Saturday, January 5, 2013

बालकथा राजाचा न्याय

     शिवसेन नावाचा एक न्यायप्रिय आणि प्रजादक्ष राजा होता. त्याने दिलेला न्याय कधीच चुकला नव्हता. शिवसेनचा न्याय म्हणजे देवाचा न्याय, असे तिथली जनता मानत होती.
     एके दिवशी दुपारी राजा शिवसेन आपल्या दरबारी मंडळींसोबत कसलीशी चर्चा करीत बसले होते. इतक्यात तिथे लांब आणि घनदाट मिशावाला एक माणूस आला. त्याच्याबरोबर आणखी एक व्यक्ती होती. मिशीवाला माणूस हात जोडून म्हणाला, "महाराज, मी नारायण. आणि हा भोलाशंकर'.' दुसर्‍या व्यक्तीकडे इशारा करत तो पुढे म्हणाला," हा गावाची हजामत करतो. मी काल याच्याकडे केस, दाढी करायला गेलो होतो.केस कापताना त्याला ताकीद दिली होती की, माझ्या मिशीला धक्का लागता कामा नये. पण तरीही याने माझ्या मिशीचे दोन केस कापले. मी त्याला पैसे देण्याचा नकार दिल्यावर त्याने तुमच्याकडे जाण्याची धमकी दिली. मग मीही म्हणालो, चल. राजा योग्य तोच न्याय देईल."
     राजाने भोलाशंकरला त्याच्या मिशीला हात लावलास का?,  विचारले. त्यावर तो हात जोडून केविलवाण्या स्वरात म्हणाला," महाराज, मी धक्कासुद्धा लावला नाही."
     राजा विचारात पडला. तो थोडा वेळ बाहेर गेला. आत आल्यावर म्हणाला," तुम्ही दोघेही खरे बोलता आहात, त्यामुळे न्याय-निवाडा करणं कठीण जातं आहे." मग नारायणकडे वळत म्हणाला," तुझ्या मिशीत किती केस होते, सांगू शकशील?'' नारायण चटकन म्हणाला," चार हजार!." यावर राजा म्हणाला," ठीक आहे. आता या निवाड्यासाठी मिशा उतरवाव्या लागतील. त्याशिवाय केस मोजता येणार नाहीत. आणि यात केस कमी आढळले तर भोलाशंकरला दंड ठोठावू पण  केस जास्त आढळले तर मात्र तुला दुप्पट दंड द्यावा लागेल."
     राजाच्या या अनपेक्षित निर्णयाने नारायण चपापला. पण स्वत: ला सावरत म्हणाला," म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाही. मी पुराव्यासाठी ते दोन केस ठेवले होते. पण माझ्या नोकराने कचर्‍यासोबत फेकून दिले."
     " याचाही विचार  करू, पण त्यासाठी केस मोजावेच लागतील. भोलाशंकर, याची मिशी उतरव."
     नारायण चिडला. " माझ्यावर राजाचा विश्वास नसेल तर हा मी चाललो." असे म्हणून रागारागाने तो  दरबारातून जाऊ लागला. शिपायांनी त्याला अडविले. आता काही आपली धडगत नाहीहे नारायणने ताडले. त्याने जाऊन राजाचे पाय धरले. विणवत म्हणाला, " नकानका माझी मिशी उतरवू. तुम्ही सांगाल ते करीन. पाहिजे तर दंडसुद्धा द्यायला तयार आहे."
     राजा म्हणाला," तुला खोटे बोलल्याची शिक्षा तर मिळेलच पण या गरीब, साध्या भोळ्या माणसालाही फसवण्याचा प्रयत्न केलास. त्याबद्दल तुला दुप्पट दंड द्यावा लागेल. जेणेकरून तुझ्यासारख्याची पुन्हा अशी हिंमत होणार नाही."
     शेवटी पाहिजे तो दंड भरण्याची हमी देऊन नारायणने आपली सुटका करून घेतली. भोलाशंकरने राजाचे आभार मानले.                                                                                             

No comments:

Post a Comment