Monday, May 29, 2017

आजाराला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची वाढतेय

     देशात विविध आजारांना बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आणि अशा जर्जर आणि त्रासदायक आजारांना कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.म्हणजे आता आजार माणसांना आत्महत्याद्वारा गिळंकृत करत आहे, आणि ही मोठी चिंताजनक गोष्ट म्हटली पाहिजे. यासाठी शासनाकडून काही तरी उपाययोजना होण्याची आवश्यकता आहे.  आपल्या आसपासची, ओळखीची, जिवाभावाची किंवा अगदी अनोळखी अथवा कधीही न पाहिलेली आठ लाख माणसं दर वर्षी या जगाचा निरोप घेत आहेत. आपल्या भारतात गेल्या वर्षी 1लाख 33हजार 623 लोकांनी आजारांना कंटाळून आत्महत्या केली आहे. 
       युद्धं, दंगली, दहशतवादी हल्ले या सगळ्यांमध्ये जेवढे लोक मरतात त्याहून अधिक जण आपल्या हाताने स्वतःचं आयुष्य संपवतात.  आयुष्याला, आयुष्यातला दुःखाला, त्रासाला, समस्यांना, मानहानीला, कर्जाला, हिंसेला, आजारपणाला कंटाळलेली ही माणसं जगणंच नको म्हणतायत. आणि जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणारे किमान दहा ते वीस जण आहेत हेही तितकंच चिंताजनक आहे.
     जगभरात होणाऱ्या आत्महत्यांपैकी सर्वात जास्त आत्महत्या १५ ते २९ या वयोगटात होतायत. उमेदीने आयुष्य सुरु करण्याच्या वयात आपलं जीवन संपवणाऱ्या मुला-मुलींच्या मनावरती इतका खोल परिणाम कसा होतो, हा प्रश्नच आहे.या वयात मृत्यूचं पहिलं कारण आत्महत्या असावं असं कधी मनातही येणार नाही. पण हे वास्तव आपण जितक्या लवकर स्वीकारू तितक्या लवकर आपण त्याबाबतीत काही तरी करू शकणार आहे,हे ध्यानात घेतले पाहिजे.
     कौटुंबिक समस्या, नातेसंबंधांमधील दुरावा, दुभंगलेली घरं ही आत्महत्या करण्याचे पहिलं कारण आहे हे भारताची २०१४ सालची आकडेवारी सांगते. त्या पाठोपाठ चिवट आणि दुर्धर आजारपणं हे आत्महत्यांचं महत्त्वाचं कारण आहे. दर वर्षी २०,००० हून अधिक व्यक्ती स्वतःच्या किंवा घरच्या कुणाच्या आजारपणाला कंटाळून जीव देतात हे वास्तव आहे. इतकी हताशा आणि पराकोटीची असहाय्यता अनेकांना आत्महत्यांकडे ढकलत आहे.खर्चाचा बोजा, वैद्यकीय उपचारांची परवड वेगळीच. मानसिक आणि दुर्धर आजारांमुळे होणाऱ्या आत्महत्या वाढत आहेत.
     हताशा, असहाय्यपणाची भावना आणि आपण कवडीमोल आहोत, आपली कुणालाच किंमत नाही या भावना प्रबळ होत जातात तेव्हा आत्महत्येचा विचारही बळकट होत जातो आणि स्वतःचा जीव संपवण्याची कृती केली जाते. मात्र ती दर वेळी अचानक नसते. हे सर्व विचार, भावना, मनस्थिती आपल्याला कशाकशातून कळत असते. आपल्यापर्यंत पोचत असते. मात्र त्या खुणा आजूबाजूच्यांना वाटता न आल्यामुळे होत्याचं नव्हतं होतं हे आता सिद्ध झालं आहे. जवळजवळ ७०% आत्महत्यांमध्ये अशा काही ना काही खुणा आढळून येतात. त्या वेळीच ओळखता आल्या तर संबंधित व्यक्तीचा जीव वाचवता येऊ शकतो. या खुणा-लक्षणं आपल्याला प्रत्येकालाच कधी कधी ना कधी जाणवलेली असतात. मात्र आपण त्या कडे फारसं लक्ष देत नाही. कधी कधी दुःखाचं, समस्येचं सावट नाहीसं होतं आणि आपण त्यातून बाहेर येतो. मात्र दर वेळी, प्रत्येकाच्या बाबत असं होतंच असं नाही. जेव्हा आपला प्रश्न, समस्या, दुःख संपणारच नाही, या वेदनेला अंत नाही असं मनात ठाम बसतं तेव्हा मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेतला जातो.
आत्महत्येचे विचार दर्शवणाऱ्या खुणा-लक्षणं आहेत.
     आजारामळे लोक आज आत्महत्येसारखे आत्मघातकी पाऊल उचलत आहेत. माणसांवर आजार हावी होत चालले आहेत. त्यांचे आत्मबळ आणि धाडस आजारापुढे तुटून चालले आहे.तो  लोकांना निराश-हताश होऊन आत्महत्या करायला असहाय्य करतो  आहे. कौटुंबिक कारणदेखील आत्महत्येला काही प्रमाणात जबाबदार आहे.आजार कोणालाही लाचार बनवतो.या आजारांमुळे लोक तर उद्वस्त होतताच,पण त्यांची घरेसुद्धा बरबाद होतात.दीर्घकाळचा आजार किंवा त्रासदायक आजार माणसाला कधीही निराशेच्या अशा गर्देत लोटतात. त्याला मग काही सुधरु देत  नाहीत आणि मग ते स्वतः चा शेवट करू पाहतात. पण खरे तर सगळेच आजार काही मृत्यूपर्यंत नेत नाहीत.कित्येकदा आजाराच्या आगोदरच माणूस स्वतः ला मृत्यूपर्यंत घेऊन जातात आणि आत्महत्या करून बसतात.भारतात 2015 मध्ये 1लाख 33हजार 623 लोकांनी आत्महत्या केली आहे. लोकांच्या आत्महत्येला दोन सगळ्यात मोठी ज्ञात कारणे आहेत ,ती म्हणजे कौटुंबिक समस्या आणि आजार. गेल्या वर्षी देशात 21हजार 178 लोकांनी आजारामुळे आत्महत्या केली.
     राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड (एनसीआरबी) यांच्या अभ्यासानुसार 2001 ते 2015 या कालावधीत भारतात एकूण 18.41 लाख लोकांनी आत्महत्या केली.यापैकी 3.85 लाख लोकांनी (जवळपास 21 टक्के) विविध कारणांमुळे आत्महत्या केली. याचा अर्थ असा की, आपल्या देशात प्रत्येक तासाला 4 आत्महत्या या आजाराला कंटाळून होत आहेत. प्रत्येक पाच पैकी एक आत्महत्या ही आजाराला कंटाळून होत आहे. गेल्या पंधरा वर्षांत आजाराला कंटाळून ज्या आत्महत्या झाल्या,यात सगळ्यात आघाडीवर आपला महाराष्ट्र आहे. पंधरा वर्षांत 63 हजार 013 लोकांनी आत्महत्या केली आहे.यानंतर क्रमांक लागतो तो आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांचा. अनुक्रमे 48हजार 376 आणि 50 हजार 178 लोकांनी आत्महत्या केली आहे. कर्नाटकातदेखील 48 हजार 053 लोकांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली.यातही 1.18लाख लोकांनी मानसिक आजाराच्या प्रभावाखाली आणि 2.37 लोकांनी दीर्घ आजाराला वैतागून आपला जीव दिला.यात नैराश्य,बायपोलर डिसआर्डर,डिमोशिया आणि स्कीजोफ्रिनिया रोग्यांची संख्या सर्वाधिक  आहे. हे असे रोग आहेत,ज्यात माणूस आपले आपल्यावर आणि आपल्या व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकत नाही.
      आपल्या देशात आजाराने ग्रासलेल्या लोकांना दिलासा देणारी कोणतीच व्यवस्था नाही.आजारी माणसामुळे कुटुंब डिस्टर्ब तर होतेच शिवाय आजारी माणसासाठी आर्थिक अथवा अन्य कारणांमुळे  स्वतंत्र व्यवस्था करता येत नाही.घरचे पार वैतागून गेलेले  असतात. सतत चिडचिड,रागाराग यामुळे आजारी माणसामध्ये  आपण एकटे पडल्याची भावना निर्माण होते.आजारांबाबतही साशकंता असल्यामुळे त्यांना आपला जीवाच नकोसा वाटतो आणि मग आपली इहलोकीची यात्रा संपवून टाकतात. शासन स्तरावर याबाबतीत काही तरी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता असून सामाजिक संस्थांनीही या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment