Thursday, July 5, 2012

हसत जगावे ९

रुग्ण आणि बिडी
डॉक्टर : तू एका दिवसात किती बिड्या ओढतोस?                                                                                                                           
 रुग्ण : दिवसातून  जवळपास वीसएक  बिड्या होतात.                                                                           डॉक्टर : माझ्याकडून इलाज करून घ्यायचा असेल तर बिड्या ओढणं बंद करावे लागेल.आजपासूनच स्वता: ला एक बंधन पाळून घे. जेवल्यावर केवळ एकच बिडी ओढायची. समजलं?       
 (रुग्णाने डॉक्टरचं म्हणणं मान्य केलं त्यानुसार त्याने उपचार सुरू केले. काही महिन्यातच याची तब्येत सुधारली.)                                                                                                                               
 डॉक्टरः बघितलसं! माझ्या उपचारानुसार तुझ्या तब्येतीत किती फरक पडला. 
                              
   रुग्णः पण डॉक्टरसाहेब, एका दिवसात वीस वेळा जेवायचं काही सोपी गोष्ट  नाही.  
                                                                                             
लाँड्री
बायकोने लाँड्रीच्या दुकानासमोर लावलेला बोर्ड वाचला.                                                                    
बनारसी साडी १० रुपये                                                                                                                        नायलॉन साडी ८ रुपये                                                                                                                                          
कॉटन साडी ५ रुपये                                                                                                                                      
 बायको पटकन म्हणाली,   " मला लवकर पाचशे रुपये द्या.मला पन्नस साड्या खरेदी करायच्या आहेत."  नवरा:  अगं ,ते काही साड्यांच्या सेलचं दुकान नाही. नीट वाच, ते लोंड्रीचे दुकान आहे.                                                                                                   
                                                                                                                        
माझ्या मागे मागे
डॉक्टरः  बेड  नंबर  आठचा  रुग्ण कुठे आहे?                                                                                                                                              
 नर्स :   त्याला  खूप  दम  लागला  आहे.  त्याचा  श्वास  फुलला  असून  मोठ्या  मुश्किलीने  पकडून  त्याचे पाय बांधले  आहेत.                                                                                                                                                     
डॉक्टरः काय! त्याला दम लागला आहे?  तर मग  त्याचा आणि त्याचे पाय बांधण्याचा संबंध काय? ताबडतोब सोडा त्याला....                                                                                                                                       
 नर्सः सर, त्याला सोडले तर ना  तो माझ्या मागे मागे सार्‍या वार्डभर धावत राहील   ......आणि पुन्हा त्याचा श्वास फुलेल. त्याला दम  लागेल.                                                                                                                                                                                                                        

हुज्जत
एका अधिकार्‍याला दुकानदाराशी खूप उशिरा हुज्जत घातल्यानंतर फर्निचरची किंमत कमी करण्यात यश आले.त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने त्याला घरी आल्यावर विचारलं, ' अरे, तुला उधारच घ्यायचं होतं तर त्याच्याशी इतका वेळ हुज्जत घालत बसण्याची काय गरज होती ? आणि  तू  तर कुणाचे उधार परत करतच नाहीस!'                                                                                                                                             
तो अधिकारी म्हणाला,' तो दुकानदार खूपच प्रामाणिक आहे रे ! त्याचं कमीत कमी नुकसान व्हावं अशी   माझी प्रामाणिक इच्छा आहे.'                                                                                                                                                                                                                                               
लग्न
बायको: अहो, एखादी वस्तू खराब झाली किंवा त्यात काही फरक पडला तर ती बदलायची असती ना?नवरा: ( आनंदाने) खरचं! तुला बदलावसं वाटत ना ?                                                                                                                                             
  बायको: हो, पण तुम्हाला इतका आनंद का                                                                                                                                                             
    " तर मी दुसरं लग्न करू?" नवर्‍याने गदी खुशीत विचारलं                                                                                                                                                                                                                

मधुमेह
एक डास दुसर्‍याला: मित्रा ,  तू असा गपगप का?                                                                                                                                        
 दुसरा डासः काय करू, माणसला चावायचं सोडून दिल्यापासून मला आणखी अधिकच भूक लागू लागली आहे.                                                                                                                                                                                                                                                                         
 पहिला डासः अरे, पण माणसाला चावायचं सोडून का दिलंस?                                                                               
 दुसरा डासः पेपरमध्ये वाचलं नाहीस ? रोज मधुमेहाने लाखो लोक मरताहेत. माणसाला चावून त्या मधुमेहाची ब्याद अंगावर कोण घेणार?                                                                                                                                                                                                           
     
गाढ्व बाप
एक गाढव दुसर्‍याला:" देवाने  माणसाला  किती बुद्धी दिली. त्याला सार्‍या जगातला बुद्धिमान प्राणी बनवलं. त्यांना त्यांच्या बापाचं नाव ठाऊक असतं, त्यांच्या मुलाचं नावसुद्धा माहित असतं , पण आपलं !  ......आपला बाप गाढव आणि आपला मुलगाही गाढवच....."                                                             

दप्तराचे ओझे कधी कमी होणार?

     शाळा सुरू होऊन आता पंधरा-वीस दिवस उलटले आहेत. आर्थिक मागास घटकातील मुलांचा चांगल्या शाळांमधील प्रवेश अद्याप लटकला असला तरी शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात झाली आहे. पाठ्यपुस्तके, त्याप्रमाणात वह्या, स्वाध्याय वह्या, गृहपाठ वह्या असा भलामोठा गठ्ठा मुलांच्या दप्तरात भरलेला आणि तो वाहून नेताना आपल्याला मुले आपल्याला सकाळ्-दुपारी आणि संध्याकाळ दिसून येत  असतात. त्यासोबत पाण्याच्या बाटल्या, डबे, छत्री, रेनकोट यांचाही बाडबिस्तरा दिसत असतो. म्हणजे साधारण शाळेला जायचं आणि यायचं म्हणजे त्यांना एक हमाली करण्याचे काम होऊन बसले आहे. नाईलाज असल्याने दप्तराचे ओझे वाहून नेण्याचा आता त्यांना सराव होऊ लागला आहे.
     खरे तर आजचे युग स्पर्धेचे आहे, असे म्हटले जाते. कोणतेही क्षेत्र असे नाही की जेथे स्पर्धा नाही. त्यामुळे यातून शालेय विद्यार्थी तरी कसे सुटतील. त्यांना लहानपणापासूनच स्पर्धेला तोंद द्यावे लागत आहे. चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्याची स्पर्धा, अभ्यासाची स्पर्धा, पहिल्या तिनात-पाचात येण्याची स्पर्धा. चांगले गुण मिळाले नाही, तर चांगल्या शाखेत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मग त्याची तयारी शाळेत असल्यापासूनच सुरू होते. यासाठी मुलांकडून अक्षरश: ढोर मेहनत करून घेतली जाते. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस त्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे वाढताना दिसत आहे. नेहमी त्यावर चर्चाही होते. मात्र हे ओझे कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कारण या चर्चा निव्वळ चर्चा राहतात. शिक्षक, शिक्षण संस्था आणि पालक यांना त्यातील गांभिर्य कळत नाही. किंवा ते घेत नाहीत.  शाळा हा बाडबिस्तरा आणायला सांगतात, त्यामुळे स्पर्धेत पुढे जायची घाई लागलेल्या पालकांना शाळा सांगतील ते पाल्यांना आणून देणे भाग झाले आहे. शाळांमध्ये ऍक्टिव्हिटीज वाढल्या आहेत. नवे-नवे प्रकल्प, सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे साहित्य असे रोज काही ना काही शाळा आणायला सांगतात आणि पालक वर्ग निमूटपणे आणून देतात. शाळांना आपली पत राखायची असते तर पालकांना स्पर्धेत टिकायचे असते, मात्र या सगळ्यात मुलांचे आतोनात हाल होत आहे.    अशा परिस्थितीत दप्तराचे ओझे कमी करण्याचा सार्‍यांनाच विसर पडला आहे. शासनही केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे  हे आजच्या शिक्षण पद्धतीसमोर एक सर्वात मोठे आव्हान होऊन बसले  आहे.
      आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार वाढतो आहेत, तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराच्या ओझ्याचा! या दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खांदा, मान, कंबरदुखीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या संगणकीच्या युगात खेळ हरवून बसला आहे. शारीरिक कसरत कमी झाली आहे. कार्टूनसारख्या बैठ्या खेळाकडे मुले आकृष्ट झाली आहेत. त्यामुळे एवढे ओझे वाहून नेण्याची शारीरिक क्षमता त्यांची नष्ट झाली आहे. मुलांचे आजार एकिकडे वाढत असताना दुसरीकडे  शिक्षणाच्या खासगीकरणासोबतच त्याचे बाजारीकरणही झालेल्या या काळात  खाजगी शिक्षण संस्था जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा याकरिता टार्गेट ठरवून काम करत  असताना दिसतात. यासाठी शाळेचा निकाल जास्तीत जास्त लागावा यासाठी विद्यार्थ्यांकडून जीवतोड मेहनत करून घेतली जाते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिकतेवरही होताना पाहायला मिळतो. शहरातील बहुतांश शाळा विद्यार्थ्यांसाठी काही अँक्टिव्हिटीज घेत असतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे बुक व नोटबुक विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात. शैक्षणिक पाठय़पुस्तके, वर्गपाठ, गृहपाठाच्या वह्यांबरोबरच या ऑदर अँक्टिव्हिटीजची बुक्सही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढवत आहेत. लहान वयात मुलांनी खेळायचे असते. मात्र, आजच्या शिक्षण पद्धतीमुळे त्यांचे खेळण्या-बागडण्याचे आयुष्य हरवून ओझे वाहण्याचे काम करावे लागत आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना दीर्घकालीन आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याचा विचार करतो कोण?

Monday, July 2, 2012

जलसंकटाचा फास आवळतोय

     आज देशात पाण्याची अजिबात कमतरता नाही, पण तरीही निम्म्याहून अधिक देश तहानलेला आहे. देशाची राजधानीच नव्हे, तर महाराष्ट्राची राजधानी आणि तशाच अन्य राज्यांच्या राजधान्या, मोठय़ा शहरांपासून छोटय़ा गावांपर्यंत सर्वत्रच पाणीटंचाईचे संकट भयानक स्वरूप घेऊन उभे आहे. मुंबईसह अनेक शहरांमध्ये पाणीकपातीचे धोरण राबवले जात आहे, तर हजारो गावांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यावर लाखो-कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. अनेक ठिकाणचे पाणी पिण्यालायक नाही. तरीही लोक त्याचाच वापर करत आहेत. इतकी पाणीटंचाईची भयानकता असताना केंद्र असो अथवा राज्य सरकार यांना याचे गांभीर्य दिसून येत नाही. अंतराळ भरारी घेण्यात आघाडीवर असलेल्या या देशात स्वातंर्त्य मिळवून 64 वर्षे उलटली तरी आपण पाण्यासारखी मूलभूत गरज भागवू शकत नाही, यापेक्षा आणखी दुर्दैव ते कोणते?
     जागतिक बँकेच्या ताज्या रिपोर्टमध्ये भूजल संकटाचा इशारा देण्यात आला आहे. वातावरणात होत चाललेला बदल आणि अंदाधुंद होणारा पाण्याचा वापर, पाणी संवर्धनाच्या योजनांचा अभाव यामुळे आगामी दशकभरात भारतातले 60 टक्के विभागातील (ब्लॉक) जलस्तर धोकादायक पातळी गाठू शकतील आणि दुष्काळी परिस्थिती ओढवेल. तेव्हा पिकांना तर सोडाच पण प्यायच्या पाण्यासाठी मारमार होऊन बसेल, असे भविष्य जागतिक बँकेने वर्तवले आहे. राष्ट्रीय स्तरावरील पाच हजार 723 ब्लॉकपैकी 1 हजार 820 ब्लॉकनी जलस्तर पातळीची धोकादायक रेषा ओलांडली आहे. जलसंवर्धनाचे उपाय न केल्याने पाणी वाया जात असलेल्या 200 विभागांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाने यापूर्वीच संबंधित राज्यांना तात्काळ उपाययोजना करण्याबाबत कळविले आहे. पण देशातल्या अनेक राज्यांनी याबाबत प्रभावी अशी पावले उचललेली नाहीत. पाणी संकट त्यांनी गांभीर्याने घेतलेच नाही.
        मागे म्हटल्याप्रमाणे आपल्या देशात पाण्याची अजिबात कमतरता नाही. देशात 144 कोटी एकर फूट पाणी उपलब्ध आहे. यातील केवळ 14 कोटी एकर फूट पाण्यासाठी आपण धरणे किंवा जलाशये बांधली आहेत. उरलेल्या पाण्याचा कुठल्याही प्रकारचा वापर करू शकत नाही. ते पाणी वापराविना विनासायास समुद्राला जाऊन मिळते. पावसाळ्यात महापुराची परिस्थिती अनुभवतो, तर उन्हाळ्यात दुष्काळाची! पाणी अडविण्याच्या योजना न राबवल्याने उपलब्ध पाण्यावर पाणी सोडत आहोत. पाण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने जे सरकार लोकांना पाणी देऊ शकत नाही त्या सरकारला शासन चालवण्याचा कुठलाच अधिकार नाही, असे सांगून फटकारले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती खार्‍या पाण्याचे पिण्यायोग्य पाणी करण्यावर व पावसाळ्यातील पाणी अडवून जिरवण्याबाबत स्वस्त आणि सोपे पर्याय शोधण्यावर काम करणार होती. पण या समितीच्या रिपोर्टचे काय झाले, याबाबत काहीच कळले नाही. भारतात पावसाळ्यात पुष्कळ पाणी मिळते. ते अडवण्याचे, जिरवण्याचे किंवा साठवण्याचे जे प्रयत्न जातीने आणि मुबलक प्रमाणात व्हायला पाहिजे होते, ते झाले नाहीत. भारताची लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे त्या दृष्टीनेही उपयोग झाला असता. देशात पावसाळ्यात 30 अब्ज कोटी एकर फूट पाणी मिळते. यातले बहुतांश पाणी बाष्पीभवन व नदीनाल्यातून वाहून जाते. भारतातल्या नद्यांमधून वाहणारे पाणी अडवण्याचा किंवा नदीजोड प्रकल्प राबवण्याचा अक्षम्य गुन्हा देशाला मोठय़ा जलसंकटात ओढवणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. पुर्‍या नियोजन व गतीनुसार काम केल्यास बरेच पाणी वापरू शकतो.   
      देशात 14 अशा मोठय़ा नद्या आहेत ज्यांचा प्रवाह क्षेत्र 20 हजार किलोमीटर आहे, तर दोन हजार ते 20 हजारपर्यंत प्रवाह क्षेत्राच्या 44 नद्या आहेत. या मोठय़ा व मध्यम नद्यांपासून 90 टक्के पाणी मिळते. हे पाणी जवळपास 190 खर्व क्युबिक मीटर इतके आहे. यातील केवळ 15 टक्के पाणी साठवण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे. भारतातले कृषी क्षेत्र अमेरिकेपेक्षा दुप्पट आहे. पण उत्पादन मात्र निम्मेच आहे. उत्पादित जमिनीपैकी 25 टक्केच क्षेत्र कसे तरी पाणी मिळवू शकते. जगभरातल्या अनेक देशांनी एक नदी दुसरीकडे वळवून पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातसुद्धा या दृष्टीने थोडे फार काम झाले आहे. पण ते फारच तोकडे आहे. राष्ट्रसंघाने सांगितले आहे की, पुढील 30 वर्षात भारतात पाणीटंचाईचे संकट उग्रस्वरूप धारण करेल. हा धोक्याचा इशारा गांभीर्याने देणार्‍या अवर्षणग्रस्त भागात पाणी अडवण्याचे किंवा नदीचे पाणी पोहचवण्याचे प्रकल्प वेगाने राबवले जाणे आवश्यक आहे. रेंगाळून चालणार नाही, नाही तर शेतीसाठी सोडाच, पण प्यायच्या पाण्यासाठी मारामार होऊन जाईल.  
punya-nagari 2/7/2012

Monday, June 25, 2012

सायकल : अनेक दुखण्यांवरचे औषधपेट्रोलचे

  दर वाढल्याने प्रवासही महागला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम अन्य जीवनाश्यक घटकांवरही झाला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था चिंतेत असल्याचे सांगितल्यानंतर कॉर्पोरेट जगतासह सामान्यजनांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असे असले तरी ऊर्जा संकट देशाच्या दळणवळण व्यवस्थेसाठी घातकच म्हणायला हवे. देशात लागणारे 80 टक्के इंधन आपण आयात करत असतो आणि त्यासाठी जबर किंमत मोजतो. त्यातच रुपयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले अवमूल्यन यामुळे आणखी गंगाजळी आपल्या इंधनासाठी मोकळी करावी लागत आहे. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणारच आहे. सत्ताधारी आणि विरोधक या जागतिक मंदीच्या काळात सामोपचाराने वागत आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे सोडून त्याचे राजकारण करीत बसले आहेत, ही दुर्दैवाची बाब असली आणि सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या यूपीए सरकारातील उघडकीस आलेल्या भयंकर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे हे सरकारही आपली विश्वासार्हता गमावून बसले आहे. त्यामुळे सामान्यजनांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. सामान्यजनांना यावर तोडगा काढताना स्वत:वरच आवर घालावा लागणार आहे. सतत दोन चाकी, चार चाकी वाहनांवर स्वार असणार्‍या मध्यमवर्गीय मंडळींनी स्वत:च्या मनाला आवर घालून काटकसरीचे पर्याय अवलंबायला हवेत. सायकलचा वापर या सर्वावर एक चांगला उपयोग आहे. सायकलच्या वापराने इंधन बचत तर होतेच, पण अनेक दुखण्यावरचे औषधही आहे. बैलगाडीपाठोपाठ सर्वात प्रथम वाहन स्वरूपात रस्त्यावर धावू लागलेल्या सायकलीचा वापर 1885 मध्ये पूर्ण बदलासह होऊ लागला. आता त्यात बराच बदल झाला असला तरी त्याचा मूळचा ढाचा बदललेला नाही. पुढे तिला मोटार जोडूनच मोटारसायकलची निर्मिती झाली. याच मोटारसायकलने पुढे सायकलला मागे टाकले आणि सायकल मागे पडली ती पडलीच. ही सायकल केवळ इंधन बचत करत नाही, तर आपल्या अनेक व्याधींवरचे 'रामबाण' औषधही आहे. व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केल्यास त्याचे लाभ लक्षणीय आहेत. इक्झर सायकलवर बंद जिममध्ये दोन-दोन तास घाम गाळून नंतर एसी गाडीतून घरी जाण्यापेक्षा रोज कार्यालयात सायकलवरून गेल्यास आरोग्य, इंधन बचत, प्रदूषणापासून मुक्तता असे अनेक हेतू एकाच वेळी साध्य होतील.

प्रदूषणाचा प्रश्न अलीकडच्या काही वर्षात चांगलाच उग्र बनला आहे. वाहनातून बाहेर पडणार्‍या धुरांमुळे ग्लोबल वॉर्मिगमध्ये प्रचंड भर पडत आहे. त्यामुळे सायकल अनेक प्रश्नांचे उत्तर असू शकते. शिवाय मोठय़ा महानगरांपासून छोटय़ा नगरांपर्यंत वाहतूक कोंडीसारखी समस्या सतावत आहे. त्यावरही अनायसे नियंत्रण येईल. प्रदूषणामुळे दमा, अस्थमा, हृदयरोग अशा अनेक रोगांनी जे मानवी शरीरांवर आक्रमण केले आहे, त्यावर नियंत्रण येईलच, पण सायकल चालवल्याने हाता-पायांसह संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम होईल. शरीरांतर्गातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. त्यामुळे आजार, दुखणी पळ काढतील. व्यायामामुळे मनही ताजेतवाने राहील. क्रयशक्ती वाढेल. देशातल्या रस्त्यांवर सायकलींचा वावर कमी व्हायला अन्य वाहनधारकांचाही वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. रस्त्यावर सायकलधारकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. दुचाकीस्वार, बसचालक अथवा अन्य चार चाकी चालक यांच्याद्वारे नेहमीच सायकलस्वारांना कमी लेखले जाते. युरोप-जपानसारख्या देशांमध्ये सायकलस्वारांसाठी वेगळी 'लेन' (रस्ता) असते. अर्थातच तिथे सायकलीच्या वापरासाठी अनुकूलता असल्याने सायकलचा वापर वाढत आहे. नव्या मॉडेलमुळे कॉलेजवयीन युवकांमध्ये, शाळकरी मुलांमध्ये त्याची क्रेझ वाढत आहे, तर काही पर्यावरणवादी लोक सायकलचा हटकून वापर करू लागले आहे. 10-20 किलोमीटरचे अंतर काहीजण सहज सायकलीवरून करत आहेत, ही आशादायी बाब म्हटली पाहिजे. भारतीयांमध्ये ईर्षा ही वाढत असलेली विकृती क्लेशकारक आहे. शेजार्‍याने मोटारसायकल घेतली म्हणून आपणही घ्यायची. मग भलेही कर्ज का काढायचे होईना; पण दारात गाडी आणणार. ही ईर्षा घात करते. कारण त्यामुळे इंधनासाठी घाटा आलाच. हा घाटा एकवेळ खड्डय़ात नेल्याशिवाय राहत नाही. शिवाय सायकल वापरणे म्हणजे कमीपणाचे समजले जाते. त्यामुळे सायकलकडे काणाडोळा केला जातो; पण एक लक्षात ठेवायला हवे, चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेली माणसे दुसरा काय म्हणतो, याचा विचार करत नाहीत, म्हणूनच ती मोठी होतात.

punyanagari 25/6/2012

Sunday, June 24, 2012

देशातल्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक

देशातले आत्महत्येचे आकडे भविष्यातले भयावह चित्र अधोरेखित करत आहेत. २०१० मध्ये भारतात एकूण १ लाख ८७ हजार लोकांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नल     'लान्सेट' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या सर्व्हेक्षण रिपोर्टनुसार दक्षिण भारतातली चार राज्य आत्महत्येच्या बाबतीत आघाडीवर आहेत. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ ही ती राज्ये असून महाराष्ट्राचा क्रमांक यानंतर लागतो. महाराष्ट्रात २०१० मध्ये १९ हजार लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या तामिळनाडूत झाल्या आहेत, तो आकडा आहे, २८ हजाराचा.
     आत्महत्या करणार्‍यांमध्ये महिलांची संख्या चिंता वाटावी अशीच आहे. प्रसृती दरम्यान जीव गमावणार्‍या महिलांच्या संख्येत घट आली आहे, मात्र आत्महत्येचा आकडा वाढतो आहे. २०१० मध्ये १५ ते २९ वयोगटातल्या महिलांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण  सर्वाधिक आहे. हा आकडा एकूण महिला आत्महत्येच्या ५६ टक्के आहे. आणखी एक विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे शिकल्या-सवरलेल्या महिलांमध्येच ही प्रवृती अधिक असल्याचे दिसते. युवा पुरुष वर्गाचे आत्महत्या करण्याचे प्रमाणही बरेच आहे. एकूण पुरुषांच्या सम्ख्येत युवा वर्गाची संख्या ४० टक्के आहे. आत्महत्या करणार्‍या पुरुषांचे सरासरी वय ३४ तर महिलांचे २५ आहे. देशातले हे आत्महत्येचे प्रमाण एडसला बळी पडणार्‍या संख्येच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट आहे.
     आणखी एक चक्रावून टाकणारी बाब म्हणजे विकसित देशांच्या तुलनेत भारतात युवा वर्गात विशेषतः युवतींमध्ये आत्महत्येचे प्रमाण ४ ते ६ पटीने जास्त आहे. या सगळ्याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की देशातल्या आत्महत्या रोखण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कोणतीही रणनीती आखण्यात आलेली नाही. किंवा या आत्महत्या गांभिर्याने घेतल्या गेल्या नाहीत. संख्येच्या पातळीवर विचार केला  तर     १५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वर्गामध्ये केल्या जाणार्‍या आत्महत्यांमध्ये आंध्रप्रदेश आघाडीवर आहे. आत्महत्येचे मुख्य कारण सामाजिक आहे, त्यापाठोपाठ आर्थिक परिस्थिती, ताणतणाव, व्यसन ही कारणेही कारणीभूत  आहे. आत्महत्या करणारे जीवन संपवण्यासाठी विषारी कीटकनाशकाचा सर्वाधिक वापर करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कीटकनाशके सहज उपलब्ध होत असल्याने व मरण यातना फारशा होत नसल्याने त्याचा अधिक वापर केला जात असावा. त्यामुळे कीटकनाशके सहज उपलब्ध होण्यावर प्रतिबंध घालण्याचा विचार व्हायला हवा. सहा महिलांमधील एक महिला मृत्यूला कवटाळण्यासाठी पेटवून घेण्याचा पर्याय निवडत असल्याचेही यानिमित्ताने आढलून आले आहे.
     मागे आणखी एक आंतरराष्ट्रीय सर्व्हे प्रकाशित झाला होता, त्यात भारताल्या महिलांवर होणारे अन्याय-अत्याचार सौदी अरेबियासारख्या देशांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे म्हटले होते. सर्व्हेक्षणात जगातल्या १९ विकसित आणि विकसनशील देशांमध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि हिंसा यांसारख्या विषयांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला होता. यात भारत, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझिल, सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये महिलांची आवस्था विचित्र असल्याचे म्हटले आहे.  महिलांवर अन्याय-अत्याचार, छळ, यौवन शोषण, सामाजिक भेदभाव यासारख्या त्याज आणि निंदनीय घटनांवर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा दिसून येतो. समाजात स्त्रियांची उपेक्षा आणि संवेदनहिनताही दिसून येते. काही प्रकरणाम्मध्ये महिलांना होणार्‍या हिंसेला समाजमान्यता मिळाली आहे. एका सरकारी अभ्यासानुसार ५१ टक्के पुरुष आणि ५४ टक्के महिलांनी पत्नीला मारहाण करण्याच्या कृत्याला योग्यतेचे प्रमाणपत्र दिले आहे.
     आजचा समाज अजूनही महिलेला स्वातंत्र्य द्यायला तयार नाही.त्यामुळे निम्म्या लोकसंख्येची उपेक्षा करून कुठलाही देश, समाज प्रगती करू शकत नाही. महिला सक्षमीकरण आणि आरक्षण याबाबतीत आपण अजूनही बोटचेपे धोरण अवलंबत आहोत. देशातल्या महिलांची परिस्थिती सुधारत नसेल तर याला समाजाबरोबरच आमची व्यवस्थाही तितकीच कारणीभूत आहे. ही व्यवस्था बदल्याची आवश्यकता आहे.  आवश्यक त्या सामाजिक आणि कायदेशीर सुधारणा स्वीकारण्याबाबतीत हयगय करून चालणार नाही. त्याची तातडीने अंमलबजावणी व्हायला हवी.            

Saturday, June 23, 2012

बालकथा समजूतदार

        एक होता यश. मम्मी-पप्पांचा लाडका. क्लासमध्ये नेहमीच फर्स्ट. सगळेच म्हणत, यश मोठा स्मार्ट आहे. पण अलिकडे त्याला एक वाईट खोड लागली होती. मम्मीबरोबर मार्केटला जायचा ना तेव्हा, एखाद्या गोष्टीवर हटकून हट्टाला बसायचा. उडणारे विमान दिसले की, घे म्हणून दंगायोट करायचा. आइस्क्रीम पाहिलं की जाग्यावर नाचायला लागायचा. मम्मीकडून 'नाहीशब्द आला की, याची आदळापट सुरू ...  कधी कधी रस्त्यावरच आडवा पडायचा. पाय खुडायचा. शेवटी वैतागून मम्मी तो मागेल ती वस्तू घेऊन द्यायची नंतर  मम्मी फार समजावून सांगायची, कधी रागवायची. असा हट्ट बरा नव्हे म्हणायची. मग त्याला मम्मीचा राग यायचा. म्हणायचा,' सगळी मुलं हट्ट धरतात. त्यांची मम्मी त्यांना रागावत नाही. राजू, दिनू, बानू, मिनी सगळे ममी-पप्पांकडे हट्ट धरतात आणि ते  त्यांच्या पसंदीच्या वस्तू खरेदी करतात. ते त्यांना रागावत नाहीत. तू मात्र रागावतेस!'
     एक दिवस मम्मी रागाने म्हणाली, " यश, तू दिवसेंदिवस बिघडत चाललायस. बाकींच्या पोरांचं मला माहित नाही. पण तू ही सवय सुधार! तुझे पप्पा आणि मी तुझ्यासाठी किती खेळणी घेतो, खायच्या चिजा घेतो. पण तरीही तू पुन्हा पुन्हा नव्या वस्तूंसाठी हट्ट धरतोस. ही वाईट सवय आहे. यापुढं काहीएक मागायचं नाही. गप्प होमवर्क करीत बस जा." असे म्हणून मम्मी किचनमध्ये निघून गेली.
     काही दिवसांनंतरची गोष्ट! यशच्या मित्राला-राजूला त्याच्या पप्पाने सायकल घेऊन दिली. यश बागेत खेळायला गेला तेव्हा राजूने मोठ्या ऐटीत आपली सायकल त्याला दाखवली आणि म्हणाला," बघ, माझ्या पप्पांनी माझ्यासाठी किती छान सायकल आणलीय. दुकानात गेल्यावर मी हीच सायकल पाहिजे असा हट्ट धरला. मग काय! मम्मी -पप्पांनी घेतली सायकल विकत." यशलाही खूप वाटलं, खरंच! पप्पांनी माझ्यासाठीसुद्धा सायकल विकत घेऊन दिली असती तर मीसुद्धा पार्कमध्ये सायकल आणून खेळलो असतो.
     संध्याकाली पप्पा ऑफिसमधून घरी आल्या आल्या यश त्यांना सामोरे गेला आणि त्यांच्या पायांना हातांनी वेटोळे घातले. पप्पांनी त्याला उचलून घेतलं. मग पुढ्यात बसवून घेऊन टीव्ही पाहू लागले. यश पप्पांना म्हणाला," पप्पा, मला सयाकल घेऊन द्या ना! राजूच्या मम्मी-पप्पांनी त्याला नवीन सायकल घेऊन दिलीय. मलाही नवीन सायकल पाहिजे."
     तेवढ्यात मम्मी रागावत म्हणाली," यश, तुला कितीदा सांगितलं, हट्ट करायचा नाही म्हणून.. दुसर्‍याशी बरोबरी ती काय करायची?  " यश पप्पांच्या पुढ्यातून उठला आणि रडायला लागला. " मला सायकल पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्यावर तुमचं प्रेमच नाही, नाही तर असं वागला नसता." असे म्हनून तो रड्त रड्त बाहेर निघून गेला.
पप्पा मम्मीला म्हणाले," कशाला रागावलीस त्याला. घेऊन देऊ सायकल."
हा दिवसेंदिवस मुलखाचा हट्टी बनत चाललाय. त्याचा आपण प्रत्येक हट्ट  पूर्ण करू शकत नाही आहोत. पाहताय ना पैशाशिवाय कसे हाल चालले आहेत ते! ..."
"पण हरकत नाही, मला कपडे घ्यायला ठेवलेले पैसे आहेत. त्यातून आणि आणखी काही तरी उलाढाल करून घेऊ सायकल."
मम्मी हळूच म्हणाली," अहो पण, तुमच्या कंपनीची अनिवर्सरी आहे ना या मंथ एंडला. समारंभाला जुनेच कपडे घालून जाणार का?''
"असू दे गं, त्याचा आनंद म्हणजे आपला आनंद. कपडे काय नंतरही घेता येतील. आणि जुने कपडे घालून गेल्यावर काय फरक पडणार आहे?"
     यश दाराआडून मम्मी-पप्पांचे बोलणे लपून ऐकत होता. त्याला खूप वाईट वाटले. पटकन त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला वाटले होते, रडून , गोंधळ घालून सायकल मिळवता येईल. पण आपल्यासाठी मम्मी-पप्पांना त्यांच्या गरजांवर  मुरड घालावी लागत आहे, हे  कळल्यावर त्याला फार दु:ख झाले.
     आता यशला पश्चाताप झाला. त्याची त्यालाच लाज वाटू लागली. 'मी किती मूर्ख! मम्मी-पप्पा माझ्यावर किती प्रेम करतात. मी मात्र दुसर्‍यांचे पाहून उगाचच हट्ट धरून त्यांना त्रास देतो.' तो धावतच त्यांच्याजवळ गेला," सॉरी मम्मी-पप्पा! आता मी कधीच हट्ट धरणार नाही मला सायकल नको. " असे म्हणून यश पप्पांना मिठी मारून रडू लागला. मम्मी-पप्पांनी त्याला गप्प बसवले  आणि म्हणाले," "आज आमचा यश समजूतदार बनला."           

Monday, June 11, 2012

हसत जगवे ८

भेदभाव का?
आत्माराम 'वर' पोहचले. त्यांना स्वर्गातल्या एका तात्पुरत्या कक्षेत ठेवण्यात आले. त्यांच्यासोबत आणखीही काही लोक होते. त्यांना स्वर्गात ठेवायचं की नरकात याचा फैसला दोन-चार महिन्यांनी होणार होता. इथे सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री फक्त बिस्किटं आणि चहा दिला जायचा. पण कितीही खा आणि प्या. दोन दिवसांनी त्या कक्षाचा प्रभारी दूत आला, तेव्हा आत्माराम त्याला म्हणाले," मी खिडकीतून रोज पाहतोय, तिकडे त्या नरकवासियांना तीनवेळा मस्तपैकी भरपेट जेवण दिलं जातंय आणि आम्हाला मात्र चहा-बिस्किट? आमच्याशी असा भेदभाव का?"
दूत उत्तरादाखल म्हणाला," त्यांची संख्या लाखात आहे, आणि तुम्ही फक्त सहा-सात! आम्ही विचार केला की इतक्या कमी लोकांसाठी दाम आणि श्रम का वाया घालवायचे?'                   
     घाणेरडा फिक्चर
ते आपल्या मुलावर रागावत होते," तुला लाज नाही वाटत, घाणेरडा   फिक्चर बघतोस ते."
मुलगा म्हणाला," नाही पप्पा, मी गेलो नव्हतो, फिक्चरला. तुम्ही दुसर्‍याच कुणाला तरी पाहिला असाल."
"गप्प बस गाढवा, मला शहाणपणा शिकवू नकोस. मी तुझ्या मागच्याच सीटवर बसलो होतो. मी या.. या डोळ्यांनी पाहिलं तुला घाणेरडा फिक्चर पाहताना. "                                                
    मीच तो जादूगर
एक व्यक्ती गावातल्या एकमेव अशा दुकानात गेला. "तुमच्या दुकानात जे काही सडलेली फळं, टोमॅटो, अंडी आहेत, ते सगळे पॅक करून द्या. पैशाची काही काळजी करू नका."
दुकानदार त्याला अपादमस्तक न्याहाळत म्हणाला," आलं लक्षात! आज संध्याकाळी जादूगरचा प्रोग्रॅम आहे ना गावात. कार्यक्रम चांगला झाला नाही तर त्याची चांगलीच खबर घेण्याचा डाव दिसतोय तुमचा. पण साहेब, मी यापूर्वी तुम्हाला या गावात कधी पाहिलं नाही."
तो म्हणाला," मीच तो जादूगर."                                                        
                                                                           नरक
त्यानं आपल्या मित्राला विचारलं,"  मैत्रिणीखातर तू सिगरेट, दारू आणि मांस-मच्छी सारं काही सोडलंस ना, मग तिच्याशी लग्न का करत नाहीस?"
मित्र म्हणाला," मी खूप विचार केला, मोठ्या मुश्किलीने जिंदगी सुधारली आहे, आता पुन्हा नरकात पडून काय फायदा?"                                                                                   
लग्न
 "माझे बाबा म्हणत, बेटा, आपल्या जिंदगानीत असं एकादं काम करावं, जे आपल्या खानदानीत कुणी केलं नसेल."
"मग तू काय केलंस?"
" मी लग्न केलं."                                                                          
गोळी घालीन
एका अफगाणी सैनिकाला त्याच्या एका अधिकार्‍यानं प्रश्न केला," समज, एखाद्या तालिबान्यानं तुला पकडलं आणि म्हणाला की तुझी बायको माझ्या ताब्यात दे नाही तर बंदूक दे, तेव्हा तू काय करशील?'
"माझी बायको देईन."
अधिकार्‍याला झटकाच बसला. म्हणाला," पण का?''
तो म्हणाला," माझ्या बायकोला घेऊन चालला की त्याला गोळी घालून ठार करीन."  
उपवास
लग्नानंतरच्या काही दिवसानंतर एके सकाळी ती नवर्‍याला म्हणाली," संध्याकाळी येताना एक किलो सफरचंद, एक किलो द्राक्षे, अर्धाडझन केळी, एक किलो संत्री आणि एक नारळ घेऊन या."
त्यानं विचारलं," का काही खास बेत?"
ती म्हणाली," उद्या माझा उपवास आहे."                                                     
डोकं
तो म्हणाला," तू नेहमी म्हणतेस ना की पुरुषांना डोकंच नसतं. हे बघ, पेपरात काय लिहलंय- पुरुषमंडळींचं डोकं स्त्रियांपेक्षा अधिक चालतं."
बायको म्हणली," तुम्ही अजूनसुद्धा तुमचं डोकं चालवत नाही आहात. पेपरमधलं वाचून बोलता आहात."                ..