Monday, June 14, 2021

(लघुकथा) आपलं दैवत


महानगरपालिकेची ट्रॉली ट्रॅक्टरच्या मागोमाग खेचली जात होती. ती शहरातल्या केरकचऱ्यांनी काठोकाठ भरली होती. तो केर शहराबाहेरच्या भल्यामोठ्या खड्यात टाकला जाणार होता. नंतर त्याचे खत बनले की पालिका ते शेतकऱ्यांना विकणार होती.

"काय! कसं काय चाललंय?' हा आवाज ऐकून देवाच्या चरणावरुन पायउतार झालेली फुलांची माळ इकडे-तिकडे पाहू लागली. वेश्येच्या केसांतून कचराकुंडीत आलेला आणि आता ट्रॉलीत आलेला गजरा तिला काहीतरी बोलू पाहात होता.

'तू इथे कसा  आलास रे?' फुलमाळ त्याच्यावर संतापून म्हणाली. 

'वेश्येच्या कोठ्यावर राहणारा तू माझ्यासोबत कसा?'

'हेच तर मी तुला विचारणार होतो. या घाणेरड्या कचऱ्याच्या ढिगावर तू काय करतेस? तू तर कृष्णामाईच्या पवित्र पाण्यावर तरंगायला हवी होतीस?'

तेवढ्यात आणखी एक आवाज आला. दोघांनी त्या आवाजाकडं पाहिलं. तो गुलाब होता. 

'मित्रांनो, मी गुलाब. काल संध्याकाळी एका तरुणानं आपल्या प्रियेशीच्या मोहक केसांत मला माळलं होतं. उशीरा ती गुलूगुलू बोलत राहिली. घरात शिरण्यापूर्वी मुलीनं मला डोक्यातून काढलं आणि आपल्या पर्समध्ये लपवलं. रात्रभर मला कवेत घेऊन मला कुरवाळत राहिली, चुंबन घेत राहिली. सकाळी तिने मला रस्त्यावर फेकून दिलं.'

'आजचा माणूस किती मतलबी झालाय नाही?', फुलमाळ तिरस्काराने म्हणाली.

'भाविकांच्या गर्दीत ज्या सन्मानानं मला देवाच्या गळ्यात स्थान मिळालं. पहाट होताच रस्त्यावर यावं लागलं.'

गजरा म्हणाला, 'ताई, तू म्हणतेस ते. खरंच आहे. संध्याकाळी त्या सुंदर वेश्येनं | मला किती नखऱ्यात आपल्या केसात माळलं होतं. किती धुंद झाली होती ती, त्या अनोळख्या माणसाबरोबर. धसमुसळेपणा तर विचारूच नका. पण सकाळी तिनं पहिल्यांदा मला बाहेरचा रस्ता दाखवला.'

काही काळ सगळे शांत राहिले. केवळ त्या ट्रॅक्टरचा भयंकर आवाज येत होता. मग गुलाब म्हणाला, 'या माणसांविषयी तक्रार तर कुणाकडे करायची? खरं पाहिलं तर आमच्याशिवाय हे जग निव्वळ उजाड, भावनाशून्य आणि भयंकर बनले असते.'

यावर फुलमाळ म्हणाली, 'मित्रांनो, आपल्या तक्रारीला काही किंमत नाही. आता तुम्हीच पहाल, आपण सारे त्या खड्यात पडू. आपण कुजून आणि सडून जाऊ. खत बनू. पुन्हा सुपिक जमिनीसाठी आपला वापर ही माणसं करतील. पिकं येतील. फुलं फुलतील. आपण आणखी पुन्हीं तोडले जाऊ. देवाचा कंठ शोभेल. वेश्येचा आंबाडा सजेल. प्रियेशीचे केस दरवळतील. पण हे कुठंवर चालेलं? आपण गप्प राहू तो पर्यंत हे असंच चालायचं..! आपलं दैवच आणखी काय?'-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

No comments:

Post a Comment