Wednesday, April 28, 2021

पाणी वाचवायला हवं


आपण सुरुवातीपासूनच पाणी साठवत आलो आहोत.  परंतु आधुनिक जीवनशैलीने नैसर्गिक स्त्रोतांच्या संवर्धनाची कल्पना केवळ काही स्वयंसेवी संस्था आणि सरकारांपर्यंत मर्यादित करून टाकली आहे. असं आपल्या अजिबात वाटत नाही की पाणी, हवा, जमीन किंवा इतर नैसर्गिक संसाधनांनाही मर्यादा असतात आणि ते कायम टिकणारे नाहीत. वास्तविक आपल्याला जर शिकायचं असेल तर आपण आपल्या इतिहासात डोकावून पाहायला हवं.

आदि युगात आपल्याकडे पुरेसे पाणी होतं, तरीही त्या काळात जलसंधारणाची पुरेशी व्यवस्था केली गेली होती आणि त्याच पद्धतींमध्ये थोडा बदल करून आज आपण पाण्याच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणात मुक्त होऊ शकतो.  जलसंधारणाच्याबाबतीत भारताला एक उत्कृष्ट इतिहास आहे.  येथे जल संवर्धनाची एक मौल्यवान पारंपारिक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, जी केवळ ओळखली जाण्याचीच नाही, तर ती आपण अंगीकारलीही जाण्याची आहे.

वैदिक कालखंडात पाण्याची साठवण नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही प्रकारे केली गेली.  सध्याची परिस्थिती पाहिली तर पाण्याचे व्यवस्थापन हे देशाच्या अर्थव्यवस्थेशी आणि सामाजिक व्यवस्थेशी निगडित आहे.  यावर कृषी, औद्योगिक आणि तांत्रिक प्रगती अवलंबून आहे.  भारतातील भूजल जलविज्ञानाचा विकास पाच हजार वर्षांहून अधिक जुना आहे.  वैदिक साहित्यात याचा पुरावा आहे.  त्यामध्ये इंद्र, वायु, अग्नि इत्यादि विविध देवतांची श्लोक, सूत्र आणि स्तुती म्हणून पूजा केली जाते.  प्राचीन भारतीय संस्कृतीत 'पाणी म्हणजे जीवन आहे' हे सिद्धांत मांडले गेले आहेत.

वैदिक साहित्यात वारंवार पाण्याचे स्रोत, पाण्याचे महत्त्व, तिची गुणवत्ता आणि संवर्धनाविषयी वारंवार चर्चा केली गेली आहे.  वैदिक कालखंडात पाण्याचे व्यवस्थापन मोठ्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने केले जात असे.  चरक संहितामध्ये भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेचीही चर्चा आहे.  वृहत संहितेच्या चौपन्नाव्या अध्यायात झाडे, प्राणी, जमीन आणि खडकांशी संबंधित विशेष संकेतक व विहिरी खोदण्याच्या पध्दतीचे वर्णन आहे, ज्यामुळे जमिनीखाली पाणी प्रकट होते.  निसर्गात अशी काही झाडे आहेत, जी जमिनीखाली पाणी असल्याबाबत माहिती देतात.  आजचे पर्यावरणीय विज्ञान आणि वराहमिहीरचे पारंपारिक विज्ञान यांच्यातही एक संबंध आहे.  निसर्गाने पृथ्वीवर एकाहत्तर टक्के पाण्याची व्यवस्था केली आहे.  एवढेच नाही तर आपल्या शरीराचा सदुसष्ट टक्के भाग पाण्याने व्यापला आहे.

पाणी ही जीवनासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे.  पण आज त्याचे स्रोत कमी होत आहेत. आज जगाला  सुरक्षित आणि ताज्या पाण्याच्या स्त्रोतांची गरज आहे.  पिण्याचे पाणी आणि स्वच्छता, सुविधा, आरोग्याचे रक्षण या गोष्टी मूलभूत गरजांपैकी एक आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा आणि स्वच्छता हे सर्व लोकांच्या आरोग्यासाठी आणि विकासाच्या समस्यांसाठी राष्ट्रीय आव्हान बनले आहे.  भूगर्भातील पाण्याच्या गुणवत्तेतही सातत्याने घट होत आहे.  एका अंदाजानुसार, दूषित पाणी देशातील चौदा लाखांपेक्षा जास्त वस्त्यांमध्ये पोहोचते आहे.  प्रश्न असा आहे की या लोकांना शुद्ध पाणी कसे मिळणार?

इतर देशांप्रमाणेच भारतातील पाण्याचे संकटही गंभीर आहे.  पारंपारिक जल स्त्रोत जसे की तलाव आणि सरोवरे जलद शहरीकरणामुळे नष्ट झाले आहेत.  केंद्रीय भूजल मंडळाने विविध राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून हेही स्पष्ट झाले आहे की, या राज्यांची भूजल पातळी वर्षाकाठी वीस सेंटीमीटर दराने कमी होत आहे.  भारतात सध्या दरडोई पाण्याची उपलब्धता दोन हजार घनमीटर आहे.  परंतु जर परिस्थिती तशीच राहिली तर पुढील दोन दशकांत पाण्याची उपलब्धता दर व्यक्ती एक हजार पाचशे घनमीटरपर्यंत कमी होईल.  एक हजार सहाशे ऐंशी घनमीटरपेक्षा कमी पाण्याची उपलब्धता म्हणजे धोकादायक परिस्थिती हे लक्षात घ्यायला हवे. 

भूगर्भातील पाण्याच्या अतिवापरामुळे पारंपारिक पाण्याचे स्त्रोत कोरडे होत आहेत.  पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी 97.5 टक्के पाणी समुद्री आहे. हे समुद्री पाणी खारट असल्याने आमच्यासाठी निरुपयोगी आहे.  उर्वरित अडीच टक्के पाणी गोड आहे.  परंतु त्यातील चोवीस दशलक्ष घन किलोमीटर भूगर्भातील पाणी सहाशे मीटर खोलीवर अस्तित्त्वात आहे आणि सुमारे पाच लाख घन किलोमीटर पाणी अशुद्ध आणि प्रदूषित झाले आहे.  म्हणजेच पृथ्वीवर  असणाऱ्या एकूण पाण्यापैकी केवळ एक टक्का पाणी उपयुक्त आहे.

जगातील आठ अब्ज लोकसंख्येसह सर्व प्राणी आणि वनस्पती जगताला या एक टक्का पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहेत.  सिंचन, शेती आणि सर्व उद्योग या गोष्टी गोड्या पाण्यावर चालतात.  साहजिकच, आगामी काळात पाण्याचे संकट अधिक गंभीर रूप धारण करणार आहे.  यामुळे देशात अन्न-धान्याचे संकट निर्माण होईल, उद्योग संपतील, स्थलांतर, बेरोजगारी वाढेल व परस्पर संघर्षांना चालना मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल.  भारतात जगातील एकूण गोड्या पाण्यांपैकी अडीच टक्के पाणी उपलब्ध आहे, त्यातील एकोणनव्वद टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते.

सध्याला देशातील सर्व भागात जल व्यवस्थापन विषयक कामे तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.  यासाठी आपल्याला कृषी क्षेत्रापासून सुरुवात करावी लागेल, कारण शेतीमध्ये पाण्याचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जातो.  पाण्याचा गैरवापर ही सिंचनाची गंभीर समस्या आहे.  सामान्य धारणा अशी आहे की जास्त पाणी वापरल्यावर जास्त उत्पन्न मिळते, जे खरेतर चुकीचे आहे.  पिकाच्या उत्पादनात सिंचनाचा वाटा पंधरा-सोळा टक्के आहे. ठिबक सिंचन, तुषारसिंचन तंत्रांचा आणि शेतातील सपाटीकरण यांद्वारे पाण्याचा गैरवापर किंवा नासाडी रोखता येते.  पिकांना जीवन-रक्षक किंवा पूरक सिंचन देऊन उत्पन्न दुप्पट करता येते. यासाठी आणखीही काही प्रयोग करता येतील. मोठ्या आणि छोट्या सर्व कृषी क्षेत्रासाठी तलाव किंवा पाण्याचे साठे तयार करणे आवश्यक आहे.  गाव पातळीवर मोठ्या तलावाचे बांधकाम करणे गावासाठी उपयुक्त आहे, यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होईल. पावसामुळे देशातील सुमारे पंचाहत्तर टक्के भूगर्भातील पाण्याची कमतरता दूर करता येते.  देशातील वेगवेगळ्या पर्यावरणीय झोननुसार अंदाजे 30 दशलक्ष हेक्टर पाण्याचा साठा केला जाऊ शकतो.  शेतीनंतर उर्वरित अकरा टक्के पाणी मानवी वापरासाठी आणि उद्योगांसाठी वापरले जाते.

भारत पाण्याचा जागतिक स्त्रोतांचा सर्वात मोठा ग्राहक आहे. संपूर्ण जगात  भारतात पाण्याचा सर्वाधिक वापर करण्याचे प्रमाण तेरा टक्के आहे.  भारतानंतर चीन बारा टक्के आणि अमेरिका नऊ टक्के वापरतो.  एका अहवालानुसार, 2050 पर्यंत अनेक भारतीय नद्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार आहे.  दरवर्षी पाऊस आणि बर्फातून वाहणार्‍या नद्यांमधून भारताला सरासरी चार हजार अब्ज घनमीटर पाणी मिळते.  भारतात साडेचार हजाराहून अधिक धरणे असून यांची साठवण क्षमता दोनशे वीस अब्ज घनमीटर आहे. यात लहान सहान जलस्रोतांचा समावेश नाही. ज्यांची क्षमता 810 अब्ज घनमीटर इतकी आहे. तरीही आमची दरडोई साठवण क्षमता ऑस्ट्रेलिया, चीन, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, स्पेन आणि अमेरिकेपेक्षा खूपच कमी आहे.

 प्राणी जगतासाठीही पाणी आवश्यक आहे.  म्हणूनच, नैसर्गिक स्त्रोत नष्ट होऊ नयेत, म्हणून काळजी घेतली पाहिजे. पर्वत,जलस्रोत आणि वने यांना एकाच सूत्रात बांधले जाणे फार महत्वाचे आहे. त्यातूनच जलसंधारण शक्य आहे.  म्हणूनच जंगले आणि नद्या वाचविणे आवश्यक आहे, कारण या दोन्हीमुळेच पिण्याचे पाणी आणि पुरेसे शुद्ध वातावरण मिळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment