Monday, November 14, 2011

बालकथा गोपाळ आणि मिठ्ठू

   माकडांचा खेळ तर तुम्ही खूपदा पाहिला असाल. मदार्याच्या इशार्यावर माकड कसल्या कसल्या नकला करत असतं. त्याच्या खोडीसुद्धा पाहिल्या असाल. तुम्ही त्याला घरातून कपडे उचलून नेतानाही पाहिला असाल, पण आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत की, ज्यामुळे माकडसुद्धा मुलांशी मैत्री  करू शकतं, याचा तुम्हाला प्रत्यय येईल.
     काही दिवसच झाले होते, लखनौमध्ये एक सर्कस कंपनी येऊन. त्यात वाघ, अस्वल, चित्ता यांच्यासह आणखी काही प्राणी होते. याशिवाय एक मिठ्ठू नावाचे माकडसुद्धा होते. मुलांच्या झुंडीच्या झुंडी रोज या प्राण्यांना पाहण्यासाठी येत होत्या. मिठ्ठू त्या सगळ्यांना खूप आवडायचा. त्या मुलांमध्ये गोपाळसुद्धा होता. तो रोज यायचा आणि मिठ्ठूजवळ तासनतास बसून राहायचा. त्याला वाघ, अस्वल, चित्ता या प्राण्यांमध्ये अजिबात रस नव्हता. तो मिठ्ठूसाठी घरातून चणे-हरभरे, शेंगदाणे, केळी घेऊन यायचा आणि त्याला खाऊ घालायचा. मिठ्ठूलासुद्धा त्याचा इतका लळा लागला होता की, त्याच्याशिवाय तो काही खायचाच नाही. अशा प्रकारे दोघांमध्ये चांगली दाट मैत्री झाली.
   एक दिवस गोपाळने ऐकले की, सर्कस कंपनीचा मुक्काम हलणार आहे. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटले. तो रडत आपल्या आईजवळ आला आणि म्हणाला, " आई, मला आठ आणे दे! मी जाऊन मिठ्ठूला विकत आणतो. कुणासठाऊक तो कुठे जाईल, त्याची माझी भेट कशी होणार? त्यालासुद्धा माझ्याशिवाय चैन पडणार नाही."
   आईने समजावलं, " बाळ, माकड कुणावर जीव लावत नाही. ते मोठं खोडकर असतं. इथे आल्यावर सगळ्यांना चावत सुटेल. आपल्याला फुकटची बोलणी ऐकून घ्यावी लागतील."  पण गोपाळवर आईच्या समजवण्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो रडू लागला. शेवटी आईने नाईलाज म्हणून एक आठ आण्याचे नाणे त्याच्या हातात ठेकवले.
   आठ आणे मिळाल्यावर गोपाळच्या आनंदाला पारावारच उरला नाही. त्याने आठ आण्याला मातीने    घासून्-फुसून चकचकीत केले आणि उड्या मारतच मिठ्ठूला विकत आणायला निघाला.
   पण मिठ्ठू तिथे दिसला नाही. गोपाळचे मन सैरभैर झाले. डोळे भरून आले. मिठ्ठू कुठे पळून तर गेला नाही ना? अशी शंका त्याला आली. मालकाला आठ आणे दाखवत गोपाळ म्हणाला,  " दादा, मिठ्ठूला मला विकत देणार ना ?"
.    मालक रोज त्याला  मिठ्ठूशी  खेळताना  आणि खाऊ घालताना पाहात आला होता. तो हसून म्हणाला , " पुढच्या खेपेला येईन ना, तेव्हा मिठ्ठूला नक्की तुक्झ्या स्वाधीन करीन."  गोपाळ निराश झाला. तेथून हलला आणि मिठ्ठूला इकडे-तिकडे शोधू लागला. तो त्याला शोधण्यात इतका दंग होता की त्याला कशाचेच भान उरले नव्हते. चित्त्याच्या पिंजर्याजवळ आल्याचं त्याच्या अजिबात लक्षात आलं नाही. चित्ता आत गपचिप पडला होता.  गोपाळला  पिंजर्याजवळ पाहून त्याने पंजा बाहेर काढला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न  करू  लागला . गोपाळ तर दुसरीकडेच पाहात होता. त्याला काय माहित होतं की, चित्त्याचा तीक्ष्ण  पंजा  त्याच्या  हाताजवळ पोहचला आहे. चित्ता त्याचा हात पकडून ओढणार इतक्यात कुठूनसा मिठ्ठू आला. त्याने त्याच्या पंजावर उडी घेतली आणि पंजाचा दाताने चावा घेऊ लागला. चित्त्याने दुसरा पंजा बाहेर काढला आणि त्याला असे काही जखमी करून टाकले की, तो तिथेच खाली कोसळला. तिथेच जोरजोराने ओरडू लागला.
   मिठ्ठूची ही अवस्था पाहून गोपाळसुद्धा रडू लागला. दोघांचे रडणे ऐकून लोक धावले. पाहतात तर मिठ्ठू बेशुद्ध पडला होता आणि गोपाळ रडत होता. मिठ्ठूची जखम लगेच धुण्यात आली. त्यावर मलम लावले गेले. थोड्या वेळात त्याला शुद्ध आली. तो गोपाळकडे अगदी प्रेमभरल्या नजरेने पाहू लागला. जसं काही सांगत होता की, आता का रडतो आहेस ? मी तर बरा झालो आहे.
   काही दिवस मिठ्ठूची मलमपट्टी होत राहिली. शेवटी तो खडखडीत बरा झाला. गोपाळ रोज यायचा आणि त्याला खाऊ-पिऊ घालायचा. शेवटी कंपनीचा जाण्याचा दिवस उगवला. गोपाळ खूप दु:खी होता. तो मिठ्ठूच्या पिंजर्याजवळ अश्रू भरल्या डोळ्यांनी उभा होता. इतक्यात तिथे मालक आला आणि म्हणाला," मिठ्ठू तुला मिळाला तर तू त्याचे काय करशील ?"  गोपाळ म्हणाला, " मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन. त्याच्यासोबत खेळेन. त्याला माझ्या ताटात खाऊ-पिऊ घालीन. आणि त्याच्यावर खूप खूप प्रेम करीन."
   मालक म्हणाला," छान ! मलाही हेच हवं होतं. मी तुझ्याकडून आठ आणे  घेताच त्याला तुझ्या स्वाधीन करतोय." गोपाळला जसा काही खजिना गवसल्याचा आनंद झाला. त्याने मिठ्ठूला आपल्या मिठीत घेतलेपण मिठ्ठू खाली उअतरला आणि त्याच्या मागे मागे चालू लागला. दोघे खेळत- उड्या मारत घरी पोहचले.                                               ( प्रेमचंद यांच्या कथेचा स्वैर अनुवाद)

No comments:

Post a Comment