Tuesday, August 18, 2015

महिला नेतृत्व असमानता; भारताच्या माथी लागलेला कलंक


      सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी चाललेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान राजकारणातल्या महिलांच्या सहभागाबाबतच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका सर्व्हेक्षणामुळे तर त्याबाबतची हवा आणखीणच गरम झाली आहे. या सर्व्हेक्षणानुसार राजकारणात महिलांना नेतृत्व देण्याच्याबाबतीत भारत फारच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. सध्याच्या संसदेतील महिलांच्या संख्येच्या आधारावर जगातल्या देशांची एक रँक निश्‍चित करण्यात आली आहे. 189 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक 111 वा आहे. संयुक्त राष्ट्राची भागिदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतर संसदीय संघ (आयपीयू) संस्थेने आपल्या दरवर्षाच्या रिपोर्टनुसार एक रँक बनवली आहे. यात जगातल्या 189 देशांचा समावेश आहे. आपल्या देशातल्या महिलांच्या संसदीय प्रतिनिधींच्या संख्येनुसार देश महिला समानतेबाबत किती मागासलेला आहे, याची प्रचिती येते.   देशातल्या  545 खासदारांच्या लोकसभेत महिला खासदारांच्या संख्येचे प्रमाण 11.4 टक्के आहे. तर  राज्यसभेत हेच प्रमाण फक्त 10.6 आहे. संसदेतले वैश्‍विक स्तरावरील हेच प्रमाण 22 टक्के इतके आहे. अलिकडच्या काळात विश्‍व  स्तरावर संसदेतले महिलांच्या सहभागाचे प्रमाण 1.5 ने वाढले असल्याचे सव्हेक्षण सांगते, हे जरी खरे असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात  मात्र आपल्या देशातले आकडे वेगळेच बोलतात. 4896  खासदार आणि आमदार असलेल्या आपल्या भारतात फक्त 418 महिला  खासदार आणि आमदार आहेत. म्हणजे हे प्रमाण फक्त 9 टक्के इतके आहे.  1952 च्या पहिल्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या फक्त 20 होती.  ती 15 व्या लोकसभेपर्यंत येता येता 59 पर्यंत पोहचली. आतापर्यंतच्या वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही आकडेवारी फारच दीनवाणी आहे. गेल्या सहा दशकांमध्ये महिला खासदारांचे प्रमाण 4.1 पासून 10.9 पर्यंत पोहचले आहे. या नुसार वैश्‍विक स्तराशी तुलना केल्यावर तर आपला देश फारच मागे असल्याचे दिसून येते. आयपीयूच्या यादीत असलेला रवांडा नावाचा छोटासा देश याबाबतीत अग्रस्थानावर आहे. तिथल्या संसदेत 60 टक्के महिला आहेत. हेच प्रमाण अमेरिकेत 20,कॅनडा 29.6, फ्रान्स 22.5 आणि नॉर्वेमध्ये 39.6 इतके आहे.
      आपल्या देशातल्या मतदान प्रक्रियेत जवळजवळ निम्म्याने महिलांचा सहभाग आहे, परंतु राजकारणातला सहभाग त्या प्रमाणात नाही, हे मोठे दुर्दैवी आहे.  संसद किंवा विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक 1996 पासून लटकलेले आहे. राजकारणात महिलांना समान अधिकार देण्याबाबतच्या मुद्द्यावर आपला विचार किती कूपमंडुकीय आहे, हेच दर्शविते. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, आफगाणिस्तान, इटली आणि इराकसह जगभरातल्या शंभराहून अधिक संसदीय सभागृहांमध्ये महिलांसाठी कुठल्या कुठल्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्या देशात 1996 पासून लोकसभेच्या स्थापनेचे  पाच-सहा टप्पे उलटले. पंधरावी लोकसभाही विसर्जित होतेय, तरीही  महिलांसाठीच्या 33 टक्क्याच्या आरक्षणाचे विधेयक काही पारित हो ऊ शकले नाही.
       काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने महिलांची भागिदारी असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे सर्व्हेक्षण केले होते. तिथल्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला होता.  त्यातले निष्कर्ष महिलांसाठी मोठे उत्साहवर्धक आहेत. या कंपन्यांशी संबंधीत असलेल्या गुंतवणूकधारकांना 53 टक्के लाभांश आणि 24 टक्क्यांहून  अधिक विक्रीचा लाभ मिळालेला होता. याच धर्तीवर विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, ज्या देशाच्या संसदीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधिक, त्या देशाची प्रगती  वाखाणण्यासारखी आहे. आपल्या देशातही आता ती वेळ आली आहे.  देशातल्या राजकारण्यांनी किंवा नेतृत्वांनी महिलांविषयीचे धोरण उदार ठेवण्याची गरज आहे.  आज आपल्या देशातल्या एकूण मतदारांपैकी निम्मी संख्या महिलांची आहे. तरीही देशातल्या राजकारणात महिलांचे नेतृत्व कमकूवत होत चालले आहे. सध्या देश निवडणुकीला सामोरा जात आहे. राजकीय पक्षांनी महिलांना पुढे आणण्याच्यादृष्टीकोनातून पावले उचलण्याची गरज आहे.  संसदेत महिलांसाठी  प्रतिनिधीत्व वाढवून वैश्‍विक स्तरावर भारताच्या माथी लागलेला महिला असमानतेचा कलंक पुसून टाकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, पक्ष नेतृत्वांनी पुढे यायला हवे.

पेपरवाला पोर्‍या: सकाळी सकाळी प्रकाश दाखवणारा

     सकाळी ठरल्या वेळेत पेपर आला नाही तर मन अस्वस्थ व्हायला होतं. काही तरी हरवल्यासारखं, राहून गेल्यासारखं होतं. कित्येकदा वृत्तपत्रात वाचण्यासारखं नवीन असं काही नसतंच. टीव्ही, इंटरनेटच्या आजच्या जमान्यात सगळंच अगोदर कळतं. परंतु तरीदेखील वृत्तपत्र वाचण्याची तल्लफ काही जात नाही. तीदेखील एक नशा आहे. दारुड्याला, मावा-गुटखा खाणार्‍याला विचारा, तल्लफ काय असते ती! वृत्तपत्र वाचण्याचीही एक तल्लफ आहे. त्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. अर्थात ती ठरल्या वेळेला मिळायला हवी.    सकाळच्या चहा किंवा नाष्टाबरोबर वृत्तपत्र नसेल तर चहा, नाष्टाचा स्वाददेखील बेचव लागतो. ऋतु कोणताही असो, पावसाळा असो की हिवाळा. पेपरवाला ठरल्यावेळी हमखास येतो. कितीही विपरीत वातावरण असलं तरी त्याचं आगमन त्याच्या निष्ठेला, त्याच्या जबाबदारीला आपलं मन सलाम करायला उठतं.
      जवळजवळ सगळीचं वृत्तपत्रं रात्री उशिराच प्रेसमधून बाहेर पडलेली असतात. आता नव्या तंत्रज्ञानामुळं काही वृत्तपत्रांनी पुरवण्यादेखील नेहमीच्या अंकात समाविष्ठ करून देतात. या अगोदर स्थानिक पुरवण्या, विशेषांक, रविवारसह अन्य विषयांवरच्या पुरवण्या पेपरवाल्या मुलालाच घालाव्या लागत होत्या. अजूनही काही वृत्तपत्र पुरवण्या स्वतंत्ररित्या देतात, तेव्हा या मुलांची दमछाक होते. काही स्थानिक लोक वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा खर्च परवड्त नाही, म्हणून आपल्या संस्थेच्या जाहिरातीच्या पॉंम्लेट वृत्तपत्रात घालायला देतात. चार पैशाच्या आशेपायी ही मुलं तीदेखील कामं न कुरकुरता करतात. ही मुलं आपली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडताना दिसतात.या मुलांचा दिवस पहाटेलाच सुरू होतो. 
      एका मुलाकडे अनेक वृत्तपत्रांची चळत असते. एजंट किंवा मालक आपलं काम करीत असतात. मात्र खरं काम या पेपर वाटणार्‍या मुलांचं आहे. पोस्टमनसारखं जाण्या-येण्याचा एरिया ठरवून त्या विविध वृत्तपत्रांची मांडणी करून सायकलच्या मागच्या कॅरेजला लावतो किंवा पिशवीत सरकावतो. आणि अनेक बातम्यांचं ओझं घेऊन तो सायकलला टांग मारतो. वृत्तपत्रात काय छापलं आहे, हे त्याच्या खिजगणीतही नसतं. ॠायकल चालवता चालवता मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच विचार घुमत असतो. कुणाला कोणतं वृत्तपत्रं द्यायचं आहे, कुणाकडे किती महिन्याचं बील बाकी आहे. तू रोज पेपर टाकत नाहीस, तुला मिळणार नाही, असे ओरडणारी अन्नू आँटीचं काय करायचं. असे एक ना अनेक सवाल, प्रश्‍न  त्याच्या डोक्यात फिरत असतात. टसगल प्लोर घरांमध्ये पेपर वाटणं सोपं असतं, सायकलवर बसल्या-बसल्या पेपर फेकता येतो. पण डबल फ्लोर घरांमध्ये पेपर टाकायचं म्हणजे सायकलला स्टँड लावून वरपर्यंत जावं लागतं. कधी सायकल पडते, मग पुन्हा चळत बांधावी लागते. पहाटेच्यावेळी कुत्र्यांच्या हमला असतोच. कधी कधी पेपरच्या गाड्या वेळेत येत नाहीत. कधी एका वृत्तपत्राची गाडी आलेली असते, तर दुसर्‍या वृत्तपत्राची नाहीच.त्याच्यासाठी मग थांबावं लागतं आणि कस्टमरच्या बोलल्या बोलण्याला सहन करावं लागतं. सारखं बोलून सारवासारव करावी लागते. लोकांना मात्र वेळच्यावेळी पेपर हवा असतो. एवढं सगळं झेलत तो रुटीन पार पाडत असतो.
      वर्षातले बारा महिने एकच काम. त्यात बदल असा नाहीच! मला वाटतं, या पेपरवाल्या पोरांशिवाय आणखी कोणाचं असं ताईट रुटीन नसणार आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकाला वाटत असतं की, सगळ्यात अगोदर वृत्तपत्र आपल्याच हाती पडावं. मोठ्या शहरात तर हीच मुलं अगदी अचूक नेम धरल्यासारखे वृत्तपत्र खालून दुसर्‍या-तिसर्‍या फ्लोरवर टाकत असतात की, ते बरोबर हव्या त्या घरात किंवा दारासमोर जाऊन पडतं.
      सकाळचं वृत्तपत्र आणि त्याचा सुवास हवाहवासा वाटतो. ते हाती पडल्यावर धन्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या पचनक्रियेला खाद्य मिळाल्यासारखं वाटतं आणि तृप्ती झाल्याचंही समाधान वाटतं. सकाळी पेपर वाचायला नाही मिळाला तर दिवसाचा मूडदेखील बिघडून जातो. माझे काही वार्ताहर मित्र तर पहाटे पहाटेच पेपरची वाट पाहात स्टँडच्या एरियात  घुटमळताना पाहिली आहेत. त्यांना तर आपण दिलेली बातमी कशी लागली आहे आणि कुठे लावली आहे, हे पाहण्याची अतुरता असते. असं हे पेपरचं अनोखं वेड आहे.
      घरात आल्यावर मुलाला दिनविशेषचं पान हवं असतं किंवा क्रीडा पान. मुलीला आजचा मेनू काय दिलाय याची उत्सुकता. मग त्या मायलेकीच्या त्यावर गप्पा! सकाळी जरी सगळ्या पानांवर एकदा नजर फिरवली तरी समाधान होतं. नंतर त्या पेपरची पानं कुठे कुठे गेलीत, याची चिंता नसते. त्याची चिंता गृहकुट्उंबाला असते. त्यातून तिला महिन्याच्या रद्दीचे पैसे मिळत असतात. त्यामुळे तिचा पेपर वाचून (की चाळून) झाला की तो घडी घालून रद्दी ठेवण्याच्या जागी व्यवस्थित पडलेला असतो. नंतर दिवसभर त्याच्यकडे बघायचं झालं नसलं तरी दुसर्‍यादिवशीच्या वृत्तपत्राची वाट पाहतच असतो.

बालकथा - गाढव ते गाढवच

       मन्या घुबड उदास असायचा. जंगलात सगळ्यांचे मित्र होते.ते आपसात खेळायचे, हसायचे-खिदळायचे, हुंदडायचे, मिळून खाऊ खायचे. मिळून गाणी गायचे. मोठी धम्माल करायचे. मन्या घुबड मात्र बिलकूल एकटा असायचा. ना मित्र होते, ना नातेवाईक! झाडाच्या उंच फांदीवर आपल्या घरात एकटाच पडून राहायचा. जंगलातल्या दुसर्‍या लोकांना हसताना-खिदळताना पाहून त्याला आणखी वाईट वाटायचे.
       बिचार्‍यानं तरी काय करावं?सगळ्यांसोबत तो खेळू शकत नव्हता. कारण तो दिवसा झोपायचा. तो काही आपल्या मर्जीने झोपायचा नाही , तर निसर्गानंच त्याला असं बनवलं होतं. रात्री सगळे झोपी गेले की, तो जागा व्हायचा. त्यावेळी त्याला वाटायचं, आपणही फांद्या-फांद्यांवर उड्या माराव्यात, झाडाच्या उंच शेंड्यांवर जाऊन मोठ्या मोठ्यानं गावं. रात्रीच्या किर्र वातावरणात त्याचा गाण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या पक्ष्यांच्या घरांच्या बत्त्या उजळायच्या. खिडकीतून डोकी बाहेर काढून सगळे एका दमात ओरडायचे. कोण घुबड रात्रीचं किंचाळतंय?
      तो दबल्या आवाज म्हणायचा, मी घुबडच तर आहे!
 घुबड आहेस ना! मग  गपचिप पहारेदारीच काम कर! ओरडून आमची झोपमोड का करतोस?
 सगळ्यांची बोलणी खाऊन मन्या  आपल्या घरात येऊन गप्प पडायचा.
       एकदा रात्रीच्यावेळी मन्या आपल्या घरट्यात निपचिप पडला होता.रात्री त्याला कशाची भीती वाटत नसे. उलट अंधारात तो अगदी लांबच सहज पाहू शकत होता.त्यारात्री त्यानं पाहिलं की तिकडे लांब झाडं खूप कमी आहेत. आणि शहराकडं जाणारा रस्ताही दिसतो आहे. तिथे कोणी तरी होतं. तो गपचिप झाडावर बसला. पाच-दहा मिनिटे तशीच गेली. मन्या अजूनही तसाच बसला होता. आता मन्याच्या मनात कसलं तरी काहूर उठलं. कोण आहे? कशाला आला आहे? अगोदर असं काही घडलं नव्हतं.का कोणी शिकारी जाळं टाकून सकाळ होण्याची प्रतीक्षा करतो आहे? तो हळूच घराबाहेर आला. तो उडत उडत तिथल्या झाडावर जाऊन बसला. खाली वाकून पाहिल्यावर तो चकीत झाला. कोणी शिकारी-बिकारी नव्हता. गाढव होते.
  गाढव इथे कसे? मन्या पुटपुटला.
 मन्या सगळ्यात खालच्या फांदीवर आला. त्यानं गाढवाला विचारलं, तू इथे काय करतोयस?
 गाढव उठून उभे राहिले आणि म्हणाले, मला इथेदेखील चैन पडत नाही.
      मन्यानं गाढवाकडं निरखून पाहिलं. गाढव खूप उदास दिसत होतं. थकल्यासारखा वाटत होता. त्याला गाढवाविषयी सहानुभूती वाटली. तो प्रेमाने म्हणाला, घाबरू नकोस. मी मन्या. वर पहा मी इथे बसलो आहे.तिकडे नव्हे, इकडे... अरे, बरोबर तुझ्या डोक्यावरच्या फांदीवर. आता सांग, कोण तुला शांतपणे जगू देत नाही.?
      गाढवाने भराभर आपल्या पापण्यांची उघडझाप केली आणि येणार्‍या अश्रूंना मोकळे. थोड्या वेळाने  म्हणाला, तुला काय सांगू? तू  तरी काय करशील?
      कोणाला तरी आपले दु: ख ऐकवले की, मन हलकं होतं... आणि तू जोपर्यंत काही सांगणार नाहीस, तोपर्यंत मी तरी कशी मदत करणार बरं. तसं माझं नाव मन्या. मला आपला मित्र समझ.
      मित्र शब्द ऐकून गाढव खूश झाला. त्याने डोळे गोल गोल फिरवले. लांबसे कान मस्तपैकी हलवले. शेपटी त्याने कितीदा तरी आपटली.
 मला आतापर्यंत कोणी मित्र नव्हता. तू मित्र ना मग माझी परेशानी ऐक.
      गाढवाने सांगायला सुरुवात केली, गावात एक परीट होता. त्याने मला विकत घेतले. त्याच्याजवळ सार्‍या गावाचे कपडे धुवायला येत असत. मळकट कपडे माझावर लादून धुवायला घेऊन जात असे. धुतलेले ओले  कपडे पुन्हा माझ्यावर लादून गावात आणत असे.ओले कपडे घेऊन भरभर  चालू लागलो  नाही तर मला काठीने  पायांवर मारत  असे. ठीक आहे, मारलं तर मारलं . निदान जेवण तर चांगलं द्यावं की नाही? नाही! मला जेवण द्यायचं म्हणजे त्याच्या उरावर ये ई. भुकेमुळे मला रात्री धड झोपही यायची नाही. सकाळी पुन्हा काम सुरू.
      गाढवाने सांगितले, आज रात्री माझ्या खोपटाचा दरवाजा उघडा होता. मी निघून आलो. वाटेत हरभर्‍याचं शेत होतं. मन भरून खाल्लो. खूप मजा आली. मग इकडे आलो. बर्‍याच दिवसांनी पोटभर खाल्लो.
 अरे गड्या,  मीच  एकटा दु:खी आहे, असा समजत होतो. पण तुही दु:खी आहेस. आता  सांग, पुढं काय करायचं ठरवलं आहेस?
 अजून तरी कुठला विचार  केला नाही. परत जायचा तर प्रश्‍नच नाही. काय करू?
 तुला मित्र म्हटलंय तर काही तरी विचार करायलाच हवा. असं कर. आता तू इथे या झाडींच्या मागे झोप. मी विचार करतो. मग सांगेन.
       इथे परटाच्या लाठीची भीती नव्हती. गाढव झुडपाच्या पाठीमागे जाऊन डाराडूर झोपी गेला. दुसर्‍यादिवशी मन्या म्हणाला, मित्रा, काम तर करावंच लागेल. कामाशिवाय दोन-चार दिवस ठीक आहे, पण सारी जिंदगी कशी जगणार?  असं करू, काही दिवस तू इथे राहा. दिवसभर आपण दोघे झोपू. रात्री तू शेतात जाऊन पोटभर खाऊन येत जा. तोपर्यंत  तुझ्यसाठीच्या कामाचा बंदोबस्त करीन. जिथे काम कमी आणि राहण्या-खाण्यासाठी चांगली व्यवस्था असेल, तिथे तू जा. गाढवाला फार आनंद झाला. तीन-चार दिवस त्याने आरामात काढले. गाढव मस्त रमले. त्याची तब्येत अगदी टणटणीत झाली.
      पाचव्या दिवशी मन्या अगदी आनंदाने परतला. मित्रा, फार चांगली नोकरी  मिळाली आहे. उद्या तू कामावर जा. रात्री भेटायला येत जा.   इकडे परटाचे  गाढवावाचून सगळे काम बिघडले. त्याने गाढवाची शोधाशोध केली, पण गाढवाचा पत्ता काही लागला नाही. परीट आता त्याच्या शोधासाठी जंगलाच्या दिशेने येत होता.
      नोकरी मिळ्याल्याचे  ऐकून गाढवाला फार आनंद झाला.  आनंदातच तो उड्या मारु लागला.  आता त्या राक्षस परटापासून मुक्त झालो. आज तर मला गाणं गावंसं वाटू लागलं आहे. असे म्हणच तो आपल्या भसड्या आवाजात गायला लागला.  गप्प गप्प!  मन्या ओरडला. अरे, मोठ्याने ओरडू  नकोस. पण गाढव आपल्याच मस्तीत होता. तो जोरजोरात गातच होता.
 हे तर माझेच गाढव आहे. परटाने त्याला ओळखले.  आणि त्याला काठीने बडवत घराकडे घेऊन चालू लागला.  मन्याने  अफसोसपणे मान हलवली. आणि पुटपुटला, शेवटी गाढव ते गाढवच!
 

Wednesday, August 12, 2015

दप्तराच्या ओझ्याचा विचारचं का करायचा?

     
 मुलांच्या दप्तरांचं ओझं पालकांच्या, शिक्षकांच्या, शाळेच्या, समाजाच्या, मिडियाच्या,शासनाच्या चिंतेचा विषय ठरला आहे.न्यायालयानेही हा विषय मनावर घेतला आहे.  शासनाने हे ओझं कमी करण्याच्या कामी कमिटीही स्थापन केली आहे. त्यांच्या हालचाली चालू आहेत. हे सगळं चाललं असताना काही उपक्रमशील शिक्षकांनी आपापल्या परीनं मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी उपक्रम राबवून हातभार लावत आहेत. शासनाकडे उपक्रम सादर करीत आहेत. आपणदेखील या कामी  हातभार लावावा, असे वाटल्याने मीदेखील  यादृष्टीने शिक्षक, पालक, शिक्षण अधिकारी चर्चा केली. त्यातून काही मुद्दे माझ्यापुढे आले, तेच मी इथे मांडत आहे.
     पूर्वी, अर्थात आमच्या वेळेला एक पाटी, एक पिशवी आणि एक-दोन पुस्तके या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नव्हतं. पुढे शिक्षणाचा प्रसार वाढला.शासनाने मोफत पाठ्यपुस्तके द्यायला सुरवात केली.पालकालाही आपल्या पाल्याला शिकवलं पाहिजे असे वाटायला लागले, त्याला हवी ती गरज पालक पुरवू लागले. खासगी शाळांचा पसारा वाढला, तसा दप्तराचा बोझ्यादेखील वाढला. मात्र ग्रामीण शाळांपेक्षा खासगी शाळांच्या मुलांच्या दप्तराचं ओझं अधिक आहे. मुलांच्या दप्तरात असतं तरी काय पाहू. सर्व विषयांची पुस्तकं,तितक्याचं वह्या,कंपासपेटी,प्रयोग वही, मार्गदशिका(गाईड),जेवणाचा डबा,पाण्याची बाटली, हवामानानुसार छत्री, रेनकोट किंवा छत्री, पी.टी. तासासाठीचे शर्ट-पँट याशिवाय नकळतचं बरंच काही.याच्यानं दप्तर फाटून आतल्या वस्तू बाहेर डोकावू लागल्या. आणि मुलं ती वागवत नेताना झुकू लागले.
      पण दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार केला असता, इतरांशी चर्चा केली असता दप्तराचं ओझं पुष्कळ म्हणजे पुष्कळचं कमी करता येणं शक्य आहे. आमच्या वेळेला आम्ही शिल्लक कोरी पानं काढू त्याचे पायडिंग करायचो. त्याचा विषयासाठी उपयोग करायचे. पण आता तसा उपयोग होताना दिसत नाही. त्याला खर्च योतो. लिहिताना अडचण येते. मुलांनादेखील ते आता आवडत नाही. पण वह्या कमी कशा करता येतील? याला एक उपाय आहे. 1)एक फाईल बनवावी. त्या फाईलमध्ये किमान (जितके  विषय आहेत तितके  ग्रहीत धरून) बारा कागद लावावेत. फाईलमधील कागदांचे विषयांप्रमाणे गट करावेत.प्रत्येक गटावर विषयांचे नाव, प्रकरणाचे नाव, त्याचा क्रमांक आणि तारीख टाकावी.
      2) शाळेला नेताना ही एकच फाईल न्यावी.शाळेत जे लेखन करायचे, ते या फाईलमधील विषयांनुरुप लावलेल्या कागदांमधे करावी. प्रकरण पूर्ण होईपर्यंत तो संच तसाच जवळ ठेवायचा.पूर्ण झाला की, तो पिन लावून वेगळा करायचा.
     3) प्रत्येक विषयांची स्वतंत्र फाईल घरी ठेवावी. फाईलीवर ठळक अक्षरात विषयाचं नाव मोठ्या आणि ठळक अक्षरात लिहावे.प्रकरण किंवा धडा पूर्ण होई तोपर्यंत घरी आल्यावर शाळेत नेलेले कागद त्या त्या विषयाच्या फाईलीत लावावीत.यासाठी पालकांनी मुलांना थोडी फार मदत करावी. यामुळे वह्यांचं ओझं शून्यवत होईल.शेवटपर्यंत फक्त एकच फाईल न्यावी लागेल. घरी आल्यावर त्या त्या विषयांच्या फाईलला कागद लावताना आपोआपच उजळणी होईल.
वह्या आणि पुस्तकांचं ओझं कमी झालं की, दप्तर अगदी हलकं हलकं होईल. मग ओझ्याचा विचारच का करायचा?
     4) फाईली या प्लॅस्टिकच्या, हलक्या आणि आकर्षक वापराव्यात.
     5) पाठ्यपुस्तक मंडळाने दोन सत्रासाठी दोन स्वतंत्र पाठ्यपुस्तके बनवावीत. सध्या पहिली ते चौथीसाठी हा प्रयोग पाठ्यपुस्तक मंडळ वापरत आहे, मात्र बारावीपर्यंत हा प्रयोग राबवायला हवा.
     6) आरटीईनुसार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अनिवार्य आहे. शाळांनी फिल्टरचे पाणी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना घरून पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागणार  नाहीत. आठवीपर्यंत शालेय पोषण आहार शाळांमध्ये उपलब्ध आहे. पुढे हा पोषण आहार दहावीपर्यंत वाढवावा.त्यात आणखी सुधारणा केल्यास मुलांना घरून डबे आणावे लागणार नाहीत.यासाठी पालकांची पालकसभा घेऊन समजावून सांगावे. या गोष्टी पाळल्यास दप्तराचं ओझं वाटणार नाही.


Sunday, August 9, 2015

आम्ही लुटारु


   घटना एक:- राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवाने एका ट्रकचा अपघात झाला.बिचारे ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले.ट्रकमधला तांदुळ आणि डाळ रस्त्यावर इस्तत: पसरला.जवळच एक वस्ती होती.तिथल्या लोकांना अपघाताची वार्ता  कळली आणि त्यांनी पिशव्या भरभरुन डाळ आणि तांदुळ नेला.ड्रायव्हर, क्लिनर ओरडत होते. पण त्यांना त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता.
   घटना दोन:- शेंगदाण्याच्या तेलाचा ट्रक रस्त्यावर पलटी झाला. तेल रस्त्यावरुन  वाहू लागलं.जवळच्या लोकांनी पातेलं, बादल्या भरभरुन तेल आपल्या घरी घेऊन गेले.वाटतं होतं,एवढ्यानं त्यांना सर्व काही मिळून गेलं.
   घटना तीन:- पेट्रोलने गच्च भरलेला टँकर समोरुन येणार्‍या वाहनावर जोरात आदळला.टँकर पलटी झाला. पेट्रोल वाहत जाऊन एका खड्ड्यात जमा झाले.  लोक पेट्रोल बादली बादलीने भरून घेऊ लागले. अक्षरश: लूट माजली. अचानक एका म्हातार्‍याला बीडी ओढण्याची तल्लप झाली. त्याने काडेपेटी पेटवली आणि मोठा स्फोट झाला. किती तरी माणसे आगीच्या लोटात सापडली. काही माणसे जळून मेली. कित्येक माणसे आगीत जखमी झाली.
    घटना चार:- रेल्वेत दरोडा पडला. आरडाओरडा माजला.वाचवणारे कमी आणि लुटणारे जास्त निघाले. लुटालुट झाली. प्रतिकार कारणार्‍यांची हाडे मोकळी केली. काहींना धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले.काहींनी जीव मुठीत घेऊन जवळचे आहे ते देऊन टाकले.
    माफ करा. या सगळ्या घटना आपल्या देशातल्या आहेत. ज्या जनतेला आपण बिच्चारी म्हणतो , तीच जनता लुटारु निघाली. जनताच अशी लुटारु, दरोडेखोर निघाली असेल तर त्यांचा नेता म्हणवणारा कसा असेल? त्यांच्या नेत्यांकडून कोणती अपेक्षा करायची? जसे पुजारी असतात, तसे भगवान असणारच. म्हणतात कि, ज्या देवळातला पुजारी सज्जन असतो, त्या मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. इथले सगळेच लुटीत दंग आहेत. राजा आणि प्रजा. नेता दोन्ही हातांनी लुटत असतो, तेव्हा आपण हाय हाय म्हणून डोकं बडवून घेत असतो.परंतु, जनताच  लुटी करत असेल तर काय म्हणायचे?
    गर्दीचं एक आपलं मनोशास्त्र असतं.गर्दी विचार करत असते,जेव्हा सगळेच लुटतायेत , तेव्हा आपण का मागे राहायचे.सगळे नदीत कचरा वैगेरे टाकून नदी दुषित  करताहेत, तेव्हा आपल्या  एकट्याने घाण न टाकल्याने नदी थोडीच शुद्ध होणार आहे?  एका शिक्षकाला विचारलं,तेव्हा चांगलेच भडक ले. म्हणाले,तुम्हाला मी एकटाच दिसतोय का?सगळी यंत्रणाचा भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे, तेव्हा फक्त शिक्षकांकडूनच कसली आशा बाळगता? आम्हीच का प्रामाणिक राहावं? आम्हादेखील मुलं-बाळं आहेत.
    हीच गोष्ट आम्ही कलमनवीसाला विचारली. तो उसळल्यासारखा म्हणाला,समाज सुधारण्याचा ठेका काय आम्हीच घेतला आहे? पुढार्‍याला विचारलंतर म्हणाला, आम्ही इमानदारीनं वागायला वागलो तर आमची दुकानदारी कशी चालेल? आम्हाला कोण विचारेल?
   चालले आहे तोपर्यंत चालू द्या. आपल्याला काय त्याचं. हीच गोष्ट सगळ्यांच्या तोंडी. मजेशीर गोष्ट अशी अशी की, जे लोक काचेच्या महालात राहतात, तेच लोक दुसर्‍याच्या घरावर दगड फेकताना दिसतात. लुटीच्या दर्येत सगळेच गटांगळ्या खाताहेत. बिचारे प्रामाणिक पाण्यात उतरायला धजावत नाहीत.कारण त्यांना वाटतंय,त्यांचे कपडे कोणी तरी उचलून नेईल. आणि आपल्या नागडं फिरावं लागेल, याची त्यांना धास्ती वाटतेय.                        




Sunday, July 6, 2014

बालकथा महागात पडली ठकबाजी





      राजस्थानातल्या एका गावात रामधन नावाचा शेतकरी राहात होता. तो साधासुधा होता,पण मोठा चतुर होता. गावातल्या कोणाच्यातदेखील  त्याला धोका देण्याची हिंमत नव्हती. त्याच्या गावात पाणी टंचाई होती. साधी विहीरदेखील गावात नव्हती. गाववाल्यांना दूरवरून पाणी आणावे लागे.
      रामधनचे वडील सनकी डोक्याचे होते. ते कोणावरही पटकन विश्‍वास ठेवत. दुसर्‍याचे ऐकून ते आपल्या मुलाबरोबर-रामधनबरोबर भांडायचे.एकदा रामधनचे वडील त्याच्याशी भांडण करून कुठे तरी निघून गेले. आठवडा उलटून गेला तरी ते परत आले नाहीत. रामधनला चिंता वाटायला लागली. त्याने शोधाशोध सुरु केली.
      हिवाळ्याचे दिवस होते. त्याने आपल्यासोबत चार कांबळी घेतल्या आणि आपल्या वडिल्यांच्या शोधासाठी बाहेर पडला. वडिलांचा शोध घेत घेत तो फार लांब आला. एक हिरवगार असं गाव होतं. गावात एक खोल  विहीर होती. तिला बारमाही पाणी असायचं. विहिरीवर एक शेतकरी बैलांच्यासाथीने रर्‍हाट चालवत होता. रर्‍हाटाजवळच त्या शेतकर्‍याचे तीन मित्र गप्पा मारत बसले होते. रर्‍हाट्याच्या मोटेतून येणारं पाणी पाटापाटानं पुढं पुढं जात होतं आणि रान भिजवत होतं. ते पाहाताच रामधनला नवल वाटलं. याआधी कधी त्याने रर्‍हाट पाहिलं नव्हतं. त्याने पहिल्यांदा पाण्यात हात घातला. मग त्याने हात-पाय धुतले आणि पानी प्याला. त्याला तरतरी आली. थकवा पळाला.
       रामधनने शेतकर्‍याला विचारलं, भाऊ, तुमची विहीर तर झक्कासच आहे. पण एक मला कळत नाही. इतकं पाणी भरून देण्याकरता कोण बरं बसलं आहे विहिरीत? त्याला थकवा-बिकवा येत नाही काय?
      रामधनची गोष्ट ऐकून शेतकरी हसला आणि म्हणाला, मोट तुझे वडील भरताहेत. त्यांच्या पाण्यामुळेच तर शेत भिजतं आहे.
      रामधन म्हणाला, असं! माझे वडील इथं आले आहेत! पण भाऊ, या असल्या कडक्याच्या थंडीतदेखील मोटेत पाणी भरताहेत. त्यांना थंड  कशी लागत नाही?
      रामधनची गोष्ट ऐकून पुन्हा एकदा शेतकर्‍याला हसू आलं. जवळच बसलेले त्याचे मित्रदेखील हसू लागले. शेतकरी रामधनला म्हणाला,खरंय, थंड तर वाजतच असेल. जर तुला तुझ्या वडिलांची इतकी काळजी असेल तर त्या कांबळी मला दे.मी त्या त्यांच्याजवळ पोहचवीन.  बाकीचे मित्रदेखील म्हणाले, हो.. हो, कांबळी देऊन टाक.  
      रामधन काही वेळ विचार करत राहिला. मग म्हणाला, हो..हो, तुम्ही बरोबर म्हणता आहात. ही घ्या कांबळी. आणि माझा राम राम सांगा . मी पुन्हा येऊन भेटेन, असे म्हणत त्याने चारी कांबळी देऊन टाकल्या.
      रामधन तिथून निघून जाताच शेतकरी आणि त्याचे मित्र रामधनच्या मूर्खपणावर उशिरापर्यंत हसत राहिले. मित्रांपैकी एकजण म्हणाला, आता या कांबळी आपल्यात वाटून घेतल्या पाहिजेत. शेतकरी लोभी होता. म्हणाला, कांबळी तर मीच घेणार. मीच त्याला माझ्या हुशारीने ठकवलं.
      शेतकर्‍याचे मित्र खवळले. त्यांनी गावातल्या सगळ्यांच ही घटना सांगितली. काही महिने उलटले. शेतकर्‍याच्या शेतातला गहू काढणीला आला होता. भरघोस पीक आलं होतं.शेतकर्‍याचं कुटुंब काढणीत गुंतलं होतं. एक दिवस अचानक रामधन तिथे हजर झाला. शेतकर्‍यानं त्याला ओळखलं. हसत हसतच त्याने विचारलं, काय भाऊ, कसं काय येणं केलंत? तुम्चे वडील तर खूप मजेत आहेत. कांबळी अंगावर ओढून ते विहिरीत आरामात झोपले आहेत. या खेपेला त्यांना द्यायला काय आणलं आहेस?
      रामधन भोळेपणानं म्हणाला, भाऊ, या खेपेला काही द्यायला आलो नही तर न्यायला आलो आहे. गव्हाचं निम्म पीक आणि माझे वडील!
      शेतकरी त्याच्या तोंडाकडेच पाहत राहिला. नंतर स्वत: ला  सावरत म्हणाला, निम्म पीक!ते कसं काय?
      रामधन म्हणाला, भाऊ, माझ्या वडिलांनी अगदी कडाक्याची थंडी असतानादेखील कुडकुडत मोटेत पाणी भरले. त्यामुळेच शेत भिजलं आणि तुम्हीच म्हणाला होतात. आता सांगा, मी अर्ध्या पिकाचा हक्कदार आहे की नाही?
      पण शेतकरी मानायला कुठे तयार होता. तो रामधनला  बरेवाईट बोलू लागला. रामधनने गावातल्या पंचांकडे तक्रार केली.   शेतकर्‍याच्या तिन्ही मित्रांनी त्याचा  बदला घेण्याचे ठरवले. त्याने त्यांना कांबळी दिल्या नव्हत्या. त्याचा राग काढण्याची नामी संधी त्यांना मिळाली होती.
      पंचांनी सगळा प्रकार ऐकून घेतला. मग रामधनला म्हणाले, शेतकर्‍याने तुझी चेष्टा केली होती. अरे, इतक्या मेहनतीच काम  कुठला माणूस करू  शकेल का?
      रामधन सहजपणे म्हणाला, मला काय ठाऊक? मी बापडा साधाभोळा माणूस. माझ्या गावात अशी एकदेखील विहीर नाही. असलं रर्‍हाट कधी पाहिलं नाही. बरे, तुर्तास  याला चेष्टा समजू. पण मग त्यांनी माझ्या कांबळी हडप करताना विचार करायला हवा होता. मी तर यांची गोष्ट खरी समजून बसलो आणि कांबळी दिल्या. आता तुम्हीच मला न्याय द्यावा.
 पंचांनी साक्षीसाठी शेतकर्‍यांच्या मित्रांना बोलावलं. ते संधीचीच वाट पाहात होते. ते तात्काळ म्हणाले, रामधन बरोबर म्हणतो आहे. शेतकर्‍याने खोटे बोलून त्याच्याकडून चार कांबळी हडपल्या आहेत.
      पंचांनी निर्णय दिला, रामधनला शेतकर्‍याने खोटे बोलून ठकवलं आहे. आता याला आपल्या पिकलेल्या गव्हातलं निम्मं धान्य दंड म्हणून द्यावंच लागेल. शिवाय रामधनच्या वडिलांनादेखील याने शोधून त्याच्या ताब्यात द्यावं.
     बिच्चारा शेतकरी पुरता खजिल  झाला.  गावकर्‍यांपुढे त्याचं काही एक चाललं नाही. त्याला अर्धं पीक रामधनला द्यावं लागलं. पण त्याच्या वडिलांना कोठून शोधून आणणार? तो रामधनला म्हणाला, भाऊ, अर्धे पीक घेतलं आहेस. आता तरी मला माफ कर. मी तुझ्या वडिलांना कोठून शोधून आणू? मी तर त्यांना ओळखतदेखील नाही. वाटल्यास, दुसरे काही तरी दंड म्हणून घे.
      हे  ऐकून रामधनला हसू आलं, बास, हारलास? स्वत: ला मोठा हुशार समजत होतास. जा, माफ केलं.माझे वडील घरी परतले आहेत. पण लक्षात ठेव, पुन्हा कधी कुणाला ठकवलं तर आख्खं पीक गमावून बसशील. असे म्हणून तो घराच्या वाटेला लागला.
                                                                                          करी पुरता खजिल  झाला. ात द्यावं.ा याला आपल्या पिकलेल्या गव्हातलं निम्म धान्य दंड म्हणून द्यावंच लागेल. शिवाय रामधनच्या उ 
 
 

मोदींना सगळे का घाबरत आहेत?




      भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सभांना लोक ज्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येने उपस्थितीत दाखवत आहेत, ते पाहून काही तथाकथित सेक्युलर पक्षांमध्ये अस्वस्थता आणि भितीचे वातावरण पसरले आहे. खासकरून राजकारणाला धंद्याचे स्वरुप देणारे भ्रष्ट  नेते आणि भारताला केवळ बाजारपेठ समजल्या जाणारे देश  पुरते घाबरले आहेत. यामुळेच ते मोदींना रोखण्यासाठी एकवटले आहेत. कोण त्यांची जात विचारतो आहे, तर कोण माणुसकीचे धडे द्यायला लागले आहेत. कोण म्हणतो आहे, मोदींना मत देणार्‍यांना समुद्रात बुडवायले हवे. कॉंग्रेसची मंडळीदेखील भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी तिसर्‍या आघाडीला समर्थन देण्याची किंवा घेण्याची भाषा करीत आहेत. याचा सरळ अर्थ असा निघतो की, त्यांना त्यांचा पराभव समोर दिसतो आहे. यामुळे ते एका बाजूला मोदींच्या विकासाच्या दाव्यांना खोटे सिद्ध करण्याच्या खटपटीला लागले आहेत तर दुसर्‍या बाजूला तिसर्‍या आघाडीत सामिल हो ऊन सत्ता स्थापन्याची भाषा करत आहेत. तिकडे अमेरिका, ब्रिटन आणि चीनसारख्या जगातल्या अनेक देशांना भारताच्या पंतप्रधानपदी मोदींसारखा खमक्या , दूरदेशी आणि स्वत:च्या निर्णयावर ठाम असणारा नेता नको आहे. या देशांना भारत समृद्ध, विकसित आणि आत्मनिर्भर व्हावा, अशी इच्छाच नाही. भारताने सतत आपल्या आश्रयाखालीच राहिले पाहिजे, भारताची गंगाजळी बाजारपेठच्यानिमित्ताने आपल्याच देशाला मिळायला पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे.
      त्यामुळेच आज तमाम देशी, विदेशी शक्ती, आतंकवादी यांच्या निशाण्यावर पहिल्या क्रमांकावर मोदी आहेत. त्यांची वाढत चाललेली लोकप्रियता त्यांच्यासाठी धोकादायक ठरली आहे. आतंकवाद्यांनादेखील भारतात  त्यांच्या कारवायांना लगाम घालू शकणारे मजबूत आणि स्थीर सरकार नको आहे.  मोदी आजच्या घडीला देशातले सर्वात लोकप्रिय जननेता आहेत.देशातल्या करोडो लोकांच्या आशा-आकांक्षाचे ते प्रतीक बनले आहेत. देशात नवे सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी विद्यमान कॉंग्रेस व आघाडी सरकारची आहे. खासकरून भारतीय संविधानाप्रती ज्यांची खरी निष्ठा आहे, त्या नोकरशाहीची आणि प्रशासन यंत्रणीची ही जबाबदारी आहे. मोदींना पुरेशी सुरक्षा यंत्रणा मिळायला हवी.
      लोकशाहीत जनतेचा खरा नायक तोच असतो, जो आम जनतेच्या आशा- आकांक्षांप्रती खरा उतरण्याची क्षमता राखतो. पाटण्याच्या रॅलीत बॉंबस्ङ्गोट हो ऊनदेखील लोक आपल्या नेत्याचे भाषण ऐकण्यास उत्सुक होते. वाराणशीच्या मोदींच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी जनतेच्या उपस्थितीचे  जे विराट दर्शन झाले, त्यामुळे या गोष्टीला पुष्ठीच मिळते. यादृष्टीने म्हटले तर मोंदी यांनी सर्वच राजकीय नेत्यांना केव्हाच मागे टाकले आहे. गरीब जनता त्याच त्याच खड्ड्यात बिचत राहिली आहे, त्यांची कुचेष्टा चालवली गेली आहे. आता शेतकरी, मजुरांना मोदींच्या माध्यमातून आपल्या अस्तित्वाची जाणीव हो ऊ लागली आहे. देशातल्या संसाधनांवर पहिला हक्क गरिबांचा आहे, असेही ते म्हणतात.
      आतापर्यंतच्या तमाम भाषणांमध्ये मोदी यांनी भ्रष्टाचार आणि आतंकवादाविरोधात आपण कडक भूमिका घेऊ, असेच सांगितले आहे. यामुळे वेळोवेळी मोदींवर आगपाखड करणारे भ्रष्ट आणि बेमान नेतेदेखील घाबरले आहेत. आम्ही हिंदू असू किंवा मुसलमान असू पण हा देश प्रत्येक त्या  नागरिकाचा आहे, जो सर्वात अगोदर भारतीय आहे. भ्रष्टाचार, आतंकवाद आणि नक्षलवाद ही आपल्या देशासमोरील  सर्वात मोठी आव्हानं आहेत. या सगळ्यांशी सामना आपण सगळे भारतीय मिळून करू शकतो. अल्पसंख्यांकादेखील कोणत्याही प्रकारची आशंका असण्याचं कारण नाही, असंही मोदींनी स्पष्ट केलं आहे. ज्याप्रकारे त्यांनी संपूर्ण गुजरातचा विकास केला आहे, त्याचप्रकारे देशातल्या सव्वाशे कोटी भारतीयांचा विकास हे त्यांचे लक्ष्य आहे. देशाने सोनिया, राहूल, मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारचा कारभार पाहिला आहे. त्यात घोटाळे, महागाई, भ्रष्टाचार, घराणेशाही, दरबारी संस्कृतीशिवाय काही पाहायला मिळाले नाही. काही चांगले कायदे बनवले गेले, पण त्यांची अंमलबजावणी किती प्रामाणिकपणे केली गेली, याचा विचार करण्याची गोष्ट आहे.
      मोदींनी कॉरपोरेट घराण्यांना लाभ मिळवून दिला, असा आरोप कॉंग्रेस करत आहे. मात्र याच नीतीच्या आधारावर कॉंग्रेस गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ राज्य करत आहे. आर्थिक सुधारणा मोठ्या साम्राज्यशहांना लक्षात ठेवून केल्या गेल्या, यात तीळमात्र शंका नाही. याचे जनक डॉ. मनमोहनसिंह आणि पी. व्ही. नरसिंहरावसारखे कॉंग्रेस नेतेच आहेत.  आर्थिक सुधारणांची ही नवी नीती आंतरराष्ट्रीय मुद्राकोष, जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटनांद्वारा निर्देशित केली जाते. याच नीतींवर आपला देश चालला आहे. आमचा व्यापार कसा असावा, हे जागतिक व्यापार संघटनेवर आधारलेली आहे. आपली अर्थ व्यवस्थेचा पायादेखील जागतिक बँकेवर अवलंबून आहे. आपल्याला कोळसा खरेदी करायचा असेल तर ङ्गक्त त्यासंबंधीच्याच अटी आपल्याला मानाव्या लागत नाहीत तर आणखीही काही अटींना आधिन व्हावे लागते. यामुळेच आपल्या देशात विषमता वाढत आहे. या नीती-कायद्यांना बदलवण्याचे काम केवळ एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करता येत नाही. यात सुधारणा किंवा रद्दबातल ङ्गक्त केंद्र सरकारच करू शकते.  आपल्याला अशा कायद्याची-नीती-नियमांची आवश्यकता आहे, ज्यामुळे आपल्या देशातल्या उद्योगधंद्यांना चालना मिळाली पाहिजे, विदेशी व्यापार वाढवून लाभ मिळाला पाहिजे. हीच गोष्ट मोदी सांगताहेत. सध्या गुजरातेत 24 तास विज उपलब्ध आहे. जास्तीत जास्त उद्योगधंद्यांना आपल्या राज्यात बोलावून रोजगार वाढवला आहे. एका सरकारी आकड्यांनुसार जर देशात शंभर लोकांचा रोजगार मिळाला तर त्यातल्या 72 नोकर्‍या एकटा गुजरात देतो. कृषी क्षेत्रातदेखील गुजरातने प्रगती केली आहे.
      आपल्या देशात प्राकृतिक आणि मानवी संसधनांची कमतरता नाही. आपल्याजवळ जगापेक्षा अधिक पिकाऊ जमीन आहे. कोळसा, लोखंड, अभ्रक, ऍल्युमिनिअम, थेरियमसारख्या प्राकृतिक संसाधनांची कमतरता नाही. देशात मनुष्यबळही काही कमी नाही. आज आपल्याला अशा एका दृढसंकल्पवाल्या दूरदर्शी नेत्याची आवश्यकता आहे. जो, आपल्या सव्वाशे कोटी लोकांच्या शक्तीला कार्यशक्तीत (वर्कङ्गोर्स)बदलू शकेल. देशातली विशाल जनशक्ती अजूनही झोपलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना जागे करून देशाच्या नवनिर्मितीला लावू शकतो.  अशा नेत्याची देशाला आवश्यकता आहे. मोदींमध्ये हे गुण सारी जनता पाहत आहे. मग यात चूक काय आहे?