Wednesday, November 23, 2011

धोनी तरुणांच्या गळ्यातला ताईत

भारतीय क्रिकेटचा कप्तान महेंद्रसिंग धोनी तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. जिद्द, चिकाटी आणि वेळप्रसंगी रणनीती आखण्यात माहीर असलेल्या 'माही'ची यशस्वी वाटचाल सगळ्यांनाच आकर्षित करीत आहे. एका छोट्या शहरातून आलेल्या या क्रिकेटपटूची यशस्वी कहानी कहानी मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये शिकवली जात आहे, यावरूनच त्याच्या प्रचंड यशस्वी कारकिर्दीचे लोकांना किती आकर्षण आहे, याची प्रचिती येते.
अतिक्रिकेटबाबत सध्या ओरड सुरू आहे. त्यातच या अतिरेकामुळे किंवा फिटनेस अभावी काही खेळाडूंना दुखापतग्रस्त हो ऊन संघाबाहेर राहावे लागत आहे. आपल्या भारतीय क्रिकेट संघातल्या कित्येक खेळाडूंची कारकिर्द 'अल्पजीवी' ठरली. तर काहींच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण या सगळ्यांना पुरून उरला आहे तो महेंद्रसिंग धोनी! त्याने अतिक्रिकेटची कधी कुरकूर केली नाही की दुखापतग्रस्त हो ऊन संघाबाहेर बसला नाही. टीममधल्या सगळ्यांना प्रोत्साहित करत, काही वरिष्ठांची मर्जी सांभाळत, मानपान देत त्यांच्या अनुभवाचे धडे गिरवताना दिसतो. तर नवोदितांना त्यांचा खेळ फुलवताना पाठीवर भक्कम आधाराची थाप देतो. तर कधी मोक्याच्याप्रसंगी धोका पत्करून विजयश्री खेचून आणतो. अशा महेंद्रसिंग धोनीला नशिबाचीही साथ मिळत गेल्याने त्याच्या कप्तानीच्या वाटचालीत अपयशाचे काटे कमीच आले. काही ठिकाणी त्याचे निर्णय साफ चुकले परंतु त्याच्या मागच्या यशस्वीतेने अशा चुका झाकोळल्या गेल्या.
अत्यंत मागास अशा झारखंड राज्यातल्या रांची या छोट्या शहरातून आपली कारकिर्द घडविणारा धोनी बघता- बघता सार्‍या जगातल्या तरुणांचा लाडका क्रिकेटपटू ठरला. त्याची क्षमता केवळ देशातच नव्हे तर सार्‍या जगाने वाखाणली आहे. भारताला २०११ चा विश्वचषक जिंकून देऊन त्याने तमाम भारतीय जनतेची मने जिंकली. १९८३ नंतर ज्या चषकाची तृष्णा भारतीयांना होती, ती त्याने आपल्या कुशल नेतृत्वाखाली भागवली. आज विश्व क्रिकेट जगतातल्या यशस्वी कर्णधारांच्या पंक्तीत त्याची गणना होते.  वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मिळालेले प्रचंड यश तसं पाहायला गेलं तर अकल्पित आहे. थक्क करणारं आहे. असं यश क्वचितच एखाद्या क्रिकेट्पटूच्या वाट्याला येतं. भारतीय संघात पहिल्यांदा विकेटकिपर व नंतर फलंदाज म्हणून सामिल झालेल्या धोनीच्या फलंदाजीचा आढावा घेतल्यावर असं लक्षात येतं की तो फलंदाजीतील त्याची कामगिरी पाहता तो निव्वळ फलंदाज म्हणून संघात सहज सामावला गेला असता. कारण त्याची एकदिवशीयमधली कामगिरी सरासरी ५१.१५ इतकी फलंदाजाच्या कामगिरीला पोषक अशी आहे. पण  माही त्याउपर जाऊन आज भारतीय संघात 'थ्री इन वन' ची यशस्वी भूमिका पार पाडतो आहे.  चपळ विकेटकिपर, चलाख कप्तान आणि चतुर फलंदाज या बिरुदावल्या त्याला चिकटल्या आहेत.
कप्तान म्हणून माहीने विश्वचषक २०११, टी-२० विश्वचषक-२००७ भारताला मिळवून दिले आहेत. याशिवाय  कसोटी कप्तान म्हणूनही त्याने चांगली कामगिरी पार पाडली आहे. कसोटी कप्तान काळात त्याने निव्वळ एक मालिका गमावली आहे. बॉर्डर्-गावस्कर चषक जिंकण्याबरोबरच ऑस्ट्रेलियातली ट्राएंगुलर मालिकाही त्याने देशाच्या खिशात टाकली आहे.
लीग क्रिकेटमध्येसुद्धा आपल्ल्या नेतृत्वगुणाची आणि कामगिरीची कमाल दाखवली आहे. आयपीएलच्या चार सिझनपैकी दोनमध्ये संघाला त्याने चॅम्पियन बनवले. आणि एकदा चेन्नई सुपर किंग्ज टीमला उपविजेतेपद बहाल करून दिले. शिवाय एका सिझनमध्ये आपल्या संघाला अंतीम चारमध्ये नेण्याची कामगिरी करून दाखवली. याचा अर्थ  टी-२० मध्ये धोनी सुपर-डुपर हिट कप्तान ठरला आहे.
लोकप्रियतेच्याबाबतीत म्हणाल तर तो सचिन तेंडुलकरशी बरोबरीने टक्कर देतो आहे. काही नामांकित कंपन्यांचा ब्रँड अम्बेसेडर असलेल्या दोनीने पैसा आणि लोकप्रियतेच्याबाबतीत क्रीडा ते मनोरंजन जगतातल्या सितार्‍यांन्या केव्हाच मागे टाकले आहे. एका छोट्याशा शहरातून आलेल्या धोनीने मिळवलेले अकल्पित यश थक्क करणारे आहे. न थकता, संयमाने देशासाठी योगदान देणार्‍या धोनीमधले नेतृत्वगुण खरोखरीच अभ्यासण्यासारखे आहेत. म्हणूनच देशातल्या काही मॅनेजमेंट कॉलेजांमध्ये त्याच्या कहानीचा अभ्यासक्रम लावण्यात आला आहे. त्याची यशस्वी वाटचाल खरोखरीच देशातल्याच नव्हे तर जगातल्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. 

No comments:

Post a Comment