Sunday, June 3, 2012

नानाविध फंड्याने चित्रपट निर्माते मालामाल

    पहिल्यासारखी सिनेनिर्मात्यांना चित्रपट चालला न चालला याची आता चिंता राहिली नाही. कार्ण आता चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच त्यांचा खिसा गरम हो ऊ लागला आहे. चित्रपट प्रमोटचे नानाविध फंडे, टीव्ही प्रदर्शनाचे हक्क अशा अनेक कारणांमुळे निर्मात्यांचे हात तुपात आहेत. काळ बदलला, ट्रेंड बदलला तसे निर्मात्यांचे दिवसही पालटले.
   या वर्षी प्रारंभीच करण जौहरच्या हृतिक रोशन स्टारर 'अग्निपथ' चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स ४१ कोटी रुपयांना झी नेटवर्कला विकले गेले. जवळपास ६० कोटीचे बझेट असलेल्या  या चित्रपटाने टीव्ही हक्कातून प्रदर्शनापूर्वीच एक तृतीयांश रक्कम मिळवले. थिएटरच्या इन्कमची तर बातच सोडा! म्हणजे 'आम के आम गुठलियों के भी दाम' म्हणतात ना, तसा काहीसा हा प्रकार झाला म्हणायचा. आता एखाद्या बड्या निर्मात्याचे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच पैसे वसूल होण्याचा प्रकार सामान्य झाला आहे. कॉर्पोरेट कंपन्या सगळ्या कसोट्या पडताळून, एखाद्या प्रोजेक्टमध्ये दम असेल तर त्यावर खिसा मोकळा करायला मागे-पुढे पाहात नाहीत, हेच यातून स्पष्ट होते. २००७ मध्ये दिवाळीच्या दरम्यान आलेला शाहरुखचा 'ओम शांती ओम' याचेच उदाहरण घ्या. ३५ कोटीत बनलेला हा चित्रपट शाहरुख खान आणि फरहा खान यांनी इरोसला ७० कोटीला विकला. म्हणजे चित्रपट पडद्यावर येण्याअगोदरच त्यांनी शंभर टक्के नफा कमावला होता.
    गेल्यावर्षी १ जुलै रोजी 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा अमिताभचा सिनेमा रिलीज होणार होता. त्याचदिवशी युवावर्गात लोकप्रियता मिळवलेल्या इमरान खानचा 'दिल्ली बैले' झळकणार होता. तेव्हा पत्रकारांनी अमिताभला विचारलं होतं की या चित्रपटाच्या मुकाबल्यात तुमच्या चित्रपटाचा कसा टिकाव लागणार? यावर अमिताभने उत्तर दिले होते, 'या चित्रपटासाठी केवळ साडेदहा कोटी रुपये खर्च आला आहे. त्याचा टीव्हीवर दाखवण्याचा हक्क आम्ही अगोदरच साडे तेरा कोटीला विकला आहे. आता आम्ही नफ्यातच आहोत. थिएटरमधून मिळणारा पैसा म्हणजे बोनस असणार आहे.' आहे की नाही कमाल!
   म्हणजे आता पहिला जमाना कधीचा लोटला आहे. पूर्वी निर्मात्याला घातलेला पैसा काढण्यासाठी मोठी धडपड करावी लागे. पैसे जमवण्यासाठी त्याला अनेकांचे उबंरठे झिझवावे लागत. तो डिस्टीब्यूटर्सकडून ऍडवान्स पैसे घ्यायचा. सिनेमा बनविण्यासाठी बाजारातून अधिक व्याजाने पैसे उभे करायचा. चित्रपट पूर्ण करून रिलीज करेपर्यंत त्याला जमीन्-अस्मान एक करावे लागे. यात अनेकांचे दिवाळे निघाल्याच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. अनेकांना घरदार विकावं लागलं आहे. काहींनी मृत्यूलाही कवटाळले आहे. आज मात्र अशी परिस्थिती राहिलेली नाही. दमदार प्रोजेक्ट असेल तर मागेल ती किंमत मिळून जाते. सध्या  चमक -धमक नसलेले चित्रपट भाराभर येत आहेत. पण ती एका झटक्यात विकली जात आहेत आणि हिटही होत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या त्यातल्या एखाद्या गोष्टीला फ्लॅश करून वेगळ्या अंदाजात चित्रपट प्रेक्षकांसमोर आणतात. त्यामूळे प्रेक्षक त्याच्यामागे धावल्याशिवाय राहत नाहीत. चित्रपट प्रमोट करण्याचे नानाविध फंडे वापरले जात आहेत. कधी चित्रपटाचे नायक्-नायक टीव्हीच्या रिऍलिटी शोमध्ये तर कधी मालिकांमध्ये घुसतात. गाण्याच्या सीडी फुकट वाटतात. त्यामुळे आपोआपच   चित्रपटाची प्रसिद्धी होते.
    २०११ मध्ये अगदी साधारण चांगले मिळकत मिळवून गेले. शाहरुखच्या 'रा-वन'चेच उदाहरण घ्या. म्यूझिक राइट्स, मोबाइलवर वाजणारी कॉलर ट्यून, रिंग टोन, डिझिटल फॉर्मेट, कंज्युमर प्रोडक्ट, थिएटरचे हक्क, व्हिडिओ गेम अशा अनेक माध्यमातून या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच बरीच कमाई केली.
    पैसे कमविण्याचे आणखी एक साधन म्हणजे चित्रपटाचे संगीत. सुभाष घई यांच्या 'युवराज' चित्रपटाच्या म्युझिकने राइट्समधून इतकं भरभरून दिलं की चित्रपटाच्या प्रदर्शनातून निव्वळ बोनसच हाती लागला. गेल्या महिन्यात आलेल्या 'जन्नत-२' च्याबाबतीथी हेच घडले. खरे तर काही फिल्मकार असे आहेत की त्यांच्या स्क्रिप्ट्मध्ये दम नसला तरी ते म्युझिकवर अधिक भर देतात. श्राव्य संगीतासाठी मेहनत घेतात. म्हणून म्युझिक कंपन्या त्यांच्या पुढे-मागे घुटमळत असतात. लवकरच प्रदर्शित होणार्‍या 'गँग्स अँड वासेपूर' किंवा 'शंघाई' सारख्या     चित्रपटांनी आताच मोठी कमाई म्युझिक राइट्समधून केली आहे. चित्रपटात आयटम नंबर टाकले आणि कथेपेक्षा आयटम नंबरची अधिक पब्लिसिती केली की यश पदरात पडलेच म्हणून समजा. असे अनेक फंडे वापरून चित्रपट प्रेक्षकांच्या माथी मारल्यावर कुठला निर्माता कंगाल होऊन रस्त्यावर येणार आहे?

No comments:

Post a Comment