Tuesday, August 18, 2015

प्रदुषित वसुंधरेला वाचवण्यासाठी आता प्राचीन परंपरांचाच आधार

      मही,पृथ्वी,वसुधा,देवी, धरा, वसुंधरा, धरणी, अवनी, भूमी, क्षमा,क्षीति अशी किती तरी नावं आहेत आपल्या पृथ्वीची! संस्कृत, मराठी, हिंदीसह  अनेक भाषांमध्ये या वसुंधरेला तब्बल 32 हून अधिक नावं आहेत. तिच्या प्रत्येक नावांमध्ये तिच्या  विशिष्ट विशेषता दडल्या आहेत. आपल्या सूर्यमालेतला  एकमेव असा गृह आहे, ज्यावर जीवन विद्यमान आहे.त्यामुळे या गृहाला जिवंत गृह (लिविंग प्लॅनेट) देखील म्हणतात. या प्राणवंत गृहाचे इको सिस्टीम म्हणजे इथले सगळे जीव-जंतू आणि झाडं -वेली इथे उगवतात, जन्माला येतात. वाढतात आणि जिवंत राहू शकतात. ही पृथ्वी आपल्याला जन्म देते, सांभाळते,पोसते. इतकेच नव्हे तर  शारिरीक आणि मानसिक विकासाबरोबरच आपल्याला आध्यात्मिक उत्कर्षाची भाव-भूमीदेखील प्रदान करते. आपल्या सभ्यतेची, आपल्या  संस्कृतीची आधारवडदेखील हीच आहे. आपल्या ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञानाच्या विकासाचा  पायादेखील हीच आहे. आपली निरंतर वाढणारी लोकसंख्येलादेखील आधार देण्याचं काम हीच देते. विशेष म्हणजे आपल्या वाईट-साईट कृत्यांचा भारदेखील हीच सोसते.  अशा मंगलमय पृथ्वीला आपल्या भारतीय ऋषींनी माता म्हणून सन्मान दिला आहे. हिच्या सगळ्या रुपांची स्तुती, प्रार्थना या आदरणीय मंडळींनी केली आहे.
 वसुंधरा दिवस मानण्याची गरज
       संयुक्त राष्ट्र संघाने 1970 मध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिवस जाहीर केला. मात्र प्रारंभी 20 मार्च रोजी हा दिवस मानण्यत आला. कारण या दिवशी दिवस रात्र समान असतात. पण नंतर 22 एप्रिल दिवस निवडला गेला. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, वसुंधरा दिवस साजरा करण्याचे कारण काय? वास्तविक या भूमीवर किंवा पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व जवळजवळ 10 लाख वर्षांपासून आहे. मात्र आपण आपल्या हुशारीमुळे, तंत्रज्ञानामुळे केवळ 4-5 हजार वर्षांपूर्वीचा अभ्यास करू शकलो आहे. पण या कालावधीत मानवाने जैवमंडळाच्या वातावरणात अनेक प्रतिकूल गोष्टी केल्या आहेत. अर्थात मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी या गोष्टी केल्या, मात्र त्याची सजा मात्र वसुंधरेला भोगावी लागत आहे. आपल्याला आवश्यक असणार्‍या जल, वायू, मृदा या सगळ्यांना आपण प्रदूषित करून टाकले आहे. त्यामुळे जगभरातल्या लोकांमध्ये जागृती पोहचवण्यासाठी वसुंधरा वाचवा अर्थात सेव अर्थ ची घोषणा द्यावी लागली. भारतातले बरेचशी माणसं, संस्था संयुक्त राष्ट्र संघाच्या या हेल्प, सेव, प्रोटेक्ट अर्थ घोषणेनुसार काम करताना दिसतात. 2014 ची थीम आहे- झाडं लावा,आपलं घर स्वच्छ ठेवा, जलवायू परिवर्तन समजून घ्या आणि भविष्यात पृथ्वी वाचेल, अशा तंत्रज्ञानाचा शोध घ्या, विचार करा. केरकचरा कसा नष्ट करता ये ईल, असे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या दृष्टीने पावले उचला. जेणेकरून पृथ्वीचे संरक्षण होईल.
 मगच सुरक्षित राहील वसुंधरा
      आता विचार करण्याजोगाप्रश्‍न म्हणजे केवळ एक दिवस वसुंधरा दिवस साजरा करून किंवा सप्ताह साजरा करून आपण काय विशेष मिळवणार आहोत? केवळ ङ्क झाडे लावा, झाडे जगवा. एक मूल एक झाड.हिरवीगार भूमी, ग्रीन धरतीङ्ख अशा घोषणा देऊन काय उपयोग होणार आहे? आपल्या फक्त एक दिवस नव्हे तर दररोज, वर्षभर वसुंधरा दिवस साजरा करावा लागणार आहे.प्रत्येक दिवस पृथ्वी दिवस असावा, हेच सांगून, हेच ऐकून आणि याचसाठी जागरूक राहून   काम करावम लागणार आहे. पृथ्वी वाचवा, असं म्हणण्याचं हे आधुनिक रुप असलं तरी आपल्या ऋषीमंडळींनी, संतमंतांनी आपल्या दूरदृष्टीने अगोदरच याबाबत लिहून ठेवलं आहे. त्यांना याचा धोका कळला होता.
 पृथ्वीवरील जीव-जंतू, झाडं-लता,वेली एकमेकाला पूरक आहेत. झाडं-वेली जसं आपल्याला जगवतात, तसं आपणदेखील त्यांना जगवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात- जो खांडावया घावो घाली। कां लावणी जयानें केली। दोघां एकचि सावली। वृक्ष दे जैसा॥तर संत एकनाथ म्हणतात- अतिथी आलिया वृक्षापासी। पत्र पुष फळ मूळ छायेसी। त्वचा काष्टासी देतसे॥तैसा वृक्ष समूळ सगळा। आर्थिया लागी सार्थक झाला॥
 जे वृक्ष लावतात, त्यांच्यावर कायमस्वरुपी निसर्गाचे छत्र लाभते असा संदेश देणारे संत एकनाथ जे वृक्ष लाविती सर्वकाळ। तयावरी छत्राचे झल्लाळ  ॥असे म्हणतात.संत तुकाराम वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें। म्हणतात.इतकेच नव्हे तर संत रामदासांनी नाना वल्लीमध्ये जीवन। नाना फळीं-फुलीं जीवन॥ म्हटले आहे.
      आपण मात्र पार उलटे वागत आहोत. पाश्‍चात उपभोगक्तावादाच्या दलदलीत सापडून आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जात आपण आपल्या धरती मातेला विसरून गेलो आहोत. प्रसिद्ध हिंदी कवी रमेश रंजक यांच्या धरती का गीत कवितेतल्या काही ओळी अशा आहेत- हे म्हारी धरती परी है बीमार/ दवाई-दारू कौन करें/ जो आवै/ सो रोग बतावै/ करै न कछू निदान।
  खरोखरच आपली धरती रोगग्रस्त बनली आहे. तिच्या रोगाचे निदान करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्याला जर स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या धरतीचा जीव वाचवला पाहिजे. कारण जसं धर्म रक्षति रक्षित:।  धर्माची रक्षण केले तर तो आपली रक्षा करेल, तसं पृथ्वीचे रक्षण केले तरच ती आपलं रक्षण करेल.
 वैदिक संस्कृतीपासून घ्या प्रेरणा
       पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्राचीन उदात्त परंपरांचा, ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल. यातूनच आपल्याला सतत जागृतीचा मंत्र मिळतो. आठवा तो आवतार युग- ज्यावेळेला धरती दानवांच्या त्रासाला-जाचाला कंटाळून गो-रुप धारण करून मला वाचवा अशी आर्त विनंती करणारं पत्र ब्रम्ह लोकांत पाठवते.तेव्हा ब्रम्हदेव विष्णूदेवाला कधी राम रुपात तर कधी कृष्ण रुपात धरतीवर पाठवतो. आजच्या युगातली आव्हानं तर विचित्रच आहेत. आज प्रदुषणाच्या महाराक्षसाने आपल्या आक्टोपसीय क्षृंखलेने धरतीला पार जखडून ठेवलं आहे.  ती सुटकेसाठी धडपडते आहे.  पर्यावरणाचे संरक्षण करून आवताराने अरण्य संस्क्रती वाचवली. कालिया नागाला मारून जलप्रदूषणापासून दूर केलं. गोसंस्कृतीचे रक्षण केलं. तसे भगिरथ प्रयत्न आज कोठे दिसून येत नाही. आज गरज आहे ती, प्रत्येक माणसाच्या मनात  अंगी रामावतार, कृष्णावतार प्रकट होण्याची. तरच वसुंधरा प्रदूषणमुक्त होईल. राम आणि कृष्ण की ज्यांची प्रेरणा म्हणजे वैदिक ज्ञान होतं. त्यातून त्यांना धरतीच्या कल्याणाच्या जागृतीचा  मूलमंत्र मिळत होता. आपण ज्या मंत्रा-मंत्रांमध्ये आध्यात्मिक्तेबरोबरच आपल्या वसुंधरेला वाचवण्याचे संकेत सूत्र प्राप्त होतात, त्या वेदमंत्रांकडे परतायला हवं. ही सूत्रं आजदेखील तितकीच प्रासंगिक आहेत, जितकी त्यावेळी होती. त्यांची सार्वभौमिकता हीच त्यांची विशेषता आहे. आणि त्या मंत्रांचे अभिप्राय आपल्या दैंनदिन जीवनातल्या अगदी बारीक-सारीक प्रक्रियांमध्ये , छोट्या-छोट्या कार्यांमध्ये व्यक्त हो ऊन आपल्या जीवनात  अशाप्रकारे सामावले आहेत की, त्यांना विसरणं कठीण हो ऊन जातं. आजही कही माणसं अशी आहेत की, आपल्या जीवनाचा आधार असलेल्या  क्षमाशील वसुंधरेची धरतीवरती पाय ठेवण्या अगोदर क्षमा मागतात.    समुद्र वसने देवि। पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नि। नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे।
 मनुष्य स्वत: इतका नम्र हो ऊन धरतीवर पाय ठेवण्यासाठीदेखील तिची क्षमा मागतो.  जगातल्या कुठल्याच संस्कृतीत अशी संवेदनशीलता सापडणार नाही. हीच संवेदनशीलता आपल्याला वैदिक काळापासून धरती किंवा तिजवरील विद्यमान कोणत्याही तत्त्व, वृक्ष, जल, वनस्पती आदींची हिंसा करण्यापासून परावृत्त करते. कोणत्या ना कोणत्या रुपात आजदेखील पृथ्वीप्रती सन्मान , आदरभाव, तिला देवी मानण्याची भावना जागृत आहे. म्हणूनच प्रत्येक घराच्या, दुकानाच्या किंवा अन्य कुठल्या प्रतिष्ठानचा पाया खोदताना भूमिपुजनाची उदात्त परंपरा आजही सांभाळली जाते.
 वसुधैव कुटुंबकम
      अथर्वेदाचं पृथ्वी सूक्त तर एकप्रकारे पर्यावरण संरक्षण किंवा पृथ्वी वाचवा मोहिमेचा दस्तावेजच आहे.याच्या 63 मंत्रांमधे जे स्तवन आहे,ते विलक्षण म्हणावे लागेल. यातले आणखी एक वर्णित तथ्य भूशास्त्रज्ञांच्या संशोधनाशी मेळ खातं, तर दुसर्‍या बाजूला या प्राणवंत भूमातेची अनंत अनंत अशा विशेषता अधोरेखित केल्या आहेत. संपूर्ण भौगोलिक, राजनैतिक, आणि राष्ट्रीय सीमांपलिकडे आणि पर्वत, समुद्र, वनप्रदेश आणि काळमर्यादा यापलिकडेही भूमीची वंदना, प्रेमपूर्ण स्तुती आणि तिच्या सतत रक्षणाच्या मौलिक सूत्रांचे विधान करणं हेच या संपूर्ण सुक्ताचं विशेष आहे. वास्तविक वैदिक संस्कृतीच्या दृष्टीने संपूर्ण पृथ्वी एक आहे. त्यावर निवास करणारा संपूर्ण प्राणी  एक आहे. त्यातलेच आपण मनुष्य लोक सर्वश्रेष्ठ आणि विवेकशील प्राणी आहोत. त्यामुळे या धरेच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर येते. याचाच अर्थ असा की, या पृथ्वीतलावरील अन्य प्राणी, जीव-जंतू आणि झाडं-वेली यांनादेखील इथे राहण्याचा अधिकार आहे. आमचा लोभ, आमचा मूड, आमचा अविवेक अनेक जाती-प्रजाती लुप्त करत आहे. म्हणजेच आपल्या धरतीचे सर्वांग सौंदर्य आपण नष्ट करत चाललो आहोत. या धरतीचे सौंदर्य पुन्हा खुलवण्याची जबाबदारी आपली आहे. हे केव्हा करू तर आपण वैदिक ऋषी अथर्वा यांच्या सुरात सूर मिसळू पाहू तेव्हा!
      माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या:   अर्थात माता भूमी आहे, आणि मी तिचा पुत्र आहे.  एक अनुभूत सत्य असे की,  आईचे आपल्या मुलाशी एक अतूट नाते असते. परंतु, अथर्ववेदाचा ऋषी राष्ट्रीय प्रेमापुरता मर्यादित राहत नाही. तो वसुधैव कुटुंबकम च्या सिद्धांताला मान्यता देतो. पुत्राची जबाबदारी आपल्या धरतीला कोणताच त्रास होता कामा नये, यासाठी प्रयत्नशील राहणे. पण आज आपण कुपुत्राच्या श्रेणीत जाऊन पोहोचलो आहोत. तिचा विध्वंस करायला टपलो आहोत. तिला कुरुप करतो आहोत. स्नेह-भाव हो ऊन आणि संवेदनशीलता कायम ठेवूनच पृथ्वीला  वाचवू शकू. छर्यावरणाची कोठली समस्या असो किंवा जैवमंडल असंतुलन कारण असो सगळ्या मुळाशी मनुष्याच्या मनातल्या इच्छा, त्याच्या आकांक्षा, त्याचा लोभ, त्याचा मोह आहे.
 तरच सुरक्षित राहील पृथ्वी
       आधुनिक काळात प्राचीन परंपरांच्या उदात्त रुपांची स्वीकृती करताना आम्हाला आधुनिक संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारावर पृथ्वीवर व्यापलेले सर्वप्रकारचे प्रदूषण दूर करण्याचा संकल्प सोडला पाहिजे.  कचर्‍याचा निपटारा ही आजच्या युगातली सर्वात मोठी समस्या आहे. त्यातल्या त्यात ई-कचरा मोठा धोकादायक आहे. आपल्या गरजेसाठी आपण वनाच्या चादरीचे तुकडे करतो आहोत. वृक्षारोपणाला धर्माचे अंग मानत चाललो तरच हिरव्यागार पृथ्वीचे स्वप्न साकार होईल. ऊर्जेचे नवे-नवे पर्याय शोधावे लागतील. तरच अणु ऊर्जेच्या विस्फोटाच्या दुष्परिणामापासून आपण वाचू शकू. वास्तूकला असेल किंवा नगर रचना विधी यांमध्ये पर्यावरण मित्र (इकोफ्रेंडली)तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.तरच आपण येणार्‍या पिढीच्या हातात सुरक्षित रुपात वसुंधरा सोपवू शकू.                

                                                                  

पर्यावरण रक्षणासाठी वीज बचत करा

     भारतातील मोसमी पाऊस बेभरवशाचा झाला आहे. हवामानात वारंवार बदल होत असतात. परिणामी अन्नधान्य सुरक्षा धोक्यात येत असून कित्येक वनस्पती व प्राणयांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत.हे संकट जागतिक असले तरी त्याचे परिणाम अनेक देशांना भोगावे लागतात.त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर हवामान बदल रोखण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि याची सुरूवात आपण वीज बचतीपासून करू शकतो. त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. सामाजिक स्वयंसेवक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन जागृतीसाठी प्रयत्न करावेत. अलिकडेच महाराष्ट्रात झालेली गारपीट हे हवामान बदलाचेच द्योतक आहे. पृथ्वीच्या सरासरी तापमानात गेल्या दीडशे वर्षांत अतिशय वेगाने वाढ झाली आहे.    वातावरणातील उष्णता धरून ठेवणार्‍या कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड वायूंचे उत्सर्जन यास कारणीभूत आहेत. औद्योगिक क्रातीपासून आजतागायत मानवी समाजाने औद्योगिक प्रगतीच्या नावावर खनिज तेल,कोळसा, जंगल आदी संसाधनांची प्रचंड लूट केली. परिणामी यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात उष्णता धरून ठेवणार्‍या वायूंचे उत्सर्जन झाले. आणि पृथ्वीचे तापमान वाढले. के प्रमाण 350 पीपीएम (पार्टपर मिलियन) पर्यंत खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट असले तरी सध्या हे प्रमाण 315 पर्यंत जाऊन पोहचले आहे. परिणामी पृथ्वीवरील हिमनग वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावरील निसर्ग आणि जनजीवन पाण्याखाली जात आहे. हवामान बदलाचे हे संकट जागतिक असले तरी त्याचे परिणाम अमेरिका, युरोप, भारत, बांगला देश अश सर्वच देशांना कमी-जास्त प्रमाणात भोगावे लागणार आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याची सुरूवात आपल्याला वीज बचतीतून करता ये ईल. याचा दुहेरी लाभ आपल्याला मिळेल.उष्णता धरून ठेवणार्‍या वायूंवर नियंत्रण ये ईल आणि दुसरे म्हणजे वीज बचत केल्याने आपले आर्थिक नुकसानदेखील होणार  नाही.                                                                      
 

