Wednesday, May 30, 2012

हसत जगावे ६


किती वाजले?
आत्माराम मित्रांना परदेश प्रवासातल्या गोष्टी सांगत होते. अचानक म्हणाले," अरे हो, एक गोष्ट तर साम्गायची विसरलोच." असे म्हणून ते आपल्या आतल्या खोलीत गेले आणि एक भिंतीवर्चे घड्याळ आणले. ते भिंतीवर टांगत म्हणाले," हे घड्याळ जर्मनीत घेतलंय. याला कुकू क्लॉक म्हणतात. याची खासियत अशी की, दर तासाला एक चिमणी बाहेर येते आणि टाईम सांगून पुन्हा आत जाते.तिथल्या दुकानात या घड्याळाची किंमत खूपच महाग होती. एका फिरस्त्याकडून घासाघीस करून स्वस्तात हे घड्याळ आणले आहे. .... अरे! आता पाच वाजताहेत......"
सर्वांच्या नजरा घडयाळावर खिळल्या. काही वेळातच हलकेसे संगीत वाजले. आणि एक चिमणी बाहेर आली. तिने इकडे-तिकडे पाहिले आणि विचारले," किती वाजले?"                           -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 



कुत्र्याचा भाऊ
"तुम्ही त्या दिवशी सांगत होतात की, तुमचे शेजार्‍याशी लांबचे नाते आहे म्हणून..."
" हो. हो, बरोबर! त्याचे काय आहे, आमचा कुत्रा ना त्यांच्या कुत्र्याचा भाऊ आहे."   



व्यायामाचे साहित्य
निधनानंतर काही दिवसांनी एका व्यापार्‍याच्या मृत्यूपत्राचे वाचन करण्यात आले. त्यात लिहिले होते- 'पत्नीच्या नावावर घर आणि बॅंकेतला सगळा पैसा, दोन गाड्या आणि माझा बिझनेस माझ्या एकुलत्या एक मुलाने सांभाळावा. नोकर गोविंदाने माझी ३० वर्षे सेवा केली आहे. त्याला पाच लाख रुपये देण्यात यावेत. आणि माझ्या मेव्हण्याला माझे व्यायामाचे साहित्य म्हणजे डंबेल्सट्रॅड मिल, योगासन करताना अंथरायचे बस्कर आणि मालिशचे तेल. कारण तो नेहमी म्हणतो की, जीवनात पैशापेक्षा तब्येत  महत्वाची आहे.'   



घाबरू नका!
आत्माराम हॉस्पीटलच्या पायर्‍या उतरून धावतच खाली येत होते. इतक्यात त्यांना तुकाराम भेटले. त्यांनी त्यांना अडवत विचारले," का रे, काय झाल? आणि असा धावत कुठे निघालास? आणि आज तर तुझे ऑपरेशन आहे ना?''
आत्माराम म्हणाला," अरे तुक्या सांगू तुला! आता नर्स सांगत होती की, घाबरू नका. छोटंसंच ऑपरेशन आहे. सगळं व्यवस्थित होईल."
"ती बरोबरच सांगते. यात घाबरण्यासारखं काय आहे." तुकाराम म्हणाला.
आत्माराम म्हणाला," ती मला नाही. डॉक्टरला म्हणत होती."    



बाँम्ब
पाकिस्तानातल्या एका माणसाने पोलिसांना फोन केला," मी इथल्या पार्कमध्ये बेंचवर बसलोय. आताच मी पाहिलं, इथे  माझ्यापासून काही अंतरावर एक बॉम्ब पडला आहे.मला सांगा, आता मी काय करू?"
पोलिस म्हणाला," बॉम्बवर लक्ष ठेवा. एक तासभर वाट पाहा. कोणी नेले नाही तर तुम्ही घेऊन जाऊ शकता."
                                                                                                             

तंबाखू व्यसन टाळण्यासाठी नीती, भीतीची सांगड हवी

       तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणार्‍या  दुष्परिणामांची कल्पना जनमानसाला व्हावी, या हेतूने जागतिक स्तरावरूनच तंबाखूविरोधी दिवस पाळण्यात येतो. पण तरीही  माणूस व्यसनापासून मुक्त होताना दिसत  नाही. उलट व्यसनाच्या विळख्यात आणखी आवळता  जातो.  एक धक्कादायक निष्कर्ष असे सांगतो की, तंबाखूच्या आहारी गेलेला माणूस वर्षभरात पाऊण किलो तंबाखू फस्त करीत असतो. आजकाल तंबाखू चघळणे, गुटखा खाणे, सिगारेट ओढणे ही फॅशन होऊन बसली आहे. दरवर्षी या फॅशनचा आलेख आपल्या देशात वाढत आहे. मागील दोन दशकांत तंबाखू खाणाऱ्यांचे प्रमाण 12 टक्‍क्‍यांनी वाढले आहे, असे "वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट इन्व्हेटिगेट इन हेल्थ'तर्फे झालेल्या सर्वेक्षणात नमूद आहे.
    १९५0 ते २000 या पन्नास वर्षांत तंबाखूने विकसित देशांमध्ये  तब्बल ६ कोटी लोकांचा बळी घेतला. त्यापैकी जवळजवळ ५ कोटी पुरुष होते, तर १ कोटी महिला होत्या. यात भारत आणि चीन आदी देशांचा समावेश नाही. आज  तंबाखूमुळे  दरवर्षी तीस लाख लोकांचा जीव जातो. त्यात दहा लाख चिनी नागरिक, तर आठ लाख भारतीय नागरिकांचा समावेश आहे.  अशीच परिस्थिती कायम राहिली तर  आगामी १0-१५ वर्षांत हीच संख्या १ कोटीवर पोहोचेल, अशी भीती व्यक्त करण्यात येते. त्यात ३0 लाख चिनी लोक असतील.

 तंबाखूमुळे निकोटीनसह २४ प्रकारचे विषारी पदार्थ असतात. यामुळे अकाली मृत्युमुखी पडणार्‍यांचे आयुष्य त्यांच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे सरासरी २0 ते २५ वर्षांनी कमी होत असते, असे जागतिक आरोग्य संघटना सांगते.  विकसित देशातील फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मरणार्‍या रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्णांना तंबाखूच्या सवयी असतात. तर  भारतात मुख कर्करोगामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणार्‍या एक लाख दुर्दैवी भारतीयांपैकी जवळजवळ ९५ टक्के हे तंबाखूचे शिकार ठरत असल्याचे आढऊन आले आहे.

  तंबाखूचे पृथक्करण केल्यावर त्यात २४ प्रकारचे प्रमुख घातक पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. त्यातल्या अनेक पदार्थांमध्ये कर्करोग निर्माण करण्याची क्षमता आहे. तंबाखूतला सर्वात घातक घटक म्हणजे निकोटीन. तंबाखू, जर्दा, गुटखा आणि मावा खाल्ल्याने तोंडाच्या श्लेमपटलावर तर विपरित परिणाम होतोच, शिवाय त्यातील विषारी पदार्थ रक्तात पसरून सर्व शरीरावरच त्याचा परिणाम होतो. तंबाखूतले उत्तेजक, विषारी  पदार्थ काही क्षणातच रक्तात पसरतात व उत्तेजना आणतात. त्यामुळे हळूहळू त्याची चटक लागते.
      पण तंबाखूच्या सेवनाने येणारी उत्तेजना तात्पुरती असते. थोडयाच वेळात त्याची 'किक' संपते. मग मानसिक थकवा जाणवायला लागतो. शारीरिक क्षमताही कमी व्हायला लागते. स्नायूंमध्ये ढिलाई आल्यासारखे वाटते. ही ढिलाई घालवण्यासाठी मग पुन्हा तंबाखू, गुटखा, मावा खावावा लागतो. आणि हे दुष्टचक्र पुढे चालूच राहते. यातून सशक्त, निरोगी, कार्यक्षम आणि देशभक्त पिढी निर्माण होण्याऐवजी दुबळी, रोगी, अकार्यक्षम, व्यसनग्रस्त, वैफल्यग्रस्त पिढी तयार होते, ज्याची देशाच्या विकासात काडीची मदत होत नाही.
     कर्करोगाचे अनेक प्रकार असले आणि आज हा रोग भयानक रूप घेत असला तरी तंबाखू, गुटखा आणि मावा यामुळे केवळ वीस-पंचवीस वर्षांची युवा पिढी तोंडाच्या कर्करोगाला बळी पडत आहे, ही मोठी दुर्दैवाची आणि चिंतेची बाब म्हटली पाहिजे. जगभरात तोंडाच्या कर्करोगाला बळी पडलेल्या लोकांची संख्या केवळ तीन- चार टक्के आहे, मात्र आपल्या भारतात हेच प्रमाण ४० ते ५० टक्के इतके भयावह आहे. आता हृदयविकाराच्या कारणांत तंबाखू, गुटखा आणि मावा यांच्या सेवनाच्या कारणाचाही समावेश झाला आहे. तंबाखू सेवनामुळे कातडीखालील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हृदयाचे ठोके वाढतात. हृदयाचे काम वाधते, पण रक्तपुरवठा मात्र वाढत नाही. आणखी परिणाम म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर विशिष्ट प्रकारच्या स्निग्ध पदार्थांची पुटे चढण्याची क्रिया बळावते. त्यामुळे हळूहळू रक्तवाहिन्यांचा व्यास कमी हो ऊ लागतो व साहजिकच त्या त्या अवयवांचा रक्तपुरवठा कमी व्हायला लागतो.
     याशिवाय तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम होतात. तोंडाची चव जाते. भूक मंदावते. पचनाच्या तक्रारी वाढायला लागतात. तंबाखूच्या धुरामुळे श्वसनाचे विकार, अस्थमा आदी रोगांनाही आयते आमंत्रण मिळते. आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्याचा अंडाशयावर परिणाम हो ऊन नपुसकत्व येऊ शकते. शुक्रजंतूंवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. माकडावर केलेल्या प्रयोगातून हे  सिद्ध झाले आहे.  
     तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनानंतर अनेक अनिष्ट परिणाम माणसाच्या शरिरावर होत असतानाही युवा पिढी त्याच्यापासून दूर जाण्यापेक्षा त्याला अधिकाधिक जवळ करताना दिसत आहे, हे मोठे दुदैव म्हटले पाहिजे. आजच्या पालकाला आपल्या पाल्याकडे वेळ द्यायला फुरसत नाही. तर पाल्य चांगल्या गोस्टींचा अंगिकार करण्यापेक्षा वाईट गोष्टींना कवटाळताना दिसत आहेत्.प्राथमिक शाळेत जाणार्‍या मुलांच्या खिशात पेन-पेन्सिल ऐवजी गुटख्याच्या पुढ्या आढळून येत आहेत. आजच्या मुलांवर, युवा पिढीवर कुणाचाच धाक राहिलेला नाही. सरकारेही त्यांच्या भावनिकतेचा विचार करताना त्यांना शारीरिक अथवा मानसिक असा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशा कायद्याच्या निर्मितीच्या मागे लागताना दिसत आहेत. त्यामुळे ना पालकाचा वचक राहिला ना शिक्षकाचा! शारीरिक, मानसिकतेने दुर्बल झालेली मुले अशा तकलादू व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात. मात्र हे व्यसन सबल करत नाही, उलट त्याला आतून पोखरण्याचे काम करते.
     व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी लोकांना विशेषतः युवा पिढीला नितीमत्तेची मोठी गरज आहे. नीती आणि भीतीची योग्य सांगड घालून त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याची गरज आहे. नीतीमत्तेचे धडे घरापासून गिरवायला हवेत. अगोदर पालकांनी त्याच्यापासून दूर राहिले पाहिजे. अन्यथा चव चाखण्याची ऊर्मी जागी हो ऊन त्याचा आस्वाद घेण्याकडे कल वाढतो. कुठल्याही गोष्टीचा एकदा का  आस्वाद घेतला की ती गळी पडल्याशिवाय राहत नाही.शाळा-कॉलेजमधून शिक्षक- प्राध्यापकांनीसुद्धा संस्कारावर भर द्यायला हवा. शिक्षकच मुलांसमोर व्यसन करत असेल तर त्यांनी आदर्श कोणाकडून घ्यायचा, हा मोठा प्रश्नच निर्माण होईल. सगळेच शिक्षक सारखे नसतात, या न्यायाने क्वचितच शिक्षक तंबाखू, गुटखा अथवा मावा खाताना किंवा सिगरेट ओढताना दिसतात.
     धुम्रपानाबाबत सरकारने अनेक कडक कायदे अस्तित्वात आणले आहेत. शाळा- कॉलेज, थिएटर, वाचनालये, बसस्थानक अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, शिवाय कडक शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे, पण कायदा पळतो कोण, असा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणच्या प्रमुखाला तसेच शाळा- कॉलेजच्या मुख्याध्यापक- प्राचार्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. पण कोणीही 'नस्ती आफत' ओढवून घ्यायला तयार नाही. कारण त्यांच्या संरक्षणासाठी पुरेशी व्यवस्था अथवा कायदा अस्तित्वात आणलेला  नाही.
      सिगरेट- विडी ओढणार्‍यापेक्षा त्याचा धूर घेणार्‍यालाही त्याचा अधिक त्रास होतो, ही मोठी चिंतेची बाब आहे.  यासाठीच हे कायदे करण्यात आले असले तरी गांभिर्याने घ्यायला कोणी तयार नाही. आपल्या देशात अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले आहे.  विशेषतः अल्पवयीन मुले या रोगांची शिकार होताना दिसतात. आरोग्याला आपायकारक असलेल्या तंबाखूच्या धुरामुळे सर्दी, पडसे, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे अशा नित्य समस्याही उद्भवत आहेत.
     तंबाखू व त्याच्याशी निगडीत असलेले उद्योगक्षेत्र आणि त्यातून होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता हितसंबंध गुंतलेल्या लॉबीच्यावतीने धुम्रपानाबाबत पद्धतशीरपणे गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न होत असतात. सरकारलाही यातून मोठा महसूल मिळत असल्याने तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणू शकत नाही. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई करणारे कायदे सरकारने केले असले तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकार सतर्क नाही. निदान  त्याबाबत जागरूक असण्याची आवश्यकता आहे. वेळप्रसंगी कायद्याची कठोरता दाखवली गेली पाहिजे. नाही तर निव्वळच्या कागदी  कायद्याला काहीच महत्त्व नाही.  धुम्रपानाच्या समस्येवर उपाय करताना लोकशिक्षणावरही अधिक भर दिला गेला पाहिजे.  सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनी आपापल्या परीने तंबाखूपासून दूर राहण्याच्या दृष्टीकोनातून पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. त्यात तळमळ असली पाहिजे तरच प्रयत्नांना यश मिळते. प्रत्येक डॉक्टरांनी यासाठी जरूर प्रयत्न करायला हवेत. गणेशोत्सवसारख्या  अन्य मंडळांनीही जागृतीचे प्रयोग हाती घ्यायला हवेत. निर्व्यसनी प्रत्येक माणसाने संपूर्ण देश आपल्यासारखा होण्यासाठी योगदान द्यायला दिले पाहिजे.  (संकलित)      
(३१ मे तंबाखू सेवन विरोधी दिन)
                           

Tuesday, May 29, 2012

बालकथा सर्वोच्च खोटे

                                                                      गोष्ट तशी जुनीच आहे. चंदनपूरच्या राजाला एकदा लहर आली. त्याने एक घोषणा केली, जो कोणी सर्वोच्च खोटे बोलेल, त्याला सोन्याचा सफरचंद समारंभपूरवक बहाल करण्यात येईल. राजाची घोषणा ऐकून दूर-दूरचे लोक आले. खोटारडेपणाचा कळस गाठणार्‍या घटना त्यांनी कथन केल्या, पण तरीही त्या राजावर प्रभाव टाकू शकल्या नाहीत. असेच काही दिवस गेले. सर्वोच्च खोटे बोलणारा अद्याप सापडला नाही. एक दिवस अत्यंत गरीब, हडकुळा इसम हातात मडके येऊन दरबारात दाखल झाला. तो राजाला म्हणाला," महाराज, आपल्या ईश्वर सुख आणि शांती देवो. आरोग्य आणि संपन्नता देवो. पण मला क्षमा करा, कारण मी माझे पैसे न्यायला आलो आहे. आपण माझे कर्जदार आहात. हुजूर, आपण मला माझे  सोन्याने भरलेले मडके परत द्यावे. सध्या मी खूपच आर्थिक हालाकीत आहे."
      हे ऐकून राजाला मोठा संताप आला. या सटर-फटर माणसाचा मी कसा बरं कर्जदार असणार? राजा म्हणाला," तू खोटे बोलतो आहेस. मी तुझ्याकडून कुठले कर्ज-बिर्ज घेतलेले नाही." तो इसम म्हणाला," महाराज, मी खरेच बोलतो आहे. पण मग तुम्हाला खोटे वाटत असेल तर तो सोन्याचा सफरचंद मला बक्षीस द्या. " आता राजाला त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला. मग तो मोठ्या चलाकीने म्हणाला," नाही.. नाही... तू खरेच बोलतो आहेस." गरीब इसम पटकन म्हणाला," मग माझे सोन्याने भरलेले मडके परत द्या." शेवटी राजाने मान्य केले की, या माणसाने बक्षीस जिंकले आहे. राजाने त्याला सर्वोच्च खोटे बोलणार्‍याचा पुरस्कार जाहीर करून सोन्याचे सफरचंद बक्षीस समारंभपूर्वक देऊन सन्मान केला. 

Monday, May 28, 2012

कृत्रिम शीतपेये आरोग्यास घातक

उन्हाळय़ात घराबाहेर पडल्यावर शरीराची लाहीलाही होत असताना तहान भागविण्यासाठी आकर्षक बाटल्यांमधील शीतपेयांचे सेवन केले जाते. यामुळे तात्पुरते मनाला समाधान मिळते, मात्र नकळतपणे शरीरावर त्यांचा प्रतिकूल परिणाम होतो. जगभरातील संशोधकांनी यावर संशोधन केले असून शीतपेयांच्या अतिसेवनामुळे आजारी पडणार्‍या लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे यात समोर आले आहे. त्यामुळे जर कोणी सातत्याने कार्बनयुक्त शीतपेयांचे सेवन करत असेल तर त्याला वेळीच या धोक्यांची कल्पना द्यायला हवी.

    
फेसाळणारी कार्बनयुक्त कोलासारखी शीतपेये आरोग्यास हानीकारक आहेत असा दावा पाँडिचेरी विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी केला आहे. दिल्लीस्थित विज्ञान आणि पर्यावरण केंद्राने केलेल्या चाचणीमध्ये लोकप्रिय कोला कंपन्यांच्या शीतपेयांमध्ये जास्त प्रमाणात हानीकारक घटक आढळून आले आहेत. या घटकांमुळे मनुष्याच्या शरीरावर एखाद्या स्लो पॉयझनसारखा परिणाम होतो असे स्पष्ट झाले आहे. या शीतपेयांचा सर्वाधिक धोका बालकांना होत असून जगभरातील प्रदीर्घ संशोधनानंतर कृत्रिम स्वाद, रसायने, रंग असणार्‍या पेयांपासून लहान मुलांना दूर ठेवावे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. संशोधनानुसार या पेयांच्या वारंवार सेवनाने मुलांची एकाग्रता कमी होते, शिवाय शरीरावरदेखील दुष्परिणाम होतो. जवळपास सर्वच कृत्रिम शीतपेयांत एथलिक                    
       ग्यायकॉल, सॅकरीन, कॅफीन आणि फॉस्फोरिक अँसिड मिसळलेले असते. यामुळे ज्या वयात मुलांच्या शरीराची वाढ होत असते त्याच काळात त्यांची भूक मंदावते. त्यांना अशक्तपणा येऊ शकतो. त्यांच्या लिव्हर व किडनीवरदेखील परिणाम होण्याचा धोका असतो. अनेकदा ही शीतपेये बराच काळ सतत फ्रीजमध्ये ठेवण्यात आल्यामुळे दूषित होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मोठय़ांनी शीतपेये टाळायलाच हवीतच, पण मुलानांही यापासून दूर ठेवायला हवे. त्यापेक्षा ताज्या फळांचा रस, ताक, लस्सी, नारळपाणी यासारखी शीतपेये द्यावीत. ही शीतपेये शरीराकरिता उत्तम असतात. यातून पोषक घटक तर मिळतातच, सोबत उन्हाळय़ातील त्रासांपासूनदेखील बचाव होतो. या पेयांमुळे उत्साहदेखील टिकून राहतो. त्याचप्रमाणे यात धोक्याचे प्रमाणदेखील कमी असते.

punya_nagari 28/5/2012 ( loikjagar)

Sunday, May 27, 2012

बालकथा उपाय सापडला

gavakari, nashik 27/5/2012

सार्वजनिक जीवन तंबाखूच्या धुराच्या विळख्यात!

     आपल्या देशात आज अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे सार्वजनिक आरोग्यच धोक्यात आले आहे. अनेक वैद्यकीय अहवालांनी गेल्या दोन दशकातील विविध अभ्यासाद्वारे काढलेल्या निष्कर्षात यावर शिक्कामोर्तब केले आहे. अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग असेच हृद्यरोग जडलेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखूच्या धुरामुळे श्वसनाचे विकार , अस्थमा आदी रोगांनाही आयते आमंत्रण मिळत असून विशेषतः अल्पवयीन मुले या रोगांची शिकार होत आहेत. आरोग्याला अपायकारक ठरणार्‍या तंबाखूच्या धुरामुळे सर्दी, पडसे, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे अशा नेहमीच्या समस्याही निर्माण होत आहेत.
     सिगरेट, बिडी आदी पेटवल्याने होणारा धूर सेवन करणार्‍याच्या शरीरात तर जात असतोच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या सभोवताली असलेल्या व्यक्तींच्या शरीरातही श्वसनावाटे हा धूर प्रवेश करत असतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही तंबाखू सेवन न करताही हा धूर अपाय करतो. धुम्रपान करणार्‍यांच्या आरोग्याला होणार्‍या अपायाइतकाच किंबहुना अधिक अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे धोका सम्भवतो. हृदयविकार, फुफ्फुसे यांना होणारी हानी ही धुम्रपान करणार्‍याच्या जीवाला होते, तितकीच असते. या धुरातील आरोग्याला हानीकारक ठरणार्‍या रसायनांमुळे न्युमोनिया, अस्थमा, कानाचा संसर्ग आदी समस्यांचे प्रमाणही वाढू लागल्याचे निष्कर्ष निघत आहेत. लहान मुलांना तर या धुरामुळे बहिरेपणा संभवतो. तसेच या धुरामुळे गर्भवती स्र्तियांच्या गर्भाची वाढ खुंटते. त्याचबरोबर श्वसनाचेही विकार जडतात.
     अप्रत्यक्ष धुम्रपानामुळे आपल्याकडे सार्वजनिक आरोग्याची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे, हॉटेल्स, कार्यालये यामध्ये अप्रत्यक्ष धुम्रपानाचे प्रमाण सर्वाधिक आहे. एका पाहणीअंती युरोपीय देशांमध्ये अप्रत्यक्ष धुम्रपानाचा सम्बंध हा वयाच्या १५ वर्षांनंतर येतो. अमेरिकेत धुम्रपान न करणार्‍यांपैकी ८८ टक्के लोक अप्रत्यक्ष धुम्रपानाला बळी पडतात., असाही एक अहवाल सांगतो. भारतात तर हे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत किती तरी पटीने अधिक असल्याची भीती वैद्यकशास्त्रात व्यक्त केली जात आहे.
     सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई करण्यासाठी सरकारने कठोर कायदे केले आहेत. मात्र त्याच्या अंमलबजावणीबाबत ठार निष्क्रियता दिसून येत आहे. अंमलबजावणी काटेकोर व कठोर होण्याची आवश्यकता आहे. शिवाय लोकशिक्षणावर अधिक भर देण्याची गरज आहे. स्वयंसेवी संस्था, निर्व्यसनी नागरिक यांनी आपले कर्तव्य समजून हा धुराचा विळखा कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शाळा- कॉलेजमध्ये जागृती करणारी व्याख्याने, पोस्टर्स लावले जावेत. धुम्रपान करणार्‍या पालकाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी सगळ्यांनीच पुढे आले पाहिजे.

