Thursday, July 5, 2012

दप्तराचे ओझे कधी कमी होणार?

     शाळा सुरू होऊन आता पंधरा-वीस दिवस उलटले आहेत. आर्थिक मागास घटकातील मुलांचा चांगल्या शाळांमधील प्रवेश अद्याप लटकला असला तरी शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात झाली आहे. पाठ्यपुस्तके, त्याप्रमाणात वह्या, स्वाध्याय वह्या, गृहपाठ वह्या असा भलामोठा गठ्ठा मुलांच्या दप्तरात भरलेला आणि तो वाहून नेताना आपल्याला मुले आपल्याला सकाळ्-दुपारी आणि संध्याकाळ दिसून येत  असतात. त्यासोबत पाण्याच्या बाटल्या, डबे, छत्री, रेनकोट यांचाही बाडबिस्तरा दिसत असतो. म्हणजे साधारण शाळेला जायचं आणि यायचं म्हणजे त्यांना एक हमाली करण्याचे काम होऊन बसले आहे. नाईलाज असल्याने दप्तराचे ओझे वाहून नेण्याचा आता त्यांना सराव होऊ लागला आहे.
     खरे तर आजचे युग स्पर्धेचे आहे, असे म्हटले जाते. कोणतेही क्षेत्र असे नाही की जेथे स्पर्धा नाही. त्यामुळे यातून शालेय विद्यार्थी तरी कसे सुटतील. त्यांना लहानपणापासूनच स्पर्धेला तोंद द्यावे लागत आहे. चांगल्या शाळेत प्रवेश मिळवण्याची स्पर्धा, अभ्यासाची स्पर्धा, पहिल्या तिनात-पाचात येण्याची स्पर्धा. चांगले गुण मिळाले नाही, तर चांगल्या शाखेत प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे मग त्याची तयारी शाळेत असल्यापासूनच सुरू होते. यासाठी मुलांकडून अक्षरश: ढोर मेहनत करून घेतली जाते. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस त्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे वाढताना दिसत आहे. नेहमी त्यावर चर्चाही होते. मात्र हे ओझे कमी करण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. कारण या चर्चा निव्वळ चर्चा राहतात. शिक्षक, शिक्षण संस्था आणि पालक यांना त्यातील गांभिर्य कळत नाही. किंवा ते घेत नाहीत.  शाळा हा बाडबिस्तरा आणायला सांगतात, त्यामुळे स्पर्धेत पुढे जायची घाई लागलेल्या पालकांना शाळा सांगतील ते पाल्यांना आणून देणे भाग झाले आहे. शाळांमध्ये ऍक्टिव्हिटीज वाढल्या आहेत. नवे-नवे प्रकल्प, सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचे साहित्य असे रोज काही ना काही शाळा आणायला सांगतात आणि पालक वर्ग निमूटपणे आणून देतात. शाळांना आपली पत राखायची असते तर पालकांना स्पर्धेत टिकायचे असते, मात्र या सगळ्यात मुलांचे आतोनात हाल होत आहे.    अशा परिस्थितीत दप्तराचे ओझे कमी करण्याचा सार्‍यांनाच विसर पडला आहे. शासनही केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे दप्तराचे ओझे  हे आजच्या शिक्षण पद्धतीसमोर एक सर्वात मोठे आव्हान होऊन बसले  आहे.
      आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाचा भार वाढतो आहेत, तर विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराच्या ओझ्याचा! या दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खांदा, मान, कंबरदुखीच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. आजच्या संगणकीच्या युगात खेळ हरवून बसला आहे. शारीरिक कसरत कमी झाली आहे. कार्टूनसारख्या बैठ्या खेळाकडे मुले आकृष्ट झाली आहेत. त्यामुळे एवढे ओझे वाहून नेण्याची शारीरिक क्षमता त्यांची नष्ट झाली आहे. मुलांचे आजार एकिकडे वाढत असताना दुसरीकडे  शिक्षणाच्या खासगीकरणासोबतच त्याचे बाजारीकरणही झालेल्या या काळात  खाजगी शिक्षण संस्था जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा याकरिता टार्गेट ठरवून काम करत  असताना दिसतात. यासाठी शाळेचा निकाल जास्तीत जास्त लागावा यासाठी विद्यार्थ्यांकडून जीवतोड मेहनत करून घेतली जाते. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिकतेवरही होताना पाहायला मिळतो. शहरातील बहुतांश शाळा विद्यार्थ्यांसाठी काही अँक्टिव्हिटीज घेत असतात. त्यासाठी विशिष्ट प्रकारचे बुक व नोटबुक विद्यार्थ्यांना घ्यावे लागतात. शैक्षणिक पाठय़पुस्तके, वर्गपाठ, गृहपाठाच्या वह्यांबरोबरच या ऑदर अँक्टिव्हिटीजची बुक्सही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढवत आहेत. लहान वयात मुलांनी खेळायचे असते. मात्र, आजच्या शिक्षण पद्धतीमुळे त्यांचे खेळण्या-बागडण्याचे आयुष्य हरवून ओझे वाहण्याचे काम करावे लागत आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना दीर्घकालीन आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याचा विचार करतो कोण?

No comments:

Post a Comment