Thursday, June 25, 2020

शिक्षकांच्या पोटात भीतीचा गोळा

कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या शाळांना 'टाळे' लागले आहेत. ही कुलपे कधी उघडली जातील, हे सांगणं सध्यातरी कठीण आहे. काही दिवसांपूर्वी रोज दहा हजारांनी  वाढणारी कोविड-19 च्या रुग्णांची संख्या आता 15 हजारांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्याच्याबाबतीत शिक्षकांबरोबर पालकांनाही चिंता सतावू लागली आहे. परंतु, या सगळ्यांत शिक्षकांच्या पोटात मात्र भीतीचा गोळा उठला आहे. 'काम नाही तर दाम नाही',अशी भूमिका सरकार घेऊ शकते. त्यामुळे काही महिने आपल्यालाही विना वेतन काढावे लागतील की काय, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. या अगोदर 75 टक्के पगार अदा करून 25 टक्के पगाराला कात्री लावण्यात आली आहे. अलीकडेच कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागणार असल्याचे सूतोवाच मंत्री जयंत पाटील यांनी दिल्याने कदाचित उद्या आपल्या पगारावर टाच आणली जाईल की काय, अशी शंका त्यांना सतावू लागली आहे. काही अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रतिष्ठेची कसलीही आब न राखता त्यांना कसल्याही कामावर नेमणूक करून त्यांच्या प्रतिष्ठेचे धिंडवडे काढले.
अगदी दारूच्या दुकानांवर, रेशन दुकानांवर तर कंटेन्मेंट झोन असलेल्या परिसरात डबे पोहचवण्याचेही काम लावण्यात आले. रस्त्यावर चेक पोस्टवरही ड्यूटी लावण्यात आली आहे. शिक्षकांना बसून पगार खाणं जीवावर येत आहे. शाळा सुरू करा किंवा कामं लावा,पण आमच्या पेश्याचा विचार करून लावा, इतकंच त्यांचं म्हणणं आहे. शाळा सुरू करा म्हणण्यामागं त्यांचा पगार आहे. पण धाडसानं याचं समर्थन त्यांना करता येत नाही, हीदेखील त्यांची अडचण आहे. शाळांची स्वच्छता राखणं,याची संपूर्ण जबाबदारी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीवर टाकण्यात आली आहे. या काळात शाळांचा उपयोग क्वारंटाईनसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.मात्र त्यानंतरची स्वच्छतेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर सोपवण्यात आली आहे.
सध्या शिक्षकांनी पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटून टाकली आहेत. त्याचा अभ्यास मुले घरी करत असतानाच त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचं कामही सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण घ्यायला विद्यार्थी उत्सुक दिसत नाहीत. शिवाय शाळा पातळीवर विचार केला तर एका वर्गातील फक्त पाच ते दहा टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अंरॉईड मोबाईलची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय नेट पॅक साठीची आर्थिक अडचणही त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे हे शिक्षण विद्यार्थ्यांना उपयोगाचे ठरू शकेल का, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. समान शिक्षणाला इथे खोडा बसतो आहे, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सक्तीचे असू नये. शाळा या जेव्हा सुरू होतील, तेव्हापासूनच अभ्यासक्रम सुरू केला जावा. अभ्यासक्रम मे महिन्यापर्यंत नेता येईल आणि जितके महिने अभ्यासक्रमाला मिळतील,तेवढाच अभ्यासक्रम मूल्यमापनासाठी घेणे योग्य ठरेल.  विनाकारण मारून मुटकून शिक्षणाची सक्ती करणं, सध्याच्या वातावरणात घातकच ठरेल. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सध्या तरी ओरोगामी, कवितांना चाली, इंग्रजी-हिंदी भाषेच्या तसेच गणिताच्या मूलभूत प्रक्रियेवर भर दिला जावा. व्यवसाय शिक्षण मार्गदर्शनासाठी ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल.आज मूल्य शिक्षण महत्त्वाचं आहे, त्या आधारावर व्हिडीओ, ऑडिओ तयार करून मुलांपर्यंत पोहोचवायला हरकत नाही. म्हणजे निदान सरकारला जे निरंतर शिक्षण अपेक्षित आहे, ते सुरू राहील.
कोविड-19 च्या भारतातील किंवा राज्यातील रुग्णांचा आलेख कमी कमी होताना दिसत नाही,तोपर्यंत शिक्षणाचा विचार करणे उपयोगाचे नाही. आज दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढतानाच दिसत आहेत.
या सगळ्यांत शिक्षकांना मात्र झळ बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विनाअनुदानित शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक रोजगार हमीच्या कामांना जात असल्याच्या किंवा भाजीपाला विकत असल्याच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमातून पुढे येत आहेत. शाळा सुरू नाहीत,त्यामुळे पालक शाळांना फी द्यायला तयार नाही. साहजिकच शिक्षकांना पगार द्यायला शिक्षण संस्था चालकांकडे पैसा नाही. खासगी शिकवण्या घेणाऱ्या शिक्षकांचीही हीच अवस्था झाली आहे. हा गोंधळ सुरू असतानाच सरकारने पन्नास-पंचावन्न वय वर्षे झालेल्या  आणि व्याधी लागलेल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचे परिपत्रक काढून शिक्षकांना चिंतेत टाकले आहे. साधारण अलीकडच्या वातावरणामुळे किंवा हायब्रेड खाण्याने म्हणा साधारण चाळीस- पन्नासच्या दरम्यान कुणा ना कुणाला कोणता तरी आजार जडलेला आहे. त्यामुळे या परिपत्रकाची अंमलाबाजवणी झाल्यास किमान लाख-दीड लाख कर्मचारी घरी जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अनेकांना नोकऱ्या उशिराने लागल्या आहेत. मुदती आधी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागल्यास अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.  शिक्षकांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अडचणी, समस्यांना तोंड द्यावे लागत आलेलेच आहे. अलीकडे शिक्षकांच्या बदल्यांचा विषय खूप मोठा गंभीर बनला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बदल्या थांबल्या असल्याने शिक्षकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
शिक्षकांची भरती प्रक्रिया थांबली असल्याने अगोदरच शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा आणि अशैक्षणिक कामांचा ताण वाढला आहे. यात ऑनलाईन शिक्षणावर पुढील काळात अधिक भर दिला जाणार हे उघड आहे. दहा पेक्षा कमी पटांच्या शाळांवर गंडांतर आले आहे. त्यामुळे यापुढील काळात शिक्षकांना फक्त ऑपरेटर म्हणून काम करावे लागेल की काय, याची भीती आहे. शिक्षण ही बदलणारी प्रक्रिया असली तरी मागास, आर्थिक मागास आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शिक्षण क्षेत्रात मात्र अस्वस्थ्येचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment