Saturday, January 5, 2013

बालकथा चोरी म्हणजे कला?

     राजा कृष्णदेवराय  महिन्यातून एकदा तुरुंगातले कामकाज पाहायला जात.  ते तुरुंगातल्या कैद्यांना मिळणार्‍या सोयी-सुविधांची जातीने  पाहणी करीत. कैद्यांना मिळणार्‍या वागणुकीत फरक जाणवला तर अधिकार्‍यांची खरडपट्टी काढत.
     एकदाची गोष्ट. राजा कृष्णदेवराय तुरुंगात पाहणी करीत फिरत होते. इतक्यात  दोन कैदी समोर आले आणि त्यांनी राजाचे पाय धरून शिक्षा माफीची याचना करू लागले. आपल्या कामाचे समर्थन करताना ते म्हणाले," चौर्यकर्म  वेदातल्या ६४ कलांपैकी एक आहे. पण आपण शिक्षामाफी करणार असाल तर आम्ही हे काम कायमचे सोडून देऊ आणि चरितार्थासाठी दुसरा कोणता तरी मार्ग शोधू."  
     हे ऐकून राजा विचारात पडला. तो चोरांना म्हणाला," ठीक आहे, मी एका अटीवर तुम्हाला मुक्त करीन."
     "सांगा महाराज सांगा, कोणती अट आहे ती?" दोघेही हात जोडून म्हणाले.
     " तुमच्या कलेचे प्रात्यक्षिक दाखवावं लागेल, यासाठी तुम्हाला तेनालीरामच्या घरी चोरी करावी  लागेल. चोरी करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला तात्काळ मुक्त करेन."
     राजा पुढे म्हणाला," हां, पण लक्षात ठेवा, यात कोणालाही शारीरिक इजा होता कामा नये." त्या रात्री दोघा चोरांना तेनालीरामच्या घरी चोरी करण्याकरिता मुक्त करण्यात आले. तेनालीरामच्या घरासमोर  सुंदर बाग होती. दोघेही पहिल्यांदा बागेत उतरले. मग ते चोर पावलांनी भिंतीशी आले. त्यांनी इकडे-तिकडे पाहिले, तिथे कोणीही दिसले नाही. ते आत जाण्याचा मार्ग शोधू लागले.
     तेनालीराम जागाच होता. त्याने चोरांना पाहिलं होतं. त्याने आपल्या बायकोला आवाज दिला," अगं, ऐकलंस का, जरा इकडे ये. दोन चोर तुरुंगातून पळाले आहेत. शहरात सगळीकडे घबराहट पसरली आहे. आपल्यालादेखील सावध राहिले पाहिजे. तू असं कर, तुझे सगळे दागिने आणि रोकड इकडे घेऊन ये. आपण ते एखाद्या गाठोड्यात बांधून, कुठे तरी सुरक्षित ठिकाणी ठेवू."  त्याच्या पत्नीने घरातले होते, नव्हते ते दागिने आणले. तेनालीरामने ते सगळे एका गाठोड्यात बांधले. आणि गाठोडे घराच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत टाकले.
      चोर सगळा प्रकार पाहात होते. ते चांगलेच हर्षले, कारण चोरीचा माल आयताच त्यांच्या हाती लागणार होता. थोड्यावेळाने तेनालीराम आणि त्याची बायको दोघेही घरात परत आले. चोर याचीच  वाट पाहात होते. ते झोपल्याची खात्री झाल्यावर दोघे चोर पावलाने विहिरीजवळ आले. त्यांनी विहिरीत डोकावले, दाट अंधार असल्याने त्यांना कशाचाही अंदाज येत नव्हता. पहिला चोर दुसर्‍याला म्हणाला," तू विहिरीत उतर आणि पाणी किती खोल आहे, याचा अंदाज घेऊन सांग."
     दुसरा चोर विहिरीत उतरला. तो बाहेर येऊन म्हणाला,'' बाब्या, विहिर खूप खोल आहे. पाणीही पुष्कळ आहे. दागिन्याचे गाठोडे बाहेर काढणं मोठं अवघड आहे. विहिरीतले बरेचसे पाणी उपसल्यावर गाठोडे आपल्या हाती लागू शकेल.'
     दोघांनी थोडा वेळ विचार केल्यावर त्यांनी  विहिरीतून पाणी काढण्याचा निर्णय घेतला. दोघे बादलीने पाणी उपसू लागले.  ओतलेले पाणी बागेत जाऊ लागले.  तेनालीराम खिडकीत लपून सारे काही पाहात होता. त्याने अंगावर एक शाल लपेटली आहे आणि हातात खुरपे घेऊन बाहेर आला. चोरांना न दिसेल अशा पद्धतीने सगळ्या झाडांना पाणी मिळेल, याची व्यवस्था करू लागला. दोघेही पाणी उपसण्याच्या नादात असल्याने त्यांना तेनालीराम दिसला नाही.
विहिरीतून चार-पाच तास पाणी उपसल्यानंतर चोर पार थकून गेले. नंतर त्यातला एक चोर विहिरीत उतरला. आतून ओरडला, " गाठोडे मोठे जड आहे. तूदेखील खाली ये." दुसराही खाली उतरला. दोघांनी मिळून मोठ्या कष्टाने ते गाठोडे वर काढले.
     आता दोघांचा आनंद गगनात मावेना. पहिला चोर दुसर्‍याला म्हणाला," लवकर गाठोडे खोल, पाहू तरी आत किती माल आहे तो."   आणि हे काय! दुसर्‍याने गाठोडे खोलताच त्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. त्यात त्यांना दागिन्यांऐवजी दगड दिसत होते. त्यांना मूर्च्छा यायची वेळ आली. दोघांना चकीत पाहून  तेनालीरामने त्यांना हाक दिली. "अरे बाबानों, दोघांनी आणखी थोडे पाणी उपसा. पाण्यावाचून फक्त दोन झाडेच  बाकी  आहेत. तेवढी माझ्यावर कृपा करा."   तेनालीरामचा आवाज ऐकून दोघेही घाबरले. पहिला दुसर्‍याला म्हणाला," चल पळ, नाही तर तेनालीराम आपल्याला पकडेल."
दोघांनीही  तेथून  पळ काढला. राजाजवळ जाऊन त्यांनी सगळी हकिगत सांगितली आणि चोरीला कधी कला म्हणणार नाही, अशी शपथ खाऊन दोघेही पुन्हा  तुरुंगात निघून गेले.                                                                

No comments:

Post a Comment