Wednesday, April 22, 2020

पृथ्वी वाचली तर माणूस वाचेल

आज जगात स्थलप्रदूषण, वायुप्रदूषण व जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणात होतांना दिसते. कारखान्याचा विस्तार जगातील सर्वच देशांनी वाढविला आहे. यामुळे पहिला प्रहार जंगलसंपत्तीवर झाला आहे. यामुळे आज पृथ्वी डगमगतांना दिसून येते. मानवाच्या अतिरेकामुळे पृथ्वीतलावरील भूकंप, अतिपाऊस, अतिउष्णता, अतिथंडी अशाप्रकारचे विनाशाकडे नेणार्‍या घटना दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे.  २१ व्या शतकात मानव इतका पुढे गेला आहे की अनेक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अत्याधुनिक शस्त्र बनविण्याच्या शर्यती लागलेल्या आहेत.
आतातर 'बायोवेपन्स' म्हणजे जैविक शस्त्र बनविण्याची शर्यत लागली आहे. यामुळे पृथ्वी नष्ट होऊ शकते.  उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खतांचा वापर करीत आहे यामुळे पृथ्वीतील शक्ती कमी होतांना दिसते.  मानवाने जंगल संपत्तीची हत्या केल्यामुळे नदी, तलाव मोठय़ा प्रमाणात आटलेले दिसतात. यामुळे दिवसेंदिवस पृथ्वीच्या तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसते. त्याचप्रमाणे ग्लोबल वॉर्मिंगमुळे सुध्दा पृथ्वीचे संतुलन डगमगायला लागले आहे. पृथ्वीवरील जंगलसंपदा कमी झाल्यामुळे व छोटे-मोठे तलाव आटल्यामुळे हिंसक पशू व जंगलातील इतर पशू (वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, माकडे) यांना जंगलात योग्य आहार व पाणी मिळत नसल्यामुळे शहराकडे धाव घेताना दिसतात, हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे. अशा अनेक कारणांमुळे पृथ्वीचा र्‍हास होत आहे व जंगली प्राण्यांचे जीवन धोक्यात आलेले आहे. यावर उपाय शोधण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. त्यातूनच १९७0 मध्ये विंसकॉन्सिन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन यांनी २२ एप्रिल हा जागतिक पृथ्वी दिवस साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. आज जगात २00 हून अधिक देश आहेत या देशांच्या तुलनेत लोकसंख्येचा विचार केला तर ६ अब्जा वर लोकसंख्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशांनी पृथ्वीला वाचविण्याच्या उद्देशाने २२ एप्रिलला प्रत्येक व्यक्तीने एकतरी झाड लावायला पाहिजे. ज्यांच्या परिसरात जागा नसेल अशांनी एखाद्या कुंडीमध्ये  तरी झाड लावले  पाहिजे. त्याचप्रमाणे जंगलतोडीमुळे जंगलातील प्राणी शहराकडे भटकतात त्यांच्यासाठी जगातील संपूर्ण देशांनी जंगलामध्ये छोटे-छोटे तलाव बांधून जंगली प्राण्यांचे प्राण वाचवून संगोपन करायला पाहिजे.  मानवाच्या अनेक चुकांमुळे अनेक जंगली पशु-पक्षी व महत्त्वपूर्ण वृक्ष लुप्त होत आहे. या पृथ्वीतलावर प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याचा हक्क  आहे.  प्रत्येक पशु-पक्षी एकमेकांवर अवलंबून असतो. जगातील गिधाड हा पक्षी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावीत असतो. मेलेल्या प्राण्यांचे मांस खाणे गिधाडाचे काम असते. त्यामुळे तेथील परिसर शुद्ध होतो. परंतु दु:खाची बाब ही की वायुप्रदूषण व जलप्रदूषण यामुळे गिधाडांची संख्या जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे पृथ्वीवर मानवजातीचे असणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच जंगलातील पशु-पक्षी यांचे सुध्दा जीवन तेवढेच महत्त्वाचे आहे. तेव्हाच पृथ्वी सुरक्षित राहील.  आज वृक्षलागवडच पृथ्वीला वाचवू शकते. वृक्ष लागवडीमुळे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरेल व पावसाचे पाणी सरळ समुद्र किंवा नद्यामध्ये न जाता पृथ्वीच्या पोटात जाईल. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत मिळेल. यामुळे विहिरी, तलाव व नदी नेहमी जलमग्न राहील. मानवाने पाण्यासाठी सरळ पाताळात प्रवेश केला आहे. म्हणजेच आज मानवाने पाण्यासाठी जमिनीच्या आत ७00 फूट खोलवर जाऊन बोरवेलच्या सहाय्याने आपण पाताळातील पाणी शोषत आहोत. मानवाची जमिनीतील पाण्याची क्षमता फक्त ५0 फुटांपर्यंत आहे. परंतु मानवाचा अतिरेक हा विध्वंसाकडे किंवा विनाशाकडे न्यायला काहीच वेळ लागणार नाही. कारण मानवाच्या हातात सर्वच काही आहे, परंतु मानवाला अद्याप निसर्गावर नियंत्रण ठेवता आले नाही.

No comments:

Post a Comment