Friday, June 14, 2013

चोराच्या घरात चोरी

  
   एक चोर होता. त्याचे नाव होते करणकुमार. अनेक वर्ष तो चोरी करत आला
, पण एकदाही सापडला नाही. त्याला खूप वाटायचं, आपण हा धंदा सोडावा आणि मेहनतीचं काम करावं. पण हा त्याचा संकल्प दुस-या दिवसापर्यंतही टिकायचा नाही.
     एका रात्री करणकुमार चोरी करायला बाहेर पडला होता. एका घरात तो अगदी काळजीपूर्वक शिरला. खोलीत दिवा जळत होता. एक माणूस दु:खी मनाने मान खाली घालून चिंताग्रस्त बसला होता. त्याच्यासमोर देवाचा एक सोन्याचा मुकूट आणि दागदागिने पसरलेले होते. करणकुमार माघारी फिरणार, तोच आवाज आला, ‘‘मित्रा ये, आता परत चाललास कुठे? तू चोर ना! चोरी करण्याच्या उद्देशानेच आलास ना?’ करणकुमार जागच्या जागी थबकला. त्याला मोठं आश्चर्य वाटलं.
तो माणूस एखाद्या पाहुण्याचं स्वागत करावं, तशाप्रकारे बोलत होता. काहीसा घाबरलेला करणकुमार त्याच्याजवळ जाऊन खाली बसला. तो माणूस म्हणाला, ‘काय नाव तुझं? तुझ्यासारखाच मीदेखील चोर आहे. प्रत्येक वेळेला चोरी केल्यावर विचार करतो की, आता हा चोरीचा धंदा सोडावा. चोरी म्हणजे पाप, अधर्म. कष्टानं कुणी तरी मिळवतं आणि आपण त्याच्याकडून ते लुबाडून नेतो. त्याला अडचणीत टाकतो.’’
      करणकुमार म्हणाला, ‘‘माझं नाव करणकुमार. मित्रा, तू म्हणतोस ते खरं आहे. आपण आपल्या आणि घरच्यांच्या नजरेतून उतरलेले असतो. माझी बायको तर माझा तिरस्कार करते. चोरीच्या वस्तूंना स्पर्शदेखील करत नाही.’’ ‘‘माझं नाव श्रावणकुमार. जरा विचार कर, तो एक श्रावणकुमार होता, ज्याने आपल्या अंध माता-पित्यांची सेवा केली. त्यांना कावडीत बसवून तीर्थयात्रा घडवून आणली. आणि मी एक असा श्रावणकुमार, जो नालायक आणि अधर्मी. मी मेल्यावर मला नरकातदेखील जागा मिळणार नाही.’’
     ‘‘तू म्हणतोस ते बरोबर आहे, श्रावणकुमार. बरं, तू हे समोर काय घेऊन बसला आहेस? हा सोन्याचा मुकूट आणि ही आभूषणं?’’ करणकुमारने विचारलं. ‘‘अरे मित्रा, आज तर मी करंटेपणाचा कळस केला. मी एका मंदिरात गेलो होतो. तिथे देवाच्या मूर्तीवर सोन्याचे दागिने घातले होते. मी मंदिराच्या दाराला लावलेलं कुलूप तोडलं आणि हे सगळे दागिने चोरून घेऊन आलो. आता माझा आत्मा माझा धिक्कार करतो आहे. अरे, देवालाही सोडलं नाहीसहे शब्द घणासारखे माझ्या कानात आदळत आहेत. क्षणभरही माझं मन स्थिर नाही. आता तूच सांग, मी काय करू?’’ श्रावणकुमार दु:खी होऊन म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘माझ्या मते तू देवाची ही सगळी आभूषणं जिथे होती, तिथे ठेवून ये.’’
‘‘पण मला मूर्तीचा शृंगार करता येत नाही. पहिल्यासारखी आभूषणं जिथल्या तिथे कशी बरं चढवता येतील मला?’’ श्रावणकुमार म्हणाला.
     करणकुमार म्हणाला, ‘‘काळजी करू नकोस. मी या कामात तुला मदत करीन.’’
     दोघेही मुकूट आणि आभूषणं घेऊन मंदिराच्या दिशेने निघाले. मंदिरात पोहोचल्यावर दोघांनीही पाहिलं, पुजारी अजून झोपलेला होता. मंदिरातल्या आभूषणांची चोरी झाल्याची बातमी अजूनही कुणाला कळालेली नव्हती. करणकुमारच्या मदतीने श्रावणकुमारने देवाच्या मूर्तीवर मुकूट आणि इतर आभूषणं जशी होती तशी चढवली. दोघांनीही देवाला हात जोडले. आपल्या वाईट कामाबद्दल क्षमा मागितली आणि देवाला वचन दिलं की, आता यापुढे कधीही चोरी करणार नाही. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीन.
     मंदिराबाहेर आल्यावर श्रावणकुमार म्हणाला, ‘माझ्यावर जे पापाचं ओझं होतं, ते आता दूर झालं आहे. आता मला खूप समाधान मिळतंय.’’‘‘मलादेखील फार बरं वाटतं आहे. कारण ही जी वाईट गोष्ट मी सोडू शकत नव्हतो, ती सोडायला माझं मन तयार झालं आहे. परमेश्वराने आपल्याला सद्बुद्धी दिली आहे. आता मी मेहनत करीन आणि भल्या कामासाठी वेळ देईन.’’
     ‘‘खरंच, प्रामाणिक माणूस म्हणून
     जगण्यात फार मोठा आनंद आहे.’’ असं म्हणून श्रावणकुमारने करणकुमारला अलिंगन दिलं. चोरीचा धंदा सोडून नवं जीवन जगण्याचा संकल्प करून दोघांनेही एकमेकांचा निरोप घेतला.
     त्यानंतर खरोखरच करणकुमार आणि श्रावणकुमार दोघांनी चोरीचा धंदा सोडून दिला आणि छोटा व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक व्यवहारामुळे दोघांच्याही धंद्याला चांगली बरकत आली. लवकरच ते शहरातले एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी बनले. आता त्यांना लोक शेठ करणकुमार आणि श्रावणकुमार म्हणून ओळखू लागले.

Wednesday, June 12, 2013

शिक्षकांच्या संघटना एका छताखाली: शिवधनुष्य पेलणे अशक्य

     कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व शिक्षक संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यासाठी राज्याच्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला असून जाईल तिथे श्री. पाटील आपला मनोदय बोलून दाखवत आहेत. त्यांनी  पुढाकार घेऊन राज्यातल्या शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची पहिली बैठक  दि. १९ जून रोजी मुंबईत बोलावली आहे. यासाठी त्यांनी शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष आणि सचिवांना आमंत्रणे धाडली आहेत. मात्र, शिक्षक संघटनांना एकत्रीकरणाच्या नावाखाली राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या फेडरेशन स्थापनेबाबतच्या आशा धुसर वाटत आहेत.
     अलिकडेच शिक्षकांच्या बदल्यांसंबंधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची बैठक  जयंत पाटील यांनी मुंबईत आयोजित केली होती. या बैठकीला राज्यातील सुमारे २२ संघटनांचे राज्याध्यक्ष व समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे फेडरेशन स्थापन करण्याचा विचार बोलून दाखविला. अर्थात गेल्या वर्षभरापासून श्री. पाटील हा आपला मनोदय शिक्षकांच्या विविध व्यासपीठावरून दाखवत आहेत. मुंबईतल्या बैठकीत संघटनांनी फारसा मनावर घेतला नाही. मात्र आता यासाठी खास बैठक बोलवण्यात आल्याने चर्चेला ऊत आला आहे.
सर्व शिक्षक संघटना एकाच छताखाली आल्यास शिक्षकांचे प्रश्न सुटू शकतात, असा दावा जयंत पाटील यांनी  केला आहे. त्यानुसार कर्नाटक राज्याच्या धर्तीवर सर्व संघटनांचे एकच फेडरेशन असावे, यावर निर्णय घेण्यासाठी मुंबईत १९ जूनला बैठक बोलवण्यात आली आहे.  मात्र, जयंत पाटील काहीही म्हणत असले तरी त्यांच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नाला राजकीय वास आहे, असे म्हटले जात आहे.
       शिवाजीराव पाटील यांच्या संघटनेच्या एकत्रिकरणाचा प्रयत्न अद्याप यशस्वी झाला नसता श्री. पाटील राज्यातल्या सर्वच संघटनांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न अशक्य आहेच, पण त्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा महत्त्वाच्या आहेत, असे म्हटले जात आहे. वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिपत्त्याखाली शिवाजीराव पाटील यांची शिक्षक संघटना वावरत आहे. हीच संघटना फुटलेली असल्याने त्यांना आगामी निवडणुकीत मोठा धोका दृष्टीस पडत आहे. राज्यात जवळपास तीन लाखावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. यातले सुमारे एक दीड लाख शिक्षक शिक्षक संघाचे म्हणजेच शिवाजीराव पाटलांच्या संघटनेचे सभासद आहेत.उर्वरीत शिक्षक विविध संघटनांमध्ये सामावलेले आहेत.
      राज्यात दहा ते बारा शिक्षक संघटना आहेत.   सध्याच्या घडीला शिवाजीराव पाटलांची संघटना बलाढ्य वाटत असली तरी संभाजी थोरातांनी आपली वेगळी चूल मांडली असल्याने ही संघटना खिळखिळी झाली आहे. ही संघटना एकत्रित करण्याची जबाबदारीही जयंत पाटील यांनी घेतली आणि यासाठी मुंबई, आळंदी, इस्लामपूर आणि कोल्हापूर आदी ठिकाणी फुटीर व शिवाजीराव पाटलांच्या संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. यात त्यांनी राज्य स्तरावरील पदाधिकारी निवडून  काही प्रमाणात  यश मिळवले असले तरी  अद्याप जिल्हा व तालुका पातळीवर या संघटना या तनामनाने एकत्र आल्या नाहीत. अद्याप या निवडी पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा शिक्षक संघाची मोट घट्ट बांधावी लागणार आहे. ही प्रक्रिया खोळांबली असताना त्यांनी राज्यातल्या सर्व संघटना एका छताखाली आणण्यासाठी घाई लावली आहे. त्यातच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, माराठवाड्यात या एकिकरणाला विरोध वाढू लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात अद्याप याबाबत विरोधाचा उघड सूर निघत नसला तरी खासगीत या एकिकरणाची खिल्लीच उडवली जात आहे.
      एकत्रीकरणाला बव्हंशी शिक्षक संघटनांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या संघटना या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शिक्षक संघटनांचे फेडरेशन करून त्याला राजकीय पक्षाच्या दावणीला बांधण्याचा हा डाव असल्याचा आरोप संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. राज्यातील विविध शिक्षक संघटना आपापल्या स्तरावर शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. संघटनांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्यामागे एकमेव राजकीय कारण असल्याचे म्हटले  जात आहे.  ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना सर्व शिक्षक संघटना शिक्षकांचे नेते म्हणवून घेणार्‍या आमदार शिवाजी पाटील यांच्या अधिपत्याखाली आणायची आहे आणि शिक्षकांचा उपयोग आगामी निवडणुकांसाठी करून घ्यावयाचा आहे. त्यासाठीच हा एकत्रीकरणाचा सारा खटाटोप आहे. शिक्षक संघटना या राजकारणविरहित असून, त्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. सर्व संघटना आपापल्या स्तरावर चांगले काम करत आहेत. त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा कोणालाही अधिकार नाही. फेडरेशन स्थापनेला पूर्णपणे विरोध केला जाईल. शासन आणि संघटना यांच्यात अभद्र युती झाल्यास शिक्षकांचे हित पाहिले जाणार नाही, असा सूर विविध भागातून निघत आहे. जयंत पाटलांनी १९ जूनला मुंबईत बैठक बोलावली  असताना सुमारे २0 संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक दि. १८ जून रोजी पुण्यात होत आहे.  त्यात या एकत्रीकरणाला प्रखर विरोध करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे जयंत पाटलांचे मनसुबे उधळले जाणार अशीच परिस्थिती सध्या तरी उदभवत असल्याचे दिसत आहेत.      

Sunday, June 9, 2013

अंधश्रद्धने केले नुकसान

   
 
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आल्या आल्या आकाशने विचारलं, ‘बाबा, माझं पेन आणलंत?’ ‘हो, आणलंय’, असं म्हणत त्यांनी आपल्या बॅगेतून एक पेन काढलं आणि आकाशच्या हातात टेकवलं. पेन पाहताच आकाशचा चेहरा उतरला. तो म्हणाला, ‘हे काय हो बाबा, मी तुम्हाला निळ्या रंगाचं पेन आणायला सांगितलं होतं, तुम्ही हिरव्या रंगाचं आणलंत. निळा रंग यश देतो, माहीत नाही का तुम्हाला?’ त्यावर बाबा चकित होऊन म्हणाले, ‘हे कुणी सांगितलं तुला?’ ‘माझ्या वर्गातल्या नितीनने सांगितलं.

     हिरव्या रंगाच्या पेनने परीक्षा दिली तर चांगले गुण मिळत नाहीत!आकाशने उत्तर दिलं. आकाश, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. हिरव्या-निळ्या रंगाने काही घडत नसतं. तू परीक्षेची चांगली तयारी केली असशील तर चांगलेच गुण मिळतील. बाबांनी समजावलं. पण आकाश ऐकायला तयार नव्हताच. तो बाबांकडे निळ्या रंगासाठी हट्ट धरून बसला. तेव्हा बाबा म्हणाले, ‘आता सगळी दुकानं बंद झाली असतील. आता कोठून आणणार निळ्या रंगाचं पेन?’
     पेन शोधता शोधता बरीच रात्र झाली. शेवटी एकदाचं निळ्या रंगाचं पेन मिळालं. अजून त्याला परीक्षेची तयारी करायची होती. पण त्याला झोप येऊ लागली. त्यामुळे त्याने आईला पहाटे पाच वाजता उठवायला सांगून तो झोपी गेला. पहाटे आईने त्याला उठवलं. तो बेडवरून खाली उतरत होता, तोच आईला शिक आली. तो पुन्हा बिछान्यावर जाऊन झोपला. आईने पुन्हा एकदा त्याला उठायला सांगितलं. आणि ती आपल्या कामाला निघून गेली. बाबांना तर त्याचा रागच आला.
     ते आकाशला म्हणाले, ‘आकाश, काल तू निळ्या पेनच्या भानगडीत अभ्यास केला नाहीस. आता उठतोस की नाही? साडेसहापर्यंतच तुला वेळ आहे.तेव्हा आकाश म्हणाला, ‘बाबा, नितीनने सांगितलंय की, कुठलंही काम सुरू करण्यापूर्वी कुणी शिकलं तर लगेच कामाला सुरुवात करायची नाही.बाबा म्हणाले, ‘अरेव्वा! आमचा आकाश तर चक्क अंधश्रद्धाळू बनला आहे. पण याच्याने तुझं नुकसानच होणार आहे.तरीही आकाश टाळत राहिला. दहा मिनिटांनंतरच तो अंथरुणातून उठला.
     परीक्षेच्या तयारीसाठी त्याच्याकडे फक्त साडेसहापर्यंतच वेळ होता. सात वाजता त्याची स्कूलबस यायची. काल रात्री निळ्या पेनाच्या शोधात आणि आज सकाळी शिकेच्या भानगडीत त्याची परीक्षेची तयारी काही म्हणावी तशी छान झाली नाही. त्यामुळे त्याला शाळेत जाण्यासाठी तयार व्हायलाही वेळ झाला. बाबा आणि आकाश रस्त्यावर येताच त्यांना एक मांजर आडवं गेलं. आकाशने बाबांना थांबवलं. एक मोटारसायकल पुढे गेल्यावर मग तो निघाला. स्कूलबस कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर येऊन थांबायची. पण आता तिथे ना गाडी होती ना मुलं! म्हणजे स्कूलबस कधीच निघून गेली होती. पण आकाशला तर शाळेत पोहोचणं आवश्यक होतं, कारण आज परीक्षा होती.
     एक रिक्षा आली. बाबांनी त्याला हाक मारली. दोघेही रिक्षात बसायला पुढे निघाले, तोच आकाश जागच्या जागी थांबला. बाबांनी विचारल्यावर आकाश म्हणाला, ‘बाबा, गाडीचा क्रमांक १३०१ आहे. तेरा हा अंक अशुभ असतो. या रिक्षाने गेलो तर परीक्षा चांगली जाणार नाही. आपण दुस-या रिक्षाने जाऊ या.
     आकाशचं बोलणं ऐकून बाबांना भलताच राग आला. ते म्हणाले, ‘तुझं डोकंबिकं फिरलंय का? कुठल्या अंधश्रद्धेच्या गोष्टी करतोयस तू? आत्ता तुला शाळेत पोहोचणं महत्त्वाचं आहे. चल, रिक्षात बस बघू. आधीच उशीर झाला आहे.पण आकाश आपल्या गोष्टीवर अडून राहिला. रिक्षावाल्याला दुसरं भाडं मिळालं आणि तो निघून गेला. ब-याच उशिराने एक रिक्षा आली. दोघे शाळेत पोहोचले.
     परीक्षा सुरू होऊन अर्धा तास झाला होता. आकाश वर्गात गेला. परीक्षा दिली आणि दुपारी शाळेतून घरी आला. त्याचा चेहरा उतरलेला होता. आई-बाबांनी त्याला विचारल्यावर त्याने पेपर खूपच कठीण गेल्याचं सांगितलं. तेव्हा बाबा म्हणाले, ‘बघितलसं, अंधश्रद्धेच्या आहारी गेलं की काय होतं ते! मी तुला अगोदरच सांगितलं होतं, असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस!आई म्हणाली, ‘ठीक आहे. आता हात-पाय धुऊन घे. काही तरी खा आणि पुढच्या अभ्यासाच्या तयारीला लाग.
     आकाश हात-पाय धुण्यासाठी उठणार तोच, बाबांना शिक आली. बाबा म्हणाले, ‘आकाश, मला शिक आली. आता तू दहा मिनिटे असाच बसणार का? हात-पाय धुवायला जाणार नाहीस का?’ ‘नाही बाबा, आता मी या भानगडीत पडणार नाही. मला सगळं काही समजून चुकलं आहे. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत.असं म्हणून आकाश अभ्यास करायला बसला

Wednesday, May 22, 2013

विज्ञान क्षेत्राला प्राथमिकता देण्याची गरज

     जगात आता वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान आर्थिक स्रोत बनले आहेत. कुठल्याही देशाची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता त्याची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन बनले आहे. आपल्या देशात असं काय कमी आहे की, ज्यामुळे इथे विज्ञान, तंत्रज्ञान पोसलं जात नाहीये. पाश्‍चिमात्य देशांमध्ये आज जे विज्ञान आणि तंत्रज्ञान इतके पुढे पोहचले आहे, ते पुढे कसे गेले याचा अभ्यास केला पाहिजे.     शास्त्रज्ञ आणि अभियंता यांच्या संख्येच्या दृष्टीने विचार केल्यास हिंदुस्थान जगात तिसरा सर्वात मोठा देश आहे. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र तो बरेच पिछाडीवर आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारतीय विज्ञान कॉंगे्रसच्या कोलकात्यातील शताब्दी महोत्सवी अधिवेशनात संबोधताना देशातल्या सामाजिक समस्यांच्या समाधानासाठी प्रयत्न केले जावेत, अशी विनंती शास्त्रज्ञांना केली आहे. यासाठी सरकारने विज्ञाननीती - २०१३ आखली आहे. त्यांनी विकेंद्रित पद्धतीने सार्थक विकासाला प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षाही यातून व्यक्त केली आहे. यापूर्वीदेखील त्यांनी चीनने हिंदुस्थानला मागे टाकल्यावरून चिंता व्यक्त केली होती आणि वैज्ञानिक संशोधनावरचा खर्च एक टक्क्याने वाढवला जाईल, असे आश्‍वासन देत म्हटले होते. वास्तविक, अद्यापि या वाढीव खर्चाची रक्कम त्यांनी दिली नाही. खरे तर पहिल्यांदा देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्कार यासाठीचे वातावरण तयार करण्याची गरज आहे. आपल्या देशातले तमाम शास्त्रज्ञ विदेशात निघून जातात. गेल्या वर्षाच्या अधिवेशनात त्यांनी विदेशात काम करणार्‍या अशा शास्त्रज्ञांना माघारी परतण्याचे आवाहन केले होते. ते अशा पोकळ आवाहनाने परतणेही शक्य नाही आणि अपेक्षेप्रमाणे ते परतले नाहीतच.
     मुळात आपले वैज्ञानिक विदेशात जातातच का, हा मोठा प्रश्‍न आहे. याचे उत्तर चार वर्षांपूर्वी रसायनमध्ये संयुक्तरीत्या नोबेल पारितोषिक मिळवलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या वेंकट रमण रामकृष्णन या शास्त्रज्ञाने दिले होते. त्यांनी म्हटलं होतं की, हिंदुस्थानी शास्त्रज्ञांना लालफीतशाहीपासून मुक्तता आणि अधिक स्वायत्ततेची गरज आहे. देशातल्या वैज्ञानिक संस्था आणि राष्ट्रीय प्रयोगशाळा जोपर्यंत नोकरशाहीच्या तावडीत आणि नात्यागोत्यांनी ग्रस्त राहील तोपर्यंत हिंदुस्थानात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा रस्ता सापडणार नाही. देशात वैज्ञानिक शोध आणि आविष्कारासाठी पोषक वातावरण तयार करण्याची जबाबदारी अर्थात देशाची पर्यायाने पंतप्रधानांची आहे.
     आपल्या देशात आजच्या घडीला रामन, खुराना का निर्माण होत नाहीत, याचा गांभीर्याने विचार कधी झालाच नाही. इतक्या सगळ्या वैज्ञानिक संस्थांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने असणार्‍या शास्त्रज्ञांचे संशोधन कोणत्या दिशेने चालले आहे आणि ही मंडळी तिथे काय करते, याचा देखील शोध घेतला गेला पाहिजे. एक तर ते काही करत नसले पाहिजेत किंवा आपल्या देशात वैज्ञानिक प्रगतीसाठी पोषक वातावरण नसले पाहिजे.
     जगात आता वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञान आर्थिक स्रोत बनले आहेत. कुठल्याही देशाची वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता त्याची आर्थिक प्रगती मोजण्याचे साधन बनले आहे. तांत्रिक ज्ञान आता व्यापाराचे हत्यार बनले आहे. म्हणूनच विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाविना आता देशाची प्रगती अशक्य आहे. आपल्या देशात असं काय कमी आहे की, ज्यामुळे इथे विज्ञान, तंत्रज्ञान पोसलं जात नाहीये. वास्तविक, समाजच विज्ञान आणि तंत्रज्ञान कोणत्या दिशेला न्यायचं हे निश्‍चित करू शकतो.
जर अगदी लक्षपूर्वक विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, पाश्‍चिमात्य देशांत यासाठी इतकी अनुकूल परिस्थिती होती, की त्यामुळे वैज्ञानिक विकास आवश्यक झाला होता. स्वातंत्र्याच्या आनंदात लोक साहसी प्रवासाला निघायचे. त्यांचा संपर्क जगात काही तरी नवे करण्याचा ध्यास घेतलेल्या लोकांशी व्हायचा. त्यातून त्यांना प्रेरणा मिळायची. त्यामुळे विकासाची एक नवी प्रक्रिया सुरू झाली. पश्‍चिमी युरोप आणि अमेरिका यांनी विज्ञान विकासाला जेवढे प्राधान्य दिले, तितके अन्य कुठल्या देशांनी दिले नाही. त्यांना या नव्या वैज्ञानिक संस्कृतीचे फायदे स्पष्ट दिसत होते. यामुळेच काही आणखी देशांनी त्यांचे अनुकरण केले. आपण मात्र या देशांच्या तर्‍हा स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे या क्षेत्रात हिंदुस्थान कायम पिछाडीवरच राहिला. आज देशात ९०० पेक्षा अधिक विज्ञान संस्था, विद्यापीठांमध्ये विज्ञान - तंत्रज्ञान संशोधनावर काम चालले आहे. पण तरीदेखील जगातल्या विज्ञान साहित्यात आमचा साधा नामोल्लेख नाही. जगभरातल्या विद्यापीठांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन व विकासाचे काम होते. परंतु आपल्या इथली विद्यापीठे अथवा अभियांत्रिकी कॉलेजेस राजकारणाचे अड्डे बनले आहेत. इथे फक्त पदव्यांच्या भेंडोळ्या वाटल्या आणि विकल्या जातात. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बाबतीत आम्ही दुसर्‍या देशांवर अवलंबून आहोत. त्यासाठी आपल्याला मोठी किंमतही चुकती करावी लागते आहे. आज वीस हजारांपेक्षा अधिक तंत्रज्ञान विदेशातल्या कंपन्यांच्या सहाय्याने हिंदुस्थानी बनावटीच्या इंजिन अथवा अन्य वस्तूंमध्ये वापरले जात आहे. साधे आपण टूथपेस्ट, बूटपॉलिश, च्युइंगम, रंग अथवा शवपेटी बनवण्याचे तंत्रज्ञानदेखील आम्ही विकसित करू शकलो नाहीत. आम्ही कुठल्याही कामात सार्वजनिक भागीदारीला प्रोत्साहन दिलं नाही. नद्यांवर बांध घातले, रस्ते बनवले, पण चीनप्रमाणे आम्ही त्यांना लोकांशी जोडू शकलो नाही. याउलट आम्ही   निवडणूक जिंकण्यासाठी आणि पाठिंबा मिळवण्यासाठी जातीयवाद आणि धर्मवादाला प्रोत्साहन दिले. इथली अध्यापक आणि वैज्ञानिक मंडळी राजकारण्यांचे उंबरठे झिवत राहिली आणि विद्यार्थी मात्र कुठल्याशा विदेशी संस्थेचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धडपड करत राहिले अथवा करताहेत. पोखरण अणुस्फोट, अंतरिक्ष उपग्रह आणि अग्निबाण निर्मितीत आमच्या शास्त्रज्ञांची विलक्षण क्षमता जगजाहीर आहे. आता आपल्याला गरज आहे ती आपली प्राथमिकता निश्‍चित करण्याची आणि त्यानुसार नीती ठरवून अंमलबजावणी करण्याची.

Sunday, May 19, 2013

बालकथा विचित्र शिक्षा

     एकदा बादशहा अकबरच्या सर्वात लाडक्या बेगमने तातडीने भेटायला येण्यासाठी म्हणून  एका सैनिकाकरवी  निरोप  धाडला.  बादशहा दरबारात होता. त्यामुळे तो सैनिक थेट दरबारात आला आणि बादशहाच्या कानात कुजबुजला. तातडीने बादशहा उठला आणि जायला निघाला. बादशहाची बेगमला भेटण्याची अतुरता पाहून बिरबलला हसू आले. ते पाहून बादशहाला संताप आला.  तो बिरबलला म्हणाला," माझा अशा प्रकारे उपहास करण्याची तुझी हिम्मतच कशी झाली? तू स्वतः ला समजतोस कोण? चल, आत्ताच्या दरबारातून चालता हो.  आणि पून्हा म्हणून   माझ्या राज्यात पाय ठेवायचा नाहीस. "
     बिरबलने बादशहाची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि काही एक न बोलता  तो दरबारातून निघून गेला. बिरबलवर जळणार्‍यांच्या पोटात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. आता आपलेच राज्य ,असे म्हणत ते एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसू लागले. आता बरेच दिवस झाले, पण बिरबल काही  दरबारात परतला नाही. आता बादशहाला त्याची उणीव भासू लागली. त्याची बिरबलाशिवाय म्हणजे मोडलेल्या कण्यासारखा अवस्था झाली. बादशहाची कोणतीही समस्या एका चुटकीसरशी सोडवणार्‍या बिरबलच्या अनुपस्थितीमुळे बादशहाला अनेक समस्यांशी सामना करावा लागत होता. प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने  अनेक प्रश्न रेंगाळत पडले होते.
     एकदा बादशहा महालाच्या खिडकीतून बाहेर पाहत असताना त्याला कोणी तरी रथात बसून रस्त्यावरून जात असल्याचे दिसले. त्याने लगेच सैनिकाला त्याची माहिती काढून आणावयास सांगितली. सैनिकाने परत येऊन तो बिरबल असल्याचे सांगितले. आता स्वतः बादशहा रस्त्यावर आला. आणि समोरून येणार्‍या बिरबलला अडवले. त्याला  बादशहा म्हणाला," माझ्या आज्ञेचं पालन केलं नाहीस." बिरबल म्हणाला," हुजुर, आपल्या आज्ञेची  मी कधीच अवहेलना  केली नाही. आपण मला आपल्या राज्याच्या जमिनीवर पाय न ठेवण्याची आज्ञा केली होती, म्हणून मी दुसर्‍या देशातील माती आणून रथात पसरली आहे आणि त्यावर मी उभा आहे. त्यामुळे मी आपल्या राज्याच्या मातीवर उभा राहण्याचा प्रश्नच येत नाही. आता माझे संपूर्ण जीवन मला याच रथावर  घालवावे लागणार आहे." बिरबलची ही चतुराई बादशहाला भारी आवडली. शेवटी बादशहा त्याच्या या चतुराईवर तर फिदा होता. बिरबल आपल्याला सोडून जाणार नाही, याची पक्की खात्री बादशहाला होती.
     तो बिरबलला म्हणाला," बिरबल, मी तुला दिलेली आज्ञा आत्ताच्या आत्ता मागे घेत आहे. आता उतर खाली" असे म्हणून त्याच्या उतरण्याची वाट न पाहता  बादशहा स्वतः बिरबलजवळ गेला आणि त्याला हाताला धरून खाली उतरवले. बिरबल खाली उतरताच बादशहाने बिरबलला मोठ्या प्रेमाने  अलिंगन दिले. दुसर्‍यादिवशी बिरबल हसतमुखाने दरबारात आलेला पाहून त्याच्यावर जळफळाट करणार्‍यांची तोंडे मात्र पाहण्यासारखी झाली होती.

Friday, May 17, 2013

माकडाचा पराक्रम

     चिन्नी फार गोड मुलगी होती. तिला कोणी बाहुली म्हणायचं, तर कोणी परी म्हणायचं. घरातले सगळेच तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे. अशा चिन्नीकडे खेळणीही सुंदर सुंदर होती. डोळे मिचकावणारी बाहुली, डमरू वाजवणारे अस्वल, झुक-झुक करत शिट्टी वाजवणारी आगगाडी अशी भरपूर खेळणी तिच्याकडे होती. तिला ती सगळी खेळणी आवडायची. पण फक्त टाळ वाजवणारं माकड मात्र आवडत नसे.
     टाळ वाजवणा-या त्या माकडाला पाहिलं की, तिचा संताप व्हायचा. ते माकड चावीवर चालायचं, पण त्याच्यात एक खोड होती. चिन्नी त्याला चावी द्यायची, तेव्हा ते टाळ वाजवायचं नाही. गप्प राहायचं. पण चिन्नी कसल्या तरी कामात असली किंवा झोपलेली असेल तर मात्र ते हमखास टाळ वाजवायला सुरुवात करायचं. त्यामुळे तिला माकडाचा मोठा राग यायचा. तिला वाटायचं, फेकून द्यावं कोठे तरी याला! पण ती फेकूनही देऊ शकत नव्हती. कारण ते तिला तिच्या आजीने मोठया प्रेमाने वाढदिवसाला दिलं होतं.
     एक दिवस चिन्नी खेळण्यांशी खेळत बसली होती. तिने विचार केला, चला, माकडाला पुन्हा एकदा चावी देऊन पाहू. नाही तरी त्याचा त्रासच आहे नुसता! आता शेवटचा प्रयत्न करून पाहू. नाही तर अडगळीच्या खोलीत फेकून देऊ. असा विचार करून तिने माकडाला हातात घेतलं. त्याला चावी दिली आणि त्याला खाली सोडलं. पण कसलं काय! माकड मख्ख उभं. त्याने टाळ वाजवलंच नाही.
     चिन्नी रागारागाने उठली आणि माकडाला उचललं. तरातरा जात त्याला अडगळीच्या खोलीत फेकून आली. सगळ्या खेळण्यांना माकडाविषयी चीड होतीच. ते माकड कधीही उठायचं आणि टाळ वाजवून सगळ्यांनाच त्रास द्यायचं. त्यामुळे बाकी खेळणीही त्याला वैतागलेली होती. त्याला चिन्नीने अडगळीच्या खोलीत फेकून दिल्याने सगळ्यांनाच आनंद झाला. डोळे मिचकावणा-या बाहुलीने त्याच आनंदात अनेकदा डोळे मिचकावले. अस्वल डमरू वाजवत नाचू लागलं. झुक-झुक आगगाडीने शिट्टी वाजवली.
     रात्री खाणं-पिणं झाल्यावर चिन्नी सगळ्या खेळण्यांना पुढय़ात घेऊन झोपी गेली. पण अडगळीच्या खोलीत पडलेल्या माकडाची झोप उडाली होती. आपण योग्य वेळेला टाळ वाजवू शकत नाही, म्हणून ते स्वत:ला दूषणं देत होतं. दु:खात ते उशिरापर्यंत जोरजोराने रडत राहिलं. पण त्याचं ते रडणं ऐकायला, तिथं कोणी नव्हतंच!
     दु:ख आवरून माकड शांत झालं, तोच त्याच्या कानावर कसला तरी आवाज पडला. त्याने थोडं वाकून पाहिलं तर त्याला घरात दोन चोर घुसले असल्याचं दिसलं. घरातले सगळेच झोपलेले होते.
     माकडाला आता काय करावं काही सुचेना. घरातल्यांना जागं करावं आणि चोरांना पकडून द्यावं, असं त्याला फार वाटत होतं, परंतु ते काहीच करू शकत नव्हतं. ते चिन्नीच्या खोलीपर्यंत जाऊनही आलं, पण तिचा दरवाजा आतून बंद होता. तेवढय़ात त्याला एक आयडिया सुचली. त्याने स्वत:ला एखाद्या बाटलीला हलवावं, तसं हलवलं. पुढं-मागं झुकवलं. हात हलवण्याचाही प्रयत्न केला. तरीही हात काही हलले नाहीत. पण त्याने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न करण्याचं ठरवलं. आता नाही तर कधीच नाही. कारण आता या लोकांना मदत केली नाही तर आपल्या जीवनाला मग कसलाच अर्थ राहणार नाही.
     आपण निरुपयोगी ठरू, असा विचार करून त्याने पुन्हा हात हलवून टाळ वाजवण्याचा प्रयत्न केला. आणि काय आश्चर्य! टाळ वाजू लागले. एवढंच नव्हे तर टाळ वाजणं थांबतच नव्हतं. मग काय! घरातले सगळे लहानथोर माकडाच्या दंग्याने जागे झाले. त्याला गप्प करण्यासाठी सगळेच त्याच्या दिशेने धावले. पण ते माकड चोर जिथे होते, तिथे घरंगळत जाऊन पोहोचलं. झालं, चोर आयते तावडीत सापडले. घरातल्या सगळ्या सदस्यांनी त्या चोरांना चांगलंच बदडून काढलं.शेवटी पोलिस आले. चोरांना त्यांच्या ताब्यात दिलं. पोलिस गेल्यावर माकड चुपचाप अडगळीच्या खोलीकडे जाऊ लागलं. तेवढय़ात चिन्नीने त्याला हाक मारली, ‘अरे हे काय? तुझी जागा अडगळीच्या खोलीत नाही, तर माझ्याजवळ आहे. सॉरी, मला माफ कर’.
     माकडाच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ते म्हणालं, ‘मी नेहमीच चुकीच्या वेळी टाळ वाजवून तुला त्रास देत असतो. त्यामुळे माझी जागा तिथेच योग्य आहे’. चिन्नी म्हणाली, ‘अरे, प्रत्येकात काही ना काही खोड असते. तशी माझ्यात देखील आहे. पण तू तर आज कमालच केलीस. यामुळे तू मला आवडू लागला आहेस. आता यापुढे एक क्षणही तुला दूर लोटणार नाही. नेहमी तुला माझ्याजवळ ठेवीन’. असं म्हणत चिन्नीने त्याला उचलून कडेवर घेतलं आणि आपल्या खोलीत आली. त्याला एका खास जागेत ठेवलं. त्याला पाहिल्यावर बाकी सगळ्या खेळण्यांचा जळफळाट झाला, पण चिन्नीने त्याचा पराक्रम सांगितला. तेव्हा सगळेच कौतुक करायला त्याच्याकडे सरकले.

Thursday, May 9, 2013

विकासाच्या पोकळ बाता

     नऊ वर्षांपासून देशाचे सरकार चालवणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाच्या वर्तमान समस्यांवर तोडगा कसा काढला जाणार आहे हे अजूनही सांगू शकलेले नाहीत. देश आणि उद्योग क्षेत्रातील निराशा, त्याचबरोबर हतबलता हा जो माहोल देशात निर्माण झाला आहे तो दूर सारण्यासाठी त्यांनी कुठली पावले उचलली आहेत किंवा पुढे काय करणार हे काहीच त्यांनी सांगितलेले नाही.