Wednesday, May 22, 2013

विज्ञान क्षेत्राला प्राथमिकता देण्याची गरज

     जगात आता वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान आर्थिक स्रोत बनले आहेत. कुठल्याही देशाची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता त्याची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन बनले आहे. आपल्या देशात असं काय कमी आहे की, ज्यामुळे इथे विज्ञान, तंत्रज्ञान पोसलं जात नाहीये. पाश्‍चिमात्य देशांमध्ये आज जे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढे पोहचले आहे, ते पुढे कसे गेले याचा अभ्यास केला पाहिजे.     शास्त्रज्ञ आणि अभियंता यांच्या संख्येच्या दृष्टीने विचार केल्यास हिंदुस्थान जगात तिसरा सर्वात मोठा देश आहे. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र तो बरेच पिछाडीवर आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय विज्ञान कॉंगे्रसच्या कोलकात्यातील शताब्दी महोत्सवी अधिवेशनात संबोधताना देशातल्या सामाजिक समस्यांच्या समाधानासाठी प्रयत्न केले जावेत, अशी विनंती शास्त्रज्ञांना केली आहे. यासाठी सरकारने विज्ञाननीती - २०१३ आखली आहे. त्यांनी विकेंद्रित पद्धतीने सार्थक विकासाला प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षाही यातून व्यक्त केली आहे. यापूर्वीदेखील त्यांनी चीनने हिंदुस्थानला मागे टाकल्यावरून चिंता व्यक्त केली होती आणि वैज्ञानिक संशोधनावरचा खर्च एक टक्क्याने वाढवला जाईल, असे आश्‍वासन देत म्हटले होते. वास्तविक, अद्यापि या वाढीव खर्चाची रक्कम त्यांनी दिली नाही. खरे तर पहिल्यांदा देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्कार यासाठीचे वातावरण तयार करण्याची गरज आहे. आपल्या देशातले तमाम शास्त्रज्ञ विदेशात निघून जातात. गेल्या वर्षाच्या अधिवेशनात त्यांनी विदेशात काम करणार्‍या अशा शास्त्रज्ञांना माघारी परतण्याचे आवाहन केले होते. ते अशा पोकळ आवाहनाने परतणेही शक्य नाही आणि अपेक्षेप्रमाणे ते परतले नाहीतच.
     मुळात आपले वैज्ञानिक विदेशात जातातच का, हा मोठा प्रश्‍न आहे. याचे उत्तर चार वर्षांपूर्वी रसायनमध्ये संयुक्तरीत्या नोबेल पारितोषिक मिळवलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या वेंकट रमण रामकृष्णन या शास्त्रज्ञाने दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना लालफीतशाहीपासून मुक्तता आणि अधिक स्वायत्ततेची गरज आहे. देशातल्या वैज्ञानिक संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा जोपर्यंत नोकरशाहीच्या तावडीत आणि नात्यागोत्यांनी ग्रस्त राहील तोपर्यंत हिंदुस्थानात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा रस्ता सापडणार नाही. देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्कारासाठी पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी अर्थात देशाची पर्यायाने पंतप्रधानांची आहे.
     आपल्या देशात आजच्या घडीला रामन, खुराना का निर्माण होत नाहीत, याचा गांभीर्याने विचार कधी झालाच नाही. इतक्या सगळ्या वैज्ञानिक संस्थांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने असणार्‍या शास्त्रज्ञांचे संशोधन कोणत्या दिशेने चालले आहे आणि ही मंडळी तिथे काय करते, याचा देखील शोध घेतला गेला पाहिजे. एक तर ते काही करत नसले पाहिजेत किंवा आपल्या देशात वैज्ञानिक प्रगतीसाठी पोषक वातावरण नसले पाहिजे.
     जगात आता वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान आर्थिक स्रोत बनले आहेत. कुठल्याही देशाची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता त्याची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन बनले आहे. तांत्रिक ज्ञान आता व्यापाराचे हत्यार बनले आहे. म्हणूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाविना आता देशाची प्रगती अशक्य आहे. आपल्या देशात असं काय कमी आहे की, ज्यामुळे इथे विज्ञान, तंत्रज्ञान पोसलं जात नाहीये. वास्तविक, समाजच विज्ञान आणि तंत्रज्ञान कोणत्या दिशेला न्यायचं हे निश्‍चित करू शकतो.
जर अगदी लक्षपूर्वक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, पाश्‍चिमात्य देशांत यासाठी इतकी अनुकूल परिस्थिती होती, की त्यामुळे वैज्ञानिक विकास आवश्यक झाला होता. स्वातंत्र्याच्या आनंदात लोक साहसी प्रवासाला निघायचे. त्यांचा संपर्क जगात काही तरी नवे करण्याचा ध्यास घेतलेल्या लोकांशी व्हायचा. त्यातून त्यांना प्रेरणा मिळायची. त्यामुळे विकासाची एक नवी प्रक्रिया सुरू झाली. पश्‍चिमी युरोप आणि अमेरिका यांनी विज्ञान विकासाला जेवढे प्राधान्य दिले, तितके अन्य कुठल्या देशांनी दिले नाही. त्यांना या नव्या वैज्ञानिक संस्कृतीचे फायदे स्पष्ट दिसत होते. यामुळेच काही आणखी देशांनी त्यांचे अनुकरण केले. आपण मात्र या देशांच्या तर्‍हा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात हिंदुस्थान कायम पिछाडीवरच राहिला. आज देशात ९०० पेक्षा अधिक विज्ञान संस्था, विद्यापीठांमध्ये विज्ञान - तंत्रज्ञान संशोधनावर काम चालले आहे. पण तरीदेखील जगातल्या विज्ञान साहित्यात आमचा साधा नामोल्लेख नाही. जगभरातल्या विद्यापीठांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन व विकासाचे काम होते. परंतु आपल्या इथली विद्यापीठे अथवा अभियांत्रिकी कॉलेजेस राजकारणाचे अड्डे बनले आहेत. इथे फक्त पदव्यांच्या भेंडोळ्या वाटल्या आणि विकल्या जातात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही दुसर्‍या देशांवर अवलंबून आहोत. त्यासाठी आपल्याला मोठी किंमतही चुकती करावी लागते आहे. आज वीस हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान विदेशातल्या कंपन्यांच्या सहाय्याने हिंदुस्थानी बनावटीच्या इंजिन अथवा अन्य वस्तूंमध्ये वापरले जात आहे. साधे आपण टूथपेस्ट, बूटपॉलिश, च्युइंगम, रंग अथवा शवपेटी बनवण्याचे तंत्रज्ञानदेखील आम्ही विकसित करू शकलो नाहीत. आम्ही कुठल्याही कामात सार्वजनिक भागीदारीला प्रोत्साहन दिलं नाही. नद्यांवर बांध घातले, रस्ते बनवले, पण चीनप्रमाणे आम्ही त्यांना लोकांशी जोडू शकलो नाही. याउलट आम्ही   निवडणूक जिंकण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी जातीयवाद आणि धर्मवादाला प्रोत्साहन दिले. इथली अध्यापक आणि वैज्ञानिक मंडळी राजकारण्यांचे उंबरठे झिवत राहिली आणि विद्यार्थी मात्र कुठल्याशा विदेशी संस्थेचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धडपड करत राहिले अथवा करताहेत. पोखरण अणुस्फोट, अंतरिक्ष उपग्रह आणि अग्निबाण निर्मितीत आमच्या शास्त्रज्ञांची विलक्षण क्षमता जगजाहीर आहे. आता आपल्याला गरज आहे ती आपली प्राथमिकता निश्‍चित करण्याची आणि त्यानुसार नीती ठरवून अंमलबजावणी करण्याची.

Sunday, May 19, 2013

बालकथा विचित्र शिक्षा

     एकदा बादशहा अकबरच्या सर्वात लाडक्या बेगमने तातडीने भेटायला येण्यासाठी म्हणून  एका सैनिकाकरवी  निरोप  धाडला.  बादशहा दरबारात होता. त्यामुळे तो सैनिक थेट दरबारात आला आणि बादशहाच्या कानात कुजबुजला. तातडीने बादशहा उठला आणि जायला निघाला. बादशहाची बेगमला भेटण्याची अतुरता पाहून बिरबलला हसू आले. ते पाहून बादशहाला संताप आला.  तो बिरबलला म्हणाला," माझा अशा प्रकारे उपहास करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? तू स्वतः ला समजतोस कोण? चल, आत्ताच्या दरबारातून चालता हो.  आणि पून्हा म्हणून   माझ्या राज्यात पाय ठेवायचा नाहीस. "
     बिरबलने बादशहाची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि काही एक न बोलता  तो दरबारातून निघून गेला. बिरबलवर जळणार्‍यांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता आपलेच राज्य ,असे म्हणत ते एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले. आता बरेच दिवस झाले, पण बिरबल काही  दरबारात परतला नाही. आता बादशहाला त्याची उणीव भासू लागली. त्याची बिरबलाशिवाय म्हणजे मोडलेल्या कण्यासारखा अवस्था झाली. बादशहाची कोणतीही समस्या एका चुटकीसरशी सोडवणार्‍या बिरबलच्या अनुपस्थितीमुळे बादशहाला अनेक समस्यांशी सामना करावा लागत होता. प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने  अनेक प्रश्न रेंगाळत पडले होते.
     एकदा बादशहा महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना त्याला कोणी तरी रथात बसून रस्त्यावरून जात असल्याचे दिसले. त्याने लगेच सैनिकाला त्याची माहिती काढून आणावयास सांगितली. सैनिकाने परत येऊन तो बिरबल असल्याचे सांगितले. आता स्वतः बादशहा रस्त्यावर आला. आणि समोरून येणार्‍या बिरबलला अडवले. त्याला  बादशहा म्हणाला," माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस." बिरबल म्हणाला," हुजुर, आपल्या आज्ञेची  मी कधीच अवहेलना  केली नाही. आपण मला आपल्या राज्याच्या जमिनीवर पाय न ठेवण्याची आज्ञा केली होती, म्हणून मी दुसर्‍या देशातील माती आणून रथात पसरली आहे आणि त्यावर मी उभा आहे. त्यामुळे मी आपल्या राज्याच्या मातीवर उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. आता माझे संपूर्ण जीवन मला याच रथावर  घालवावे लागणार आहे." बिरबलची ही चतुराई बादशहाला भारी आवडली. शेवटी बादशहा त्याच्या या चतुराईवर तर फिदा होता. बिरबल आपल्याला सोडून जाणार नाही, याची पक्की खात्री बादशहाला होती.
     तो बिरबलला म्हणाला," बिरबल, मी तुला दिलेली आज्ञा आत्ताच्या आत्ता मागे घेत आहे. आता उतर खाली" असे म्हणून त्याच्या उतरण्याची वाट न पाहता  बादशहा स्वतः बिरबलजवळ गेला आणि त्याला हाताला धरून खाली उतरवले. बिरबल खाली उतरताच बादशहाने बिरबलला मोठ्या प्रेमाने  अलिंगन दिले. दुसर्‍यादिवशी बिरबल हसतमुखाने दरबारात आलेला पाहून त्याच्यावर जळफळाट करणार्‍यांची तोंडे मात्र पाहण्यासारखी झाली होती.

Friday, May 17, 2013

माकडाचा पराक्रम

     चिन्नी फार गोड मुलगी होती. तिला कोणी बाहुली म्हणायचं, तर कोणी परी म्हणायचं. घरातले सगळेच तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. अशा चिन्नीकडे खेळणीही सुंदर सुंदर होती. डोळे मिचकावणारी बाहुली, डमरू वाजवणारे अस्वल, झुक-झुक करत शिट्टी वाजवणारी आगगाडी अशी भरपूर खेळणी तिच्याकडे होती. तिला ती सगळी खेळणी आवडायची. पण फक्त टाळ वाजवणारं माकड मात्र आवडत नसे.
     टाळ वाजवणा-या त्या माकडाला पाहिलं की, तिचा संताप व्हायचा. ते माकड चावीवर चालायचं, पण त्याच्यात एक खोड होती. चिन्नी त्याला चावी द्यायची, तेव्हा ते टाळ वाजवायचं नाही. गप्प राहायचं. पण चिन्नी कसल्या तरी कामात असली किंवा झोपलेली असेल तर मात्र ते हमखास टाळ वाजवायला सुरुवात करायचं. त्यामुळे तिला माकडाचा मोठा राग यायचा. तिला वाटायचं, फेकून द्यावं कोठे तरी याला! पण ती फेकूनही देऊ शकत नव्हती. कारण ते तिला तिच्या आजीने मोठया प्रेमाने वाढदिवसाला दिलं होतं.
     एक दिवस चिन्नी खेळण्यांशी खेळत बसली होती. तिने विचार केला, चला, माकडाला पुन्हा एकदा चावी देऊन पाहू. नाही तरी त्याचा त्रासच आहे नुसता! आता शेवटचा प्रयत्न करून पाहू. नाही तर अडगळीच्या खोलीत फेकून देऊ. असा विचार करून तिने माकडाला हातात घेतलं. त्याला चावी दिली आणि त्याला खाली सोडलं. पण कसलं काय! माकड मख्ख उभं. त्याने टाळ वाजवलंच नाही.
     चिन्नी रागारागाने उठली आणि माकडाला उचललं. तरातरा जात त्याला अडगळीच्या खोलीत फेकून आली. सगळ्या खेळण्यांना माकडाविषयी चीड होतीच. ते माकड कधीही उठायचं आणि टाळ वाजवून सगळ्यांनाच त्रास द्यायचं. त्यामुळे बाकी खेळणीही त्याला वैतागलेली होती. त्याला चिन्नीने अडगळीच्या खोलीत फेकून दिल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. डोळे मिचकावणा-या बाहुलीने त्याच आनंदात अनेकदा डोळे मिचकावले. अस्वल डमरू वाजवत नाचू लागलं. झुक-झुक आगगाडीने शिट्टी वाजवली.
     रात्री खाणं-पिणं झाल्यावर चिन्नी सगळ्या खेळण्यांना पुढय़ात घेऊन झोपी गेली. पण अडगळीच्या खोलीत पडलेल्या माकडाची झोप उडाली होती. आपण योग्य वेळेला टाळ वाजवू शकत नाही, म्हणून ते स्वत:ला दूषणं देत होतं. दु:खात ते उशिरापर्यंत जोरजोराने रडत राहिलं. पण त्याचं ते रडणं ऐकायला, तिथं कोणी नव्हतंच!
     दु:ख आवरून माकड शांत झालं, तोच त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्याने थोडं वाकून पाहिलं तर त्याला घरात दोन चोर घुसले असल्याचं दिसलं. घरातले सगळेच झोपलेले होते.
     माकडाला आता काय करावं काही सुचेना. घरातल्यांना जागं करावं आणि चोरांना पकडून द्यावं, असं त्याला फार वाटत होतं, परंतु ते काहीच करू शकत नव्हतं. ते चिन्नीच्या खोलीपर्यंत जाऊनही आलं, पण तिचा दरवाजा आतून बंद होता. तेवढय़ात त्याला एक आयडिया सुचली. त्याने स्वत:ला एखाद्या बाटलीला हलवावं, तसं हलवलं. पुढं-मागं झुकवलं. हात हलवण्याचाही प्रयत्न केला. तरीही हात काही हलले नाहीत. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न करण्याचं ठरवलं. आता नाही तर कधीच नाही. कारण आता या लोकांना मदत केली नाही तर आपल्या जीवनाला मग कसलाच अर्थ राहणार नाही.
     आपण निरुपयोगी ठरू, असा विचार करून त्याने पुन्हा हात हलवून टाळ वाजवण्याचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य! टाळ वाजू लागले. एवढंच नव्हे तर टाळ वाजणं थांबतच नव्हतं. मग काय! घरातले सगळे लहानथोर माकडाच्या दंग्याने जागे झाले. त्याला गप्प करण्यासाठी सगळेच त्याच्या दिशेने धावले. पण ते माकड चोर जिथे होते, तिथे घरंगळत जाऊन पोहोचलं. झालं, चोर आयते तावडीत सापडले. घरातल्या सगळ्या सदस्यांनी त्या चोरांना चांगलंच बदडून काढलं.शेवटी पोलिस आले. चोरांना त्यांच्या ताब्यात दिलं. पोलिस गेल्यावर माकड चुपचाप अडगळीच्या खोलीकडे जाऊ लागलं. तेवढय़ात चिन्नीने त्याला हाक मारली, ‘अरे हे काय? तुझी जागा अडगळीच्या खोलीत नाही, तर माझ्याजवळ आहे. सॉरी, मला माफ कर’.
     माकडाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते म्हणालं, ‘मी नेहमीच चुकीच्या वेळी टाळ वाजवून तुला त्रास देत असतो. त्यामुळे माझी जागा तिथेच योग्य आहे’. चिन्नी म्हणाली, ‘अरे, प्रत्येकात काही ना काही खोड असते. तशी माझ्यात देखील आहे. पण तू तर आज कमालच केलीस. यामुळे तू मला आवडू लागला आहेस. आता यापुढे एक क्षणही तुला दूर लोटणार नाही. नेहमी तुला माझ्याजवळ ठेवीन’. असं म्हणत चिन्नीने त्याला उचलून कडेवर घेतलं आणि आपल्या खोलीत आली. त्याला एका खास जागेत ठेवलं. त्याला पाहिल्यावर बाकी सगळ्या खेळण्यांचा जळफळाट झाला, पण चिन्नीने त्याचा पराक्रम सांगितला. तेव्हा सगळेच कौतुक करायला त्याच्याकडे सरकले.

Thursday, May 9, 2013

विकासाच्या पोकळ बाता

     नऊ वर्षांपासून देशाचे सरकार चालवणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाच्या वर्तमान समस्यांवर तोडगा कसा काढला जाणार आहे हे अजूनही सांगू शकलेले नाहीत. देश आणि उद्योग क्षेत्रातील निराशा, त्याचबरोबर हतबलता हा जो माहोल देशात निर्माण झाला आहे तो दूर सारण्यासाठी त्यांनी कुठली पावले उचलली आहेत किंवा पुढे काय करणार हे काहीच त्यांनी सांगितलेले नाही.   

Friday, April 26, 2013

बालकथा : पोपट, वाघ आणि गाढव

     बादशहा बिरबल दरबार्‍यांना विचित्र प्रश्न विचारत असे. त्याने एकदा बिरबलला विचारले," बिरबल, मला एकाच माणसाच्या अंगात तीन तर्‍हेचे तीन गुण दाखवू शकशील?"
     बिरबल म्हणाला," का नाही हुजूर! एकाच माणसाच्या अंगात पोपट, वाघ आणि गाढवाचे गुण दाखवू शकतो. पण आज नाही, उद्या. बादशहांनी परवानगी द्यावी."
     बादशहाने होकार भरला. दुसर्‍यादिवशी बिरबलाने एका माणसाला पालखीत बसवून आणले.त्याने नुकतेच नशापान केले होते. बादशहाला पाहताच त्याने हात जोडले आणि म्हटले, हुजूर माफी असावी. मी फार गरीब आहे हो, मला माफ करा."
     बिरबल बादशहाला म्हणाला," हुजूरयाचा अंगात पोपट शिरला आहे,  बरं का! म्हणून  हा पोपटाची बोली बोलतो आहे."
     त्या माणसाला आता आणखी नशा चढली. तो बादशहाकडे बोट करीत म्हणाला," तू दिल्लीचा बादशहा झालास म्हणून जास्त शहाणपट्टी मारू नकोस. शहाणपणा दाखवायचं काही काम नाही. आम्हीदेखील आमच्या घराचे बादशहा आहोत."
     बिरबल म्हणाला," बादशहा सलामत, या वेळेला हा वाघाची डरकाळी फोडतोय."
काही वेळाने मात्र त्यांना काहीच बोलता ये ईना. नशा आता त्याच्या अंगात चांगलीच भिनली होती. त्याला धड चालता ये ईना, ना बोलता ये ईना. बेलकांडे खात तो एका कोपर्‍याला जाऊन पडला.तोंडाने मात्र काहीबाही बरळत होता.
     बिरबल म्हणाला," आता या माणसाला लाथ मारली तरी ती खाईल. असाच लोळत राहिल. म्हणजे आता त्याच्यात आणि गाढवात काहीच फरक राहिलेला नाही."
यावर बादशहा जाम खूश झाला. हसतच तो बिरबलाकडे गेला. त्यावेळी  त्याचा हात कंठहारावर होता.

Saturday, April 13, 2013

कसदार अभिनयाचा प्राण

  
   शेवटी एकदाचा अभिजात अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.  त्यांच्या चाहत्यांना कधीची या बातमीची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी प्राण यांच्या आजारपणाची बातमी आल्याने काहीशा व्यथित झालेल्या चाहत्यांना ही बातमी सुखावून गेली. हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल सात दशकाहूनही अधिक काळ खलनायकांचा बेताज बादशहा बनून राहिलेल्या प्राण यांच्या अभिनयाच्या उंचीपर्यंत आजदेखील कोणी पोहचला नाही. त्यांची खलनायकी नि:संशय  एकमेवाद्वितीय होती. प्राण यांच्यानंतर या चित्रपटसृष्टीत अनेक जाने-माने खलनायक हो ऊन गेले आणि आजही आहेत, पण प्राण यांच्या मुकाबल्यापर्यंत कोणी पोहचू शकला नाही. त्यांची उंची अबादित राहिली.

     प्राण १९३९ मध्ये पंजाबी भाषेत प्रदर्शित झालेल्या 'यमला जट' चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करते झाले. खरे तर प्राण यांना फोटोग्राफर बनायचं होतं, पण नशिबाने त्यांना अभिनेता बनवलं. 'यमला जट' मध्ये नूरजहाँदेखील भूमिका होती. ती त्यावेळी  अवघी दहा वर्षांची होती. नंतर १९४२ मध्ये प्राण यांचा पहिला हिंदी 'खानदान' चित्रपट आला, त्यात नूरजहाँ त्यांची नायिका बनली होती. नूरजहाँ त्यावेळीही काही मोठी प्रौढ नव्हती. ती केवळ बारा-तेरा वर्षांची असावी. क्लोज-अप दृश्यांमध्ये तिला दगड किंवा वीट यांवर उभारावं लागायचं. प्राण यांनी नायक म्हणून काही चित्रपटांमध्ये काम केलं, पण त्यांना त्यात काही मजा आली नाही. नायिकेबरोबर गाणं गाताना त्यांना वेगळचं फिलिंग व्हायचं. पावसात गायचं, बर्फावर नाचायचं किंवा झाडांभोवती फिरायचं, असल्या गोष्टी त्यांना जमायच्या नाहीत. फाळणीनंतर ते आपल्या कुटुंबासह मुंबईला आले. त्यांना वाटलं होतं, इथं  त्यांच स्वागत होईल. पण तब्बल नऊ महिन्यांहून अधिक काळ  त्यांना काम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या संघर्षमय काळातदेखील त्यांची ऐट मोठी होती. ते  आपल्या कुटुंबासह अलिशान हॉटेलमध्ये राहत. जसजशी त्यांच्याजवळची पुंजी संपत आली, तसेतसे त्यांना स्वस्तातल्या हॉटेलमध्ये राहणं भाग पडलं. शेवटी त्यांना प्रसिद्ध लेखक साअदत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्या सहाय्याने 'जिद्दी' या चित्रपटात छोटीशी भूमिका मिळाली. या चित्रपटाचा नायक होता, देव आनंद आणि त्याची नायिका होती कामिनी कौशल. 'जिद्दी' हिट झाला आणि प्राण यांना आणखी तीन चित्रपट मिळाले. त्यांची नावे होती. गृहस्थी, अपराधी आणि पुतली. मुंबईत आल्यावर प्राण यांचा सगळ्यात हिट चित्रपट राहिला तो बी आर चोप्रा यांचा 'अफसाना'. मग मात्र प्राण यांनी  मागे वळून कधी पाहिलेच नाही. यानंतर जो चित्रपटांचा  सिलसिला सुरू झाला तो एकेक हिट चित्रपटांचे झेंडे गाढूनच. दरम्यान प्राण अभिनयाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचले.
     'जिद्दी' नंतर 'बडी बहन', शीशमहल, अफसाना, आह, आंसू, अंगारे, मीनार, पहली झलक, बिरादरी, देवदास, कुंदन, मुनीमजी, मिस इंडिया, मि. एक्स, अदालत, चोरी चोरी, नया अंदाज, मधुमती, जालसाज, बेवकूफ, छ्लिया, जिस देश में गंगा बहती है, गुमनाम, शहीद, दिल दिया दर्द लिया, दस लाख, फिर वो ही दिल लाया हूं, सावन कि घटा, काश्मिर की कली, जब प्यार किसी से होता है, मिलन, राम और श्याम, उपकार, आदमी, हीर रांझा, जॉनी मेरा नाम, पूरब और पश्चिम, परिचय, विक्टोरिया नं. २०३, बॉबी, जंजीर, कसौटी, अमर अकबर अंथनी, अंधा कानून, नौकर बीवी का, नास्तिक, जागीर, शराबी, कर्मयुद्ध, सुहागन, आणि दान सारख्या कित्येक चित्रपटांमध्ये प्राण यांनी भूमिका केल्या आणि भूमिका अजरामर केल्या. जवळपास साडेतीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. यातल्या जवळ पास तीनशे चित्रपटांच्या कास्टिंग दरम्यान सगळ्यात शेवटी नाव यायचं 'अँड प्राण'.  हे नाव  त्यांचे महत्त्वच अधोरेखित करायचे. याने प्रेरित होऊनच त्यांची ओळख 'अँड प्राण' अशी ठेवली गेली.
     खासगी जीवनात अत्यंत सालस आणि सतत दुसर्‍याच्या मदतीसाठी तत्पर असणार्‍या प्राण यांचे पूर्ण नाव प्राण किशन सिकंद असे आहे. ते चित्रपटात जसे सतत सिगरेट ओढताना आणि धुर सोडताना दिसत,  तसे वास्तविक जीवनात देखील ते धुम्रपानाचे शौकीन राहिले आहेत. सिगरेट्च्या धुरांचे वेटोळे ही त्यांची ओळख बनली होती. त्यांच्या संवादातला 'बरखुरदार' हा शब्ददेखील मोठा लोकप्रिय झाला. त्यांनी वाईट माणसाला दरवेळेला नवनव्या अंदाजात पडद्यावर सादर केले. मॅनरिज्मबरोबरच ते प्राण आपल्या वेशभुषेकडेदेखील फार गांभिर्याने लक्ष द्यायचे. प्राण यांनी आपले डोळे, आपला आवाज आणि आपला मॅनरिज्म यांच्या जोरावरच खलनायकी साकारली. या कामाबाबत ते वाकबदार होते. ते कधी 'चिप' झाले नाहीत किंवा कधी त्यांनी विनाकारण आरडाओरडा केला नाही. एकदा प्राण आणि जॉय मुखर्जी 'फिर वही दिल लाया हूं' चित्रपटाचे शुटींग करत होते. शुटिंग पाहायला आलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात नासिर हुसेन यांना कठीण जात होते. तेव्हा त्यांनी प्राण यांची मदत घेतली. तेव्हा प्राण यांनी शांत राहायला सांगण्यासाठी व्हिलनच्या अंदाजातच गर्दीला सामोरे गेले आणि अक्षरशः गर्दी नियंत्रणात आली.   घाबरून गर्दी शांत झाली.
     एकेकाळचे प्रसिद्ध त्रिकुट म्हणजे देव-राज-दिलीप यांचा हमखास आवडीचा खलनायक प्राणच असायचे. या तिघांना अगोदरच फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या तिघांना प्राणसारख्या मुरलेल्या अभिनेत्यासोबत दोन हात करण्यात मजा यायची. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे या त्रिकुटबरोबरच राजेंद्रकुमार यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नायकाला प्राणपेक्षा अधिक मेहनताना मिळत नव्हता.
     'जंजीर' चित्रपटात अमिताभला घेण्याची शिफारस स्वत; प्राण यांनी केली होती. अमिताभसोबत प्राण यांनी तब्बल १४ चित्रपट केले आहेत. यातल्या पहिल्या सहा चित्रपटात प्राण यांनी अमिताभपेक्षा अधिक पैसे घेतले होते. १९७० मध्ये प्राण यांना अमिताभपेक्षा अधिक पैसे मिळत होते. १९७० ते १९७५ पर्यंत प्राण भूमिकेच्या हिशोबाने पाच ते वीस लाखपर्यंत मेहनताना घ्यायचे. राजकपूर 'बॉबी' चित्रपटासाठी प्राण यांना 'कास्ट' करत होते, पण त्यावेळी राजकपूर यांची परिस्थिती तेवढे पैसे देण्याची नव्हती. शेवटी प्राण यांनी केवळ एक रुपयावर 'बॉबी' चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली. १९९० मध्ये वाढत्या वयाच्या समस्यांमुळे प्रान यांनी चित्रपट स्वीकारणे बंद केले. अमिताभ बच्चन यांचे करिअर डळमळीत झाले होते, तेव्हा प्राण यांनी अमिताभच्या विनंतीनुसार मृत्यूदाता आणि तेरे मेरे सपने मध्ये काम केले, ही त्यांची महानताच म्हणावी लागेल.     

Tuesday, April 9, 2013

विकासाच्या पोकळ बाता

     अलिकडेच सीबीआयच्या एका बैठकीत मनमोहनसिंह म्हणाले होते की, भारतीय अर्थव्यवस्थेला जर पूर्ण क्षमतेने काम करायचे असेल तर भ्रष्टाचार आणि नोकरशाहीची निष्क्रियता यासारखे घरचे अडथळे दूर करायला हवेत. पण प्रश्न असा आहे की, मनमोहनसिंह स्वतः पंतप्रधान आहेत आणि असे असताना ते या गोष्टी सांहताहेत कुणाला? युपीए सरकारचा कुटुंबप्रमुख या नात्याने त्यांना काही करता येत नाही कात्यांनी यासंबंधी काही तरी करून दाखवावे, अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. सध्या जी भारतासमोर, अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेतती पार करण्यासाथी आपण कोणकोणत्या योजना राबवल्या, त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे केली, हे सगळे सांगण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेतून जात आहे, हे आता आकडे पुढे करून सांगण्याची आवश्यकता नाही. कारण महागाईने अगोदरच सामान्य माणसांचे जिणे मुश्किल करून ठेवले आहे. त्याच्यानेच देशात काही बरं चाललं नाही, याचा अंदाज यायला वेळ लागत नाही.
     औद्योगिक क्षेत्रात मंदी आली आहे. त्यामुळे रोजगाराचा धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्थेत सरकारी सुधारणांचा दावा केला जात असला तरी सुधारणांचे कसलेच संकेत मिळत नाहीत. आठ पायाभूत उद्योगांच्या उत्पादनांमध्ये वेगाने होत असलेली घसरण भविष्यात औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुधारणा होईल, असे म्हणण्यासारखे चित्र आपल्यासमोर दिसत नाही. या क्षेत्रात तातडीने सुधारणा झाल्या नाहीत तर उद्योगांमध्ये कपातीचे धोरण स्वीकारले जाईल, आणि हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकेल. सध्या या घसरणीमुळे सरकारबरोबरच औद्योगिक क्षेत्रदेखील मोठ्या चिंतेत आहे. ही घसरण देशाच्या भविष्य, रोजगार निर्मिती आणि सामाजिक स्थिरतेसाठी घातक ठरू शकते. सध्याची ही अवस्था पाहता युपीए सरकारातील नेत्यांच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करते.
     नऊ वर्षांपासून देशाचे सरकार चालवणारे पंतप्रधान मनमोहनसिंह आणि कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहूल गांधी देशाच्या वर्तमान समस्यांवर तोडगा कसा काढला जाणार आहे, हे अजूनही सांगू शकलेले नाहीत. देश आणि उद्योग क्षेत्रातील निराशा , त्याचबरोबर हतबलता हा जो मोहोल देशात निर्माण झाला आहे, तो दूर सारण्यासाठी त्यांनी कुठली पावले उचलली आहेत किंवा पुढे काय करणार आहे, हे काहीच त्यांनी सांगितलेले नाही. शिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेला नवसंजिवनी देऊ, असा विश्वासदेखील ते देऊ शकलेले नाहीत.गेल्या महिन्यात कित्येक रेटिंग एजन्सींनी आणि आर्थिक संस्थांनी लागोपाठ अशा भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत बर्‍याच विपरित टिपण्या केल्या आहेत.
     मूडीजने देशाचा संभाव्य विकास दर कमी केला आहे. इतकेच नव्हे तर याला त्यांनी थेट युपीए सरकारची नीती जबाबदार असल्याचे म्हटले आहे. स्टँडर्ड अँड पुअर्स या आणखी एका रेटिंग एजन्सीने अगोदरच भारताचे रेटिंग खाली आणले आहे. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर ५.३ वर आला आहे. जो गेल्या नऊ वर्षातला सर्वात निच्चांकी आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे २०११-१२ मध्ये देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दरदेखील ६.५ टक्के होता. हा त्याच्या अगोदरच्या आर्थिक वर्षाच्या विकास दरापेक्षा (८.४ टक्के) फारच कमी होता. देशाचा निर्यात व्यापारदेखील अडचणीत आहे. निर्यात घटल्याने निर्यातसंबंधी कर्मचार्‍यांच्या कपातीच्या बातम्याही आता येऊ लागल्या आहेत. मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रातल्या स्थितीमध्ये सुधारणा होऊ न शकल्याने त्यातल्या रोजगाराच्या संधीही कमी होऊ शकतात.