Monday, February 1, 2016

रस्त्यांवरील नियम पायदळी


      रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागातदेखील वाहनांना काही तोटा नाही. वाहनाचा आरटीओकडून वाहन परवाना मिळवण्यापासून वाहतुकीच्या नियमांचे आणि कायद्याचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येते. प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालवताना तर पाहायलाच नको. रस्त्यावरचे सगळेच नियम पायदळी तुडवले जात आहेत. आज सर्वत्र श्रीमंतीचे प्रमाण वाढल्याने तसेच अत्यंत अल्प रक्कम देऊन कर्जाने गाडी मिळत असल्याने दुचाकी तसेच कार घेण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, नियमांचे पालन करताना कमीच आढळतात.
      ग्रामीण भागातदेखील वाहने भरारा धावत असतात. शहरी अनुकरण गावातही होत आहे. कॉलेज युवक फिल्मी स्टाईलने वाहन चालवून पोरींवर इंप्रेशन पाडत असतो.कॉलेज परिसर, पिकअप शेड,चौक अशा मोक्याच्या ठिकाणी ही मंडळी वाहनासह गर्दी करून उभी असतात. रस्ते अडवले जातात. याबाबत कोणी जाब विचारला तर तुझ्या बापाचा रस्ता आहे काय? असे मग्रुरीने ओरडत त्याच्याच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडत असतात. मुलींसमोर इन्सल्ट झाल्यावर तर मग बघायची सोय नाही. विचारणार्‍या बोकलूनच काढले जाते. साध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वकियांना यश मिळाले तर वाहनांची पुंगळी काढून गावभर कर्णकर्कश आवाजात फेरी मारली जाते. लोकांना त्याचा त्रास होतोय, याची जाणीवदेखील त्यांना नसते. मग लोकांना वाटते, का म्हणून त्याला निवडून दिले.पण वेळ गेलेली असते.
      शहरात रस्ता नियमांची पायमल्ली होत असते, त्याकडे लक्ष द्यायला आरटीओ आणि पोलिसांना लक्ष देता येत नाही,तिथे ग्रामीण भागातील काय तर्‍हा.

       शहरात सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणे, पदपथावरून दुचाकी नेणे, गाडी सुरू असताना फोनवरून बोलणे, कारणाशिवाय हॉर्न वाजवणे, सीट बेल्ट न बांधणे, हे सगळे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविले जातात. भारतात तर दुचाकी म्हणजे तरुणांना सायकलच वाटते. बाईक आणि गाड्यांचा हॉर्नही कधीकधी एकसारखाच असतो. त्यामुळे पाठीमागून गाडी येतेय की, दुचाकी हे काही कळायला मार्ग नसतो. कधी वाहनाचा हॉर्न इतका कर्कश असतो की, पादचार्‍यांना आणि इतर वाहनचालकांना क्षणभर कळत नाही की, कशाचा आवाज आहे? पादचारी दचकून थबकतात तर वृद्धांच्या हृदयाचे ठोके चुकतात. शहरांमध्ये सिग्नलवर दुचाकी व कारांचा खच दिसून येतो. येथे अन्य वाहनांसाठी थांबायला जागाच नसते. कारच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्यावर डावीकडून उजवीकडे कारच कार दिसून येतात. नियमाप्रमाणे उजवीकडील जागा कार किंवा इतर चारचाकी वाहनांची असावयास हवी. त्याबाजूला दुचाकी व सायकलींची जागा असायला हवी. मात्र, कुठेही वाहतुकीचे नियम पाळले जाताना दिसत नाही.  पाश्चिमात्य देशांत वाहतुकीचे कायदे, नियम पाळणे ही त्यांची संस्कृती बनली आहे आणि कायदे तोडणे ही भारतीयांची संस्कृती बनली आहे. भारतात वाहतुकीचे नियम नव्या नव्या शक्कल वापरून कसे तोडले जातात, हे बघतच नवी पिढी मोठी होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले तर सीसीटीव्हीतून चित्रीकरण करून त्याचे नाव-गाव व फोटोसह त्याच्या घरी दंडाच्या रकमेची पावती पाठवून दंड वसूल केला जाईल, असे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. मात्र, आज तसे होताना दिसत नाही. सर्वत्र वाहतुकीचे नियम सर्रास तुडविले जात आहेत.  

No comments:

Post a Comment