Friday, May 25, 2012

सरकारकडून अपेक्षा करणंच बेकार!

      शेवटी एकदाच्या पेट्रोलच्या किंमती वाढल्या. युपीए सरकारने आपला तीन वर्षांचा कार्यकाल यशस्वीरित्या पूर्ण केल्याच्या आनंदाप्रित्यर्थ महागाईने आधीच भरडून गेलेल्या जनतेला हा आणखी एक नजराना दिला आहे, असेच म्हणावे लागेल. या सरकारने गरीबांचे समाधान होईल, असे काहीच दिले नाही. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान बाळगावा, अशा किती तरी गोष्टी आपल्या देशात आहेत., पण त्याहीपैक्षा अधिक गोष्टी या शरमेने मान खाली घालाव्या लागणार्‍या आहेत. आपल्याला आपल्या सरकारची , देशाची लाज वाटावी, इतका अशा गोष्टींचा पाढा  मोठा आहे. त्याच्याखाली अभिमानास्पद गोष्टी पार झाकाळून, काळवंडून गेल्या आहेत. सध्याच्या पेट्रोल दरवाढीच्या साडेसातीने सात्त्विक माणसाच्या संतापाचाही उद्रेक झाला आहे. त्याच्या मुखातून अपशब्दांची माळ बाहेर पडावी,अशी ही दरवाढ आता नैतीकतेलाच गिळकृंत करायला निघाली आहे. हे पतन धोकादायक म्हणायला हवे.      आपल्या देशात जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे, त्याचा आपल्याला अभिमान आहे. या देशात सर्वधर्माचे लोक गुण्यागोविंदाने, भाईचार्‍याने राहतात. सर्व धर्माचा समान आदर केला जातो. जगातले सर्वाधिक शिकले-सवरलेले पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत, याचाही आपल्याला अभिमान आहे. ते पंतप्रधानाबरोबरच कुशल अर्थतज्ज्ञही आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी एकदाही निवडणूक लढवली नसली तरी सलग आठ वर्षे ते आपल्या लोकशाही देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहात आहेत. याचाही आम्हाला अभिमान आहे. पण दुसर्‍या बाजूला आम्हाला लाज वाटावी, अशी पुष्कळ कारणेही आमच्यासमोर आहेत.आपल्या पंतप्रधानांकडे स्वतःची निर्णयक्षमता नाही, धडाडी नाही.अर्थतज्ज्ञ असूनही त्यांचा हिशोब कच्चाच वाटावा, अशी परिस्थिती आहे. तेल कंपन्या त्यांना आपला तोटा वाढत असल्याचे सांगतात आणि आपले पंतप्रधान सामान्य जनतेचा विचार न करता पेट्रोलची भाववाढ करून मोकळे होतात. त्यांना एकदाही तेल कंपन्यांचे बॅलन्स सीट पाहावे, असे वाटले नाही काय? तेल कंपन्या सातत्याने नफा कमावत असताना दरवेळेला तोट्याच्या नावाखाली सामान्यांच्या खिशावर दरोडा टाकला जात आहे. हा कुठला न्याय म्हणायचा? दरवेळेला सामान्य माणसाला सुळावर चढवलं जाणं, कितपत योग्य आहे? किंअती वाढवायच्याच असतील तर त्या निवडणुकीच्या तोंडावर का वाढवल्या जात नाहीत? का अशी जनतेशी प्रतारणा केली जात आहे? सरकारला याची अजिबात शरम वाटत नाही काय?
     आमच्या मात्र माना शरमेने खाली जात आहेत. नको त्या गोष्टी आम्हाला पाहाव्या लागत आहेत. आता तर आमची शरमेने खाली गेलेली मान वर काढणं मुश्किल हो ऊन बसलं आहे. कारण पावलोपावली अशा लाजिरवाण्या घटना घडत आहेत. २ जी-स्पेक्ट्रम घोटाळ्यातला एक आरोपी असलेला मंत्री ए. राजा संसदेत जाताना विषारी हास्य ओकतो तेव्हा , ते आम्हाला पाहावेलम तर कसं? पण काय करणार, भ्रष्ट्राचार्‍यांना संरक्षण देणारं हे सरकार सामान्यजनांच्या जिवावर सत्तेवर येतं, तेव्हा आपली कर्तव्यं विसरून जातं. इतके मोठमोठे घोटाळे झाले, पण काय झाले या घोटाळेबाज लोकांचे? आम्ही त्याचे परिणाम पाहू शकत नाही, हीसुद्धा एक मोठी शरमेची बाब म्हटली पाहिजे. काळ्या पैशावर अगदी स्वच्छ खोटे बोलणार्‍या सरकारचे हे पंतप्रधान सर्वेसर्वा आहेत. मग आम्हाला याचीसुद्धा लाज वाटलीच पाहिजे.
     अनेक पक्षांचे मिळून बनलेले सरकार चालवाताना तशा अडचणी येत असतातच, या गोष्टी आपण समजू शकतो. कारण सगळ्यांना सोबत घेऊन जाणे, मोठे कठीण काम असते. पण याचा अर्थ असा नव्हे की सहयोगी पक्षांना खूश करताना सामान्य जनतेला , ज्यांनी तुम्हाला संसदेत पाठवलं, त्यांना दु: खाच्या दरीत लोटायचं. युपीए सरकारची पहिली टर्म अशी-तशी गेली. या दरम्यान कुठलीही सक्ती दिसून आली नाही. दुसर्‍या टर्ममध्ये शिस्तीसाठी सक्ती    आवश्यक होती. पण शिस्त कुठेच दिसली नाही. शिस्त नाही तिथे सक्ती कुठे असणार? हां पण, सामान्य जनतेवर महागाईची सक्ती मात्र आवर्जून लादली गेली. 'मुकी बिच्चारी, कुणीही हाका' शी त्यांची अवस्था झाली आहे.
     आज देशाच्या प्रगतीचे आकडे आपल्यासमोर आहेत, ज्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पण देशात रोज काही ना काही अशा घटना घडत आहेत की त्यामुळे शरमेने मान खाली घालावी लागत आहे. एकसुद्धा अशी एखादी घटना नाही की, देशाच्या हिताच्याविरोधात काम करणार्‍या देशद्रोह्याला, भ्रष्ट्राचार्‍याला कठोर शिक्षा झाली आहे. ज्याच्यापासून  इतर धडा घेतील. आणि ज्या काही शिक्षा झाल्या आहेत, त्या इतक्या रंजक आहेत की त्याच्यापासून काय शिकणार, हाच मुळी प्रश्न आहे. ज्या शिक्षेपासून धडा मिळत नाही, अशा शिक्षेची मग गरजच काय? महागाईवर महागाई, भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांवर घोटाळे ही या युपीए सरकारची देण आहे.
     सरकार काही तरी बहाणे बनवून सामान्य जनतेला मुर्खात काढत आहे. तेल कंपन्यांनी २६ जून २०१० ला पेट्रोल नियंत्रणमुक्त केले होते. तेव्हा सांगताना त्यांनी कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती लक्षात घेऊन देशातल्या पेट्रोलच्या किंमती निश्चित केल्या जातील. सरकार आणि कंपन्यांनी मिळून गेल्या दोन वर्षात १४ वेळा क्रूड तेलाच्या महागाईच्या नावाखाली पेट्रोलच्या किंमती वाढवल्या. खरे तर ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचा भाव ११४ डोलर प्रति बॅरल होता, तेव्हाही तेल कंपन्या घाट्याची भाषा करत होत्या. आज क्रूड तेलाचा भाव ९१.४७ डोलर आहे, तरीसुद्धा तोटा होत असल्याचे सांगितले जात आहे. रुपयाची घसरण पुढे केली जात असली तरी, हासुद्धा एक बहाणाच आहे. कारण १५ मे २०११ पासून आतापर्यंत डॉलर १० रुपयाने महाग झाला आहे. आणि कच्चे तेल २२ डॉलरने स्वस्त झाले आहे. पण या दरम्यान पेट्रोलच्या किंमती केवळ तीनवेळा तेही जुजबी प्रमाणात कमी करण्यात आल्या.
     कंपन्यांचं म्हणणं असं की, ८० टक्के कच्चे तेल विदेशातून आयात करावे लागते. आणि त्याची किंमत डॉलरमध्ये चुकती करावी लागते. सध्या एक डॉलर ५६ रुपयाचा झाला आहे. त्यामुळे अधिक किंमत मोजावी लागत आहे. आयात माहागात पडत आहे, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षातली गोम वेगळीच आहे. १५ मे २०११ ला पेट्रोलचा भाव ५ रुपयांनी महागला होता, तेव्हा क्रूड तेल ११४ डॉलर प्रति बॅरल होते. मात्र त्यावेळेला डोलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ४६ रुपये होती. या भावाने पाहिल्यास एक बॅरेल तेलासाठी  आपल्याला ५२४४ रुपये द्यावे लागत होते. आज क्रूड तेल ९१.४७ डॉलर प्रति बॅरल आहे. आणि एक डॉलर ५६ रुपयाचा आहे. म्हणजे आजच्या भावाने एक बॅरल तेल ५०९६ रुपयांना मिळत आहे. याचाच अर्थ कच्चे तेल १४८ रुपये प्रति बॅरल स्वस्त मिळत आहे.
     सरकारी तेल कंपन्यांचं म्हणणं असं की, पेट्रोलशिवाय डिझेल, गॅस आणि रॉकेल सरकारी नियंत्रणाखाली आहेत. त्यांच्या किंमती वाढल्या नसल्यानेही त्यांचा तोटा वाढत चालला आहे. डिझेलची शेवटची वाढ २६ जून २०११ ला करण्यात आली होती. यावर्षी १.८६ लाख कोटी रुपये तोटा होईल, असा दावा तिन्ही कंपन्यांनी केला आहे. वास्तविक पाहता या तिन्ही कंपन्या मोठा नफा कमावत आहेत. २०११ च्या वार्षिक रिपोर्टनुसार आयओसीला ७४४५ कोटी, एचपीसीएलला १५३९ कोटी आणि बीपीसीएलला १५४७ कोटी रुपये नफा झाला आहे आणि तोही कर चुकता करून! डिझेल, गॅस आणि रॉकेलवरच्या घाट्याची बातसुद्धा खोटीच आहे. कारण सरकार यावर सबसिडी देत आहे. ज्या देशातले खरब्जावधी रुपये काळ्या धनाच्या रुपात विदेशी बँकांमध्ये पडून आहेत. आणि त्याचा सरकारला पत्तासुद्धा नाही, अशा सरकारकडून आणखी कुठली अपेक्षा केली जाऊ शकते? काळ्या पैशावर केवळ श्वेतपत्रिका काढली म्हणजे आपले   कर्तव्य संपले, अशी सरकारची समजूत आहे काय? देशात पीक-पाणी चांगले झाले असतानाही ना शेतकर्‍याची आर्थिक स्थिती सुधारली ना ग्राहकाला स्वस्तात धान्य उपलब्ध झाले , याला काय म्हणायचे? सर्वोच्च न्यायालयाकडून वारंवार फैलावर घेतलं जाऊनही सरकार तसेच 'ढीम्म' राहिले आहे. अशा सरकारकडून शेवटी काय अपेक्षा केली जाऊ शकते?       

