Wednesday, May 23, 2012

रेखाला अवाजवी प्रसिद्धी का?

     सध्या सिनेअभिनेत्री रेखा चांगलीच चर्चेत आहे. २७ एप्रिल रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रेखाचे नाव राज्यसभा सदस्याच्यारुपात नॉमिनेटेड केल्यानंतर ते शपथविधी पार पडेपर्यंतच्या तर काळात मिडिया स्तरावर सर्वत्र रेखा आणि रेखाच चर्चेत होती. राज्यसभेच्या कामकाजाचे प्रक्षेपण करणार्‍या सरकारी वाहिनीनेही रेखाचा शपथविधी असतानासुद्धा जया बच्चनचा त्रासिक चेहरा वारंवार दाखवून त्यात आणखीणच भर टाकली. कालपर्यंत या सिनेस्टारचे नाव सगळ्यांच्या ओठावर होतेच्,पण आता ती राज्यसभा सदस्य झाल्याने आणखी एक वलय तिच्याभोवती आले आहे. असे नव्हे की, पहिल्यांदाच कुणी चित्रपट ऍक्ट्रेस राज्यसभा दालनात पाऊल टाकते आहे. तिच्याअगोदर नर्गीस दत्त, शबाना आझमी, आणि हेमामालिनीसारख्या नायिका राज्यसभेत पोहचल्या आहेत. शिवाय अमिताभ बच्चन, वैजयंतीमाला, जया बच्चन, जयाप्रदा, स्मृति इराणी, राजेश खन्ना, विनोद खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, राज बब्बर, गोविंदा आदी चित्रपट -टीव्ही जगतातले कित्येक सितारे संसद सदस्य बनले. पण राज्यसभा सदस्यत्व  मिळाल्यावर जितका मिडिया कवरेज रेखाला मिळाला, तितका अन्य कुणाला चित्रपट कलाकाराला मिळाला नाही.
इतके कवरेज का?
     रेखा बॉलीवूड जगतातील एक बेहतरीन, एव्हरग्रीन अभिनेत्री आहे, यात वादच नाही.  तिला श्रेष्ठ अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्म फेअरसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पण तरीही तिला इतके कवरेज दिले गेले ते तिच्या नावामुळे किंवा तिच्या अभिनयामुळे नाही, हे सत्य नाकारून चालणार नाही. मिडियाचे रेखाविषयी जे प्रेम उफाळून आले आहे किंवा येत आहे, त्याला एक मोठे  कारण आहे, ते म्हणजे तिचे अमिताभशी असलेले पूर्वीचे प्रेमसंबंध. ती त्याची  भूतपूर्व प्रेमिका आहे. आणि त्याच अमिताभची पत्नी जया बच्चनसुद्धा सध्या राज्यसभेची सदस्या आहे. याचमुळे शपथ समारंभ रेखाचा असला तरी कॅमेराचा फोकस मात्र रेखापेक्षा अधिक जया बच्चनवर होता. 
राज्यसभेसाठी रेखाच का?
     इथे सगळ्यांनाच एक प्रश्न वारंवार सतावत राहतो तो म्हणजे, शेवटी केंद्र सरकारने रेखालाच राज्यसभेसाठी सदस्य म्हणून का निवडलं? आतापर्यंत नर्गिस, शबाना आझमी  आणि  हेमामालिनीसारख्या ज्या ज्या अभिनेत्रींना राज्यसभेसाठी नॉमिनेटेड करण्यात आले होते, त्या त्या यान त्या कारणाने  समाजसेवा किंवा राजकारणाशी संबंधित होत्या. पण रेखाच्याबाबतीत असली कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिची राज्यसभेसाठीची निवड, बुचकाळ्यात टाकणारी आहे. हां,  दोन वर्षापूर्वी  पद्मश्री किताब देऊन तिचा गौरव करण्यात आला होता. वास्तविक, तिला हा पुरस्कार १० वर्षांपूर्वीच मिळायला हवा होता. कारण तिच्यानंतर सिनेसृष्टीत आलेल्या माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या रॉय-बच्चन यांना या पुरस्काराने अगोदरच सन्मानित करण्यात आले होते. खरे तर, सगळ्यांनाच ठाऊक आहे की, बच्चन कुटुंबीय कधी काळी नेहरू-गांधी कुटुंबियांशी अगदी घनिष्ट संबंध साधून होते. आता मात्र परिस्थिती पार उलटी आहे. इंदिरा गांधी यांच्यामुळे डॉ. हरिवंशराय बच्चन यांना राज्यसभेचे दरवाजे खुले झाले होते तर राजीव गांधी यांच्या मैत्रीखातर बालमित्र  अमिताभ  काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबाद येथून खासदार बनले होते. पण आज जया बच्चन काँग्रेस नव्हे तर समाजवादी पक्षाच्यावतीने राज्यसभेच्या खासदार बनल्या आहेत. सध्या गांधी आणि बच्चन कुटुंबियातून साधा विस्तवही जात नाही. रेखाला  राज्यसभा सदस्य बनवून काँग्रेसने बच्चन कुटुंबाचे खच्चिकरण करण्याचा डाव आखला आहे, असे म्हणायला वाव आहे. 
      रेखाला राज्यसभेची ९९ क्रमांकाची सीट मिळाली, ती  जया बच्चनच्या बरोबर मागची सीट  होती.  त्यामुळे काँग्रेसजनांच्या गालांवर असुरी आनंदाच्या खळ्या पडल्या असल्यास नवल नव्हते.  कारण  रेखा, जया पुढे-मागे असल्याने यानिमित्ताने अमिताभ- रेखाच्या प्रेमप्रकरणाला पुन्हा उजाळा मिळेल आणि मिडिया आयते चघळायला खाद्य मिळेल. रेखा मागे असल्याने  जया सतत तणावात राहील, अशीही अटकळ काँग्रेसने बांधली असावी.  पण जया बच्चन हुशार निघाली. तिने आपली सीट बदलून घेऊन सगळ्यांच्याच मनसुब्यावर पाणी फिरवले. अर्थात रेखा आणि जयाचे किस्से इथेच थांबतील, असे म्हणायला थोडी अडचण असली तरी एक मात्र नक्की की, अमिताभ, जया आणि रेखा हा 'सिलसिला' काही थांबणारा  नाही.   
प्रारंभीचा काळ
     रेखाला पहिली प्रसिद्धी मिळाली ती, नवीन निश्चलसोबतच्या 'सावन भादो' ( १९७०) या चित्रपटामुळे! या चित्रपटाला काही प्रमाणात मिळालेल्या  यशामुळे रेखाला अनेक चित्रपट मिळाले. वास्तविक तिला हिंदी बोलता येत नव्हते. दिसायला काळी सावळी होती आणि थोडी जाडही. तरीही तिचे 'रामपूर का लक्ष्मण', ' कहानी किस्मत की', ' प्राण  जाए पर वचन न जाए' सारखे काही चित्रपट चालले. याच दरम्यान विश्वजीतसोबतचा एक किस सीन 'लाइफ' नावाच्या मासिकात छापून आला आणि खळबळ उडाली. तशातच रेखाचे  किरण कुमार आणि विनोद मेहरा यांच्याशी प्रेमप्रकरण असल्याची चर्चा रंगत राहिली. मात्र याचा रेखाला फायदाच झाला.  रेखाभोवती प्रसिद्धीचे वलय वाढत राहिले.
अमिताभचा रेखावर प्रभाव
     १९७६ मध्ये रेखाला अमिताभसोबत 'दो अंजाने' हा चित्रपट मिळाला. तोपर्यंत अमिताभ 'जंजीर', 'दीवार', 'शोले' सारख्या हिट चित्रपटांमुळे स्टार बनला होता. 'दो अंजाने' च्या शुटींग दरम्यान रेखाने अमिताभची कामावरची निष्ठा जवळून अनुभवली होती. दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार काम करणारा अमिताभ त्याची कष्ट करण्याची धडाडी यामुळे रेखा त्याच्या कामावर प्रभावित झाली. आतापर्यंत रेखा सेट म्हणजे खेळाचे मैदान असल्याचे समजत होती. पण अमिताभच्या लाइफ स्टाईलची जादू तिच्यात इतकी भिनली की, अजूनही त्यातून ती बाहेर पडू शकली नाही. रेखा आणि अमिताभ यांचा सहवास केवळ पाच वर्षांचा असला तरी त्यांच्या  सार्‍या आयुष्यावर ही पाच वर्षे भारी पडली आहेत. रेखा तर अमिताभच्या रंगात रंगूनच गेली. अगोदर ती बी- ग्रेड सिनेमाची नायिका होती. पण तिने नंतर आपले वजन कमी केले. आपल्या रंगरुपात आणि अभिनयातही निखार आणला. कष्टाची सवय ठेवली. आणि रेखा स्टार बनली. १९७६ ते १९८१ या पाच वर्षांच्या कालावधीत रेखाचे अमिताभसोबत 'दो अंजाने', 'खून पसीना', 'इमानधर्म', गंगा की सौगंध', 'मुक्कदर का सिकंदर', 'सुहाग', 'मिस्टर नटवरलाल' आणि 'सिलसिला' हे चित्रपट आले. यातले पाच चित्रपट सुपरहिट ठरले. पण 'सिलसिला' नंतर म्हणजे जुलै १९८१ च्या चित्रपट प्रदर्शनानंतर दोघांनी पुन्हा कधी एकत्र काम केले नाही. जुलै १९८२ मध्ये 'कुली' चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अमिताभला अपघात झाला. अमिताभ मृत्युच्या दाढेतून बाहेर आला. आणि तेव्हापासून अमिताभ कायमचा जयाचा झाला.
रेखाचा अभिनय खुलला
     अमिताभची लाइफ स्टाइल आपल्या जीवनात उतरवलेल्या रेखाला अमिताभशिवाय सिनेसृष्टीत वावरावे लागले. पण त्याने तिचे काही बिघडले नाही. उलट तिचा  अभिनय अधिक फुलला. 'आप की खातीर', 'घर', 'कर्तव्य' , खूबसुरत', 'बसेरा', 'उमराव जान' आणि 'खून भरी मांग' सारखे चांगले चित्रपट दिले. २००० मध्ये वाटत होते की, आता रेखा आपल्या अभिनयाला रामराम ठोकणार, मात्र रेखाने 'जुबेदा', 'लज्जा', भूत, कोई मिल गया, क्रिश सारखे चित्रपट देऊन आपला हा सिलसिला असाच चालू राहणार असल्याचे दाखवून दिले.  आता तर ५८ वर्षाची रेखा राज्यसभा सदस्याच्यारुपाने दुसरी इनिंग खेळायला निघाली आहे. रेखा दुसर्‍या इनिंगमध्ये फार काही कमाल करून दाखवेल, अशी शक्यताच नाही, मात्र मिडियाने मात्र तिला अभूतपूर्व प्रसिद्धी देऊन एका वेगळ्याच सेलिब्रिटीचा बहुमान बहाल केला, असे म्हणावे लागेल. कॉंग्रेसलासुद्धा हेच हवे होते का, कोण जाणे!    

No comments:

Post a Comment