Tuesday, April 6, 2021

पांढरे वाघ आले कोठून?


राज्यातील औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयात असलेल्या पिवळ्या रंगाच्या भक्ती वाघिणीने नुकतेच दोन पांढऱ्या रंगाच्या बछड्यांना जन्म दिला. या दोन बछड्यांमुळे या संग्रहालयातील पांढऱ्या वाघांची संख्या पाच झाली आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षाच्या कालावधीत 40 पेक्षा अधिक वाघांना जन्म दिलेल्या या उद्यानाला व्याघ्र जनानाचे केंद्र मानले जाते. सध्या याठिकाणी पाच पांढऱ्या वाघांसह 11 पिवळ्या रंगाचे वाघ-वाघीण आहेत. उर्वरित वाघांची राज्यातील व देशातील इतर प्राणी संग्रहालयातील उद्यानात रवानगी करण्यात आली आहे. मात्र आपल्या सारख्या सामान्य लोकांना असा प्रश्न पडणे साहजिक आहे की, देशात पिवळ्या रंगांचे वाघ असताना पांढऱ्या रंगाचे वाघ आले कोठून? त्यामुळे याचा शोध घेणे क्रमप्राप्त आहे. 

भारत, नेपाळ, बांगलादेश आणि भूतानमध्ये वाघांची जी प्रजाती आढळते त्याला बंगाल टायगर म्हटलं जातं. जैवविज्ञानाच्या भाषेत पॅंथेरा टिगरिस असं म्हणतात. हे सामान्यपणे पिवळ्या-नारंगी रंगाचे आणि अंगावर काळे पट्टे असलेले वाघ असतात. पण यांच्याकडून पांढरा वाघ जन्माला येणं हैराण करणारं आहे. अभ्यासानुसार पांढरे वाघ बंगाल टायगरच्या प्रजातीपासून वेगळे नाहीत. ते एकच आहेत. पण त्यांचा पांढरा रंग जीनच्या कमजोर पडल्याने येतो. याला पिगमेंट जीन असंही म्हणतात. वाघांमध्ये SLC45A2 नावाचा पिगमेंट जीन असतो. हा जीन घोडे, कोंबड्या आणि माश्यांमध्येही आढळतो. पण वाघांमध्ये जेव्हा या जीनचा एक स्ट्रेट कमजोर पडतो तेव्हा याचा रंग पिवळा किंवा नारंग येत नाही. काळ्या रंगाच्या पट्ट्यांवर काही प्रभाव पडत नाही. वाघ पांढरा रंग आणि काळ्या पट्ट्यांसह व्हाइट टायगर बनतो.

भारतात पांढऱ्या रंगाच्या वाघांच्या नोंदी  15 व्या शतकात केल्या गेल्या होत्या. भारतातील एका जंगलात फिरत असलेल्या पांढऱ्या वाघाला 1958 मध्ये शिकार करून मारण्यात आलं,तेव्हा या वाघाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. भारतात 1951 मध्ये मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात एक मादा पांढरा वाघ मोहन पकडण्यात आला होता. असं मानलं जातं की, सध्या देशात जेवढे पांढरे वाघ आहेत ते त्याचेच वंशज आहेत. त्यासोबत ब्रीडिंग सेंटरवर मोहनकडून अनेक वाघिणींना गर्भवती करण्यात आलं. त्यातून देशात पांढरे वाघ जन्माला आणले गेले होते. 18 व्या शतकात साधारण 50 पांढरे वाघ भारतीय जंगलांत असल्याच्या नोंदी गॅझेटमध्ये आहे. 1892 ते 1922 च्या दरम्यान ओरिसा, आसाम, कूच बेहार यांसारख्या ठिकाणी पांढरे वाघ मारणे अतिशय नियमीत होत होते. यादरम्यान, एकट्या बिहार प्रांतात 15 पांढरे वाघ मारून, त्यातल्या काहींची मुंडकी ट्रॉफी बनवून तत्कालीन कलकत्त्याच्या म्युझीयममधे ठेवण्यात आली. रेवा नरेश गुलाब सिंग यांनी 1920 च्या सुमारास पांढऱ्या वाघाची स्वत: शिकार करून बनवलेली ट्रॉफी पंचम जॉर्जला राजनिष्ठेची खूण म्हणून पाठवली होती, जी अजूनही लंडनच्या राजकिय संग्रहालयात आहे. याच रेवा नरेशांनी नंतर पांढरा वाघ पकडून स्वतःकडे पाळून त्याचं प्रजनन करवून घेतले.

 1959 मध्ये रेवा नरेशांनी पांढऱ्या वाघांची प्रजा वाढवण्यासाठी पकडलेला मोहन वाघ हा बहुतेक सर्व पाळीव पांढऱ्या वाघांचा जनक समजला जातो. मोहन आणि बेगम या केशरी वाघिणीची मुलगी राधा या पिता पुत्री जोडीने अनेक पांढऱ्या पिल्लांना जन्म दिला. या जोडीतील राधा मे 1974 साली मृत्यू पावली. आजही तिला 'फर्स्ट लेडी ऑफ व्हाईट टायगर्स' म्हणून ओळखले जाते. तर मोहन हा वयाच्या 19 व्या वर्षी मृत्यू झाला. याच जोडीच्या राजा आणि राणी या पिल्लांनी दिल्लीच्या संग्रहालयामध्ये, सर्वात जास्त म्हणजे 20 पांढऱ्या वाघांना जन्म दिला. वैज्ञानिक या पांढऱ्या वाघांना अल्बीनो वाघही म्हणत नाहीत. कारण अल्बीनो वाघांचा आकार आणि वजन कमी असते. पण यांचा आकार आणि वजन सामान्य वाघांप्रमाणेच असते. ब्रीडिंट सेंटरवर प्रयत्न हा असतो की, आता व्हाइट टायगरकडून कमी ब्रीडिंग केली जावी. कारण यांच्यात अनेक प्रकारचे आजार असतात. याने वाघांच्या पुढील पिढीला नुकसान पोहोचण्याची भीती आहे.

मात्र चीनमध्ये पेकिंग यूनिव्हर्सिटी बायोलॉजिस्ट शुजिन लुओ म्हणाले की, पांढरे वाघ फार दुर्मिळ आहेत. इतर वाघांप्रमाणे यांनाही सुरक्षित ठेवलं पाहिजे. हे खरं आहे की, यांच्या आत नैसर्गिकपणे एक जीन कमजोर आहे. पण याचा अर्थ हा नाही की, याच्या संरक्षणावर आपण लक्ष देऊ नये. हे भविष्यात वाघांची नवीन प्रजाती विकसित करण्यात सक्षम आहेत. सोबतच बंगाल टायगर्सच्या प्रजातीचं संतुलन ठेवण्यातही मदत होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment