Sunday, August 12, 2012

हॉकीविषयी बोलायची सोयच राहिली नाही

     लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाकडून मोठी अपेक्षा होती. ऑलिम्पिकपूर्वी घेतलेली मेहनत पाहता किमान कास्य पदकाची कमाई करेल, अशी आशा वाटत होती. पण ही आशा तर पार धुळीला मिळालीच, परंतु ऑलिम्पिकमध्ये सर्व लढती गमावून आणखी एक नामुष्की ओढवून घेतली. या लाजिरवाण्या पराभवामुळे लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीची अक्षरशः लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या मानहानीकारक पराभवामुळे हॉकीवर बोलायचे काय, असाच प्रश्न सार्‍यांना पडला आहे.
     ऑलिम्पिकमध्ये एके काळी हॉकीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या भारतीय हॉकी संघाची तिकडे लंडन ऑलिम्पिकमध्ये सर्वच लढतीत धुळधाण झाली असताना इकडे क्रीडा मंत्रालयाने हॉकी हा राष्ट्रीय खेळ नाही, असे सांगून या खेळाची पुरती वासलात लावली आहे. हॉकी संघाने, व्यवस्थापकीय यंत्रणने आणि राजकारण्यांनी या खेळाची अगोदरच वाट लावण्याची व्यवस्था केल्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने त्यावर शिक्कामोर्तब करून सार्‍यांची बोलतीच बंद करून टाकली आहे. या खेळावर आणि या अनुषंगाने येणार्‍या सगळ्या बाबींवरच कुणाची बोलायची इच्छा राहिलेली नाही. अनेकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे इतकी मोठी नामुष्की हॉकी खेळावर ओढवले जावी, ही हॉकीच्यादृष्टीने मोठी दुर्दैवी बाब म्हटली पाहिजे.
     भारतीय हॉकीला गेल्या तीन- चार  दशकापासून जी उतरती कळा लागली आहे, ती कमी व्हायलाच तयार नाही. हॉकीने गेल्या ३२ वर्षात ऑलिम्पिकमध्ये कसलेही यश मिळवलेले नाही. या संघाने १९८० मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये शेवटचे सुवर्णपदक जिंकले होते. बिजिंग ऑलिम्पिकमध्ये तर संघाने पात्रताच गमावली होती. त्यामुळे या खेपेला संघाने काही कमाल करून दाखवली नाही तर हा खेळ लोकप्रियतेच्या दृष्टीने आणखी खाली घसरेल आणि खेळाडूंचा आहे तो ओढाही अटेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. आणि झाले तसेच. वास्तविक प्रशिक्षक मायकेल नॉब्ज यांनीही एक चांगला संघ घेऊन आपण ऑलिम्पिकला चाललो आहोत, असे प्रारंभी म्हटले होते. त्यांनी सरदारासिंहची तर मोठी तारिफ करत त्याची गणना जगातल्या सर्वोत्कृष्ट दोन्-तीन खेळाडूंमध्ये केली होती. नॉब्ज यांच्या मेहनती व खर्चाच्या उधळणीमुळे हॉकी संघ पदकाची कमाई करेल, अशी स्वप्ने भारतीयांनी पाहिली होती. मात्र ज्या भारताने आठ वेळा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केलेला होता, त्याच देशातील हॉकीपटूंना लंडन ऑलिम्पिकमध्ये एक विजयही मिळवता आला नाही, यापेक्षा आणखी ते दुर्दैव कोणते? विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये एकही लढत न जिंकता रिकाम्या हाताने मायदेशी परतण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे. या आधी १९९६ च्या अंटलांटा ऑलिम्पिकमध्ये भारताला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
     ज्या खेळाने भारताला सुवर्णकाळ दिला त्या खेळाची अशी वाताहत होणे, हे भारताच्यादृष्टीने योग्य नाही. भारताच्या प्रतिष्ठेला तो धक्का आहे. खेळाला जिवंत ठेवण्यासाठी भारताने परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या खेळाची दुर्दशा राजकारण्यांमुळे आणि त्यांनी अवलंबलेल्या नीतीमुळे झाली आहे. त्याचबरोबर हॉकीविषयी संकुचित विचार, प्रसारमाध्यमांमध्ये क्रिकेटला मिळणारे अवाजवी महत्त्व यामुळेही हॉकी रसातळाला जात आहे. मधल्या काळात केपीएस गील यांची हकालपट्टी, त्यांच्या जागी असलम शेर खान यांची नियुक्ती किंवा सुरेश कलमाडी यांची इंडियन हॉकी फेडरेशनवर कब्जा करण्याची केलेली राजकीय खेळी आणि त्यातल्या अपयशामुळे समांतर 'हॉकी इंडिया' ची केलेली निर्मिती असा हा घोळ, जोळ  हॉकीला मागे खेचतच राहिला. या सगळ्याचाच परिणाम आपल्यासमोर दिसत आहे.
     शालेय स्तरावरून तर आधीच हॉकी हद्दपार झाला आहे. या स्तरावर आवडच राहिली नसल्याने पुढे त्याचा निभाव कसा लागणार? मोठमोठी माणसे, नेते, चित्रपट कलाकार क्रिकेटच्या बाजूने मैदानात उतरल्यावर गरिबांच्या या खेळाकडे लक्ष कोण देईल? सचिन तेंडुलकरचा खेळ वादातीत आहे. मात्र एखाद्या श्रीमंताच्या तालावर पैशासाठी खेळ करणार्‍या खेळाडूंना भारतरत्नसारखा महनीय किताब द्यायचा कसा, हा मोठा प्रश्न आहे. पूर्वी लोक कोंबड्याच्या झुंजी लावून गंमत पाहात. प्रिमियर लिग हा त्याचाच एक नवा अवतार आहे. कोंबड्याच्या भूमिका पार पाडणार्‍यांना हा पुरस्कार देऊन पुरस्काराचेच अवमूल्यन नाही का? पण तरीही भारतरत्नसाठी सचिनचा आग्रह कायम आहे. का तर तो श्रीमंतांचा खेळ आहे. हॉकी गरींबांचा खेळ. मेजर ध्यानचंद या खेळाशी संबंधित, पण त्यांची दखल कोण घेणार? आता तर देशाला ऑलिम्पिकमध्ये आठ सुवर्ण व एक विश्वविजेतेपद मिळवून देणारा हॉकीच काय पण इतर कोणत्याही खेळास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळालेला नाही. असेही खुद्द क्रीडा मंत्रालयानेच  सांगून टाकल्याने हॉकीची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे.    'राष्ट्रीय' म्हणवल्या जाणार्‍या गोष्टींना हा दर्जा प्राप्त कसा झाला असा प्रश्न लखनऊच्या 10 वर्षांच्या ऐश्वर्या पराशरने माहितीच्या अधिकाराखाली केंद्र सरकारला विचारला होता. सगळीकडूनच हॉकीची अशी अवहेलना होत असताना हॉकी संघानेही  पराभवाची नामुष्की पदरी पाडून घेऊन त्यात आणखी भरच घातली आहे. त्यामुळे हॉकीचा भरवसा आता सगळ्यांनी दैवावर सोडला आहे. कुणालाच हॉकीविषयी बोलायची इच्छा राहिलेली नाही.  मग हॉकीला चांगले दिवस येणारच नाहीत काय? इतिहासाची पुनर्रावृत्ती होते म्हणतात. हॉकीच्या गतवैभवाची पुर्नरावृत्ती  होणार नाही?     

No comments:

Post a Comment