Wednesday, November 30, 2011

नोकरीवाल्या महिला आणि त्यांची मुले

     नोकरीवाल्या महिलांचा फायदा खरं तर घराला-मुलांना होत असतो. बहुतांश महिला त्यांच्यासाठीच नोकरीच्यानिमित्ताने घराबाहेर पड्त असतात. आजची महिला घर आणि ऑफिसचे काम चांगल्याप्रकारे सांभाळत आहे. पण अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया ( एसोचॅम) च्या एका रिपोर्टने मात्र नोकरीवाल्या महिलांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. नोकरीपेशा असलेल्या मातांची धावपळ मुलांसाठी अडचणीची ठरत असल्याचे हा सर्व्हे म्हणतो. नोकरदार मातांची मुले ज्यादा तर  आजारी पडतात. शिवाय मुलांमध्ये लठठपणाचे प्रमाणही चारपट अधिक आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच खाण्या-पिण्याच्या बिघडत चाललेल्या सवयींवर नियंत्रण न ठेवले गेल्याने मुले आजारी पडत आहेत.  म्हणजे कुठे ना कुठे घरांमध्ये वाढ होत  चाललेल्या मुलांवर या गोष्टीचा  मोठा खोलवर परिणाम होत आहे. पूर्णवेळ काम करणार्‍या महिलांची मुले जी लठठपणा किंवा अन्य आजारांनी त्रस्त आहेत, ती मानसिकरित्याही अस्वस्थ असतात. त्यामानाने ज्या मुलांच्या माता अंशकालीन काम करतात, त्यांची मुलं मात्र आरोग्याच्याबाबतीत सुदृढ  असतात.
     ५६ टक्के नोकरीवाल्या महिलांच्या मुलांना लठठपणासारख्या समस्या जडल्या आहेत. त्यांना पुढे जाऊन मोठेपणी हृदय आणि यकृताचे विकार जडू शकतात, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. ज्या महिला अंशकालीन स्वरुपात कामे करतात , त्यांच्या मुलांना अशा समस्या कमी उदभवतात. केवळ २८ टक्के महिला अशा आहेत, की त्यांच्या मुलांना आरोग्याविषयाच्या समस्या जडलेल्या नाहीत.
     घरात राहणार्‍या महिलांची मुले त्यांच्या तुलनेत खूपच चांगली असतात. कारण ते पिझ्झा-बर्गर, पास्ता, आणि सॉफ्ट ड्रिंकसारख्या जंक फूडवर कमी अवलंबून असतात. या प्रकारचे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई,पुणे, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद आणि चंदिगडसह १० महानगरांमधल्या २५ शाळांच्या २ हजार विद्यार्थ्यांवर करण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की महानगरामधला  पाचपैकी एक मुलगा अधिक वजनाच्या आहारी गेला आहे. आणि सामान्य वजनाच्या मुलांच्या तुलनेत या मुलांना मोठेपणी लठठपणा या समस्याबरोबरच मधुमेह, हृद्य आणि यकृत विकार बळावण्याच्या शक्यता अधिक असतात.
      नोकरदार महिला दिवसभर घराबाहेर राहत असल्याने  मुलांना योग्य मात्रेत पौष्टिक आहार मिळू शकत नाही. ते खूपच कमी प्रमाणात फळे व भाजीपाला यांचे सेवन करतात. ते आवडीच्या भोजनाच्या स्वरुपात जंक फूड अधिक खाण्यावर जोर देतात. त्यामुळे लठठपणासारख्या तक्रारी वाढत आहेत. पण याचा अर्थ असा काढला जाऊ नये की, आईने नोकरीच्यानिमिताने घराबाहेर पडूच नये. नाही तर त्यांच्यावर फार मोठा अन्याय होईल.
      हा सर्व्हे विचार करायला लावणारा असला तरी प्रत्येक आई आपल्या मुलांवर प्रेमच करत नाही, असा अजिबात होत नाही. उलट काहींचा अनुभव याच्या पार विपरित आहे. नोकरदार महिला घराबाहेरच्या विश्वात सहजरित्या वावरत असल्याने त्यांच्यातला व्यवहारी आणि समजूतपणा मुलांच्या उपयोगाला येतो. शालेय शिक्षण, आणि चांगल्या सुविधाही मुलांना मिळत राहतात. स्मार्ट आणि समजूतदार महिला त्यांच्या अनुपस्थित मुलांनी चांगलं खावं-प्यावं यासाठी दक्ष असतात. नोकरदार महिलांचा आणखी एक फायदा असा की, घरातले आर्थिक प्रश्न तर सुटतात पण  घरगुती हिंसाचाराच्या घटनाही कमी प्रमाणात घडतात.
      महिलांनी स्वतःला कामाला जुंपून घेण्याची बरीच कारणे आहेत. कुटुंबाच्या आर्थिक गरजा वाढत चालल्या आहेत. शिक्षण , आरोग्य व अन्य गोष्टींसाठीचा  खर्च इतका वाढला आहे की महिलांना घराबाहेर पडल्याशिवाय  आणि काम करण्यावाचून  गत्यंतर नाही. त्या या सगळ्या जबाबदार्‍या चोखपणे पार पाडत आहेत. पण तरीही मुलांकडे होणार्‍या दुर्लक्षाला केवळ ती एकटीच जबाबदार आहे, असे म्हणता येणार नाही. कुटुंबात आणखीही काही सदस्य असतात. मुलांच्या वडिलांचीही काही जबाबदारी आहे. आजच्या घडीला मुलांचा सांभाळ ही केवळ एकट्या आईची मक्तेदारी राहिलेली नाही. संसाराची दोन्ही चाके समांतर चालायला हवी आहेत तरच संसाराचा गाडा चांगल्याप्रकारे चालत राहतो.                                                           - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment