Tuesday, March 24, 2020

जीवनाचा अमृत रस: कांति

कधी कधी असं होतं की, एकाद्या व्यक्तीजवळ बसल्यावर तिथून उठण्याची इच्छाच होत नाही तर कधी  एकाद्याजवळ बसण्याची इच्छाही होत नाही. याचे उत्तर आहे-मनाची भावना. ज्याच्या मनात समष्टीभाव आहे,तो उदारमनाचा असतो. तो दया,करुणा आणि स्नेहाचा प्रतीक असतो. तो कुणाच्या हिताच्या गोष्टींचा विचार करत नाही आणि तसाच तो स्वतः च्या स्वार्थालाही महत्त्व देत नाही.त्याच्या चेहऱ्यावर एक विशेष ओज पाहायला मिळतो. हाच ओज अथवा कांती त्याच्याविषयीच्या विशेष आकर्षणाचा केंद्र बनतो. जसं जसं माणसाचं शुद्ध ज्ञान वाढत जातं, तसं विश्वकल्याणाचा भावदेखील वाढत जातो. त्याच्या कांतीचे क्षेत्रदेखील त्यानुसार वाढत जाते. ज्यावेळेला एकादी व्यक्ती या प्रभावक्षेत्रात प्रवेश करते, तेव्हा ती सहजच आकर्षिली जाते.

आभा-मंडल
प्रत्येक व्यक्तीचे एक आभा-मंडल असते. जे त्या व्यक्तीच्या मनाला सूचना देत राहते. दृष्ट चरित्राचे आभा-मंडल कुठल्या आत्मीयता प्रधान जीवाला आकर्षित करत नाही. हेच आभा-मंडल माणसाच्या मनाचे खुराक बनते, मनाचे पोषण करते, मनाला तुष्ट आणि पुष्ट करते. आज शास्त्रज्ञानी याचा अभ्यास सुरू केला आहे. अनेक संस्था यावर काम करत आहेत. अशी उपकरणे तयार झाली आहेत, ज्यामुळे आभा-मंडल चे चित्र, भिन्न भिन्न अवस्थामध्ये घेतले जाऊ शकते. व्यक्तीच्या मनोभावनांचा अभ्यास केला जात आहे. आपल्या इथल्या ग्रंथांमध्ये सर्वकाही लिहिले आहे,परंतु ते समजून सांगणारा नाही. पण परदेशात त्याचे उत्तर उपलब्ध होत आहेत. आपले जीवन ज्ञान आणि कर्म यांचे संतुलन आहे. कर्मा शिवायचे कोरे ज्ञान विषाचं कार्य करतं. ते कुठल्या परिणाम किंवा उपलब्धीमध्ये परिणत नाही होऊ शकत. ज्ञानाशिवाय केलेले कर्मदेखील व्यक्तीला वासना क्षेत्रात बांधून टाकतं.
व्यक्तीचे पाश वाढत जातात आणि त्याचे पशुत्व बलवान होत राहते. पण ज्ञानयुक्त कर्म व्यक्तीला भावना क्षेत्रात गुंतवून ठेवतं. वासना आणि भावना यांचं समीकरण म्हणजेच जीवन आहे. ज्याप्रकारे शुद्ध कर्मक्षेत्र व्यक्तीला  ओजस्वी बनवतं, त्याचप्रकारे भावनेची शुद्धता, व्यापकता याला कांतीमध्ये परिणत करते. ओजस पराक्रमाचे क्षेत्र आहे, भावनेची प्रबलता आणि शुद्धता (निर्मळता) वीतरागाच्या दिशेने घेऊन जातो.
एक सुभाषित आहे- व्यक्ती जसे खातो,तसे निघते. अंधकाराचे भक्षण करणारा दीपक धूर काढत असतो. याच्या विपरीत ज्याने स्नेहाला जिंकले आहे, वृत्तींना क्षीण केले आहे, ते सदा उदित राहते. भक्तामरचा एक श्लोक आहे ,त्याचे भाशांतर इथे देत आहे- हे प्रभू!तू जगाला प्रकाशित करणारा अलौकिक दीप आहेस. दीप तेल आणि वातीने जळत असतो. आणि त्यातून धूर निघत असतो. तुमच्या अलौकिक दिपकाला ना वातीची गरज असते ना तेलाची. तो निर्धुम आहे. दीपक सीमित क्षेत्र प्रकाशित करतो,पण तुम्ही या परिपूर्ण जगताला प्रकाशित करता. दिव्याला एक हवेचा झोका विझवून टाकू शकतो,परंतु आपल्या अलौकिक दीपकाला पर्वत प्रकम्पित  करणारा प्रलयवानदेखील विझवू शकत नाही.

आंतरिक ज्योत

प्रकाशाचा ज्ञानाशी थेट संबंध आहे. ज्ञानाच्या विकासासाठी प्रकाशाची साधना केली जाते. सूर्योपासनेची परंपरा प्रकाशाची साधना करणाऱ्याच्या अन्तचेतनेला जागृत करते. आचार्य महाप्रज्ञ यांनी आपल्या 'भक्तामर:अन्त:स्तलचा स्पर्श' या ग्रंथात म्हटले आहे- साधना क्षेत्रात साधक आंतरिक ज्योतिच्या जागरणाची साधना करतो. त्याच्या प्रस्फुटनसाठीच तो दिपकच्या ज्योतिकडे ध्यान करतो. मनीची प्रभा, सूर्याची रश्मी अथवा चंद्राचे ध्यान करतो. त्याचे सगळे उपक्रम आपल्या शरीरातल्या ज्योतीला जागवण्यासाठी होत राहतात.
आकर्षण आकृती आणि रंग रूपमध्ये नसते, मनाच्या पवित्रतेत असते. यामुळे आभा-मंडलाची कांती वाढते. यामुळेच मनात शांत रसाची स्थापना होते.
हा एकच रस स्थायी असतो, शेष रस क्षणिक आहे, असं म्हटलं जातं, अल्पकालीन असतं. यानंतर मनातून आवेग, आवेश आणि नकारात्मक भाव लुप्त होतात. नवीन विष निर्माण होत नाही.कांती मंद नाही पडत, उज्ज्वल बनून राहते.
कामना आणि कांती एकाच धातूचे बनले आहेत. शेवटी कांतीचा आधारदेखील मनाची कामनाच आहे, असे व्याकरणकार लिहितात. कामना, भावना, इच्छा एकच आहेत आणि हे मनाचे बीज आहे. मनातच इच्छा निर्माण होते, आपोआप निर्माण होते. तुम्ही इच्छा निर्माण करू शकत नाही. फक्त पूर्ण करू शकता अथवा दाबून ठेवू शकता. भावना आणि कर्म माणसांशी जोडले गेले आहेत.
कर्मयोग,भक्तियोग,ज्ञानयोग आणि बुद्धियोग भावना आणि कर्माच्या विभिन्न समिकरणांना समजण्यासाठी व्यक्तीला मदत करतात. कामना तर शेवटी कर्मात परिवर्तित होते. कर्मासोबत निर्माण होतात राग द्वेष आणि कशाय मनात अंधकार आणि अहंकार निर्माण करतात. शरीरात विष निर्माण करतात. हे तमोगुणी असतात. यांच्यावर विजय मिळवायचा असेल तर धृतीचा विकास केला जातो. धैर्याचा विकास केला जातो. मनाची स्थिरता आणि शक्ती देणाऱया बुद्धीलाच धृती म्हणतात. धृती कांतीचे इंधन बनते.
धृतीसोबत विवेक वाढतो, ज्ञान वाढते, प्रज्ञा जागृत होते. कांती वाढते. धृतीशिवाय माणूस मोठा बनू शकत नाही. सार्थक जीवन यात्रा करू शकत नाही. सुख आणि शांततेचा अनुभव नाही घेऊ शकत. लोकहीत तर त्याचा विषयच बनू शकत नाही.
'वसुधैव कुटुंबकम' चा समष्टी भाव हाच ज्ञानाचा प्रकाश असतो. हीच कांती आहे. या कांतीमुळेच व्यक्तिमत्त्व प्रकाशमान राहते. आणि दुसऱयांनाही प्रकाशमान करण्याची क्षमता प्राप्त होते. हीच कांती ज्ञानाची उपलब्धी आहे, कर्माची परिपक्वता आहे आणि जीवनाचा अमृत रस आहे. (गुलाब कोठारी) अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत

1 comment: