पिपलांत्री ही राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील एक ग्रामपंचायत आहे. सुमारे 6000 लोकसंख्या असलेल्या या गावाची यशोगाथा आंतरराष्ट्रीय मंचांवर अभिमानाने सांगितली जाते. गावातील एकात्मतेचे उदाहरण असे आहे की आज या गावात प्रत्येक हाताला काम आहे आणि प्रत्येक मुलीसाठी एक एफडी म्हणजेच मुदत ठेव आहे. हे गाव आदर्श गाव तर आहेच पण आता ते पर्यटन गावही बनले आहे.
या गावाची यशोगाथा सन 2005 पासून सुरू होते. यावर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील श्याम सुंदर पालीवाल हा तरुण सरपंचपदी निवडून आला. पाण्याची समस्या भेडसावणाऱ्या या गावात पावलापावलावर समस्या होत्या. बेरोजगार तरुणांची फौज ड्रग्जकडे वळली होती. उंच-सखल टेकडीवर वसलेल्या या गावात सिंचनाची सोय नसल्याने शेते नापीक बनली होती. मुलांच्या शिक्षणाचे आबाळ चालले होते.
श्यामसुंदर पालीवाल यांनी सर्वप्रथम गावातील पाण्याची समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे डझनभर ठिकाणी गावातील बेरोजगार तरुणांना पावसाचे पाणी गोळा करण्यासाठी तयार केले. गावातील उजाड भागात वृक्षारोपणाचे काम सुरू केले. शिक्षण सुधारण्यासाठी शाळेच्या इमारतींची डागडुजी करून घेतली. पाहता पाहता गावाचे चित्र बदलू लागले. पावसाचे पाणी साठू लागले आणि काही वर्षांत जमिनीतील पाण्याची पातळी वाढू लागली.
आज परिस्थिती अशी आहे की जिथे एकेकाळी पाण्याची पातळी 500 फूट खोल होती, तिथे आज शेकडो पाण्याचे झरे फुटत आहेत. श्याम सुंदर गावातल्या स्वच्छतेबद्दल सांगतात की त्यांनी स्वच्छतेचे काम सुरू केले आणि स्वतः झाडू घेऊन साफसफाई करायला सुरुवात केली. ते पाहून गावातील इतर लोकही स्वच्छतेसाठी पुढे येऊ लागले. 2007 मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींनी पिपलांत्री गावाला स्वच्छ ग्रामपंचायतीचा पुरस्कार देऊन गौरविले.
पाच वर्षांनंतर श्यामसुंदर सरपंच पदावरून पायउतार झाले,पण त्यांनी घालून दिलेला आदर्श तसाच पुढे चालू राहिला. नंतर झालेले सरपंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू लागले. श्याम सुंदर सांगतात की त्यांनी गावातील मोकळ्या जागेवर आवळा आणि कोरफडीची लागवड करण्याचे काम केले. सद्यस्थितीत गावात 25,000 गुजबेरीची झाडे आहेत. ग्रामपंचायतीच्या जमिनीवर कोरफडीची लागवड केली. या कामासाठी महिलांचे बचत गट तयार करण्यात आले. कोरफडीचे पीक तयार झाल्यावर गावातच कोरफडीवर प्रक्रिया करणारा कारखाना उभारण्यात आला. गावातील महिला कोरफडीपासून ज्यूस, क्रीम इत्यादी तयार करून बाजारात विकू लागल्या. याशिवाय गावात आवळा प्रक्रिया प्रकल्प आणि बांबू उद्योग उभारण्यात आला आहे.त्यामुळे गावातच महिलांना रोजगार मिळाला.
श्याम सुंदर पालीवाल यांनी गावात आणखी एक योजना सुरू केली आहे. येथे मुलीच्या जन्मानंतर तिच्या कुटुंबाकडून ठराविक रक्कम घेतली जाते तसेच गावही रक्कम गोळा करते आणि लग्नाच्या वयापर्यंत बँकेत फिक्ससाठी टाकले जातात.त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबीयांकडून 51 रोपे लावली जातात आणि तेच त्यांची काळजी घेतात. मुलगी लग्नाच्या वयात येईपर्यंत रोपांचे रूपांतर वृक्षात होईल. या झाडांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून मुलीचे लग्न करण्याचे ठरवण्यात आले आहे. शिवाय घरात कोणाचा मृत्यू झाला की त्याच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याचीही परंपरा आहे. झाडे वाचवण्यासाठी महिला दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी झाडांना राखी बांधतात. आणि यासाठी एक मोठा कार्यक्रम घेतला जातो.
आता पिपलांत्रीचे यश पाहून राजस्थान सरकारने राज्यातील 200 हून अधिक ग्रामपंचायतींचा पिपलांत्रीच्या धर्तीवर विकास योजना सुरू केली आहे. श्याम सुंदर पालीवाल यांना ग्रामस्वच्छता, जलसंधारण आणि वृक्षारोपण प्रकल्प याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी देशभरातून आमंत्रित केले जाते. श्याम सुंदर यांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण समितीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
पिपलांत्री आणि श्यामसुंदर पालीवाल यांच्या यशाकडे पाहिल्यावर असे म्हणता येईल की, यशस्वी होण्यासाठी शहरी साधनसामग्रीची नव्हे, तर प्रामाणिकपणाने भक्कम इरादे आवश्यक आहेत. आजही हे गाव पाहण्यासाठी देशातील,परदेशी पर्यटक येत असतात.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment