Wednesday, June 7, 2023

(लघुकथा) 28 दिवसांचा पीजी

एक महिला आहे, ती जयपूरमध्ये पीजी (पेइंग गेस्ट) ठेवते. तिचे स्वतःचे वडिलोपार्जित घर आहे, त्यात मोठ्या 10-12 खोल्या आहेत.  त्या खोल्यांमध्ये प्रत्येकी ३ बेड ठेवण्यात आले आहेत. तिच्या पीजीमध्ये जेवणही उपलब्ध आहे. तिला दुसऱ्यांना करून खायला घालायला आवडते. ती अगदी मन लावून स्वयंपाक करते आणि खायला घालते. इतकं अप्रतिम खाद्यपदार्थ तिच्या  ठिकाणी उपलब्ध आहेत की त्याहून चांगला स्वयंपाक शेफदेखील बनवू शकत नाही. तुमची आई सुद्धा तुम्हाला तितक्या प्रेमाने खाऊ घालणार नाही. बहुतेक नोकरदार लोक आणि विद्यार्थी तिच्या पीजीमध्ये राहतात.सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळेच खातात. ज्यांना गरज आहे त्यांना पॅक लंच देखील दिलं जातं.परंतु तिच्या येथे एक विचित्र नियम आहे, प्रत्येक महिन्यात फक्त 28 दिवस अन्न शिजवले जाते. म्हणजे फक्त 28 दिवस मेस चालू असते. 

उरलेले २-३ दिवस हॉटेलात खा, पीजीच्या किचनमध्येदेखील स्वयंपाक बनवायला मनाई आहे. उर्वरित 2 किंवा 3 दिवस स्वयंपाकघर कुलूपबंद असते. दर महिन्याच्या शेवटच्या तीन दिवशी मेस बंद. हॉटेलात जाऊन जेवायचं, बाहेर जाऊन चहाही प्यायचा. मी तिला विचारले,' असं का? किती विचित्र नियम आहे हा? तुमचे स्वयंपाकघर २८ दिवसच का चालते?

ती म्हणाली, 'हा आमचा नियम आहे. आम्ही फक्त 28 दिवसांच्या जेवणाचेच पैसे घेतो.  त्यामुळे किचन फक्त 28 दिवस चालते.'

मी म्हणालो, 'काय विचित्र नियम आहे हा?  आणि हा नियम काही देवाने बनवला नाही, माणसानेच बनवलेला आहे,  मग हा नियम बदला ना.'

ती म्हणाली, 'नाही, रुल इज रुल.'

'जाऊ दे ना सर, आता नियम आहे म्हणजे आहे.'

त्यांची अनेकदा भेट होत असे.

एके दिवशी मी त्यांना पुन्हा एकदा छेडले, 28 दिवसांच्या त्या विचित्र नियमाबद्दल...

त्या दिवशी ती मोकळ्या मनाने बोलली आणि म्हणाली, 'तुम्हाला समजणार नाही डॉक्टर, हा नियम सुरुवातीला नव्हता. मी खूप प्रेमाने असा स्वयंपाक करून खायला घालत असे. पण त्यांच्या तक्रारी संपतच नव्हत्या.

 कधी हे कमी, कधी ते कमी, नेहमी असमाधानी, नेहमी तक्रारी...

त्यामुळे वैतागून 28 दिवसांचा हा नियम केला.  28 दिवस प्रेमाने खाऊ-पिऊ घालायचं आणि उरलेले 2-3 बाहेर जाऊ खाऊन या म्हणायचं.

त्या तीन दिवसात त्यांना त्यांची नानी याद येते.  मैदा आणि डाळीचे भाव कळतात.बाहेर किती महागाई आहे आणि किती वाईट प्रकारचं अन्न मिळतं हेही कळतं. दोन घोट चहादेखील १५-२० रुपयांना मिळतो.  या 3 दिवसातच त्यांना माझी किंमत कळते, त्यामुळे उरलेले 28 दिवस अतिशय शिस्तबद्ध राहतात. नियमांचं पालन करतात. 

जास्त सुखाची सवय माणसाला असमाधानी आणि आळशी बनवते.- रचना पाठक 

अनुवाद- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment