Tuesday, May 28, 2019

आता नजरा टीम इंडियावर


पाच वर्षांतून एकदा होणारा राजकीय महाकुंभ मेळा आता समाप्तीच्या वाटेवर आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर देश भरातल्या लोकांमधला राजकीय ज्वर उतरेल,पण लगेचच देशभरात क्रिकेटचा ज्वर चढायला सुरुवात होईल.आपल्या देशात इतर खेळापेक्षा क्रिकेटला अधिक महत्त्व दिलं जातं, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. या काळात युवावर्ग तर टीव्हीला चिकटून असतोच,पण क्रिकेटवेडे सरकारी बाबूसुद्धा कामाला सुट्टी देऊन क्रिकेटचा आनंद लुटत असतात आणि हे फक्त आपल्याच देशात घडू शकतं.

इंग्लंड आणि वेल्स येथे होत असलेली एक दिवशीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. एक दिवशीय क्रिकेटचा आगामी चार वर्षे बादशाहा म्हणून मिरवण्यासाठी जगभरातले दहा क्रिकेट संघ 46 दिवस एक दुसऱ्यां शी लढणार आहेत. पाच वेळा विश्वचषक जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्यांदा चषक जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर वेस्ट इंडिज आणि भारत तिसऱ्यांदा चषक जिंकण्याच्या इराद्याने तिथे पोहचला आहे.पाकिस्तान आणि श्रीलंका दुसऱयांदा ही चकाकणारी ट्रॉफी जिंकायला आसुसलेले आहेत. आणि अद्याप एकदाही ही सन्मानाची ट्रॉफी न जिंकलेला इंग्लंड संघ घरच्या मैदानात ती मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार,यात वाद नाही.
एक दिवशीय सामन्यांमध्ये बाजी पलटवणाऱ्या अशी ओळख असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांचासुद्धा ट्रॉफी जिंकण्यासाठी आटापिटा असणार आहे. एकूण काय तर क्रिकेटचा महाकुंभ मेळा अत्यंत चुरशीचा होणार हे तर उघड आहे. सर्व तयारीनिशी सगळे संघ मैदानात उतरतील.त्यामुळे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांचे मनोरंजन तर होईलच,पण आपापल्या देशाच्या संघाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्नही होईल.दोन वेळा विश्वचषक जिंकलेला भारतीय संघ सध्या फार्मात आहे. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा,शिखर धवन,हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव अशा दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाकडून चषकाची अपेक्षा केली जात आहे.
तीन वेळा अंतिम सामन्यात पोहचलेला भारतीय संघ दोन वेळा चषक जिंकण्यात यशस्वी झाला आहे. 2003 मध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात मात खावी लागली होती. आपल्याकडे क्रिकेट शिवाय अन्य कोणत्याच खेळला फार महत्व दिले जात नाही. एक काळ हॉकीचा होता,पण नंतर त्याचीही लोकप्रियता कमी झाली. सध्याच्या घडीला भारतीय संघ कुठेच आपला प्रभाव टाकू शकला नाही. जागतिक स्तरावर हा संघ चमत्कार  दाखवू शकला नाही.
जागतिक स्तराच्या तुलनेत विचार केला तर फुटबॉल असो किंवा बास्केटबॉल, जलतरण असो किंवा जिम्नॅस्टिक अथवा एथलेटिक्ससारख्या स्पर्धांमध्ये आपण क्वालिफाय करण्यापर्यंतसुद्धा पोहचत नाही. अशा परिस्थितीत एक क्रिकेटच असा खेळ आहे,ज्याकडून अपेक्षा केली जाऊ शकते.
क्रिकेट विश्वचषक आपण 11 पैकी जरी दोनवेळाच जिंकला असला तरी आजदेखील सर्वाधिक धावा,शतक,सर्वाधिक अर्धशतक आदींचा विक्रम सचिन तेंडुलकारच्याच नावावर अबाधित आहे.सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत सचिन रिकी पोंटिंगच्या जवळपासच आहे.
क्रिकेटचा जनक असलेल्या इंग्लंडमध्ये होत असलेली प्रत्येक विश्वचषक स्पर्धा प्रत्येकवेळी खास अशीच असते. 1975 मध्ये खेळलेला विश्वचषक वेस्ट इंडिजच्या क्लाइव्ह लायड यांच्या नावावर राहिला. 1979 मध्ये झालेल्या दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजच्याच वि. वि. रिचर्डस यांनी आपल्या बॅटची कमाल दाखवली होती.1983 मध्ये विश्वचषक भारताचे कर्णधार कपिल देव यांच्या नावावर राहिला. त्यांनी झीम्बॅवे विरुद्ध 175 धावांची अप्रतिम खेळी केली होती. कपिल देव यांनी एक नवा अध्याय लिहिला होता. 20 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह वा यांनीही आपल्या खेळाचा चमत्कार दाखवला होता.
आता आपल्याला हा विश्वचषक कोणाच्या नावावर होणार,याची उत्सुकता आहे.  सगळ्यांच्या नजरा 14 जुलै रोजी लॉडर्स च्या ऐतिहासिक मैदानावर विश्वचषक कोण उचलणार याकडे लागल्या आहेत.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012

No comments:

Post a Comment