Wednesday, May 23, 2012

(रहस्यकथा) असेही एक रहस्य...!

                                               
     मी शरलॉक होम्ससोबत एके ठिकाणी निघालो होतो. अचानक कुणी तरी हाक दिली, " मायबाप,काही तरी द्या. देव तुमचं भलं करील..." मी आवाजाच्या दिशेनं पाहिलं, आणि माझ्या अंगावरून  सरसरून काटा निघून गेला. बाप रे! किती भयंकर चेहरा होता, त्या भिकार्‍याचा! कपाळावर जखमेचा खोल व्रण होता. आणि वरचा ओठ असा काही वर सरकला होता की, तो खालच्या ओठाला बिलगायचं नावच घेत नव्हता.गालावर विद्रुप मोठे मोठे डाग होते. आणि डोक्यावर लाल रंगाचे केस. अंगावर मळलेले- फाटलेले शिरशिरी आणणारे कपडे होते.
     मी होम्सचा हात ओढतच म्हणालो," लवकर चल येथून." होम्स हसून म्हणाला," वाटसन, घाबरू नकोस. हा ह्यूज बून. मी पाहत आलोय त्याला. लोक मदत करतात. पैसे देतात. याचा फक्त चेहरा खराब नाही तर  याचा एक पायसुद्धा मोडलेला आहे. बिच्चारा, लंगडत लंगड्त चालतो."
  
   मी मात्र मनातल्या मनात देवाची प्रार्थना करू लागलो, ' पुन्हा कधी या ह्यूज बूनचा चेहरा माझ्यासमोर आणू नकोस. पण तसं घडायचं नव्हतं. एका मिसिंग प्रकरण समोर आलं. आणि त्या प्रकरणाचा ह्यूज बूनला भेटल्याशिवाय उलगडा होणार नव्हता. झालं होतं असं की, सेंट क्लेअर नावाचा इसम रहस्यमयरित्या गायब झाला होता. त्याच्याबाबतीत जो कोणी काही सांगू शकत होता, तो म्हणजे भिकारी ह्यूज बून! पोलिसांनी त्याला अटकही केली होती. पण सेंट क्लेअरविषयी काही माहिती मिळाली नव्हती.
     सेंट क्लेअरची पत्नी मॅरी शरलॉक होम्सला भेटायला आली होती. होम्सने मला याबाबतीत सांगितलं होतं. सेंट क्लेअर आपल्या पत्नी-मुलांसह शहराबाहेरच्या एका वसाहतीत राहत होता. त्याचे जीवन सुखी-समाधानी होते. तो रोज सकाळी त्याच्या कामानिमित्तानं शहरात येत असे आणि सायंकाळी ठरलेल्या वेळेत घरी परतत असे. एक दिवस सेंट क्लेअर शहरात आला. त्याच्या पत्नीलाही काही कामानिमित्तानं शहरात यावं लागलं.  ती रस्त्यावरून निघाली होती. चालता चालता तिची नजर समोर असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या उघड्या खिडकीकडे गेली. तिचा पती सेंट खिडकीत उभा होता. दोघांची नजारानजर झाली. सेंट झटकन मागे सरला आणि खिडकीही लगेच बंद झाली. ते पाहून मॅरी घाबरली. तिला काहीच कळेना! तिला पाहून सेंट मागे का हटला आणि खिडकी का बंद झाली? मॅरी जाणून घेण्यासाठी इमारतीत घुसली. पायर्‍या चढून वर जाणार इतक्यात इमारतीचा मालक लास्कर समोर आला. तो म्हणाला," मॅडम, तुम्ही वर जाऊ शकत नाही."
     मॅरी घाबरून बाहेर आली. समोर दोन काँन्स्टेबल उभे होते. ती त्यांच्याकडे गेली. आणि सारा प्रकार सांगितला. वर म्हणाली," मला वाटतं, माझ्या पतीला किडनॅप केलं असावं. प्लिज, मला मदत करा."
     दोन्ही काँन्स्टेबल मॅरीसोबत आत गेले. तिथे लास्कर उभाच होता. त्याने पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्याला रस्ता मोकळा करणं भाग पडलं. वरच्या मजल्यावर दोन खोल्या होत्या. एक रिकामी होती. आणि दुसर्‍यात तोच तो भयंकर चेहर्‍याचा भिकारी ह्यूज बून बसला होता. पण मॅरीला सेंट क्लेअर कुठेच दिसला नाही.
     लास्कर म्हणाला," इथे तर फक्त हा भिकारी ह्यूज बून राहतो. याच्याशिवाय मी कुणालाच वर येताना पाहिलेलं नाही. मिसेस मॅरींना नक्कीच भास झाला असला पाहिजे."
     पोलिसांनी सगळी खोली धुंडाळूली. तर तिथे त्यांना एक पँत, शर्ट आणि एक जोड चप्पल आढळून आली. मॅरी ती पाहताच किंचाळली, " ही या माझ्या पतीच्याच वस्तू आहेत. पण त्यांचा कोट कुठाय? आणि माझा पती...?" असे म्हणून तिने हंबरडा फोडला.
     आता पोलिसांचा मॅरीच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यांनी ह्यूज बूनला अटक केली.  आणि ठाण्यात नेले. पण ह्यूज बून एकसारखा एकच पालपूद लावत होता, "मला माहित नाही. सेंट क्लेअरचे कपडे तिथे कसे आले?''
     लास्करने पोलिसांना सांगितले की, ह्यूज बून अनेक वर्षांपासून बाजारात भिक मागायला बसतो. मीच त्याला दया येऊन माझ्या इमारतीत राहायला जागा दिली होती."
     लास्करच्या इमारतीच्या पाठीमागे एक खोल नाला होता. त्यात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी यायचे. पोलिसांनी भरतीचे पाणी ओसरल्यावर नाल्यातसुद्धा शोध घेतला, तेव्हा त्यात एक कोट मिळून आला. कोटाच्या खिशात पुष्कळशी चिल्लर नाणी सापडली. कोटामुळे प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागले.
     त्या रात्री होम्सने सेंट क्लेअरच्या घरी जाताना मला सगळा किस्सा ऐकवला. जेव्हा आम्ही मॅरीच्या घरी पोहचले, तेव्हा मॅरीने सांगितले, " एक चांगली बातमी आहे, सेंटने एक चिठ्ठी पाठवली आहे. त्यात त्याने आपण खुशाल आहोत आणि लवकरच परतणार असल्याचं म्हटलंय." होम्सने पत्र पाहून विचारलं, ही अक्षरं तुमच्या पतीचीच आहेत?"
     मॅरी म्हणाली, " हो, आणि सोबत त्यांनी त्यांची अंगठीही पाठवली आहे. क्लेअर सुखरूप असला तरी  रहस्य मात्र कायम होतं.
     होम्स रात्रभर विचार करत होता. तो झोपला नाही. दुसर्‍यादिवशी त्याने मला लवकर उठवलं. हातात एक बॅग थांबवली. "चल,आपल्याला एके ठिकाणी लवकर जायचं आहे." लवकरच आम्ही जेलसमोर उभा होतो. कोठडीत तोच भयंकर चेहर्‍याचा ह्यूज बून होता. होम्सने शिपायाला बोलावले. त्याने सांगितल्यानुसार ह्यूज बूनला घट्ट पकडलं. होम्सने बॅगेतून एक स्पंज काढला आणि तो ओला करून ह्यूज बूनच्या चेहर्‍यावर जोरजोराने रगडू लागला. बून ओरडत होता आणि सुटण्याचा प्रयत्न करीत होता. पण सिपायाची पकड मजबूत होती. थोड्याच वेळात चेहर्‍यावरचा सारा लेप उतरला. आणि समोर सेंट क्लेअर उभा राहिला. तो रडत म्हणाला," हो, मीच सेंट क्लेअर आणि ह्यूज बूनसुद्धा...!"
     नंतर सेंट क्लेअर ऊर्फ ह्यूज बूनने जे काही सांगितलं, ते असं होतं- ' मी एक चांगला अभिनेता होतो. नाटकात काम करायचो. नंतर पत्रकार म्हणूनही एका वृत्तपत्रात काम करू लागलो. एकदा संपादकांनी भिकार्‍याच्या जीवनावरची स्टोरी बनवायला सांगितली. भिकार्‍यांच्या जीवनाच्या मुळाशी जाण्यसाठी मी स्वतः एका भिकार्‍याचा गेटअप केला. आणि त्यांच्यात जाऊन बसलो. स्टोरी तर खूप छान जमलीच पण आणखी एक विशेष गोष्ट घडली. ती म्हणजे, त्या दिवशी मला पुष्कळ पैसे मिळाले. ते पैसे माझ्या पगारापेक्षा किती तरी अधिक होते. मग तेव्हापासून हेच काम करायचं ठरवलं. मी रोज घरातून निघायचो, ह्यूज बूनचा मेकअप चढवायचो आणि बाजारात जाऊन बसायचो. यासाठी लास्कर मला मदत करायचा,"
     त्यादिवशी मी कपडे बदलत होतो, तेव्हा माझ्या पत्नीने मला पाहिलं. ती आत येईपर्यंत मी माझा वेश बदलला होता. मॅरी येण्यापूर्वीच मी चिल्लरने भरलेला कोट मागे नाल्यात फेकला होता. बाकीचे कपडे बाहेर फेकणार तोच, मॅरी सिपायांसह आत आली. त्यामुळे कोट नाल्यात मिळाला आनि बाकीचे कपडे खोलीत! नंतर मी मॅरीची चिंता दूर करण्यासाठी पत्रसुद्धा पाठवलं, पण शरलॉक होम्सने या सगळ्या प्रकरणावरचा पडदा उठवला.'
     हा किस्सा संपला. सेंट क्लेअरची कसल्याही शिक्षेविना सुटका झाली. तो घरी पोहचला पण तेव्हापासून ह्यूज बून मात्र कोणाला दिसला नाही.                                                              भाषांतर- मच्छिंद्र ऐनापुरे
                                                            मूळ लेखक- आर्थर कानन डायल ( शरलॉक होम्स पात्राचा निर्माता)   

रेखाला अवाजवी प्रसिद्धी का?