सीआयआयनुसार आता सगळं काही अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हातात आहे, ते राजकोषीय संतुलन स्थापित करण्यासाठी कोणती पावले उचलतात आणि दिलेल्या वचनानुसार अंमल करतात का, हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उद्योगजगतासाठी व्याज दराचे समाधान देण्याची घोषणा व्हावी, असम या क्षेत्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे. सरकारने रिझर्व्ह बँकेशी बोलणी करून रेपो दरात घट करण्याची आवश्यकता आहे. यामुळे घरगुती मागणीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल. फिक्कीचे अध्यक्ष आर. व्ही. कनोरिया यांच्या मतानुसार औद्योगिक उत्पादनाचे ताजे आकडे पाहता या क्षेत्रातली मंदी आगामी काळातदेखील लवकर दूर होऊ शकेल असे वाटत नाही. हे मोठे चिंतेचे कारण आहे. आपली देशांतर्गत मागणी सतत घटत चालली आहे. अशावेळी ठोस निर्णयच अर्थव्यवस्थेला उभारी देऊ शकतो. सध्या युपीए सरकारवर अनेक संकटाचे ढग जमा झालेले आहेत. अगोदरच भ्रष्टाचार-घोटाळ्यात सरकार शेंबाडतल्या माशीसारखे गुरफटले आहे. त्यातच २०१४ च्या लोकसभा निवडणुका समोर आहेत. पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी काही लोकार्षित योजना सरकार लागू करू इच्छित आहे. मात्र या योजना देशाच्या अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने घातकच ठरणार आहेत.
     आर्थिक पातळीवरच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत, याला केंद्र सरकारातल्या विभिन्न मंत्रालयातल्या समन्वयाचा अभावदेखील कारणीभूत आहे. त्यांच्यात अजिबात ताळमेळ नाही. त्यांच्यामुळे जवळ जवळ दोनशेहून अधिक योजना लोंबकळत पडल्या असल्याचे सांगण्यात येते. आर्थिक पातळीवर कोठेच काही सरळ्याने चालत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे उद्योग क्षेत्रात कमालीची निराशा  पसरली आहे. सरकारने तातडीने काही सुधारणावादी पावले उचलली नाहीत तर या क्षेत्रातली गुंतवणूकदेखील स्तब्ध होईल. आणि त्याच बरोबर चालू वर्षातला आर्थिक विकास दर गेल्या वर्षापेक्षाही अधिक खराब असू शकेल.
     मूडीजचे वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञ ग्लेन लेविन यांच्या म्हणण्यानुसार भारतीय रिझर्व्ह बँक आणि सरकार या दोहोंकडून अर्थव्यवस्थेच्या हिताच्यादृष्टीने योग्य पावले उचलली जात नाहीहेत. ग्लोबल आर्थिक संकटाने तर अगोदरच देशांतर्गत अर्थव्यवस्थेला आपल्या जाळ्यात अडकून टाकले आहे. खाद्य वस्तूंच्या महागाईला आटोक्यात आणण्यावरचे उपायदेखील होत नाहीत.साखर आणि खाद्य तेलाच्या किंमती सरकारच्या नियंत्रणातून सुटल्या आहेत. आयात शुल्क अधिक असल्याने तेलाच्या किंअतीदेखील अधिक आहेत. त्यातच अमेरिकासह अन्य देशात पडलेला दुष्काळ आगीत तेल ओतण्याचे काम करीत आहे. साखर साठमारीच्या तावडीत सापडली आहे. त्यामुळेच सरकारच्या उपायांची मात्रा चालेनाशी झाली आहे. साखरेच्या किंमती वाढतच चालल्या आहेत. महागाईच्या काळात किंमती कमी करण्यावरच्या उपायांवर भर देण्यापेक्षा सरकार खाद्यान्न उत्पादनाला प्रोत्साहन न देताच खाद्यान्न सुरक्षा विधेयक आणून संकट आणखी गडद करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या दिशाहिनतेमुळे परिस्थिती आणखी बिकट बनत चालली आहे. आपल्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे. याचा परिणाम म्हणजेच सामान्य लोकांना जीवन जगणं अवघड होऊन बसले आहे. 
     विकास दराची घसरगुंडी चालू असतानाच रोजगाराच्या पातळीवर तर अगोदरच संकटाचे ढग गडद होत चालले आहेत. युपीए सरकार विकास दर पुन्हा मार्गावर आणण्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात या दाव्यानुसार काही होताना दिसत नाही. त्यातच लोकसभेच्या निवडणुका कधी जाहीर होतील, सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. युपीए सरकारातील घटक पक्ष किंवा बाहेरून पाठिंबा दिलेल्या पक्षांमधील काँगेसचे संबंध बिघड्त चालले आहेत. ताणले जात आहेत. त्यामुळे सरकार याकडेदेखील दुर्लक्ष करून चालणार नाही. केंद्र सरकार अर्थात काँगेस या न त्या प्रकारचे २०१४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नांना लागली आहे. त्यामुळे आगामी काळात काही लोकार्षित नीती किंवा योजना लोकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा अर्थ अर्थव्यवस्था पुन्हा मार्गावर येण्याची शक्यता धुसरच आहे. याचे प्रतिकूल परिणाम या देशातल्या जनतेला आणि येणार्‍या नव्या सरकारला भोगावे लागणार आहेत.