Thursday, January 24, 2013

बालकथा : जमीनदाराची शिकवण

     लखनपूर गावात विष्णूकांत नावाचा सोन्या-चांदीचा एक प्रसिद्ध व्यापारी राहात होता. त्याला मदनलाल नावाचा एक मुलगा होता. त्याला आपल्या वडिलोपार्जित व्यापारात रस नव्हता. एक दिवस अकस्मात व्यापाराचा मृत्यू झाला. त्यामुळे धंद्याची सगळी जबाबदारी मदनलालवर येऊन पडली. पण त्याने त्यात लक्ष न घालता सगळा कारभार नोकरांच्या भरवशावर सोडून दिला.
     एक दिवस त्यांच्या व्यापारातला  सल्लागार त्याला म्हणाला,"मालक, मी ऐकलंय की, आपल्या दुकानासमोरच एक व्यापारी दुसरं सोन्या-चांदीच्या व्यापाराचं दुकान थाटतो आहे. आपल्याला काही तरी करायला हवं." 
     मदनलाल बेफिकीरपणे म्हणाला," तू इतकी का काळजी करतोयस. आपयाकडे कुशल कारागीर आहेत. आपल्या व्यापारात कसलादेखील परिणाम होणार नाही."
     काही दिवसांतच समोर भव्य असे सोन्या-चांदीचे दुकान सुरू झाले. थोड्या दिवसांतच त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. व्यापारात जम बसवला.साहजिकच मदनलालची मिळकत कमी हो ऊ लागली. पुढे पुढे तर त्याला आपल्या नोकर, कारागिरांनादेखील पगार द्यायला अडचण येऊ लागली. काही कारागीर सोडून गेले तर काहींना मदनलालने काढून टाकले. व्यापार पूर्ण बसला. एक दिवस वैफल्यग्रस्तावस्थेत त्याने घर सोडले.
     असाच भटकत असताना प्रचंड थकव्यामुळे तो एका झाडाखाली विसावला. चेहर्‍यावर त्याच्या प्रचंड ताण आणि थकवा होता.  तिकडून आपल्या माणसांसोबत जाणार्‍या एका जमीनदारने त्याला पाहिले. तो आजारी असल्याचे वाटल्याने त्याने मदनलालला आपल्यासोबत घेतले. जमीनदारने त्याला बरेच काही विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही एक बोलला नाही. कदाचित, जमीनदारला त्याची दया आली असावी. त्याने त्याची आपल्या अतितीगृहात राहण्याची व्यवस्था केली.
     त्याच रात्री दरोडेखोरांनी जमीनदाराच्या घरावर हल्ला चढवला. जमीनदारदेखील आपल्या माणसांना घेऊन  शस्त्रांसह त्यांना सामोरे गेला. प्रचंड धुमश्चक्री झाली. मजबूत प्रतिकार पाहून दरोडेखोर मागे हटले आणि पळून गेले. जमीनदारला स्वतः आपल्या माणसांसोबत दरोडेखोरांशी दोन हात करताना पाहून मदनलाल चकीत झाला. तो त्याच्याजवळ जात म्हणाला," भाऊ, आपल्याकडे एवढे नोकरचाकर असताना आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून दरोडेखोरांशी लढणे योग्य नव्हते. हे काम तुमचे नाही, नोकरांचे आहे."
     ऐकून जमीनदार हसला आणि म्हणाला,'' कुठलेही काम सगळ्यांनी मिळून केले तरच  ते यशस्वी होते.  आणि तसे आपण वागलेच पाहिजे.   त्यातून जो फायदा होईल, त्यातला काही वाटा त्यांनाही द्यावा. जमीनदार आणि व्यापार्‍यांनी तर ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली पाहिजे."
     जमीनदारचे बोलणे ऐकून मदनलालचे डोळे उघडले.त्याने आपली सगळी कहानी जमीनदारला सांगितली. जमीनदारने त्याला गळाभेट देत विश्वास दिला. आणि काही माणसे आणि काही पैसा देऊन मदनलालची त्याच्या गावी रवानगी केली. मदनलालने आपल्या व्यापाराला नव्याने सुरुवात केली. आणि अल्पावधीतच त्याने आपल्या वडिलांसमान कीर्ती मिळवली.

No comments:

Post a Comment