Saturday, November 5, 2011

कविता


मी म्हणालो....
मी कळ्यांना विचारलं
जरा बालपण उधार द्याल का?
मी परतवेन संध्याकाळपर्यंत
कळ्या हसल्या, लाजल्या,
मग म्हणाल्या,
" काही वर्षांपूर्वी
तुझ्यासारखाच आला होता न्यायला
हसरं बालपण.
तो तर नाही परतवू शकला आजतागायत
तू नक्की येशील संध्याकाळ्पर्यंत ?
मी म्हणालो, तुम्ही विश्वास ठेवा
त्या म्हणाल्या,
ज्याचा स्वतः वरच विश्वास नाही
मग कसा ठेवावा विश्वास त्याच्यावर?.....
    मी फुलांना विचारलं,
जरा यौवन उधार द्याल का ?
त्या आखडल्या,
अभिमानाने फुलल्या
नी बोलल्या,
यौवन तुला देऊ ?...
तुही काही द्यायला आला असशील?
काही शोभणारी भेटवस्तू आणलीस ?
काही वेळ थांबलो मग म्हणालो,
मी जन्मजन्मांतराचा तहानलेला आहे,
जीवनात निराशलेला आहे
हसर्‍या सुमनांनी टोकलं,
कधी  पूजा-बिजा  केली असशील,
सण साजरा केला असशील एखादा अथवा
केलं असशील कुणाचं तरी अभिनंदन !
आम्हालातोडलंस, कुस्करलसं, तुडवलसं
पण ऐकलास आमचा आक्रोश ?
कसं उदवस्त केलंस जीवन ?
ज्याच्या नसा-नसात स्वार्थ भरून राहिलाय,
जो सगळ्यांच्या मार्गात काटे रचतोय
त्याला जीवनात नाही कधी
काही मिळत....
मी दिड्.मूढ हो ऊन
जड पावलांनी निघालो
हटकलं मला कुणी तरी,
वळून पाहिलं-
वटलेला वृक्ष अति विनम्र स्वरात म्हणाला,
" ये, मी देतो
अनुभवानं भरलेलं म्हातारपण"
मी पून्हा घाबरलो,
"नको रे बाबा
मला नकोय ते म्हातारपण
म्हातार्‍या वृक्षानं समजावलं, " अरे वेड्या,
 माझं वृद्धत्व मला काही जड नाही
पण इतकं लक्षात ठेव
बालपण, जवानी अथवा काहीही
कधी घेऊ नकोस उधार
आपल्याजवळच्या गोष्टींवर करावं प्रेम
जे जवळ नाही
त्याचे नको दु: ख करूस
लक्षात ठेव,
जे काही आपलं आहे
त्यातच समाधान मानावं

2 comments: