Sunday, November 13, 2011

आजची सिनेमातली नायिका

एक काळ असा होता की, वेश्यासुद्धा चित्रपटात अभिनय करायला कचरायच्या. पण काळाचा महिमा आगाध आहे. पुढे अभिनय कलेला सन्मान मिळाला. चित्रपटांशी संबंधित महिलांना पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. प्रेक्षक त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागले. आपल्या हृदयात जागा देऊ लागले. इतकेच नव्हे तर जगातले ताकदवान देशांचे शासनकर्तेसुद्धा त्यांना  आपले खास पाहुणे म्हणून सभा-सभारंभांमध्ये बोलवू लागले. मोठ-मोठे उद्योगपती, खेळाडू त्यांना आपली अर्धांगिनी बनवण्यासाठी  प्रयत्न करू लागले. त्यांच्यावर जीव टाकू लागले. अशा या  चंदेरी  पडद्यावरचा नारी प्रवास  मोठा  कठीण आणि रंजक राहिला आहे.
'लाइफ ऑफ क्राइस्ट' ( १८ ९ ६) या चित्रपटाने धुंडीराज गोविंद फाळके यांचे सारे जीवनच बदलून टाकले आणि त्याचबरोबर भारताचा मनोरंजनचा  इतिहाससुद्धा. या चित्रपटामुळे  प्रभावित झालेल्या दादासाहेब फाळके यांनी  'राजा हरिश्चंद्र' नावाचा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. ही पौराणिक कथा पडद्यावर आणण्यासठी त्यांनी साहित्याची जुळवाजुळव करायला सुरूवात केली. तयारीही जोरदार झाली. पण एका गोष्टीमुळे गाडा काही पुढे सरकेना. तो म्हणजे स्त्री पात्रासाठीची स्त्री कलाकार. त्यांनी जंग जंग पछाडले पण  चित्रपटात काम करायला स्त्री पात्रच मिळेना. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरते वैतागून गेले. अगदी हताश होऊन त्यांनी वेश्यालयाचा दरवाजा ठोठावला. पण तेथेही निराशा .  इथल्या  महिलांनीसुद्धा  चक्क नकार दिला. हताश दादासाहेब हॉटेलवर आले. तिथल्या अण्णा साळुंखे नावाच्या एका वेटरला त्यांनी या पात्रासाठी गळ घातली. अण्णा साळुंखे महिलेच्या वेशभुषेत राणी तारामती म्हणून उभे राहिले. ७ मे १९१३ हा तो ऐतिहासिक दिवस होता. भारतात एक नवा सिनेमा 'राजा हरिश्चंद्र'च्या रुपात प्रदर्शित झाला होता. पण पुढच्या चित्रपटात एखादी महिलाच नायिकेच्या भूमिकेसाठी घ्यायची, असा त्यांनी  पण  केला.मराठी नाटकांमध्ये काम करणारी कमलाबाई गोखले सगळ्या विरोधांना जुगारून 'भस्मासुर मोहिनी' चित्रपटासाठी काम करायला तयार झाल्या. या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे महिलांसाठी करिअर म्हणून नवे क्षेत्र खुले झाले. यथावकाश चांगल्या आणि सन्मानित कुटुंबाच्या महिला, इतकंच नव्हे तर बुरख्याआड जीवन कंठणार्‍या मुस्लिम स्त्रियासुद्धा याकडे आकृष्ट हो ऊ लागल्या. 
 या दरम्यान देशातली  परिस्थितीही मोठ्या गतीने  बदलत गेली.  महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महिला आपल्या घराचा उंबरठा ओलांडून आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या.  देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या  भावनेबरोबरच  त्यांच्या स्वतः च्या स्वातंत्र्याच्या  इच्छा- आकांक्षाही या निमिताने  व्यक्त होत होत्या.  या राजकीय-  सामाजिक परिस्थितीचा चित्रपटाच्या कथा नायिकांच्या प्रस्तुतीकरणावर व्यापक असा प्रभाव पडला. चित्रपटांमध्ये महिलांचे विषय हाताळले जाऊ लागले.  तीस आणि चाळीसच्या दशकात महिलांच्या समस्यांवार आधारित  ' दुनिया न माने', 'दहेज', आणि सिंदूर सारखे चित्रपट आले.
महिलांनी  अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले खरे, पण त्यांचा पुढचा प्रवास सहजसोपा नव्हता. त्यांच्याकडे साहस आणि अथक परिश्रमाची तयारी  असतानासुद्धा सिनेमा आणि कलाकार यांना  विशेषतः स्त्री कलाकारांना सन्मानाच्या दृष्टीकोनातून  पाहिले जात नव्हते. नार्तिका असल्यामुळे  होणारी असह्य टीका आणि सामाजिक बहिष्काराला कंटाळून दुर्गा खोटेसारख्या स्त्री कलाकाराने  आत्महत्या करण्याचाही  प्रयत्न केला होता. नसीम बानू यांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले होते. कारण कॉलेजचे वातावरण खराब होईल या भीतीने  कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश नाकारला होता. पण तरीही या नायिका  हार मानून घरात बसल्या नाहीत. त्या सतत संघर्ष करत राहिल्या . आपल्याला मिळालेल्या  अनुभवाचाही पुरेपूर वापर करत त्यांनी  विविध भूमिकांद्वारे  तो  पडद्यावरसुद्धा आणला. 
स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलत गेली. पन्नासचे दशक हिंदी चित्रपटांसाठी अक्षरशः सुवर्ण्युग  बनून आले. या दरम्यान नायिकाप्रधान चित्रपटही मोठ्या संख्येने आले. या चित्रपटातील सशक्त नारी पात्रांना नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला, मालासिन्हा, वहिदा रहमान आणि नूतनसारख्या दर्जेदार अभिनयाच्या  स्त्री कलाकारांनी काळावर विजय मिळवला. काळ वेगाने बदलत होता आणि परिस्थितीही. त्याचा फायदा स्त्री कलाकारांनी घेतला.
साठच्या दशकात एक महिला ( इंदिरा गांधी) जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या ( भारत) पंतप्रधान बनल्या.  इंदिरा पंतप्रधान बनल्या, तेव्हा  सार्‍या जगासह देशातल्या काही जणांच्या  भुवया उंचावल्या होत्या. ही एकटी बाई  एवढ्या मोठ्या लोकशाही असलेल्या  देशाचा कारभार कसा काय  सांभाळणार ? असा सवाल केला जात होता. पण  इंदिरा गांधी यांनी विश्वस्तरावर लोहमहिलेच्या रुपात आपली ओळख बनवली आणि विरोधकांना चारीमुंड्या चित केले. याच काळात स्त्री पात्रांना केंद्रस्थानी ठेऊन उत्कृष्ठ चित्रपत तयार झाले. '' साहब, बीवी और गुलाम ( १९६२)'', ''बंदिनी' ( १९६३)'', '' गाईड (१९६५)'', '' ममता ( १९६६)'' सारख्या चित्रपटांमध्ये सहनशीलतेच्या ठिकाणी नायिकेच्या  जीवन चरित्रात  विद्रोहाची झलक दिसायला लागली. देशात पाश्चात्य संस्कृतीचा टवटवीतपणा आणि पारंपारिक बंधनाची उसवण यामुळे नायिकांच्या चरित्रात आधुनिकपणा दिसून येऊ लागला. ''आराधना ( १९६९)''  कुमारीमाता या  कथानकावर आधारित एक सुपरहिट्ट चित्रपट  होता. तर त्याच्या पुढच्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'सफर' या यशस्वी चित्रपटात नायिका लग्नानंतरही खुलेआम आपल्या प्रियकराला भेटायला जाते , असा  तो संक्रमणाचा काळ होता, जो परंपरावादी नायिकांना  पडद्यावरून विदाई देण्याचा प्रारंभ होता. 
सत्तरच्या दशकात व्यावसायिक चित्रपटांमध्ये  नायिकांना चांगल्या भूमिका साकारायला मिळाल्या नसल्या तरी १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अंकुर' पासून समांतर सिनेमे पडद्यावर नारी सशक्तीकरणाची ज्योत पेटवायला लागले. या चित्रपटांमध्ये नायिकेच्या रुपात प्रेक्षकांनी पडद्यावर अशा काही  महिलांना पाहिलं की, ज्या साधारण दिसत असल्या तरी अभिनयाच्या अंगाने  असाधारण होत्या. शबाना आझमी, स्मिता पाटील, आणि  दिप्ती नवल सारख्या उत्कृष्ट स्त्री कलाकार    असाधारण स्त्रीयांच्या चेहराचे प्रतिनिधीत्व करत राहिल्या.  ही स्त्री पात्रं सिनेमासाठी कल्पीत  नव्हती तर ती थेट समाजातून  आली होती, असे  भासवत होती. या स्त्री भूमिकांनी समाजतल्या महिलांना एक नवी शक्ती दिली. विश्वस्तरावर भारतीय स्त्री आपलं एक स्वतंत्र अस्तित्व बनवू इच्छित होती. विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणात त्यांना ही संधीही मिळाली. संचारक्रांती आणि आर्थिक उदारिकरणामुळे जग एक ग्लोबल विलेज' बनून गेलं. भारत विश्व व्यापाराचं केंद्र बनलं. देशात अचानक विश्वसुंदरींचा पूर आला. चित्रपट नायिकांचे सौंदर्याचे मापदंड राष्ट्रीय न राहता आंतरराष्ट्रीय बनून गेले. एक अशी कमोडिटी  तयार झाली की, त्यात  ग्लोबल अपील डोकावू लागलं. 
 २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिस्म' मुळे नायिकांच्या  विवाहित असूनही परपुरुषाच्या बाहुत रमणारी स्त्री आणि गरमागरम दृश्ये यांच्या भडकावू  सादरिकरणामुळे सार्‍या परंपरा उध्वस्त झाल्या. ''सत्ता'', '' एतराज'',  ''लीला'', ''अस्तित्व'', ''क्या कहना'', ''लज्जा'' आणि ''फॅशन''सारखे अनेक चित्रपट आले. यातली नायिका आपल्या जीवनात कुणाचाच हस्तक्षेप खपवून घ्यायला तयार नव्हती. त्यांच्या योग्य अथवा अयोग्य निर्णयासाठी फक्त आणि फक्त ती स्वतः मालकीण होती. त्याला स्वतः च जबाबदार होती.  आश्चर्याची गोष्ट अशी की, तिला  आपल्या अनैतिक गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करावासा  वाटला नाही. या चित्रपटांच्या सगळ्या नकारात्मक बाजूंचा विचार करता आता स्त्रीसुद्धा पुरुषासमान आपलं स्वतंत्र अस्तित्व ठेऊ इच्छित  असल्याचंच  अधोरेखीत करते. आजच समाजतलं वास्तव सिनेमात प्रतिबिंबीत होत आहे. 
 हीच  स्त्रीची स्वातंत्र्याची  प्रबळ  इच्छा, अशा चित्रपटांच्या निर्मितीचा  मार्ग सुकर करताना दिसतात. आपल्या  नायिकेच्या जीवनात पुरुषाची साथ  असो अथवा नसो पण  स्वतः चे आयुष्य स्वतः धुंडाळणारी आणि त्याला आकार देणारी आजची स्त्री मनाने कणखर बनत चालली आहे. तिला कुणाच्या मदतीची , दयेची भीक नको आहे.  अद्याप  किनारा अजून लांब असला तरी ही एक चांगली सुरूवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. - मच्छिंद्र ऐनापुरे   

No comments:

Post a Comment