दवंडी पिटवणे : कला लोप पावली


     काळाच्या ओघात आणि आधुनिक माध्यमांच्या अंगिकारामुळे अनेक पारंपारिक कला लोप पावत चालल्या आहेत. अशातलीच एक कला म्हणजे दवंडी पिटवणे! आजच्या मोबाईल, एसएमएस आणि ई-मेलच्या जमान्यात ही कला पुरती लोप पावली आहे.
      पूर्वीच्या काळी गावात एखादी महत्त्वाची गोष्ट ग्रामस्थांसमोर आणायची झाल्यास ती दवंडीच्या माध्यमातून पोहचवली जायची. साधारणत: गावातल्या सार्वजनिक मालमत्तेचा लिलाव असो अथवा पंचांसमोर आलेला भांडणाचा, वादाचा न्यायनिवाडा असो किंवा बैठका असोत यासाठी गावातल्या सरपंचांकडून दवंडीचा मजकूर दिला जात असे. यात विषय, एकत्र जमण्याचे ठिकाण , तारीख आणि वेळ यांचा समावेश असायचा.
      दवंडी पिटवणारा गावातल्या मुख्य ठिकाणी जाऊन दवंडीद्वारे त्याची कल्पना गावातल्या लोकांना द्यायचा. ही दवंडी देण्याची एक लकब होती. हातातल्या डफावर जोरजोराने थाप मारीत तो तोंडाने ऐका हो ऐका... अशी आरोळी ठोकायचा. लोक आपला कामधंदा सोडून त्याच्याभोवतीने उभे राहायचे. बर्‍यापैकी लोक जमले की तो त्याला दिलेला मजकूर मोठ्या आवाजात सांगायचा. त्यावळचे तराळ विशेषत: शिकलेले नसायचे. केवळ लक्षात ठेवून ते आपल्याला सांगितलेला मजकूर पक्का लक्षात ठेवून सांगायचे.
      परंतु, काळ बदलला. भौतिक साधने आली. कामाच्या पद्धती बदल्या, तशा अशा पारंपारिक कलांनाही कालबाह्य व्हावं लागलं. आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आला आहे. ज्याला लिहिता-वाचता येत नाही, अशा लोकांकडेही मोबाईल आला आहे. एकादे-दोन क्रमांक लक्षात ठेवले की, हा फोन कोणाचा आहे, असे लोक सांगू शकतात. सत्तेचे विकेंद्रीकरण होत चालल्याने ग्रामपंचायतीला आणि शिपायांनाही मोठा भाव आला आहे. ही मंडळी आता मोबाईलवरच सगळे संदेश देऊ लागले आहेत. निरक्षर महिला सदस्या असली तरी तिच्या घरात कोणी ना कोणी शिकलेला असतो. त्यामुळे मजकूर कळवून घ्यायला फारसा वेळ लागत नाही.
      सध्या तर गावागावात, चावडीवर संगणक आला आहे. त्यासाठी खास ऑपरेटरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यात आता ई-मेलचीही भर पडली आहे. भौतिक सुखाची साधनं, माहिती देणारी टीव्ही, वृत्तपत्रांसारखी माध्यमं  घराघरात पोहचली असल्याने लोकांना गावात काय नवीन आहे, याची कल्पना येत आहे. काही महत्त्वाच्या घटना असल्या तरच लोक गावचावडीवर जमा होतात, अन्यथा आपापल्या कामात गुंतून राहतात. साहजिकच दवंडी देणार्‍याची गरजच उरली नाही. नोटीसा वेगैरे द्यायच्या असतील तर शिपाई किंवा कोतवाल ही कामे पाहत आहेत.




 

सजग तरुणाईला हवीय प्रतिष्ठा आणि स्थैर्य

     लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच यंदा पहिल्यांदाच युवा वर्ग मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहे. त्यांच्यात कमालीचा उत्साहही  दिसतो आहे. त्यांचा उत्साह कुणाला तारक आणि मारक ठरणार हे काही दिवसांत कळणार असले तरी त्यांची मने जाणून घेणे, राजकारण्यांना आवश्यक आहे. वास्तविक त्यांच्या निर्णयावरच देशातले  राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. देशभरात पसरलेले राजकीय अराजक , बिघडलेली सामाजिक परिस्थिती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे काहीसा अस्वस्थ झालेला आजचा तरुण वर्ग काही तरी चांगले घडण्याच्या  आणि घडविण्याच्या अपेक्षेत आहे.
      आजचा तरुण हुशार आहे. त्याला परिस्थितीची जाण आहे. त्याला भ्रष्टाचार समूळ नष्ट करावयाचा आहे, देशातली बेरोजगारी मिटावी, असे त्याला कळकलीने वाटते आहे. आज समाजात वावरताना महिला सुरक्षित नाहीत, याची त्याला जाणीव आहे आणि त्यांना सुरक्षितता  मिळावी असे वाटते आहे.याशिवाय आपल्या देशाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढावे, अशा खूपशा अपेक्षा त्यांना आहेत. याचे मूळ देशातल्या व्यवस्थेत आहे. त्या व्यवस्थेत अमूलाग्र बदल व्हावा आणि यासाठी राजकीय व्यवस्था बदलायला हवी, हे आता आजच्या तरुण वर्गाला उमलले आहे.
      अलिकडच्या  काळात अनेक घोटाळे उघडकीस आले. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले आहे. आणि ज्यांना देशाच्या उन्नतीसाठी कायदे करण्यासाठी संसदेत वा विधिमंडळतात पाठवले, त्याच लोकांनी सभागृहाच्या शिष्टाचाराला काळिमा फासला. के सगळे ही तरुणाई पाहात आली आहे. वाढती गरिबी, चोरी-दरोडे, आर्थिक फसवणुकी प्रकार हे चित्र देशाच्या प्रतिष्ठेला घातक आहे, याची जाण त्यांना आहे.
 हे  सगळे घडत असताना आजचा तरुण वर्ग घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वावरतो आहे. त्याला जागतिकीकरणाची आस आहे, त्यात तो स्वत: ला सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याबरोबरच तो सामाजिक, राजकीय स्थितीबद्दल जागरूकही आहे. आजच्या नव्या तंत्र ज्ञानाला त्याने आपलेसे केले आहे. स्वत: त्याच्याशी जोडून घेतले आहे. तो सतत माहिती आणि ज्ञानाविषयी अपडेट राहत आहे. हे सगळे खरे असले तरी त्यांच्यात भरकटलेपणाही जाणवतो आहे. पहिल्यासारखे पुढार्‍यांच्या मागे लागून केवळ दारू आणि मटण त्याला नको आहे. त्याला स्वत: एक इमेज बनवायची आहे. मात्र यासाठी तो उतावळा आहे. आपण लवकरात लवकर सेटल व्हायला हवं, म्हणून सतत धडपडत आहे. आणि यातच त्याची चूक होते आहे. संधीसाधू लोक याचाच फायदा घेतात. आजचा तरुण त्यात फसत चालला आहे.
       आजचा तरुण आपली मते पटकन जाहीर करतो. त्याला विस्तृत विचार करावासा वाटत नाही.सोशल मिडियावरची त्यांची मतं त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे जाणवून देतात. सव्वाशे कोटीच्या देशात जादूची कांडी फिरवावी, तसा लगेच काही चमत्कार घडणार नाही, मात्र त्यांचा ही माजलेली आराजकता घालवण्याप्रती किती चीड आहे, हे त्यांच्या उत्साहावरून जाणवते आहे. हा उत्साह चांगलाच आहे, परंतु, त्याबरोबर विचाराची, आणि शांतपणे मते मांडण्याचीही आवश्यकता आहे.
      तरुणाईला  विकास हवाय. हा विकास समाजकारणातून यायला हवा. केवळ सवंग लोकप्रियता मिळवून राजकारण कराणारा नेता त्यांना नको असला तरी तरुणाईला अती घाईही महागात पडणार आहे. आजचा तरुण विचारी आहे, हे खरे आहे, मात्र त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी झाला आहे. आज जे काही आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. चोर्‍या-मार्‍या होत आहेत, यात तरुण पिढीच आहे. स्त्रिया किंवा तरुणींवर जे अत्याचार होत आहेत, त्यात आजची तरुणाईच आहे. असल्या प्रवृतींना खतपाणी घालणार्‍यांना पहिल्यांदा करा. जे या जाळ्यात अडकले आहेत, त्यांचे मत परिवर्तन करा.
      आजच्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही या तरुणाईची मते जाणून घ्यायला हवीत. ही तरुण पिढी आता केवळ दारू-मटणाला भूलणारी नाही. त्यांना सर्वच दृष्टीने स्थैर्य हवे आहे. त्यांना रोजगार हवाय. त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते देण्याचे काम राजकीय पक्षांनी, नेते म्हणवणार्‍यांनी करणं गरजेचं आहे.  तरुणाईची मते जाणून घेण्याची संधी या निवडणुकीद्वारे मिळणार आहे. ही संधी दवडली तर  तरुणाई त्यांना माफ करणार नाही.     
 

महिला नेतृत्व असमानता; भारताच्या माथी लागलेला कलंक


      सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी चाललेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान राजकारणातल्या महिलांच्या सहभागाबाबतच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका सर्व्हेक्षणामुळे तर त्याबाबतची हवा आणखीणच गरम झाली आहे. या सर्व्हेक्षणानुसार राजकारणात महिलांना नेतृत्व देण्याच्याबाबतीत भारत फारच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. सध्याच्या संसदेतील महिलांच्या संख्येच्या आधारावर जगातल्या देशांची एक रँक निश्‍चित करण्यात आली आहे. 189 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक 111 वा आहे. संयुक्त राष्ट्राची भागिदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतर संसदीय संघ (आयपीयू) संस्थेने आपल्या दरवर्षाच्या रिपोर्टनुसार एक रँक बनवली आहे. यात जगातल्या 189 देशांचा समावेश आहे. आपल्या देशातल्या महिलांच्या संसदीय प्रतिनिधींच्या संख्येनुसार देश महिला समानतेबाबत किती मागासलेला आहे, याची प्रचिती येते.   देशातल्या  545 खासदारांच्या लोकसभेत महिला खासदारांच्या संख्येचे प्रमाण 11.4 टक्के आहे. तर  राज्यसभेत हेच प्रमाण फक्त 10.6 आहे. संसदेतले वैश्‍विक स्तरावरील हेच प्रमाण 22 टक्के इतके आहे. अलिकडच्या काळात विश्‍व  स्तरावर संसदेतले महिलांच्या सहभागाचे प्रमाण 1.5 ने वाढले असल्याचे सव्हेक्षण सांगते, हे जरी खरे असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात  मात्र आपल्या देशातले आकडे वेगळेच बोलतात. 4896  खासदार आणि आमदार असलेल्या आपल्या भारतात फक्त 418 महिला  खासदार आणि आमदार आहेत. म्हणजे हे प्रमाण फक्त 9 टक्के इतके आहे.  1952 च्या पहिल्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या फक्त 20 होती.  ती 15 व्या लोकसभेपर्यंत येता येता 59 पर्यंत पोहचली. आतापर्यंतच्या वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही आकडेवारी फारच दीनवाणी आहे. गेल्या सहा दशकांमध्ये महिला खासदारांचे प्रमाण 4.1 पासून 10.9 पर्यंत पोहचले आहे. या नुसार वैश्‍विक स्तराशी तुलना केल्यावर तर आपला देश फारच मागे असल्याचे दिसून येते. आयपीयूच्या यादीत असलेला रवांडा नावाचा छोटासा देश याबाबतीत अग्रस्थानावर आहे. तिथल्या संसदेत 60 टक्के महिला आहेत. हेच प्रमाण अमेरिकेत 20,कॅनडा 29.6, फ्रान्स 22.5 आणि नॉर्वेमध्ये 39.6 इतके आहे.
      आपल्या देशातल्या मतदान प्रक्रियेत जवळजवळ निम्म्याने महिलांचा सहभाग आहे, परंतु राजकारणातला सहभाग त्या प्रमाणात नाही, हे मोठे दुर्दैवी आहे.  संसद किंवा विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक 1996 पासून लटकलेले आहे. राजकारणात महिलांना समान अधिकार देण्याबाबतच्या मुद्द्यावर आपला विचार किती कूपमंडुकीय आहे, हेच दर्शविते. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, आफगाणिस्तान, इटली आणि इराकसह जगभरातल्या शंभराहून अधिक संसदीय सभागृहांमध्ये महिलांसाठी कुठल्या कुठल्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्या देशात 1996 पासून लोकसभेच्या स्थापनेचे  पाच-सहा टप्पे उलटले. पंधरावी लोकसभाही विसर्जित होतेय, तरीही  महिलांसाठीच्या 33 टक्क्याच्या आरक्षणाचे विधेयक काही पारित हो ऊ शकले नाही.
       काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने महिलांची भागिदारी असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे सर्व्हेक्षण केले होते. तिथल्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला होता.  त्यातले निष्कर्ष महिलांसाठी मोठे उत्साहवर्धक आहेत. या कंपन्यांशी संबंधीत असलेल्या गुंतवणूकधारकांना 53 टक्के लाभांश आणि 24 टक्क्यांहून  अधिक विक्रीचा लाभ मिळालेला होता. याच धर्तीवर विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, ज्या देशाच्या संसदीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधिक, त्या देशाची प्रगती  वाखाणण्यासारखी आहे. आपल्या देशातही आता ती वेळ आली आहे.  देशातल्या राजकारण्यांनी किंवा नेतृत्वांनी महिलांविषयीचे धोरण उदार ठेवण्याची गरज आहे.  आज आपल्या देशातल्या एकूण मतदारांपैकी निम्मी संख्या महिलांची आहे. तरीही देशातल्या राजकारणात महिलांचे नेतृत्व कमकूवत होत चालले आहे. सध्या देश निवडणुकीला सामोरा जात आहे. राजकीय पक्षांनी महिलांना पुढे आणण्याच्यादृष्टीकोनातून पावले उचलण्याची गरज आहे.  संसदेत महिलांसाठी  प्रतिनिधीत्व वाढवून वैश्‍विक स्तरावर भारताच्या माथी लागलेला महिला असमानतेचा कलंक पुसून टाकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, पक्ष नेतृत्वांनी पुढे यायला हवे.

पेपरवाला पोर्‍या: सकाळी सकाळी प्रकाश दाखवणारा

     सकाळी ठरल्या वेळेत पेपर आला नाही तर मन अस्वस्थ व्हायला होतं. काही तरी हरवल्यासारखं, राहून गेल्यासारखं होतं. कित्येकदा वृत्तपत्रात वाचण्यासारखं नवीन असं काही नसतंच. टीव्ही, इंटरनेटच्या आजच्या जमान्यात सगळंच अगोदर कळतं. परंतु तरीदेखील वृत्तपत्र वाचण्याची तल्लफ काही जात नाही. तीदेखील एक नशा आहे. दारुड्याला, मावा-गुटखा खाणार्‍याला विचारा, तल्लफ काय असते ती! वृत्तपत्र वाचण्याचीही एक तल्लफ आहे. त्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. अर्थात ती ठरल्या वेळेला मिळायला हवी.    सकाळच्या चहा किंवा नाष्टाबरोबर वृत्तपत्र नसेल तर चहा, नाष्टाचा स्वाददेखील बेचव लागतो. ऋतु कोणताही असो, पावसाळा असो की हिवाळा. पेपरवाला ठरल्यावेळी हमखास येतो. कितीही विपरीत वातावरण असलं तरी त्याचं आगमन त्याच्या निष्ठेला, त्याच्या जबाबदारीला आपलं मन सलाम करायला उठतं.
      जवळजवळ सगळीचं वृत्तपत्रं रात्री उशिराच प्रेसमधून बाहेर पडलेली असतात. आता नव्या तंत्रज्ञानामुळं काही वृत्तपत्रांनी पुरवण्यादेखील नेहमीच्या अंकात समाविष्ठ करून देतात. या अगोदर स्थानिक पुरवण्या, विशेषांक, रविवारसह अन्य विषयांवरच्या पुरवण्या पेपरवाल्या मुलालाच घालाव्या लागत होत्या. अजूनही काही वृत्तपत्र पुरवण्या स्वतंत्ररित्या देतात, तेव्हा या मुलांची दमछाक होते. काही स्थानिक लोक वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा खर्च परवड्त नाही, म्हणून आपल्या संस्थेच्या जाहिरातीच्या पॉंम्लेट वृत्तपत्रात घालायला देतात. चार पैशाच्या आशेपायी ही मुलं तीदेखील कामं न कुरकुरता करतात. ही मुलं आपली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडताना दिसतात.या मुलांचा दिवस पहाटेलाच सुरू होतो. 
      एका मुलाकडे अनेक वृत्तपत्रांची चळत असते. एजंट किंवा मालक आपलं काम करीत असतात. मात्र खरं काम या पेपर वाटणार्‍या मुलांचं आहे. पोस्टमनसारखं जाण्या-येण्याचा एरिया ठरवून त्या विविध वृत्तपत्रांची मांडणी करून सायकलच्या मागच्या कॅरेजला लावतो किंवा पिशवीत सरकावतो. आणि अनेक बातम्यांचं ओझं घेऊन तो सायकलला टांग मारतो. वृत्तपत्रात काय छापलं आहे, हे त्याच्या खिजगणीतही नसतं. ॠायकल चालवता चालवता मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच विचार घुमत असतो. कुणाला कोणतं वृत्तपत्रं द्यायचं आहे, कुणाकडे किती महिन्याचं बील बाकी आहे. तू रोज पेपर टाकत नाहीस, तुला मिळणार नाही, असे ओरडणारी अन्नू आँटीचं काय करायचं. असे एक ना अनेक सवाल, प्रश्‍न  त्याच्या डोक्यात फिरत असतात. टसगल प्लोर घरांमध्ये पेपर वाटणं सोपं असतं, सायकलवर बसल्या-बसल्या पेपर फेकता येतो. पण डबल फ्लोर घरांमध्ये पेपर टाकायचं म्हणजे सायकलला स्टँड लावून वरपर्यंत जावं लागतं. कधी सायकल पडते, मग पुन्हा चळत बांधावी लागते. पहाटेच्यावेळी कुत्र्यांच्या हमला असतोच. कधी कधी पेपरच्या गाड्या वेळेत येत नाहीत. कधी एका वृत्तपत्राची गाडी आलेली असते, तर दुसर्‍या वृत्तपत्राची नाहीच.त्याच्यासाठी मग थांबावं लागतं आणि कस्टमरच्या बोलल्या बोलण्याला सहन करावं लागतं. सारखं बोलून सारवासारव करावी लागते. लोकांना मात्र वेळच्यावेळी पेपर हवा असतो. एवढं सगळं झेलत तो रुटीन पार पाडत असतो.
      वर्षातले बारा महिने एकच काम. त्यात बदल असा नाहीच! मला वाटतं, या पेपरवाल्या पोरांशिवाय आणखी कोणाचं असं ताईट रुटीन नसणार आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकाला वाटत असतं की, सगळ्यात अगोदर वृत्तपत्र आपल्याच हाती पडावं. मोठ्या शहरात तर हीच मुलं अगदी अचूक नेम धरल्यासारखे वृत्तपत्र खालून दुसर्‍या-तिसर्‍या फ्लोरवर टाकत असतात की, ते बरोबर हव्या त्या घरात किंवा दारासमोर जाऊन पडतं.
      सकाळचं वृत्तपत्र आणि त्याचा सुवास हवाहवासा वाटतो. ते हाती पडल्यावर धन्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या पचनक्रियेला खाद्य मिळाल्यासारखं वाटतं आणि तृप्ती झाल्याचंही समाधान वाटतं. सकाळी पेपर वाचायला नाही मिळाला तर दिवसाचा मूडदेखील बिघडून जातो. माझे काही वार्ताहर मित्र तर पहाटे पहाटेच पेपरची वाट पाहात स्टँडच्या एरियात  घुटमळताना पाहिली आहेत. त्यांना तर आपण दिलेली बातमी कशी लागली आहे आणि कुठे लावली आहे, हे पाहण्याची अतुरता असते. असं हे पेपरचं अनोखं वेड आहे.
      घरात आल्यावर मुलाला दिनविशेषचं पान हवं असतं किंवा क्रीडा पान. मुलीला आजचा मेनू काय दिलाय याची उत्सुकता. मग त्या मायलेकीच्या त्यावर गप्पा! सकाळी जरी सगळ्या पानांवर एकदा नजर फिरवली तरी समाधान होतं. नंतर त्या पेपरची पानं कुठे कुठे गेलीत, याची चिंता नसते. त्याची चिंता गृहकुट्उंबाला असते. त्यातून तिला महिन्याच्या रद्दीचे पैसे मिळत असतात. त्यामुळे तिचा पेपर वाचून (की चाळून) झाला की तो घडी घालून रद्दी ठेवण्याच्या जागी व्यवस्थित पडलेला असतो. नंतर दिवसभर त्याच्यकडे बघायचं झालं नसलं तरी दुसर्‍यादिवशीच्या वृत्तपत्राची वाट पाहतच असतो.

बालकथा - गाढव ते गाढवच

       मन्या घुबड उदास असायचा. जंगलात सगळ्यांचे मित्र होते.ते आपसात खेळायचे, हसायचे-खिदळायचे, हुंदडायचे, मिळून खाऊ खायचे. मिळून गाणी गायचे. मोठी धम्माल करायचे. मन्या घुबड मात्र बिलकूल एकटा असायचा. ना मित्र होते, ना नातेवाईक! झाडाच्या उंच फांदीवर आपल्या घरात एकटाच पडून राहायचा. जंगलातल्या दुसर्‍या लोकांना हसताना-खिदळताना पाहून त्याला आणखी वाईट वाटायचे.
       बिचार्‍यानं तरी काय करावं?सगळ्यांसोबत तो खेळू शकत नव्हता. कारण तो दिवसा झोपायचा. तो काही आपल्या मर्जीने झोपायचा नाही , तर निसर्गानंच त्याला असं बनवलं होतं. रात्री सगळे झोपी गेले की, तो जागा व्हायचा. त्यावेळी त्याला वाटायचं, आपणही फांद्या-फांद्यांवर उड्या माराव्यात, झाडाच्या उंच शेंड्यांवर जाऊन मोठ्या मोठ्यानं गावं. रात्रीच्या किर्र वातावरणात त्याचा गाण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या पक्ष्यांच्या घरांच्या बत्त्या उजळायच्या. खिडकीतून डोकी बाहेर काढून सगळे एका दमात ओरडायचे. कोण घुबड रात्रीचं किंचाळतंय?
      तो दबल्या आवाज म्हणायचा, मी घुबडच तर आहे!
 घुबड आहेस ना! मग  गपचिप पहारेदारीच काम कर! ओरडून आमची झोपमोड का करतोस?
 सगळ्यांची बोलणी खाऊन मन्या  आपल्या घरात येऊन गप्प पडायचा.
       एकदा रात्रीच्यावेळी मन्या आपल्या घरट्यात निपचिप पडला होता.रात्री त्याला कशाची भीती वाटत नसे. उलट अंधारात तो अगदी लांबच सहज पाहू शकत होता.त्यारात्री त्यानं पाहिलं की तिकडे लांब झाडं खूप कमी आहेत. आणि शहराकडं जाणारा रस्ताही दिसतो आहे. तिथे कोणी तरी होतं. तो गपचिप झाडावर बसला. पाच-दहा मिनिटे तशीच गेली. मन्या अजूनही तसाच बसला होता. आता मन्याच्या मनात कसलं तरी काहूर उठलं. कोण आहे? कशाला आला आहे? अगोदर असं काही घडलं नव्हतं.का कोणी शिकारी जाळं टाकून सकाळ होण्याची प्रतीक्षा करतो आहे? तो हळूच घराबाहेर आला. तो उडत उडत तिथल्या झाडावर जाऊन बसला. खाली वाकून पाहिल्यावर तो चकीत झाला. कोणी शिकारी-बिकारी नव्हता. गाढव होते.
  गाढव इथे कसे? मन्या पुटपुटला.
 मन्या सगळ्यात खालच्या फांदीवर आला. त्यानं गाढवाला विचारलं, तू इथे काय करतोयस?
 गाढव उठून उभे राहिले आणि म्हणाले, मला इथेदेखील चैन पडत नाही.
      मन्यानं गाढवाकडं निरखून पाहिलं. गाढव खूप उदास दिसत होतं. थकल्यासारखा वाटत होता. त्याला गाढवाविषयी सहानुभूती वाटली. तो प्रेमाने म्हणाला, घाबरू नकोस. मी मन्या. वर पहा मी इथे बसलो आहे.तिकडे नव्हे, इकडे... अरे, बरोबर तुझ्या डोक्यावरच्या फांदीवर. आता सांग, कोण तुला शांतपणे जगू देत नाही.?
      गाढवाने भराभर आपल्या पापण्यांची उघडझाप केली आणि येणार्‍या अश्रूंना मोकळे. थोड्या वेळाने  म्हणाला, तुला काय सांगू? तू  तरी काय करशील?
      कोणाला तरी आपले दु: ख ऐकवले की, मन हलकं होतं... आणि तू जोपर्यंत काही सांगणार नाहीस, तोपर्यंत मी तरी कशी मदत करणार बरं. तसं माझं नाव मन्या. मला आपला मित्र समझ.
      मित्र शब्द ऐकून गाढव खूश झाला. त्याने डोळे गोल गोल फिरवले. लांबसे कान मस्तपैकी हलवले. शेपटी त्याने कितीदा तरी आपटली.
 मला आतापर्यंत कोणी मित्र नव्हता. तू मित्र ना मग माझी परेशानी ऐक.
      गाढवाने सांगायला सुरुवात केली, गावात एक परीट होता. त्याने मला विकत घेतले. त्याच्याजवळ सार्‍या गावाचे कपडे धुवायला येत असत. मळकट कपडे माझावर लादून धुवायला घेऊन जात असे. धुतलेले ओले  कपडे पुन्हा माझ्यावर लादून गावात आणत असे.ओले कपडे घेऊन भरभर  चालू लागलो  नाही तर मला काठीने  पायांवर मारत  असे. ठीक आहे, मारलं तर मारलं . निदान जेवण तर चांगलं द्यावं की नाही? नाही! मला जेवण द्यायचं म्हणजे त्याच्या उरावर ये ई. भुकेमुळे मला रात्री धड झोपही यायची नाही. सकाळी पुन्हा काम सुरू.
      गाढवाने सांगितले, आज रात्री माझ्या खोपटाचा दरवाजा उघडा होता. मी निघून आलो. वाटेत हरभर्‍याचं शेत होतं. मन भरून खाल्लो. खूप मजा आली. मग इकडे आलो. बर्‍याच दिवसांनी पोटभर खाल्लो.
 अरे गड्या,  मीच  एकटा दु:खी आहे, असा समजत होतो. पण तुही दु:खी आहेस. आता  सांग, पुढं काय करायचं ठरवलं आहेस?
 अजून तरी कुठला विचार  केला नाही. परत जायचा तर प्रश्‍नच नाही. काय करू?
 तुला मित्र म्हटलंय तर काही तरी विचार करायलाच हवा. असं कर. आता तू इथे या झाडींच्या मागे झोप. मी विचार करतो. मग सांगेन.
       इथे परटाच्या लाठीची भीती नव्हती. गाढव झुडपाच्या पाठीमागे जाऊन डाराडूर झोपी गेला. दुसर्‍यादिवशी मन्या म्हणाला, मित्रा, काम तर करावंच लागेल. कामाशिवाय दोन-चार दिवस ठीक आहे, पण सारी जिंदगी कशी जगणार?  असं करू, काही दिवस तू इथे राहा. दिवसभर आपण दोघे झोपू. रात्री तू शेतात जाऊन पोटभर खाऊन येत जा. तोपर्यंत  तुझ्यसाठीच्या कामाचा बंदोबस्त करीन. जिथे काम कमी आणि राहण्या-खाण्यासाठी चांगली व्यवस्था असेल, तिथे तू जा. गाढवाला फार आनंद झाला. तीन-चार दिवस त्याने आरामात काढले. गाढव मस्त रमले. त्याची तब्येत अगदी टणटणीत झाली.
      पाचव्या दिवशी मन्या अगदी आनंदाने परतला. मित्रा, फार चांगली नोकरी  मिळाली आहे. उद्या तू कामावर जा. रात्री भेटायला येत जा.   इकडे परटाचे  गाढवावाचून सगळे काम बिघडले. त्याने गाढवाची शोधाशोध केली, पण गाढवाचा पत्ता काही लागला नाही. परीट आता त्याच्या शोधासाठी जंगलाच्या दिशेने येत होता.
      नोकरी मिळ्याल्याचे  ऐकून गाढवाला फार आनंद झाला.  आनंदातच तो उड्या मारु लागला.  आता त्या राक्षस परटापासून मुक्त झालो. आज तर मला गाणं गावंसं वाटू लागलं आहे. असे म्हणच तो आपल्या भसड्या आवाजात गायला लागला.  गप्प गप्प!  मन्या ओरडला. अरे, मोठ्याने ओरडू  नकोस. पण गाढव आपल्याच मस्तीत होता. तो जोरजोरात गातच होता.
 हे तर माझेच गाढव आहे. परटाने त्याला ओळखले.  आणि त्याला काठीने बडवत घराकडे घेऊन चालू लागला.  मन्याने  अफसोसपणे मान हलवली. आणि पुटपुटला, शेवटी गाढव ते गाढवच!