Tuesday, April 13, 2021

देशाचा खरा नायक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात 'नायक सरां' च्या कामाची प्रसंशा केली आणि सिलू नायक संपूर्ण देशभर प्रसिद्ध पावला.  शेकडो युवकांमध्ये आणि त्यांच्या हजारो आप्त-स्वकीयांमध्ये त्याने आधीच सन्मान मिळवला होता. ओरिसातील अराखुडा  ही त्याची जन्मभूमी. त्याची बालपणापासूनच लष्कराची वर्दी घालून देशाची सेवा करावी आणि समाजाच्या कामी यावं, ही मनीषा होती. देशातील लोकांमध्ये सैनिकांविषयी आदर-सन्मान आहे, हीच भावना नायकाला कायम प्रेरणा देत राहिली. लष्करात जाण्यासाठी तो स्वतःला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त ठेवण्याच्या कामाला लागला. निवडप्रक्रियेसंबंधीत  लागणारी सर्व शारीरिक मेहनत तो नियमित करू लागला. पण सर्वांना मनासारखं कुठं मिळतं? त्याची उंची 168 सेंटीमीटर होती,पण भरतीसाठी 169 सेंटीमीटर हवी होती. नायकाला तो भरतीयोग्य नसल्याचं सांगण्यात आलं. परंतु त्याला ओडिशा इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्सेज (ओआयएसएफ) मध्ये नोकरीचा प्रस्ताव दिला गेला. 7 हजार 200 रुपये मासिक पगार.यातून त्याचे आणि समाजाचे भले कसे होणार? त्याने नोकरीचा प्रस्ताव नम्रपणे नाकारला.

गेल्या पाच वर्षांपासूनची मेहनत वाया गेली. सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. या निराशेतून बाहेर यायला त्याला जवळपास तीन महिने लागले. मन शांत आणि स्थिर झाले. मग त्याने विचार केला, मातृभूमी आणि समाजाची सेवा करण्याचे आणखीही काही पर्याय आहेत. मग अशा पर्यायांचा शोध सुरू झाला. आपण आतापर्यंत जे काही कौशल्य आत्मसात केलं आहे, त्या आधारावरच काहीतरी करू शकू, असं त्याला वाटलं. शेवटी त्याने निर्धार केला की, आपल्याच परिसरातील मुलांना लष्करात भरती होण्यासाठी मार्गदर्शन करायचं.

नायकाने गावातील काही मुलांना सोबत घेऊन मोफत अकॅडमी सुरू केली. पण त्याला लवकरच जाणीव झाली की, हे काम वाटतं तितकं सोपं नाही. गावातील काही विघ्नसंतोषी लोकांनी त्याच्या हेतूविषयी गैरसमज पसरवायला सुरुवात केली. नायकाला पैसे कमवायचे आहेत आणि आज ना उद्या तुमच्याकडून पैसे वसूल करेल, असे सांगितले जाऊ लागले. काहींनी त्याच्या प्रयत्नांना  अन्य गैरमार्गाशी जोडले. नायकाला अपार दुःख झालं. तो तर आपली देशभक्ती या युवकांच्या माध्यमातून जगू पाहात होता. यात त्याने फक्त निखळ देशभक्ती पाहिली होती. 

आजदेखील त्याचा कुठला एनजीओ नाही. ना कुठल्या सरकारी मदतची अपेक्षा. आजही तो कुणाकडून एक पैसा फी घेत नाही. त्याच्या हेतुमध्ये कुठली खोट नाही,त्यामुळे त्याला होणारा विरोध आपोआप मावळला. तो त्याच्या स्वप्नात गढून गेला.

सुरुवातीला युवकांचा विश्वास कमीच होता. काही दिवसांतच काही युवकांनी त्याची साथ सोडली. त्यांना प्रेरित करण्यासाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागले.त्याने  विद्यार्थ्यांना फरक जाणून घेण्यासाठी फक्त वीस दिवसांचे ट्रेनिंग घेण्याचे आवाहन केले. हळूहळू नायकाच्या कष्टाला फळ येऊ लागले. गावातल्या ज्या काही युवकांना सोबत घेऊन आपला नवा प्रवास सुरू केला होता,त्यातल्या चार युवकांची लष्कर भरतीत वर्णी लागली. साहजिकच ट्रेनिंग घेण्यासाठी शेजारील गावांतील युवकांचा ओढा वाढला. सगळेच आर्थिक दृष्टीने फकीर. मात्र त्यांच्यात आयुष्याला ध्येय देण्याची प्रबळ इच्छाशक्ती होती. पण त्यांना मार्ग दाखवणारा नायक नव्हता. त्यामुळे युवक निराश होऊन भरकटत. आता त्यांना नायकाच्या रूपाने गुरू भेटला. 

नायक त्यांना फक्त शारीरिक प्रशिक्षण देत नाहीत तर ज्यांचं गणित कच्च आहे आणि 'करंट अफेअर्स'मध्ये अडचणी येतात, अशांसाठी त्याने एक अभ्यासक्रमच तयार केला. त्याच्या ट्रेनींगचे पाहिले सत्र पहाटे साडेपाचला सुरू होते. दोन तास शारीरिक मेहनत घेतली जाते. संध्याकाळच्या सत्रात परीक्षा ,मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व विकास यातल्या बारकाव्यांकडे लक्ष दिले जाते. आतापर्यंत त्याने 300 पेक्षा अधिक युवकांना प्रशिक्षण दिले आहे. यातले 70 युवक यशस्वी झाले आहेत. त्यातील 20 युवक तर लष्करात सर्वोच्च पदावर पोहचले आहेत.

सिलू नायकचा घरगाडा वडिलांची शेती आणि स्वतः ची पार्ट टाइम ड्रायव्हरी यावर चालतो. आता त्याला सैन्यात भरती न झाल्याची खंत नाही. त्याने मातृभूमीच्या सेवेसाठी अनेक नायक तयार केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात- आपण सगळ्यांनी मिळून नायक सरांना शुभेच्छा देऊया की, त्यांच्याकडून देशासाठी अधिक नायक तयार होतील.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment