Monday, June 25, 2012

सायकल : अनेक दुखण्यांवरचे औषधपेट्रोलचे

  दर वाढल्याने प्रवासही महागला आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम अन्य जीवनाश्यक घटकांवरही झाला आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था चिंतेत असल्याचे सांगितल्यानंतर कॉर्पोरेट जगतासह सामान्यजनांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. असे असले तरी ऊर्जा संकट देशाच्या दळणवळण व्यवस्थेसाठी घातकच म्हणायला हवे. देशात लागणारे 80 टक्के इंधन आपण आयात करत असतो आणि त्यासाठी जबर किंमत मोजतो. त्यातच रुपयाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेले अवमूल्यन यामुळे आणखी गंगाजळी आपल्या इंधनासाठी मोकळी करावी लागत आहे. याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणारच आहे. सत्ताधारी आणि विरोधक या जागतिक मंदीच्या काळात सामोपचाराने वागत आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचे सोडून त्याचे राजकारण करीत बसले आहेत, ही दुर्दैवाची बाब असली आणि सत्ताधारी काँग्रेस आघाडीच्या यूपीए सरकारातील उघडकीस आलेल्या भयंकर भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे हे सरकारही आपली विश्वासार्हता गमावून बसले आहे. त्यामुळे सामान्यजनांचा कोणावरच विश्वास राहिला नाही. सामान्यजनांना यावर तोडगा काढताना स्वत:वरच आवर घालावा लागणार आहे. सतत दोन चाकी, चार चाकी वाहनांवर स्वार असणार्‍या मध्यमवर्गीय मंडळींनी स्वत:च्या मनाला आवर घालून काटकसरीचे पर्याय अवलंबायला हवेत. सायकलचा वापर या सर्वावर एक चांगला उपयोग आहे. सायकलच्या वापराने इंधन बचत तर होतेच, पण अनेक दुखण्यावरचे औषधही आहे. बैलगाडीपाठोपाठ सर्वात प्रथम वाहन स्वरूपात रस्त्यावर धावू लागलेल्या सायकलीचा वापर 1885 मध्ये पूर्ण बदलासह होऊ लागला. आता त्यात बराच बदल झाला असला तरी त्याचा मूळचा ढाचा बदललेला नाही. पुढे तिला मोटार जोडूनच मोटारसायकलची निर्मिती झाली. याच मोटारसायकलने पुढे सायकलला मागे टाकले आणि सायकल मागे पडली ती पडलीच. ही सायकल केवळ इंधन बचत करत नाही, तर आपल्या अनेक व्याधींवरचे 'रामबाण' औषधही आहे. व्यायामाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केल्यास त्याचे लाभ लक्षणीय आहेत. इक्झर सायकलवर बंद जिममध्ये दोन-दोन तास घाम गाळून नंतर एसी गाडीतून घरी जाण्यापेक्षा रोज कार्यालयात सायकलवरून गेल्यास आरोग्य, इंधन बचत, प्रदूषणापासून मुक्तता असे अनेक हेतू एकाच वेळी साध्य होतील.

प्रदूषणाचा प्रश्न अलीकडच्या काही वर्षात चांगलाच उग्र बनला आहे. वाहनातून बाहेर पडणार्‍या धुरांमुळे ग्लोबल वॉर्मिगमध्ये प्रचंड भर पडत आहे. त्यामुळे सायकल अनेक प्रश्नांचे उत्तर असू शकते. शिवाय मोठय़ा महानगरांपासून छोटय़ा नगरांपर्यंत वाहतूक कोंडीसारखी समस्या सतावत आहे. त्यावरही अनायसे नियंत्रण येईल. प्रदूषणामुळे दमा, अस्थमा, हृदयरोग अशा अनेक रोगांनी जे मानवी शरीरांवर आक्रमण केले आहे, त्यावर नियंत्रण येईलच, पण सायकल चालवल्याने हाता-पायांसह संपूर्ण शरीराला चांगला व्यायाम होईल. शरीरांतर्गातील रक्ताभिसरण व्यवस्थित राहील. त्यामुळे आजार, दुखणी पळ काढतील. व्यायामामुळे मनही ताजेतवाने राहील. क्रयशक्ती वाढेल. देशातल्या रस्त्यांवर सायकलींचा वावर कमी व्हायला अन्य वाहनधारकांचाही वाटा आहे. हे नाकारून चालणार नाही. रस्त्यावर सायकलधारकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. दुचाकीस्वार, बसचालक अथवा अन्य चार चाकी चालक यांच्याद्वारे नेहमीच सायकलस्वारांना कमी लेखले जाते. युरोप-जपानसारख्या देशांमध्ये सायकलस्वारांसाठी वेगळी 'लेन' (रस्ता) असते. अर्थातच तिथे सायकलीच्या वापरासाठी अनुकूलता असल्याने सायकलचा वापर वाढत आहे. नव्या मॉडेलमुळे कॉलेजवयीन युवकांमध्ये, शाळकरी मुलांमध्ये त्याची क्रेझ वाढत आहे, तर काही पर्यावरणवादी लोक सायकलचा हटकून वापर करू लागले आहे. 10-20 किलोमीटरचे अंतर काहीजण सहज सायकलीवरून करत आहेत, ही आशादायी बाब म्हटली पाहिजे. भारतीयांमध्ये ईर्षा ही वाढत असलेली विकृती क्लेशकारक आहे. शेजार्‍याने मोटारसायकल घेतली म्हणून आपणही घ्यायची. मग भलेही कर्ज का काढायचे होईना; पण दारात गाडी आणणार. ही ईर्षा घात करते. कारण त्यामुळे इंधनासाठी घाटा आलाच. हा घाटा एकवेळ खड्डय़ात नेल्याशिवाय राहत नाही. शिवाय सायकल वापरणे म्हणजे कमीपणाचे समजले जाते. त्यामुळे सायकलकडे काणाडोळा केला जातो; पण एक लक्षात ठेवायला हवे, चांगल्या ध्येयाने प्रेरित झालेली माणसे दुसरा काय म्हणतो, याचा विचार करत नाहीत, म्हणूनच ती मोठी होतात.

punyanagari 25/6/2012

No comments:

Post a Comment