Saturday, April 17, 2021

यंदाही भारतावर पावसाची कृपा


जागतिक हवामान बदलामुळे भारतातील मान्सुनचे गणित बिघडत चालल्याचे म्हटले जात आहे. एकीकडे कोरोनाचे संकट संपूर्ण देशात तीव्र आणि अधिक गडद होताना दिसत आहे. तर, दुसरीकडे पीकांची वाहतूक, वितरण आणि विक्रीसाठी निर्बंध आल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळत आहे. मात्र, या सर्व परिस्थितीत भारतीय हवामान विभागाने बळीराजासाठी दिलासादायक माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज केंद्रीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. याशिवाय अन्य खासगी संस्थांनी शेतकऱ्यांना आनंदांची वार्ता दिली आहे. भारतीय शेती आणि अर्थव्यवस्था यांसाठी  अत्यावश्यक असलेला मान्सूनचा अंदाज  दिलासादायक आहे.

भारतीय हवामानशास्त्र  विभाग आणि गेल्या काही वर्षांपासून खासगी व  परदेशांतील संस्था मान्सूनचा वेध घेत असून,  या सर्वांच्या अनुमानात मोठी तफावत नसल्याचे  आढळून आले आहे; त्यामुळे 'स्कायमेट वेदर'  या संस्थेने वर्तविलेला १०३ टक्के  पावसाचा अंदाज  गांभीर्याने घ्यायला हवा.  तिन्ही बाजूंनी समुद्र  धावते आणि हिमालय पर्वतरांगा  या विशिष्ट भूगोलामुळे  जग मान्सूनचे वरदान भारताला लाभले आहे. दर वर्षी जून  ते सप्टेंबर या चार महिन्यांत हमखास पाऊस  पडतो. पाऊसमान कमी-जास्त होते आणि  त्यामुळे कधी दुष्काळाची, तर कधी पूरस्थिती निर्माण होते. कधी कधी देशाच्या एका भागात  अवर्षण आणि दुसऱ्या भागात अतिवर्षा अशा  दोन्ही एकाच वेळी असतात.

देशात मोठ्या  प्रमाणावर उद्योग निर्माण झाले असले, तरी  आजही आपली अर्थव्यवस्था शेतीवर आणि  शेती पावसावर अवलंबून आहे; त्यामुळे चांगला  मान्सून होणे ही अर्थव्यवस्थेची गरजच बनली आहे. इतकेच नाही, तर देशाच्या बहुतेक भागांत पिण्याच्या पाण्यासाठीही पावसावरच अवलंबून राहावे लागते. म्हणूनच समाधानकारक मान्सूनचा अंदाज सवांसाठीच आनंदवार्ता घेऊन येणारा ठरतो. गेल्या दोन वर्षांपासून देशात सरासरीइतका पाऊस होतो आहे. किंबहुना महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, बिहार, आसाम आदी अनेक राज्यांतील काही भागांत गेली दोन वर्षे पूरस्थिती निर्माण झाली आहे. चांगल्या पावसामुळे शेतीचे उत्पादन वाढले आणि पिण्याच्या पाण्याची सोय झाली. महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यांत एरवी जानेवारीपासूनच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागते. गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईची स्थिती गंभीर झालेली नाही. गेल्या वर्षी आणि यंदाही करोना साथरोगाचे संकट असून, संसर्ग रोखण्यासाठी सारी यंत्रणा झटते आहे. या काळात दुष्काळ नसणे, हे निसगांचे अनुकूल दानच म्हणावे लागेल. यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये अनुक्रमे सरासरीच्या १०६ टक्के, ९७ टक्के, ९९ टक्के आणि ११६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

यंदाच्या पावसाच्या मौसमात पावसाचा अंदाज हा सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के दरम्यान लॉग पिरियड एव्हरेज (एलपीए) असा असेल, स्कायमेट वेदर'   ने सांगितले जात आहे.  महाराष्ट्रासह, गुजरात, गोवा यासारख्या राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पॅसिफिक महासागर आणि हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परिस्थितीनुसार हवामान विभागाकडून दीर्घ कालावधीसाठीचा दोन टप्प्यांमध्ये सरासरी अंदाज वर्तवला जातो. 

त्यामुळे पावसाबाबत चिंताजनक स्थिती नसणार, असे दिसते. आपण पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब वाचविण्याचे नियोजन करण्यात आणि सिंचन प्रकल्प राबविण्यात कमी पडत असल्यानेच, पावसावरील अवलंबन वाढले आहे. ते कमी करणे, हीच काळाची गरज आहे. एप्रिल महिन्यात एक आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा अंदाज दिला जातो. दुसरा अंदाज अधिक सविस्तरपणे दिला जातो. यामध्ये देशभरात मान्सूनचा प्रवास कसा राहील, याविषयी सविस्तर माहिती दिली जाते. केंद्रीय हवामान विभागाकडून पावसाचं प्रमाण सामान्य आहे, कमी आहे किंवा जास्त आहे हे ठरवण्याचे काही मापदंड ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार पाऊस आणि मान्सून याचा अंदाज लावला जातो. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

No comments:

Post a Comment