     सध्या सिनेअभिनेत्री रेखा चांगलीच चर्चेत आहे. २७ एप्रिल रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रेखाचे नाव राज्यसभा सदस्याच्यारुपात नॉमिनेटेड केल्यानंतर ते शपथविधी पार पडेपर्यंतच्या तर काळात मिडिया स्तरावर सर्वत्र रेखा आणि रेखाच चर्चेत होती. राज्यसभेच्या कामकाजाचे प्रक्षेपण करणार्‍या सरकारी वाहिनीनेही रेखाचा शपथविधी असतानासुद्धा जया बच्चनचा त्रासिक चेहरा वारंवार दाखवून त्यात आणखीणच भर टाकली. कालपर्यंत या सिनेस्टारचे नाव सगळ्यांच्या ओठावर होतेच्,पण आता ती राज्यसभा सदस्य झाल्याने आणखी एक वलय तिच्याभोवती आले आहे. असे नव्हे की, पहिल्यांदाच कुणी चित्रपट ऍक्ट्रेस राज्यसभा दालनात पाऊल टाकते आहे. तिच्याअगोदर नर्गीस दत्त, शबाना आझमी, आणि हेमामालिनीसारख्या नायिका राज्यसभेत पोहचल्या आहेत. शिवाय अमिताभ बच्चन, वैजयंतीमाला, जया बच्चन, जयाप्रदा, स्मृति इराणी, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, गोविंदा आदी चित्रपट -टीव्ही जगतातले कित्येक सितारे संसद सदस्य बनले. पण राज्यसभा सदस्यत्व  मिळाल्यावर जितका मिडिया कवरेज रेखाला मिळाला, तितका अन्य कुणाला चित्रपट कलाकाराला मिळाला नाही.
इतके कवरेज का?
     रेखा बॉलीवूड जगतातील एक बेहतरीन, एव्हरग्रीन अभिनेत्री आहे, यात वादच नाही.  तिला श्रेष्ठ अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्म फेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण तरीही तिला इतके कवरेज दिले गेले ते तिच्या नावामुळे किंवा तिच्या अभिनयामुळे नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. मिडियाचे रेखाविषयी जे प्रेम उफाळून आले आहे किंवा येत आहे, त्याला एक मोठे  कारण आहे, ते म्हणजे तिचे अमिताभशी असलेले पूर्वीचे प्रेमसंबंध. ती त्याची  भूतपूर्व प्रेमिका आहे. आणि त्याच अमिताभची पत्नी जया बच्चनसुद्धा सध्या राज्यसभेची सदस्या आहे. याचमुळे शपथ समारंभ रेखाचा असला तरी कॅमेराचा फोकस मात्र रेखापेक्षा अधिक जया बच्चनवर होता. 
राज्यसभेसाठी रेखाच का?
     इथे सगळ्यांनाच एक प्रश्न वारंवार सतावत राहतो तो म्हणजे, शेवटी केंद्र सरकारने रेखालाच राज्यसभेसाठी सदस्य म्हणून का निवडलं? आतापर्यंत नर्गिस, शबाना आझमी  आणि  हेमामालिनीसारख्या ज्या ज्या अभिनेत्रींना राज्यसभेसाठी नॉमिनेटेड करण्यात आले होते, त्या त्या यान त्या कारणाने  समाजसेवा किंवा राजकारणाशी संबंधित होत्या. पण रेखाच्याबाबतीत असली कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिची राज्यसभेसाठीची निवड, बुचकाळ्यात टाकणारी आहे. हां,  दोन वर्षापूर्वी  पद्मश्री किताब देऊन तिचा गौरव करण्यात आला होता. वास्तविक, तिला हा पुरस्कार १० वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता. कारण तिच्यानंतर सिनेसृष्टीत आलेल्या माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय-बच्चन यांना या पुरस्काराने अगोदरच सन्मानित करण्यात आले होते. खरे तर, सगळ्यांनाच ठाऊक आहे की, बच्चन कुटुंबीय कधी काळी नेहरू-गांधी कुटुंबियांशी अगदी घनिष्ट संबंध साधून होते. आता मात्र परिस्थिती पार उलटी आहे. इंदिरा गांधी यांच्यामुळे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना राज्यसभेचे दरवाजे खुले झाले होते तर राजीव गांधी यांच्या मैत्रीखातर बालमित्र  अमिताभ  काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबाद येथून खासदार बनले होते. पण आज जया बच्चन काँग्रेस नव्हे तर समाजवादी पक्षाच्यावतीने राज्यसभेच्या खासदार बनल्या आहेत. सध्या गांधी आणि बच्चन कुटुंबियातून साधा विस्तवही जात नाही. रेखाला  राज्यसभा सदस्य बनवून काँग्रेसने बच्चन कुटुंबाचे खच्चिकरण करण्याचा डाव आखला आहे, असे म्हणायला वाव आहे. 
      रेखाला राज्यसभेची ९९ क्रमांकाची सीट मिळाली, ती  जया बच्चनच्या बरोबर मागची सीट  होती.  त्यामुळे काँग्रेसजनांच्या गालांवर असुरी आनंदाच्या खळ्या पडल्या असल्यास नवल नव्हते.  कारण  रेखा, जया पुढे-मागे असल्याने यानिमित्ताने अमिताभ- रेखाच्या प्रेमप्रकरणाला पुन्हा उजाळा मिळेल आणि मिडिया आयते चघळायला खाद्य मिळेल. रेखा मागे असल्याने  जया सतत तणावात राहील, अशीही अटकळ काँग्रेसने बांधली असावी.  पण जया बच्चन हुशार निघाली. तिने आपली सीट बदलून घेऊन सगळ्यांच्याच मनसुब्यावर पाणी फिरवले. अर्थात रेखा आणि जयाचे किस्से इथेच थांबतील, असे म्हणायला थोडी अडचण असली तरी एक मात्र नक्की की, अमिताभ, जया आणि रेखा हा 'सिलसिला' काही थांबणारा  नाही.   
प्रारंभीचा काळ
     रेखाला पहिली प्रसिद्धी मिळाली ती, नवीन निश्चलसोबतच्या 'सावन भादो' ( १९७०) या चित्रपटामुळे! या चित्रपटाला काही प्रमाणात मिळालेल्या  यशामुळे रेखाला अनेक चित्रपट मिळाले. वास्तविक तिला हिंदी बोलता येत नव्हते. दिसायला काळी सावळी होती आणि थोडी जाडही. तरीही तिचे 'रामपूर का लक्ष्मण', ' कहानी किस्मत की', ' प्राण  जाए पर वचन न जाए' सारखे काही चित्रपट चालले. याच दरम्यान विश्वजीतसोबतचा एक किस सीन 'लाइफ' नावाच्या मासिकात छापून आला आणि खळबळ उडाली. तशातच रेखाचे  किरण कुमार आणि विनोद मेहरा यांच्याशी प्रेमप्रकरण असल्याची चर्चा रंगत राहिली. मात्र याचा रेखाला फायदाच झाला.  रेखाभोवती प्रसिद्धीचे वलय वाढत राहिले.
अमिताभचा रेखावर प्रभाव
     १९७६ मध्ये रेखाला अमिताभसोबत 'दो अंजाने' हा चित्रपट मिळाला. तोपर्यंत अमिताभ 'जंजीर', 'दीवार', 'शोले' सारख्या हिट चित्रपटांमुळे स्टार बनला होता. 'दो अंजाने' च्या शुटींग दरम्यान रेखाने अमिताभची कामावरची निष्ठा जवळून अनुभवली होती. दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार काम करणारा अमिताभ त्याची कष्ट करण्याची धडाडी यामुळे रेखा त्याच्या कामावर प्रभावित झाली. आतापर्यंत रेखा सेट म्हणजे खेळाचे मैदान असल्याचे समजत होती. पण अमिताभच्या लाइफ स्टाईलची जादू तिच्यात इतकी भिनली की, अजूनही त्यातून ती बाहेर पडू शकली नाही. रेखा आणि अमिताभ यांचा सहवास केवळ पाच वर्षांचा असला तरी त्यांच्या  सार्‍या आयुष्यावर ही पाच वर्षे भारी पडली आहेत. रेखा तर अमिताभच्या रंगात रंगूनच गेली. अगोदर ती बी- ग्रेड सिनेमाची नायिका होती. पण तिने नंतर आपले वजन कमी केले. आपल्या रंगरुपात आणि अभिनयातही निखार आणला. कष्टाची सवय ठेवली. आणि रेखा स्टार बनली. १९७६ ते १९८१ या पाच वर्षांच्या कालावधीत रेखाचे अमिताभसोबत 'दो अंजाने', 'खून पसीना', 'इमानधर्म', गंगा की सौगंध', 'मुक्कदर का सिकंदर', 'सुहाग', 'मिस्टर नटवरलाल' आणि 'सिलसिला' हे चित्रपट आले. यातले पाच चित्रपट सुपरहिट ठरले. पण 'सिलसिला' नंतर म्हणजे जुलै १९८१ च्या चित्रपट प्रदर्शनानंतर दोघांनी पुन्हा कधी एकत्र काम केले नाही. जुलै १९८२ मध्ये 'कुली' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अमिताभला अपघात झाला. अमिताभ मृत्युच्या दाढेतून बाहेर आला. आणि तेव्हापासून अमिताभ कायमचा जयाचा झाला.
रेखाचा अभिनय खुलला
     अमिताभची लाइफ स्टाइल आपल्या जीवनात उतरवलेल्या रेखाला अमिताभशिवाय सिनेसृष्टीत वावरावे लागले. पण त्याने तिचे काही बिघडले नाही. उलट तिचा  अभिनय अधिक फुलला. 'आप की खातीर', 'घर', 'कर्तव्य' , खूबसुरत', 'बसेरा', 'उमराव जान' आणि 'खून भरी मांग' सारखे चांगले चित्रपट दिले. २००० मध्ये वाटत होते की, आता रेखा आपल्या अभिनयाला रामराम ठोकणार, मात्र रेखाने 'जुबेदा', 'लज्जा', भूत, कोई मिल गया, क्रिश सारखे चित्रपट देऊन आपला हा सिलसिला असाच चालू राहणार असल्याचे दाखवून दिले.  आता तर ५८ वर्षाची रेखा राज्यसभा सदस्याच्यारुपाने दुसरी इनिंग खेळायला निघाली आहे. रेखा दुसर्‍या इनिंगमध्ये फार काही कमाल करून दाखवेल, अशी शक्यताच नाही, मात्र मिडियाने मात्र तिला अभूतपूर्व प्रसिद्धी देऊन एका वेगळ्याच सेलिब्रिटीचा बहुमान बहाल केला, असे म्हणावे लागेल. कॉंग्रेसलासुद्धा हेच हवे होते का, कोण जाणे!    

कुटुंबांवर मालिकांचा प्रभाव

   कुटुंबांवर मालिकांचा प्रभाव  एकत्र कुटुंब पद्धती मध्यमवर्गीयांमध्ये वाढत्या शहरीकरणाबरोबर कालबाह्य होत चालली आहे. जागेची अडचण हे यामागचं वरवरचं कारण असलं तरी मी आणि माझी बायको आणि पोरंकिंवा मी आणि माझा नवराअसा कोष तयार होत चालला आहे. एकत्र कुटुंबात जे संघर्ष होतात, ते प्रामुख्याने नात्यामधल्या भावनिक व आर्थिक संघर्षाशी संबंधित असतात. मात्र या संघर्षातून माणूस आता पळ काढताना दिसत आहे. वेगळे राहिलो की जबाबदा-या कमी होतील. आर्थिक सुबत्ता होईल अशी अनेकांची भावना असते. मात्र प्रत्यक्षात वेगळे राहिल्यावर जबाबदा-या वाढतात. खर्च वाढतो आणि टेन्शन वाढते. एकत्र कुटुंब पद्धतीत जबाबदा-यांची विभागणी होते. सवड मिळते. छंदांना जागा मिळते. म्हणजे कितीतरी त्याचे फायदे आहेत. पण समाजाचे व बाह्य घटकांचे मानवी मनावर इतके घट्ट परिणाम करतात आणि की तो या एकत्र कुटुंबापासून दूर जायला विवश होतो.      समाज मनावर परिणाम करणा-यांमध्ये घरातला इडियट बॉक्सआघाडीवर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. टीव्ही आणि त्यातल्या मालिकांनी समाजस्वास्थ्य बिघडविण्याचे कंत्राट घेतले आहे. टीव्ही मालिकांमध्ये घडणा-या गोष्टी थोड्या फार फरकाने या समाजातही घडत असतात आणि समाजातील घटनांचं प्रतिबिंब या मालिकांमध्ये दिसून येतं. एकीकडे आपल्याकडे आता पूर्वीसारखी कुटुंब व्यवस्था राहिली नाही.      असं म्हणत असताना दुसरीकडे मात्र त्यावर या टीव्ही मालिकांचे आक्रमण होतंय हे मात्र आपण नाकारू शकत नाही. कदाचित कुटुंब व्यवस्था बिघडण्याचं एक कारण या टीव्ही मालिकाही आहेत, असं म्हणायला हरकत नाही. टीव्ही टाईमपास म्हणून बघता बघता आता तो गरजेचा झाला आहे. कुटुंबातलाच एक घटक झाला आहे. त्यामुळे त्यांचे पडसाद घरावर उमटणं साहजिक आहे. पकड घेतील अशाच घटनांचा भरणा यात असतो.      वास्तविक यात वास्तवाची जाण असायला हवी. पण तसं होताना दिसत नाही. या मालिका बघणारा वर्ग सामान्य स्त्री हा आहे. पण त्यांची थोडीफार बदलू पाहणारी मानसिकता हजारो योजनेमागे टाकली जात आहे. या मालिकेत जे काही चालले आहे ते खरेच वाटते. मालिका पाहणारा वर्ग सामान्य असला तरी मालिकांमध्ये असणारे चित्रण श्रीमंती थाटाचे असते. त्याच्याने स्त्रिया भारावून जातात. राहणीमान पाहून आजच्या तरुणावर त्याचे चुकीचे पडसाद उमटतात आणि मग सुरू होतो तो कोणत्याही मार्गाने पैसे मिळविण्याचा, श्रीमंत बनण्याचा ध्यास. आजची तरुण पिढी या मालिकांतून काही चांगलं शिकायच्याऐवजी नको त्या भ्रामक कल्पनाच आपलं मानते. यामुळे ती चुकीच्या वाटेवरून जाणे स्वाभाविक असतं. खरं तर या मालिका समाज जागृतीत महत्त्वाचा हातभार लावत असतात. त्यामुळे मन वेगळ्याच कोंडीत सापडतं. गोंधळलेली मनं कुटुंब उद्ध्वस्त करायला कारणीभूत होतात.      या मालिका पाहून जीवनातील संकटाशी, पेचप्रसंगाशी मुकाबला करताना काय करावं हे कळत नाही.  वास्तविक दूरदर्शन व छोट्या मोठ्या मालिका या लोकशिक्षणाचं साधन आहे. कारण आपल्या समाजात बहुसंख्य लोक निरक्षर आहेत. पण त्याचा योग्य त-हेने उपयोग करून घेतला जात नाही. खरं तर टीव्हीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं व लोक शिक्षणाची कार्ये झाली तर समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने ते चांगलं आहे.
dainik surajya, solapur 14/5/2012