Thursday, May 10, 2012

बॉलीवूडचा अनमोल खजाना धोक्यात!

     भारतीय सिनेमाने आपली शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. देशभरात त्याचा उत्सव साजरा केला जात आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या बाता केल्या जात आहेत. चित्रपटांमध्ये कशाप्रकारचे इफेक्टस द्यावेत, जेणेकरून चित्रपट अधिक इफेक्टीव होईल, याची चर्चा केली जात आहे. चित्रपटात खूप पैसा आहे, याची सार्‍यांनाच कल्पना आहे. इतकेच नव्हे तर आता भारतीय चित्रपटांची चर्चा सातासमुद्रापार केली जात आहे. मायानगरीतही विविध प्रकारचे समारंभ होत आहेत. चित्रपट बनविण्याची समिकरणेही बदलली आहेत. पैसा उभारण्यासाठी चित्रपट बनवले जात आहेत, आणि बनविल्यानंतरही पैशाचाच विचार केला जात आहे.
     पण काही माणसे असेही आहेत की, त्यांना केवळ चित्रपट बनविणं, इतकंच ठाऊक आहे. त्यांना पैसा महत्त्वाचा वाटला नाही. गुरुदत्त अशाच फिल्मकारांपैकी एक! पण आता संदर्भ बदलले, समिकरणे बदलली तसे चित्रपटही बदलले. एवढे खरे असले तरी आपला हा अनमोल ठेवाच आता धोक्यात आला आहे. त्यातलीच एक दु:खद बातमी वाचायला मिळाली, ती म्हणजे भारतातला पहिला बोलपट 'आलमाअरा' ची सगळी प्रिंट खराब झाली आहे. देशातला पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' याची तर आपण केवळ १९ मिनिटांची प्रिंट्च साम्भाळू शकलो आहोत. बाकीचे सर्व 'आलमाआरा' सारखे नष्ट झाले आहे.
     आज नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नॅशनल फिल्म आर्चीव ऑफ इंडियासारख्या संस्थांच्या संचालकांना एक चिंता आता सतावते आहे, ती म्हणजे चित्रपटाच्या प्रिंटा कशाप्रकारे सुरक्षित ठेवायच्या.१९२०-३० च्या दशकातल्या चित्रपटांची तर गोष्टच निराळी पण, सध्या ७० ते ९० च्या दशकातले चित्रपट सुरक्षित नाहीत. त्यांच्या सुरक्षतेबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. १९३१ मध्ये बनविण्यात आलेला पहिला बोलपट ' आलमाआरा' याची प्रिंत पूर्णता खराब झाली आहे. बॉलिवूडच्या इतिहासात ज्या चित्रपटांची दखल घ्यावी लागेल, अशा चित्रपटांची वाताहत झाली असल्याचे दिसते आहे. अशा चित्रपटांची संख्याही मोठी आहे. उदाहरणार्थ, पहिला डबल रोलचा चित्रपट, पहिला नायिकेचा बाथ सीन असलेला चित्रपट वैगेरे..! १९२३ मध्ये बनलेला 'पत्नी प्रताप' मध्ये पहिल्यांदाने एका नायकाने दुहेरी भूमिका केल्या होत्या. १९४१ मधला 'चित्रलेखा' या चित्रपटात पहिल्यांदा नायिकेला अंघोळ करतानाचे दृश्य  दाखवले गेले होते. अशा प्रकारच्या अनेक महत्त्वाच्या चित्रपटांच्या प्रिंटा नष्ट झाल्या आहेत. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात बनलेल्या जवळपास १३०० मूकपटांपैकी केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत चित्रपट उरले आहेत. बॉलिवूडला ज्या चित्रपटांचा अभिमान आहे, अशा अनेक चित्रपटांच्या प्रिंटा त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. सूचना व प्रसारण मंत्रालयाने चित्रपटांच्या प्रिंटांच्या संवर्धनासाठी दहा कोटी रुपयांचा निधी दिला आहे. वास्तविक, जिथे ज्या चित्रपटांच्या नावावर अब्जावधीचा जुगार खेळला जातो, तिथे दहा कोटी म्हणजे दया में खसखसच! जुन्या चित्रपटांपैकी केवळ ८९ चित्रपटांना सांभाळता आले आहे. यात 'काबुलीवाला'चा समावेश आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारलेला व बलराज साहनी यांची भूमिका असलेला हा चित्रपट महत्त्वाचा ठेवा आहे. १९९३ मध्ये बनलेला कल्पना लाझमी यांच्या 'रुदाली' चित्रपटाचा बहुतांश भाग नष्ट झाला आहे.  सत्यजित राय यांचा जलसागर' सुद्धा नष्ट झाला होता, परंतु त्याच्या पॉझिटिवचा उपयोग करून त्याला पुनर्जन्म देण्यात यश आले आहे. १९८०-९० मध्ये बनलेल्या चित्रपटांचे नुकसानही अधिक झाले आहे. आपल्या देशात मास्टर निगेटीवने चित्रपट बनतात. तर जगातल्या अन्य देशांमध्ये पहिल्यांदा इंटर निगेटीवने चित्रपट बनवतात.
     चित्रपट निर्मात्यांनी आणि अन्य चित्रपटाशी निगडीत लोकांनी आपल्या चित्रपटांच्या प्रिंटांची वेळोवेळी पाहणी करून त्याला पाहण्यालायक ठेवण्याकडे लक्ष पुरवायला हवे. त्यामुळे बर्‍याच प्रमाणात समस्या सुटण्यास मदत होईल. नॅशनल फिल्म आर्चीव ऑफ इंडियामध्ये स्टोर करण्यात आलेल्या जवळपास १३ हजार चित्रपटांपैकी ९०० चित्रपट पाहण्यालायक करण्यात आले आहेत. भारतात दरवर्षी ४ हजाराच्या आसपास चित्रपट बनतात. हे सगळे चित्रपट सुरक्षित राहतील का, असा प्रश्न सतावत आहे. विधु विनोद चोप्रा यांनी काही चित्रपटांना नवसंजिवनी दिली आहे. 'सजा-ए-मौत', खामोश, परिंदा, लवस्टोरी १९४२ आदी चित्रपटांच्या प्रिंटा स्वच्छ करून त्यांची ओरिजनल क्वालिटी, त्याचा साऊंड व्यवस्थित करण्यात आला आहे. एनएफएआयच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या रिलायन्स मिडिया वर्कच्या माध्यमातून १००- चित्रपटांना जीवदान देण्याचा खटाटोप सुरू आहे. दादासाहेब फाळके यांनी ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली, त्या 'राजा हरिश्चंद्र'च्या चित्रपटाची केवळ १९ मिनिटांची प्रिंट वाचवण्यात आपल्याला यश आले आहे.
      साधारपणे एका चित्रपटाला जीवदान देण्यासाठी २ वर्षे लागतात. यासाठी लाखो रुपये खर्च होतात. नॅशनल फिल्म आर्चीव ऑफ इंडियाच्या स्टोरमध्ये ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांच्या प्रिंटा १२ ते १४ अंश सेल्सियस तापमानावर ठेवले जातात. रंगीत चित्रपटांना २ ते ४ अंश सेल्सियस तापमानावर ठेवण्यात येते.
     आपल्या देशात बनलेला 'लगान' मात्र सगळ्यात सुरक्षित आहे, असे म्हटले पाहिजे. कारण त्याची प्रिंट आपल्या देशातच नाही. ऑस्करच्या नॉमिनेशनसाठी अमिरखानने ती प्रिंट तिकडे नेली होती. आजही ती लास एंजिल्सच्या सेफ डिपाझिट वोल्टमध्ये सुरक्षित आहेत. आपल्या बॉलिवूडकडे अब्जावधी रुपयांचा पैशा आहे. पण चित्रपटांच्या प्रिंटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा सरकारकडे बोट दाखवले जाते. ही मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हटली पाहिजे. आपला अनमोल ठेवा जपून ठेवायचा असेल तर बॉलिवूडनेसुद्धा अर्थसहाय्य करायला हवे आहे. तरच अनमोल खजिना आबाधित राहील. 

dainik surajya, solapur 15/5/2012                                                                                                                     

No comments:

Post a Comment