Saturday, November 17, 2018

यश कसं मिळवाल?


     माणसं यशाच्या मागे धावत असतात. रात्र आणि दिवस यासाठी एक करीत असतात .पण तरीही काही लोकांनाच यश प्राप्त होतं. अनेकांना यशामागे काही तरी रहस्य लपलं आहे, असं वाटत असतं. त्यामुळे यशासाठी आणखी काही उपद्व्याप माणसं करताना दिसतात. खरे तर कोलीन एल पावेल यांच्या म्हणण्यानुसार यशाचं असं काही रहस्य नसतं. ते तुमची तयारी,कठोर मेहनत आणि अपयशापासून शिकण्याचेच परिणाम असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
ज्याच्या आयुष्यात अपयश आलं नाही, त्याने आयुष्यात काहीच केले नाही ,असे समजावे. अलीकडे लोक संपत्ती साठवून ठेवू लागले आहेत. आपल्या आई-बापांनी काही कमवून  ठेवले नाही, निदान आपण तरी आपल्या बायका-पोरांसाठी कमवून ठेवायला हवे,असा विचार करून माणसे मिळेल त्या मार्गाने संपत्ती जमा करताना दिसत आहे. पण यामुळे आपण आपल्या मुलांचा सत्यानाश करत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे.
     संपत्ती साठवून ठेवल्याने मुले आळशी बनतात.  मुलं बिघडतात. यामुळे ती मेहनत करत नाहीत. शेवटी संपत्ती कधी ना कधी संपते आणि ही मुलं रस्त्यावर येतात. यावेळेला हीच मुलं आपल्या आई-वडिलांना दोष देतात. आम्हाला काहीच करायला शिकवलं नाही, असे म्हणून ते आपल्याच आई बापाची अब्रू चव्हाट्यावर आणतात. मग त्यांचे डोळे उघडतात.पण वेळ गेलेली असते. त्यामुळे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ता पासूनच मुलांना कामाची सवय लावायला हवी. काम हीच ईश्वर पूजा आहे, हे त्यांच्या मनात बिंबवायला हवे. स्वावलंबी असलेली माणसे कधीच मागे पडत नाहीत. ती पुढं पुढंच जात राहतात. त्यामुळे मुलांना कामाची सवय लावावयाला हवी. त्यामुळे त्याला कष्टाचे काही वाटत नाही. आयुष्यात अपयश आले तरी न डगमगता पुढे चालत राहतात.मिशेल जॉर्डन म्हणतात की, मी माझ्या आयुष्यात अनेकदा अपयशी ठरलो आहे, पण या अपयशातूनच यशस्वी झालो आहे. यशासाठी धडपड ही करावीच लागते,ही गोष्ट प्रकर्षाने धान्यात घेतली पाहिजे.
     प्रत्येक माणसाकडे ईश्वराने काही ना काही गुण बहाल केला आहे. त्याच्या आधारावर आपल्याला यशाचे शिखर गाठता येते. पण आपल्याकडे जी प्रतिभा आहे, हे मात्र आपल्याला ओळखता आले पाहिजे.बरीच मंडळी आपल्याकडे असलेल्या प्रतिभेचा वापर करू शकत नाहीत. ती भलतीकडेच चाचपडत असतात. कुणी तरी म्हटले आहे, तुज आहे तुज पासी, परि जागा चुकलासी। त्यामुळे माणूस आयुष्यात निराश होतो. खरे तर आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर आपल्या आवडीतल्या क्षेत्राला प्राधान्य द्यायला हवे. त्यात आपलं करिअर घडवायला हवं. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, तुमची प्रतिभा तुम्हाला दिलेलं परमेश्वराचं वरदान आहे. तुम्ही त्याच्याशी काय करता त्याच्यावर तुमचं यशापयश अवलंबून आहे. 
सॅम्युल एम. शुमेकर सांगतात की, समस्या, अडचणी यांच्यपासून आपली सुटका व्हावी,अशी देवाकडे प्रार्थना करू नका. आपल्या सहज भावना म्हणूनदेखील प्रार्थना करू नका. प्रत्येक परिस्थितीत देवाची कृपा राहू दे, अशी प्रार्थना करा, जेणे करून तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ मिळेल. याशिवाय कोणत्याही अन्य प्रार्थनेला किंमत नाही. कठोर मेहनत,जिद्द,सातत्य तुम्हाला यश देऊन जातं, त्यासाठी आणखी कशात यश शोधण्याची आवश्यकता नाही. माणसं बाबा-बुवाच्या मागं लागतात ,पण ते त्यांचं स्वतः चं भलं करून घेतात. कष्ट न करण्याची सवय असलेली माणसे अशा लोकांच्या नादी लागतात आणि आपलं सर्वस्व गमावून बसतात.


2 comments: