Monday, April 12, 2021

सकारात्मक विचारांच्या पायघड्या घालूया


कोरोना महामारीच्या काळात  नववर्षाचे स्वागत करत गुढी उभारताना  मनात पूर्वीसारखा उत्साह निश्‍चितच नाही. कुठे तरी भीती, अस्थिरता, असुरक्षा, चिंताग्रस्तता या सगळ्या नकारात्मक भावनांचं पारडं जड आहेच. तरीदेखील ही नकारात्मकता बाजूला सारत शृंगारलेल्या गुढीला अभिवादन करुन नव्या वर्षाचं सहर्ष स्वागत करत येणार्‍या चैतन्यदायी चैत्राला सकारात्मक विचारांच्या पायघड्या घालू या आणि लवकरच कोरोनारुपी संकट दूर सरुन संपूर्ण मानवजात त्याच्या कचाट्यातून मुक्त होईल, अशी आशा व्यक्त करु या. नववर्ष नेहमीच नवी आशा आणि नवी उमेद घेऊन येत असतो. यावेळी मात्र आपण सर्वांनीच शासनानं घालून दिलेल्या कोव्हिड नियंत्रक नियमांची अंमलबजावणी चोख करण्याविषयीचा संकल्प सोडणं गरजेचं आहे. कारण सध्या तरी याखेरीज दुसरा पर्याय दिसत नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अथवा संसर्ग झालेल्या रुग्णांना पूर्णपणे बरं वाटावं यासाठी कोणतेही खात्रीशीर उपचार अद्याप उपलब्ध नाहीत. सगळं काही प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. लसीकरण मोहीम सुरू असली तरी लसदेखील शंभर टक्के प्रभावी नाही. ती या आजारापासून आपलं केवळ ७0 ते ८0 टक्क्यांच्या आसपास संरक्षण करु शकते. दुसरी लस घेऊनही माणसे कोरोनाच्या चपाट्यात येत आहेत. त्यामुळेच वैयक्तिक काळजीबरोबरच कुटुंबाची काळजी घेणं आणि सामाजिक जबाबदारी सांभाळणं हेच या वर्षीचंही सामूहिक ब्रीद राहणार आहे.

या संपूर्ण कोरोनाकाळानं आपल्याला निसर्गाचं संवर्धन करण्याची गरज दाखवून दिली आहे. प्रदूषणयुक्त वातावरणात रोगप्रतिकारक्षमता कमी असणारे लोक कोरोनाला लवकर बळी पडतात, हे लक्षात आल्यानंतर तरी आता आपली निसर्गाप्रतीची वागणूक अधिक जबाबदार करणं गरजेचं आहे. पहिल्या लाटेनंतर कोरोनाचा भर ओसरला त्याबरोबर आपण आधीचे सगळे नियम विसरलो आणि पुन्हा पूर्वीचीच जीवनशैली अनुसरण्याचा प्रयत्न केला. आपण बदललं पाहिजे, जीवनशैली बदलली पाहिजे ही जाणीव काही दिवसांमध्ये विस्मृतीत गेली. आयुष्यामध्ये काही बदल न करण्याचे परिणाम आता आपण भोगत आहोत. आता पुन्हा एकदा जीवनशैलीत बदल करण्याची गरज निसर्गानं दाखवून दिली आहे. त्यामुळे आता तरी अतिआधुनिकतेची कास, अतिआधुनिक घरांचा हव्यास, सिमेंटीकरण, अतिविशाल रस्ते यांचा अट्टाहास सोडून निसर्गानुकूल जीवनशैली अनुसरण्याचा संकल्प करायला हवा. आपण निसर्गनिर्मिती करू शकत नाही, फक्त संवर्धन करु शकतो. त्यामुळे वृक्षलागवड, वृक्षसंवर्धनाचं सकारात्मक कार्य आपल्याकडून वर्षभर व्हावं यासाठी प्रयत्नरत व्हायला हवं.

त्यासाठी आधी निसर्गाप्रती प्रेम, आस्था, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होणं गरजेचं आहे. निसर्गामुळे आपण आहोत ही भावना जागृत होणं गरजेचं आहे. ननिसर्गाच्या सानिध्यात जगणं आपल्याला क्रमप्राप्त आहे.त्यामुळे ज्यांना शक्य आहे,त्यांनी खेड्याची वाट धरायला हवी. महात्मा गांधीजी,खेड्या चला म्हणायचे.खेड्यात स्वर्ग आहे सांगायचे पण आपण उलटंच करायला लागलो.पोटापाण्याची माणसं शहराकडे धाव घेऊ लागले आणि खेडी ओस पडू लागली. मात्र गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या संक्रमानामुळे  'गड्या आपला गाव बरा' म्हणत मोठ्या संख्येने लोक गावाकडे आले. काही तुरळक माणसं मातीची सेवा करत गावातच थांबली मात्र बहुतांश लोक कोरोना काळ ओसरल्यावर पुन्हा शहराकडे धावली. आता पुन्हा कोरोनाने गतवर्षांपेक्षा उग्र रूप धारण केले आहे. पुन्हा लोकांना आपला गाव आठवू लागला आहे.काहीच महिन्यापूर्वी शहराकडे गेलेले लोक पुन्हा गावाकडे परतू लागली आहेत. 

माणसे गावात रमली पाहिजेत आणि त्यांना गावातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी सरकारने अधिक लक्ष द्यायला हवे आहे. गावे विकासाने समृद्ध झाली पाहिजेत. उद्योगधंदे शेतकऱ्याच्या बांधावर आली पाहिजेत. आधुनिक तंत्रज्ञान अवतरले पाहिजे. शैक्षणिक सुधारणा आता महत्त्वाची आहे. यासाठी काही वर्षे जावी लागतील,पण सुरुवात तर करायला हवी आहे. गावात मोकळ्या वातावरणात रोगांना आला नक्कीच बसणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहणार नाही. त्यामुळे सरकारचा आणि वैयक्तिक लोकांचा  आरोग्यावरचा खर्च वाचणार आहे. खेड्यात गरजा कमी लागणार आहेत. 

सध्यातरी सर्वांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. मास्क, सुरक्षित अंतर आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. नववर्षाच्या निमित्तानं सकारात्मक विचार घेऊन पुढे जाऊया.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


No comments:

Post a Comment