Friday, February 5, 2016

बालकथा : टिमूने झटकला आळस


     ताकोबा वनात टिमू नावाचे एक माकड होते. टिमू  वनातल्या अन्य प्राण्यांपेक्षा मोठा चलाख आणि उत्साही होता. एके दिवशी अप्पू हत्ती आणि बंडू अस्वल गप्पा मारत बसले होते. ते कुठल्या तरी चिंतेत होते. जंगलातल्या प्राण्यांना त्यांच्या दूरदूरच्या नातेवाईकांकडून पत्रेटपाल, मनिऑर्डर येत. पण ते आणून द्यायला लांबडा जिराफ फार उशीर करत असे. त्यामुळे अनेकांना फटका बसला होता.  आणखी,  हा लांबडा जिराफ पैसे दिल्याशिवाय चिठ्ठीच आणून द्यायचा नाही. त्याला काढून टिमू माकडाला पोष्टमन करण्याचा विचार अप्पू आणि बंडूने केला.
     एक दिवस जंगलातल्या सगळ्या प्राण्यांची सभा बोलवण्यात आली आणि त्यात टिमू माकडाची पोष्टमन म्हणून नेमणूक करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. टिमू अगदी फीट आणि चलाख आहे, अशी शिफारस करण्यात आली. लांबड्या जिराफाला वैतागलेल्या प्राण्यांनी तात्काळ प्रस्तावाला मंजुरी दिली. मंजूर प्रस्ताव वनराजापुढे ठेवण्यात आला. वनराजाने ताकोबा जंगलाचा पोष्टमन म्हणून टिमू माकडाची नेमणूक  जाहीर केली.
     टिमू अगदी वेळेत सगळ्यांना टपाल आणून द्यायचा. असेच काहीदिवस गेले.  टिमूच्या लक्षात आले की, त्याला सगळेच  पसंद करतात.  याचा त्याने फायदा घेण्याचे ठरवले. आता प्रत्येक टपालाला मागे तो एक केळ  घेऊ लागला. याचा एक फायदा त्याला होऊ लागला तो म्हणजे काम झाल्यावर त्याला अन्नासाठी भटकावे लागत नव्हते. आरामात गोळा केलेली केळी खाऊन लोळता येत होते.
     याचा परिणाम असा झाला की, टिमू हळूहळू  सुस्तावत  चालला. काम झाले की, गोळा केलेल्या केळींवर ताव मारून एखाद्या झाडावर सुस्त पडून राहू लागला. त्याच्याने त्याच्यातला चपळपणा कमी हो ऊ लागला. अंगमेहनत कमी झाल्याने  आळस चढत चालला.  कामावर दांड्या मारू लागला.  नंतर नंतर तर तो पक्का  कामचोर बनला. आजचे टपाल परवा द्या, चार दिवसांनी द्या, असा प्रकार करू लागला.   पुढे पुढे पैसेही मागू लागला.
     सगळ्यांच्या लक्षात आले की, टिमू आळशी बनला आहे. प्राण्यांकडून पैसे घेतो आहे. प्राण्यांनी मग एक सभा बोलावली. यात अनेकांनी टिमूच्या तक्रारी मांडल्या. कधी  आजाराचा बहाणा तर कधी कुठे जाण्याचा बहाणा करून  पैसे लाटतो.  झालं, सगळ्यांनी निर्णय पक्का केला. टिमूला काढून टाकायचं आणि बंडू अस्वलला त्याच्या जागी नेमायचं.  तेवढ्यात अप्पू हत्तीमध्ये पडत म्हणाला," आता कोणाला पोष्टमन नेमायचं नाही."
     एकदम सगळे ओरडले," पोष्टमन नेमायचा नाही तर आम्हाला पत्रे कशी मिळणार? आमच्या नातेवाईकांची ख्यालीखुशाली कशी कळणार?"
     अप्पू हत्ती म्हणाला," आपण सगळ्यांनी शहरात किंवा अन्य कुठे राहत असलेल्या  आपल्या नातेवाईक, आई-बाबा, भाऊ-बहीण या सगळ्यांना निरोप पाठवा कीथोडे दिवस तुम्ही पत्रे पाठवू नका. मग टिमू माकड काम नसल्याने आपोआप घरात बसेल. त्याला अद्दल घडेल."
     बंडू अस्वल म्हणाले," अप्पू, तुझी आयडिया मस्त आहे.पण शहरात कुणाला काही झालं तर आपल्याला निरोप कसा मिळेल?"
     सगळेच प्राणी ओरडले," हो हो, निरोप कसा मिळणार?"
     अप्पू हत्ती म्हणाला," अरे, जरा शांत राहा. माझं ऐका. आपण सगळ्यांनी मिळून ताकोबा वनात एक टेलिफोन बुथ बसवू.  बुथचा नंबर नातेवाईकांना देऊ. फोनवर नातेवाईकांशी आरामात बोलता येईल.  मग पत्रे येण्या-देण्याचा सवाल राहत नाही. आणि पोष्टमनची गरजच उरणार नाही.  हळूहळू आपण आपापल्या घरात टेलिफोन जोडून घेऊ शकतो."  ही आयडिया ऐकून सगळे प्राणी खूश झाले.
     ही गोष्ट टिमूच्या कानांवर गेली, तेव्हा तो मोठा अस्वस्थ झाला. त्याला आपली चूक कळली. पळतच तो सभेत पोहचला आणि सगळ्यांची क्षमा मागू लागला.  टिमूला आपली चूक कळल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला माफ करून टाकले आणि आळस झटकून कामाला लागण्याची सूचना केली. आता टिमू पहिल्यासारखा चुस्तफुस्त राहू लागला. आता तो पैसेही कुणाला मागत नाही.  कुणाला वाचता येत नाही त्यांना पत्रेही वाचून दाखवू लागला.  ताकोबा वन आनंदात डुंबून गेले.                                                     - मच्छिंद्र ऐनापुरे, जत


No comments:

Post a Comment