प्रसार होईल.परंतु, आपलं दुर्दैव असं की, ही योजना कितीही चांगली असली तरी ती योग्यरित्या राबवण्यात आली नाही. यातदेखील भ्रष्टाचार शिरला. धान्याच्या गुणवत्तेपासून ते खरेदी करण्यापर्यंत आणि शिजवून वाढण्यापर्यंत भ्रष्टाचार बोकाळला. काही लोकांनी तर पैशांच्या लालचेपायी इतक्या खालच्या स्तराला जाऊन विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा बाजार मांडला.
     आणि परिणाम समोर येऊ लागले, येत आहेत. हा मोठा चिंताजनक प्रश्न असून चरित्र आणि स्वार्थविरहीत कामाबाबत शंका उत्पन्न हो ऊ लागल्या. नि: स्वार्थ विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांचे कृत्य कुठल्याही दृष्टीकोनातून क्षम्य नाही. जरा विचार करा, बिहारमधल्या छापरीच्या मशरकस्थित एका सरकारी शाळेतील मध्यान्ह भोजन खाल्ल्याने २२ विद्यार्थी दगावले. मधुबनीमध्ये ५० मुलं तर गयामध्ये २० मुलं गंभीररित्या आजारी पडली. यातल्या बहुतांश मुलांची वय १०-११ च्या आसपास आहेत. या दुर्घटनेचे योग्यरित्या आकलन केल्यास आपल्याला असं लक्षात ये ईल की, यातून काही कुटुंबांचा वंशच संपला आहे. कारण आजची कौटुंबिक परिस्थिती आणि विचारधारा वेगळी आहे. आजकालच्या लोकांना खंडीभर मुलांची गरज नाही. एक किंवा दोन मुले पुरेत, अशी विचारधारा लोकांची झाली आही. आणि हीच मुले त्यांच्यासाठी जीवापाड  असतात. अशा लाडक्या मुलांना ही माणसं आपल्या लापरवाहीमुळे गमवावी लागत असतील तर यापेक्षा भयंकर गोष्ट कोणती म्हणायची. ही हैवानगी झाली. अशा बेफिकीर वागणुकीला क्षमा करता ये ईल काय? त्यामुळे 'मध्यान्ह भोजन' योजनेच्या सुधारणांचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.
     १२लाख शाळांमधून जवळपास ११ कोटी मुलांना या 'मध्यान्ह भोजन'द्वारा शाळांमध्ये भोजन दिले जाते.मात्र या योजनेद्वारा किती पौष्टीक अन्न मिळते, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. सरकारी शाळांची अवस्था तर फार चिंताजनक आहे. या शाळा भोजनालयात रुपांतरित झाल्या आहेत. पोषण आहार शिजवून देण्यासाठी अथवा धान्यादी मालांसाठी पुरेसा पैसा शासनाकडून उपलब्ध होत नाही. काही शाळांमधून तर शिक्षकांनाच अध्यापनाचे काम सोडून स्वयंपाकाच्या मागे लागावे लागते. तटपुंज्या मानधनावर कोणी महिला अथवा मदतनीस कामाला येत नाही. त्यामुळे शिक्षकांनाच आचारी बनावे लागते. तर काही ठिकाणी याहीपेक्षा वेगळी परिस्थिती दिसून येते.मुलांसाठीचे धान्य थेट शिक्षकांच्या किंवा स्वयंपाक्यांच्या घरात जाऊन पडते. शिवाय त्याला पायदेखील फुटतात आणि ते थेट बाजारात जातात. मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेऊन ही माणसं कसलं पुण्य करताहेत म्हणायचे? स्वतःच्या तुंबड्या भरण्याखेरीज यात दुसरं काय असणार? पुरवठादारदेखील चांगला माल पुरवत नाही. खराब, सडका माल शाळांच्या माथी मारतो. यावर कोणाचेच नियंत्रण नाही.
      बिहार असो किंवा मधुबनी अथवा गया. इथल्या दुर्दैवी घटनांनी अख्खा देश हबकून गेला आहे. आता काही मुलांच्या घरातल्या लोकांनी शाळेतला भात खात जाऊन नकोस. घरातला डबा खात जा, असे आपल्या मुलांना सुनवायला सुरूवात केली आहे. आपल्या एक-दोन मुलांची आपल्यापासून अशी कायमची ताटातूट हो ऊ नये, अशी काळजी वाटणे स्वाभाविक आहे. या घटना घडल्यानंतर देशातली राज्ये खडबडून जागी झाली आहेत. महाराष्ट्रदेखील असाच जागा झाला आहे. शासनाने शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. आठ दिवसात तपासणी करून अहवाल द्यावयाचा आहे. आठ दिवसांत या चौकश्या पूर्ण होतील. पण यातून काही निघणार नाही. कारण हा निव्वळ फार्स आहे. दिखावा आहे. याही अगोदर अशा तपासण्या झाल्या, पण यातून काहीच निष्पण झाले नाही. आता यातूनही काही निष्पण होणार नाही.
     खरे तर 'मध्यान्ह भोजन' योजना फार मोठी आणि चांगली योजना आहे.मात्र त्याची अंमलबजावणी राम भरोसे सुरू आहे. त्यात बर्‍याच चांगल्या सुधारणांची आवश्यकता आहे. या मध्यान्ह योजनेमुळे शालेय कामकाजात बाधा येऊ नये, याचीही काळजी घेतली पाहिजे. काही ठिकाणी शिक्षक फक्त मध्यान्ह भोजन उरकायला शाळेत जातात. त्याच्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडत नाही. शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात ही आणखी एक भर. मध्यान्ह भोजन योजनेला दुसरा चांगला पर्याय शोधला जायला हवा. अलिकडे शासन सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना कपडे, पाठ्यपुस्तके पुरवत असते. हे भोजन देण्यापेक्षा मुलांच्या बँकेच्या खात्यावर थेट अनुदान जमा करायला  हवे.    हुशार मुलांना शिष्यवृत्ती द्यायला हवी. जाण्या-येण्यासाठी सायकली पुरवाव्यात किंवा जाण्या-येण्याचे भाडे द्यावे. जे लोक मध्यान्ह भोजनाच्याबाबतीत बेफिकीरपणे वागतील, त्यांना मोठी शिक्षा किंवा दंड ठोठवायला हवा. मुलांना शाळेची गोडी लागावी, यासाठी आणखी काही उपक्रम आणि योजना राबवायला हव्यात. मुलगा शाळेत आला पाहिजे, रमला पाहिजे, यासाठी त्याच्या राहण्या-खाण्याबाबत दक्ष असायला हवे.पुन्हा अशा घडू नयेत तसेच शाळा, शिक्षणाची बदनामी हो ऊ नये, यासाठी सर्वच स्तरावर काळजी घेतली पाहिजे.     

अतिघाई संकटात नेई!

     एक गरीब लाकूडतोडया आपली पत्नी आणि सात मुलांसोबत एका छोटया गावात राहत होता. घरात अठराविश्व दारिद्रय़ असल्यानं त्याचे दिवस मोठया हलाखीत जात होते. दिवसरात्र काबाडकष्ट करूनही तो मुलाबाळांना पोटभर अन्न देऊ शकत नव्हता. मुलं मोठी होत होती, तशी त्याची परिस्थिती आणखीच बिकट होत चालली होती. कधी कधी त्यांना अन्नही मिळत नव्हतं. त्यामुळे ती वाळलेल्या काटक्यांसारखी दिसू लागली होती. लाकूडतोडयाला त्यांची दशा पाहावत नव्हती.
त्यानं एक दिवस आपल्या पत्नीला सांगितलं, ‘आपली परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. आपल्या मुलांचं संगोपन करण्यासाठी आपण अपुरे पडत आहोत. त्यामुळे त्यांची परवड होण्यापेक्षा सगळ्या मुलांना जंगलात सोडून येऊ. तिथे ते आपल्या जगण्याचा काहीतरी मार्ग शोधतील.लाकूडतोडयाच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू दाटले. पोटच्या पोरांना आपल्यापासून वेगळं करण्याची कल्पनाच तिला सहन होत नव्हती. तिनं त्याला खूप विरोध दर्शवला. पण शेवटी लाकूडतोडयाच्या समजावण्यानं ती तयार झाली. शेवटी ती बिचारी तरी काय करणार? तिचा नाईलाज होता. भुकेनं तडफडून आपल्या डोळ्यांदेखत मुलांचा मृत्यू पाहण्यापेक्षा ती मुलं जंगलात काहीतरी खाऊन जगतील, असं तिला वाटलं.
     लाकूडतोडयाचं आणि त्याच्या पत्नीचं बोलणं थोरला मुलगा सोमनाथ लपून ऐकत होता. सकाळी लाकूडतोडया सातही मुलांना घेऊन जंगलाच्या दिशेनं निघाला. तेव्हा सोमनाथनं आपल्या खिशात पुष्कळसे लाल खडे ठेवले. जंगलात जात असताना सोमनाथ खिशातून एकेक खडा काढून रस्त्यावर टाकू लागला. काही वेळानं लाकूडतोडया दाट जंगलात आला. मी पाणी शोधून आणतोअसं सांगून त्यानं सातही मुलांना एका ठिकाणी थांबायला सांगितलं आणि तो घरी निघून गेला. मात्र तो मनोमनी खूप दु:खी होता. जगण्याचा दुसरा काहीच मार्ग समोर दिसत नसल्यानं अगदी नाखुशीनं तो हे सगळं करत होता.
     सोमनाथ काही वेळानं आपल्या भावंडांबरोबर रस्त्यावर टाकलेल्या लाल खडय़ांच्या मदतीनं पुन्हा घरी आला. लाकूडतोडयाला मुलं घरी आलेली पाहून खूप आश्चार्य वाटलं. शिवाय खूप दु:खही झालं. त्याला काय करावं हे समजेना! त्यानं दुस-या दिवशी पुन्हा मुलांसह जंगलाचा रस्ता धरला. या खेपेला सोमनाथ घाईगडबडीत खिशात लाल खडे ठेवायचं विसरला. त्याला वाटेत एक भाकरीचा तुकडा दिसला. तो त्याचेच तुकडे करून रस्त्यात टाकू लागला. सातही मुलांना जंगलात सोडून लाकूडतोडया माघारी परत आला.
     मागच्या वेळेसारखंच सोमनाथ पुन्हा भावंडांना घेऊन घरचा रस्ता शोधत शोधत माघारी येऊ लागला, पण अचानक तो रस्ता चुकला. कारण रस्त्यात टाकलेले भाकरीचे तुकडे पक्ष्यांनी वेचले होते, त्यामुळे त्याला घरी जाण्याचा रस्ता सापडेना. अशा प्रकारे सातही भावंडं जंगलातच हरवली. पण काही दिवसांनी अचानक एक व्यक्ती लाकूडतोडयाच्या घरी आली. त्यानं फार पूर्वी घेतलेलं पुष्कळ धन लाकूडतोडयाला परत केलं. शिवाय इतके दिवसांचं व्याजही दिलं. आता लाकूडतोडयाच्या घरात सगळं काही होतं, पण त्या पैशांचा आनंद घेण्यासाठी लाकूडतोडयाची मुलं त्याच्यासोबत नव्हती. आता मात्र लाकूडतोडयाला आणि त्याच्या बायकोला आपल्या मुलांची खूप आठवण येऊ लागली. त्यांची उणीव भासू लागली. आपण केलेल्या गोष्टीचा पश्चात्ताप होऊ लागला.
     लाकूडतोडया आणि त्याच्या पत्नीनं आपल्या सातही मुलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण जंगल पालथं घातलं. खूप हिंडले. त्यांना खूप चिंता वाटत होती. पण मुलं काही सापडेनात. शेवटी हताश होऊन ते एका जागी बसले. तोच बाबा तुम्ही कुठे आहात?’ अशी आरोळी त्यांना ऐकू आली. आपल्या मुलांचा आवाज त्यांनी लगेचच ओळखला. धावतच लाकूडतोडया आणि त्याची बायको त्या आवाजाचा मागोवा घेत जाऊ लागले. आणि अखेरीस त्यांची त्यांच्या मुलांशी भेट झाली. लाकूडतोडयाने आपल्या मुलांची माफी मागितली. यापुढे कितीही मोठं संकट आलं तरी तुम्हाला सोडून जाणार नाही, असं वचन दिलं आणि आता सगळं कुटूंब सुखासमाधानाने एकत्र राहू लागलं.
     म्हणूनच मित्रांनो, अतिघाई संकटात नेई असं म्हटलं जातं. आपली सहनशक्ती थोडी वाढवली तर थोडं उशिरा का होईना, पण चांगलं फळ नक्कीच मिळतं.

Friday, June 14, 2013

चोराच्या घरात चोरी

  
   एक चोर होता. त्याचे नाव होते करणकुमार. अनेक वर्ष तो चोरी करत आला
, पण एकदाही सापडला नाही. त्याला खूप वाटायचं, आपण हा धंदा सोडावा आणि मेहनतीचं काम करावं. पण हा त्याचा संकल्प दुस-या दिवसापर्यंतही टिकायचा नाही.
     एका रात्री करणकुमार चोरी करायला बाहेर पडला होता. एका घरात तो अगदी काळजीपूर्वक शिरला. खोलीत दिवा जळत होता. एक माणूस दु:खी मनाने मान खाली घालून चिंताग्रस्त बसला होता. त्याच्यासमोर देवाचा एक सोन्याचा मुकूट आणि दागदागिने पसरलेले होते. करणकुमार माघारी फिरणार, तोच आवाज आला, ‘‘मित्रा ये, आता परत चाललास कुठे? तू चोर ना! चोरी करण्याच्या उद्देशानेच आलास ना?’ करणकुमार जागच्या जागी थबकला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं.
तो माणूस एखाद्या पाहुण्याचं स्वागत करावं, तशाप्रकारे बोलत होता. काहीसा घाबरलेला करणकुमार त्याच्याजवळ जाऊन खाली बसला. तो माणूस म्हणाला, ‘काय नाव तुझं? तुझ्यासारखाच मीदेखील चोर आहे. प्रत्येक वेळेला चोरी केल्यावर विचार करतो की, आता हा चोरीचा धंदा सोडावा. चोरी म्हणजे पाप, अधर्म. कष्टानं कुणी तरी मिळवतं आणि आपण त्याच्याकडून ते लुबाडून नेतो. त्याला अडचणीत टाकतो.’’
      करणकुमार म्हणाला, ‘‘माझं नाव करणकुमार. मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. आपण आपल्या आणि घरच्यांच्या नजरेतून उतरलेले असतो. माझी बायको तर माझा तिरस्कार करते. चोरीच्या वस्तूंना स्पर्शदेखील करत नाही.’’ ‘‘माझं नाव श्रावणकुमार. जरा विचार कर, तो एक श्रावणकुमार होता, ज्याने आपल्या अंध माता-पित्यांची सेवा केली. त्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवून आणली. आणि मी एक असा श्रावणकुमार, जो नालायक आणि अधर्मी. मी मेल्यावर मला नरकातदेखील जागा मिळणार नाही.’’
     ‘‘तू म्हणतोस ते बरोबर आहे, श्रावणकुमार. बरं, तू हे समोर काय घेऊन बसला आहेस? हा सोन्याचा मुकूट आणि ही आभूषणं?’’ करणकुमारने विचारलं. ‘‘अरे मित्रा, आज तर मी करंटेपणाचा कळस केला. मी एका मंदिरात गेलो होतो. तिथे देवाच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने घातले होते. मी मंदिराच्या दाराला लावलेलं कुलूप तोडलं आणि हे सगळे दागिने चोरून घेऊन आलो. आता माझा आत्मा माझा धिक्कार करतो आहे. अरे, देवालाही सोडलं नाहीसहे शब्द घणासारखे माझ्या कानात आदळत आहेत. क्षणभरही माझं मन स्थिर नाही. आता तूच सांग, मी काय करू?’’ श्रावणकुमार दु:खी होऊन म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘माझ्या मते तू देवाची ही सगळी आभूषणं जिथे होती, तिथे ठेवून ये.’’
‘‘पण मला मूर्तीचा शृंगार करता येत नाही. पहिल्यासारखी आभूषणं जिथल्या तिथे कशी बरं चढवता येतील मला?’’ श्रावणकुमार म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. मी या कामात तुला मदत करीन.’’
     दोघेही मुकूट आणि आभूषणं घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिरात पोहोचल्यावर दोघांनीही पाहिलं, पुजारी अजून झोपलेला होता. मंदिरातल्या आभूषणांची चोरी झाल्याची बातमी अजूनही कुणाला कळालेली नव्हती. करणकुमारच्या मदतीने श्रावणकुमारने देवाच्या मूर्तीवर मुकूट आणि इतर आभूषणं जशी होती तशी चढवली. दोघांनीही देवाला हात जोडले. आपल्या वाईट कामाबद्दल क्षमा मागितली आणि देवाला वचन दिलं की, आता यापुढे कधीही चोरी करणार नाही. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीन.
     मंदिराबाहेर आल्यावर श्रावणकुमार म्हणाला, ‘माझ्यावर जे पापाचं ओझं होतं, ते आता दूर झालं आहे. आता मला खूप समाधान मिळतंय.’’‘‘मलादेखील फार बरं वाटतं आहे. कारण ही जी वाईट गोष्ट मी सोडू शकत नव्हतो, ती सोडायला माझं मन तयार झालं आहे. परमेश्वराने आपल्याला सद्बुद्धी दिली आहे. आता मी मेहनत करीन आणि भल्या कामासाठी वेळ देईन.’’
     ‘‘खरंच, प्रामाणिक माणूस म्हणून
     जगण्यात फार मोठा आनंद आहे.’’ असं म्हणून श्रावणकुमारने करणकुमारला अलिंगन दिलं. चोरीचा धंदा सोडून नवं जीवन जगण्याचा संकल्प करून दोघांनेही एकमेकांचा निरोप घेतला.
     त्यानंतर खरोखरच करणकुमार आणि श्रावणकुमार दोघांनी चोरीचा धंदा सोडून दिला आणि छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक व्यवहारामुळे दोघांच्याही धंद्याला चांगली बरकत आली. लवकरच ते शहरातले एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी बनले. आता त्यांना लोक शेठ करणकुमार आणि श्रावणकुमार म्हणून ओळखू लागले.

Wednesday, June 12, 2013

शिक्षकांच्या संघटना एका छताखाली: शिवधनुष्य पेलणे अशक्य

     कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व शिक्षक संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून जाईल तिथे श्री. पाटील आपला मनोदय बोलून दाखवत आहेत. त्यांनी  पुढाकार घेऊन राज्यातल्या शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची पहिली बैठक  दि. १९ जून रोजी मुंबईत बोलावली आहे. यासाठी त्यांनी शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष आणि सचिवांना आमंत्रणे धाडली आहेत. मात्र, शिक्षक संघटनांना एकत्रीकरणाच्या नावाखाली राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या फेडरेशन स्थापनेबाबतच्या आशा धुसर वाटत आहेत.
     अलिकडेच शिक्षकांच्या बदल्यांसंबंधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक  जयंत पाटील यांनी मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील सुमारे २२ संघटनांचे राज्याध्यक्ष व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे फेडरेशन स्थापन करण्याचा विचार बोलून दाखविला. अर्थात गेल्या वर्षभरापासून श्री. पाटील हा आपला मनोदय शिक्षकांच्या विविध व्यासपीठावरून दाखवत आहेत. मुंबईतल्या बैठकीत संघटनांनी फारसा मनावर घेतला नाही. मात्र आता यासाठी खास बैठक बोलवण्यात आल्याने चर्चेला ऊत आला आहे.
सर्व शिक्षक संघटना एकाच छताखाली आल्यास शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतात, असा दावा जयंत पाटील यांनी  केला आहे. त्यानुसार कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत १९ जूनला बैठक बोलवण्यात आली आहे.  मात्र, जयंत पाटील काहीही म्हणत असले तरी त्यांच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नाला राजकीय वास आहे, असे म्हटले जात आहे.
       शिवाजीराव पाटील यांच्या संघटनेच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न अद्याप यशस्वी झाला नसता श्री. पाटील राज्यातल्या सर्वच संघटनांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न अशक्य आहेच, पण त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा महत्त्वाच्या आहेत, असे म्हटले जात आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्त्याखाली शिवाजीराव पाटील यांची शिक्षक संघटना वावरत आहे. हीच संघटना फुटलेली असल्याने त्यांना आगामी निवडणुकीत मोठा धोका दृष्टीस पडत आहे. राज्यात जवळपास तीन लाखावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. यातले सुमारे एक दीड लाख शिक्षक शिक्षक संघाचे म्हणजेच शिवाजीराव पाटलांच्या संघटनेचे सभासद आहेत.उर्वरीत शिक्षक विविध संघटनांमध्ये सामावलेले आहेत.
      राज्यात दहा ते बारा शिक्षक संघटना आहेत.   सध्याच्या घडीला शिवाजीराव पाटलांची संघटना बलाढ्य वाटत असली तरी संभाजी थोरातांनी आपली वेगळी चूल मांडली असल्याने ही संघटना खिळखिळी झाली आहे. ही संघटना एकत्रित करण्याची जबाबदारीही जयंत पाटील यांनी घेतली आणि यासाठी मुंबई, आळंदी, इस्लामपूर आणि कोल्हापूर आदी ठिकाणी फुटीर व शिवाजीराव पाटलांच्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यात त्यांनी राज्य स्तरावरील पदाधिकारी निवडून  काही प्रमाणात  यश मिळवले असले तरी  अद्याप जिल्हा व तालुका पातळीवर या संघटना या तनामनाने एकत्र आल्या नाहीत. अद्याप या निवडी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा शिक्षक संघाची मोट घट्ट बांधावी लागणार आहे. ही प्रक्रिया खोळांबली असताना त्यांनी राज्यातल्या सर्व संघटना एका छताखाली आणण्यासाठी घाई लावली आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, माराठवाड्यात या एकिकरणाला विरोध वाढू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अद्याप याबाबत विरोधाचा उघड सूर निघत नसला तरी खासगीत या एकिकरणाची खिल्लीच उडवली जात आहे.
      एकत्रीकरणाला बव्हंशी शिक्षक संघटनांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या संघटना या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षक संघटनांचे फेडरेशन करून त्याला राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटना आपापल्या स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. संघटनांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्यामागे एकमेव राजकीय कारण असल्याचे म्हटले  जात आहे.  ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना सर्व शिक्षक संघटना शिक्षकांचे नेते म्हणवून घेणार्‍या आमदार शिवाजी पाटील यांच्या अधिपत्याखाली आणायची आहे आणि शिक्षकांचा उपयोग आगामी निवडणुकांसाठी करून घ्यावयाचा आहे. त्यासाठीच हा एकत्रीकरणाचा सारा खटाटोप आहे. शिक्षक संघटना या राजकारणविरहित असून, त्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. सर्व संघटना आपापल्या स्तरावर चांगले काम करत आहेत. त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा कोणालाही अधिकार नाही. फेडरेशन स्थापनेला पूर्णपणे विरोध केला जाईल. शासन आणि संघटना यांच्यात अभद्र युती झाल्यास शिक्षकांचे हित पाहिले जाणार नाही, असा सूर विविध भागातून निघत आहे. जयंत पाटलांनी १९ जूनला मुंबईत बैठक बोलावली  असताना सुमारे २0 संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक दि. १८ जून रोजी पुण्यात होत आहे.  त्यात या एकत्रीकरणाला प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे जयंत पाटलांचे मनसुबे उधळले जाणार अशीच परिस्थिती सध्या तरी उदभवत असल्याचे दिसत आहेत.      

Sunday, June 9, 2013

अंधश्रद्धने केले नुकसान

   
 
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशने विचारलं, ‘बाबा, माझं पेन आणलंत?’ ‘हो, आणलंय’, असं म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढलं आणि आकाशच्या हातात टेकवलं. पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला. तो म्हणाला, ‘हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचं पेन आणायला सांगितलं होतं, तुम्ही हिरव्या रंगाचं आणलंत. निळा रंग यश देतो, माहीत नाही का तुम्हाला?’ त्यावर बाबा चकित होऊन म्हणाले, ‘हे कुणी सांगितलं तुला?’ ‘माझ्या वर्गातल्या नितीनने सांगितलं.

     हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले गुण मिळत नाहीत!आकाशने उत्तर दिलं. आकाश, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगाने काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगलेच गुण मिळतील. बाबांनी समजावलं. पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, ‘आता सगळी दुकानं बंद झाली असतील. आता कोठून आणणार निळ्या रंगाचं पेन?’
     पेन शोधता शोधता बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचं निळ्या रंगाचं पेन मिळालं. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून तो झोपी गेला. पहाटे आईने त्याला उठवलं. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिक आली. तो पुन्हा बिछान्यावर जाऊन झोपला. आईने पुन्हा एकदा त्याला उठायला सांगितलं. आणि ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला.
     ते आकाशला म्हणाले, ‘आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे.तेव्हा आकाश म्हणाला, ‘बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिकलं तर लगेच कामाला सुरुवात करायची नाही.बाबा म्हणाले, ‘अरेव्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे.तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
     परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता. सात वाजता त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनाच्या शोधात आणि आज सकाळी शिकेच्या भानगडीत त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी तशी छान झाली नाही. त्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवलं. एक मोटारसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण आता तिथे ना गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस कधीच निघून गेली होती. पण आकाशला तर शाळेत पोहोचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
     एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक मारली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, ‘बाबा, गाडीचा क्रमांक १३०१ आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुस-या रिक्षाने जाऊ या.
     आकाशचं बोलणं ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, ‘तुझं डोकंबिकं फिरलंय का? कुठल्या अंधश्रद्धेच्या गोष्टी करतोयस तू? आत्ता तुला शाळेत पोहोचणं महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू. आधीच उशीर झाला आहे.पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरं भाडं मिळालं आणि तो निघून गेला. ब-याच उशिराने एक रिक्षा आली. दोघे शाळेत पोहोचले.
     परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. परीक्षा दिली आणि दुपारी शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचं सांगितलं. तेव्हा बाबा म्हणाले, ‘बघितलसं, अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस!आई म्हणाली, ‘ठीक आहे. आता हात-पाय धुऊन घे. काही तरी खा आणि पुढच्या अभ्यासाच्या तयारीला लाग.
     आकाश हात-पाय धुण्यासाठी उठणार तोच, बाबांना शिक आली. बाबा म्हणाले, ‘आकाश, मला शिक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस का?’ ‘नाही बाबा, आता मी या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत.असं म्हणून आकाश अभ्यास करायला बसला