Wednesday, June 6, 2012

सप्रेम नमस्कार.

              पहिल्यांदा 'गतिमान संतुलन'चा मला वर्गणीदार केल्याबद्दल आभार. मागच्या पत्रात तुम्ही या मासिकाविषयी सांगितला होतात. त्याच दरम्यान आमच्या जतच्या वाचनालयात अंक पाहायला मिळाला. त्यावेळी तिथल्या मित्राला विचारल्यावर त्याने आजच अंक आल्याचे व  अंकाच्या प्रसारासाठी मोफत आल्याचे सांगितले. पण मी त्याला दिलीप कुलकर्णी आणि त्यांचे पुणे सोडणे, कुडावळेसारख्या खेड्यात मातीच्या घरात राहणे आणि स्वतः ला पर्यावरणाच्या संतुलनासाठी झोकून कार्यरत राहणे याविषयीचा आपण सांगितलेला तपशील त्याच्यापुढे  कथन केला. ऐकल्यावर तो जसा मी सुरवातीला भारावून गेलो होतो तसा तो भारावून गेला. त्याने लगेचच त्याची वर्गणी भरून टाकली. आज (दि. ५ मे) दोघांनाही अंक आला. साहजिकच अंक खूप सुंदर आहे. विशेषतः दिलीप कुलकर्णींचे संपादकीय! तुमच्यामुळे एक वैचारिक लेखन आता माझ्या संग्रही राहील.
      तुमचे पत्र चार दिवसांपूर्वीच मिळाले, पण शाळेचा निकाल किंवा अन्य गोष्टींमुळे नंतरच पत्र लिहायला घ्यायचे ठरवले होते.  शिवाय सुटटीत तुम्ही सासरी येणार असा कयास करून पत्र लिहावं की नको या संभ्रमातही काही काळ होतो. मात्र तुमच्यावर शाळेच्या बांधकामाची जबाबदारी आहे, म्हटल्यावर तुमचा माहेरवास लांबणार असा विचार करून पुन्हा पत्र लिहायला घेतले.
      तुमचा स्वभाव बडबडी असल्याचे आपण म्हटले आहे. वाचून थोडी भीतीच वाटली. कारण मला बडबड्या माणसांची खरेच भीती वाटते.  अशी माणसं मनानं निर्मळ असली तरी  भीडभाड न ठेवता बोलणारी असतात, असा माझा अनुभव आहे.  त्यामुळे अशी माणसं कधी काय बोलून समोरच्याची विकेट घेतील, सांगता येत नाही. पण अशी माणसं सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात. माणसाच्या स्वभावाचं तत्त्वज्ञान मोठं विचित्र आहे.  बघा ना! - ' जो जास्त बडबड करतो, तो सगळ्यांच्या लक्षात राहतो. जो गडबड करतो तो लक्ष वेधून घेतो. जो तडफड करतो त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. जो कडकड करतो त्याला काही तरी मिळून जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे गप्प बसणार्‍याचे मोती खपत नाहीत, मात्र बडबडणार्‍यांची वाळूही खपते म्हणतात.'
     यात कुठला गैरसमज नसावा. फक्त मी  माणसांच्या स्वभावाचं हे सुंदर साहित्यिक तत्त्वज्ञान ऐकवलं आहे. आणि ते पटण्यासारखं आहे. जतला सात आठ वर्षांपूर्वी औरंगाबादकडील एक शिक्षणसेविका  होत्या. आता त्या तिकडेच आहेत. त्याही अशाच बडबडया! त्यांना मला त्रास द्यायचे मनात आले की तेव्हाही सोडत नव्हत्या आणि आताही  नाही. आले मनात की, लगेच फोन. उचलला गेला नाही तर रिंगवर रिंग  सुरूच. मग त्याला काळ वेळ काही नाही. त्यापेक्षा फोन उचलून काहीबाही बोलून ब्याद टाळता येते. फोन उचलला की त्यांनाही समाधान. नाही उचलला तर मात्र घोळ. तसे त्यांच्या या त्रासाला माझी संमतीच आहे म्हणा! कारणही तसेच आहे. त्यांनी लहानपणापासून फार खस्ता खाल्ल्या आहेत. कौटुंबिक प्रॉब्लेम वगैरे.... मात्र त्यात अडकून तो उगाळत बसल्या नाहीत. स्वतः ला सतत  कामात ठेऊन त्यांनी त्याच्यावर मात केली. त्यामुळे अपुसकच त्यांचा स्वभावही बडबड्या बनला. अजूनही त्या गप बसत नाहीत. फावला वेळ संगीत, वादन, कलाकुसरी बर्‍याच गोष्टी...  काय करते, काय नाही, सगळे सांगितल्याशिवाय राहत नाहीत.  त्यांचा हा स्वभाव माहित असल्यामुळे एक शिक्षा म्हणून मी सहन करतोय. हा माझा बडबड्या माणसांविषयीचा तर्क आणि अनुभव.
     व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे सगळीच माणसे सारखीच नसतात, पण त्यात एक समान धागा असतो, असा माझा कयास आहे. म्हणूनच म्हटलं, बकबक करणार्‍या माणसांची भीती वाटते.
     नुकतंच 'आयोध्येतला रावण आणि लंकेतला राम' हे अनुवादीत (गुजराती) पुस्तक वाचून झाले. पुस्तक वाचताना खरा क्रूर राम होता की रावण असा प्रश्न पडत राहिला. या पुस्तकातून हेच सुचीत करण्यात आले आहे. सीतेला दिलेला त्रास, लक्ष्मणाच्या बायकोची उर्मिलाची उपेक्षा वैगेरे... तर इकडे सीतेला पळवून नेण्याशिवाय कोणतीही चूक रावणाची नसल्याचे लाक्षात येते. रावण तपस्वी, प्रचंड ज्ञानी केवळ बहिणीच्या शुर्पणखा हिच्या अहंकाराखातर ( लक्ष्मणाशी विवाह करण्याचा हट्ट) रावण- राम एकमेकासमोर भिडले. विशेष म्हणजे रावणाने नंतर पुन्हा कधीच सीतेला स्पर्श केला नाही. तिच्या नकाराचा आदर केला, बळजबरी केली नाही. राम- रावण तसे दोघेही तितकेच तोलामोलाचे किंबहुना रावण अधिक सरसच.  असो पण यामुळे रावणाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली.
     

No comments:

Post a Comment