Thursday, May 25, 2017

संघर्षयात्रेचं फलित काय?

     भाजप विरोधक पक्षांनी संघर्षयात्रा काढली. त्यांनी शेतकर्यांचा विषय घेतला. त्यांना गर्दी जमवता आली नसली तरी त्यांनी सरकार विरोधात बर्यापैकी रान उठवलं आहे. त्यांच्या आणि अन्य पक्ष,संघटनांच्या विविध यात्रांमुळे सरकारविरोधी मतं तयार होऊ लागली आहेत. सरकारला शेतकर्यांना खूश करायचं आहे, मात्र त्यासाठी त्यांना गणित मांडता येईना. परंतु, फडणवीस सरकारला आता फार दिवस शेतकर्यांना टोलवून टाळता येणार नाही. त्यांना काही तरी भूमिका घ्याची लागणार आहे. केंद्राच्या पंचवार्षिक निवडणुका दोन वर्षावर आल्या आहेत. राज्य सरकारचीदेखील अडीच वर्षे सरली आहेत.
     संघर्षयात्रेला सुरुवात झाल्यानंतर लगेचच संघर्षयात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांची व्हीआयपी व्यवस्था, शाही भोजन यामुळे ही यात्रा चांगलीच चर्चेत आली. वास्तविक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेची सवय इतकी सवय झाली आहे की, ते अजूनही त्यातून बाहेर पडलेले नाहीत. फडणवीस सरकार असूनही त्यांची कामे होत असल्याने त्यांना अशा संघर्ष यात्रेची पहिली अडीच वर्षे गरजच भासली नाही. पण त्यांना उशिराने का होईना जाग आली. आपण विरोधी बाकावर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विरोधक म्हणून आपली वळवळ दिसायला हवी, याची जाणीव झाल्याने त्यांना संघर्षयात्रा काढावी लागली. मात्र प्रारंभी त्यांच्या शाही,व्हीआयपी व्यवस्थापनाच्या बातम्या व्हायरल झाल्याने संघर्षयात्रेची हवाच जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवर नाश्त्याला भेटून विरोधी पक्षांच्या बदनामीला खतपाणीच मिळाले. सर्वच पक्षांचे नेते या यात्रेत होते. प्रत्येकाचं प्रभावक्षेत्र पाहिलं तरी या यात्रांना राज्यभर मोठी गर्दी होणं अपेक्षित होतं, पण अनेक ठिकाणी संघर्षयात्रेला गर्दीचं गणितही जमवता आलं नाही.
     काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या विरोधक म्हणून भाषण करता येत नाही, असाच अनुभव लोकांना आला. ही मंडळी अजूनही पारंपारिकतेतच आढळल्याचे दिसले. त्यांच्या भाषणात काही विशेष नावीन्य नव्हतं. त्यापेक्षा त्यांनी भाषणं केली नसतीत तर चालण्यासारखं होतं. त्यापेक्षा त्यांनी मूकयात्रा काढायला हवी होती.संघर्ष यात्रा ही तशीच वातानुकुलीतच झाली. ज्या तालुक्यात दुष्काळ आहे,ज्या भागात शेतकरी आत्महत्या करत आहेत,त्या परिसरात ही यात्रा पोहचलीच नाही. त्यामुळेही त्यांच्यावर मोठी टीका झाली. सांगलीत आलेली संघर्षयात्रा जत,आटपाडी,खानापूर या दुष्काळी तालुक्यांकडे पाठ करत निघून गेली.सरकार विरोधात आणखीही काही यात्रा निघाल्या आहेत. यात शेतकर्यांचं प्रतिनिधित्व करणार्या ज्या शेतकरी संघटना किंवा नेते आहेत त्यापैकी राजू शेट्टी यांचीस्वाभिमानी शेतकरी संघटना’, बच्चू कडूंचीप्रहार संघटना’, पत्रकार, साहित्यिक यांनी चालवलेलंकिसानपुत्रआंदोलन अशा संघटनांनीही आपापल्या शक्तीप्रमाणे आंदोलन सुरू ठेवलंय. शिवसेनाही सत्तेत असतानाही शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी आक्रमक बनली आहे. त्यामुळे राज्यात ज्या यात्रा सुरू आहेत, त्यांना यश येणार का? असा प्रश्न आहे.
     राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणण्यासाठी शेतकर्यांच्या मुद्द्याचा वापर तर केला जात नाही ना? भाजप विरुद्ध सर्व असं एकवटूनसुद्धा विरोधकांना शेतकर्यांच्या प्रश्नांवर व्यापक आंदोलन उभं करता आलं नाही, ही वस्तुस्थिती असली तरी त्यांना सरकार विरोधात बर्यापैकी रान उठवता आलं आहे. फडणवीस सरकारचं गेल्या अडीच वर्षात भरीव असं काम निदर्शनास आलं नाही. बर्याच आघाडीवर त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होताना दिसत नाही. संघर्षयात्रेबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या काही का असेनात, मात्र संघर्ष यात्रेची नितांत आवश्यकता विरोधी पक्षांना होती. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक व्यतिरिक्तच्या काळात अशी यात्रा काढणं हे खरोखरच वाखाणण्यारखं होतं. निवडणुकांमध्ये वातावरण चार्ज असतं. यंत्रणा कामाला लागलेल्या असतात. पण निवडणूका नसताना अशा यात्रा काढणं, ते ही तळपत्या उन्हात. खरंच जिकिरीचं काम आहे. त्यांनी ही संघर्षयात्रा नेटाने चालवली आहे.
     नरेंद्र मोदी पुढची आणखी एक टर्म पूर्ण करतील, असा एक सर्व्हे सांगतो आहे. मोदी सरकारचे फारशी उठावदार कामगिरी दिसत नसली तरी अगदीच निराशजनक कामगिरीदेखील नाही. त्यात काँग्रेस विरोधक यांची हालचालच बंद झाली आहे. भाजप सत्तेवर असलेल्या राज्यांची संख्या वाढली आहे.भाजपला छोट्या-मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकारलं जात आहे. याला विरोधकांची कमजोरी कारणीभूत आहे. काँग्रेस आणि त्यांचे कार्यकर्ते अजूनही जुन्या मानसिकतेतच वावरत आहेत. काँग्रेस आतापर्यंत हायकमांडवरच अवलंबून राहिली आहे. नेता,मुख्यमंत्री,पदे ही वरून लादली जात असतात. आता ही परिस्थिती बदलण्याची आवश्यकता आहे. तळागाळातला कार्यकर्ता आता रिचार्ज झाला पाहिजे. नेत्यांनी आता वरती बघण्याचे थांबवून आपल्यापासून काँग्रेस बळकट करण्यासाठी कामाला लागण्याची आवश्यकता आहे. एकमेकांचे पाय ओढण्याचे खेकड्याची प्रवृत्ती सोडायला हवी आहे.काँग्रेसमधील काही कुळं पैशांवर आरामात राहताना दिसत आहेत. आगामी काळ त्यांना कठीण आहे,याची जाणीव त्यांना यायला हवी आहे. अजूनही भाजप भ्रष्ट असो वा नसो काँग्रेसच्या मंडळींना आपल्या कळपात सामिल करण्यास उत्सुक आहे. त्यांच्यासाठी भाजपत पायघड्या घातल्या जात आहेत. पुढच्या एक-दीड वर्षात काही पालिकांच्या निवडणुका आहेत. त्या आणि पुढची पंचवार्षिक विधानसभा भाजपच्या डोळ्यांसमोर आहे.त्यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे आता विरोधकांची भूमिका बजावणार्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गप बसून चालणार नाही. त्यांची हालचाल त्यांना तारणार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.लोकशाहीत विरोधी पक्ष बळकट असायला हवा आहे, हे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही.

No comments:

Post a Comment