Wednesday, August 22, 2012

लोकशाहीतले नवे नवाब

   हा किस्सा गेल्या महिन्यातला म्हणजे जुलैमधला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरन आणि त्यांच्या अधिकार्‍यांना 'सेना दिवस' च्या कार्यक्रमाला जायचे होते. जाता जाता त्यांना कॉफी प्यावीशी वाटली. ते रस्त्यालगतच्या एका कॉफी हाऊसमध्ये घुसले. तिथे खूपच गर्दी होती. तिथल्या महिला वेटरला त्यांनी विचारले, 'कॉफी मिळेल का?' तर तिने सांगितले की,  मी दुसरे ग्राहक पाहते आहे. थोडा वेळ  वाट पाहावी लागेल. त्यांनी दहा मिनिटे वाट पाहिली तरीही तिने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी ते दुसर्‍या रेस्टारंटमध्ये गेले. तिथे त्यांना ओळखले गेले. त्यामुळे तिथे त्यांची शाही बडदास्त करण्यात आली. जेव्हा हा प्रकार शीला थॉमस या महिला वेटरला कळला, तेव्हा तिने त्यांची माफी मागितली.
     ब्रिटनमधल्या प्रसारमाध्यमांनी किश्श्यावरून बराच हंगामा केला. त्यांच्या लोकप्रियतेबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. ब्रिटनच्या पंतप्रधानांना  साधी महिला वेटरसुद्धा  ओळखत नाही, असा कांगावा त्यांनी चालवला. याअगोदर इटलीतल्या एका महिला वेटरने पंतप्रधान कॅमरन आणि त्यांच्या पत्नीला आपण कामात खूप बिझी आहोत, त्यामुळे आपल्याला जेवण देऊ शकत नाही, अशी हतबलता व्यक्त केली होती.
     कॅमरनबाबतचा आणखी एक किस्सा ब्रिटनमधल्या मिडियामध्ये चर्चेचा आणि गप्पांचा विषय झाला आहे. हा किस्सा वरील घटनेच्या अगोदरचा आहे. पंतप्रधान कॅमरन आपल्या कुटुंब आणि  आपल्या मित्र-परिवारांसोबत एका रेस्टारंटमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यावर परतताना ते चक्क आपल्या मुलीलाच तिथे विसरले. माध्यमांनी हा विषय चांगलाच रंगवला. कॅमरन दाम्पंत्य आई-वडील म्हणण्याच्या लायकीचे नाहीत, असा शेरा  मारत त्यांनी  त्यांची खूप टर उडवली. पण झालं होतं असं की, कॅमरन आणि त्यांच्या मित्रांच्या अनेक गाड्या तिथे होत्या. त्यांना वाटलं की ती कुठल्या तरी एका गाडीत बसली असेल. पण जेव्हा त्यांना कळले की, आपली मुलगीच तिथेच राहिली आहे, तेव्हा ते पुन्हा तिथे मुलीला आणायला गेले. तिथल्या रेस्टारंटवाल्यांनी पंतप्रधानांच्या मुलीला तोपर्यंत व्यवस्थित सांभाळून ठेवले होते.
     ब्रिटनच्या प्रसारमाध्यमांनी यावर काहीही टिकाटिपणी केली असली तरी भारतीयांसाठी मात्र हा मोठा संदेश आहे. पंतप्रधानाने सामान्य नागरिकांप्रमाणे हिंडावे- फिरावे, रेस्टारंटमध्ये जावे, मनासारखे पण  सामान्यांप्रमाणे खावे-प्यावे, सामान्य नागरिकांप्रमाणे चुका कराव्यात आणि त्यांना  वागणूकही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे मिळावी. ही कल्पनाच आम्हां भारतीयांना सहन होणारी नाही. आपल्या देशाचे पंतप्रधान तर दूरच पण अन्य मंत्रीगण, मुख्यमंत्री, उच्चाधिकारी आणि एवढेच नव्हे तर जिल्ह्याचा कलेक्टर किंवा जिल्ह्याचा  पोलिस अधिक्षक यांच्या भोवतीने खालच्या अधिकार्‍यांचा- कर्मचार्‍यांच्या भोवतीचा गराडा पाहिला कुठे इंग्लडचा पंतप्रधान आणि कुठे आमचा जिल्ह्याचा अधिकारी असा प्रश्नच पडतो. दिल्ले तर दूरच राहिली. त्यांच्याभोवतीचा लवाजमा पाहिला की, नवाबांचा रुबाब फिका वाटावा. या मंडळींचा सर्वसामान्य नागरिकांशी संबंधच येत नाही.   ब्रिटनच्या पंतप्रधानाबाबत घडणारी घटना आपल्याकडे स्वप्नातसुद्धा पाहायला मिळणार नाही.
     आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी  पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा मंत्री जातातत्या त्या ठिकाणची रहदारी अगोदरच बंद करण्यात येते. ही मंडळी तिथून जात नाहीत, तोपर्यंत त्याठिकाणचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले असते.      लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. भारतातल्या सामान्य नागरिकांना त्यांना पाहायचं तर दूरच पण बोलणं, भेटणंसुद्धा नशिबी नसतं. अलिकडच्या काही वर्षांपासून तर सुरक्षितच्या नावाखाली ही 'व्हीआयपी' मंडळी अधिकच पोलिसांच्या गराड्यात वावरत असतात. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि मंत्री- संत्री यांच्या संरक्षणाच्या नावावर या गरिब देशातले अब्जावधी रुपये उधळले जात आहेत. दहशतवादाचा धोका असल्याचे कारण पुढे करीत या गोष्टीचे समर्थन केले जाऊ लागले आहे. पण हा धोका ब्रिटनमध्ये नाही काय? असा प्रश्न पडतो.  उलट आपल्यापेक्षा अधिक ब्रिटन जगभरातल्या दहशतवादांच्या हिटलिस्टवर आहे. मग ब्रिटनमधील पोलिस किंवा सुरक्षा यंत्रणा पंतप्रधानांच्या सुरक्षेची व्यवस्था करीत नाही काय? पण सुरक्षा आणि देखरेख ही गोष्ट वेगळी आणि राजा-महाराजांसारखा संरक्षणाचा लवाजमा म्हणजेच हत्यारबंद सुरक्षारक्षक, नोकर आणि हुजर्‍यांची फौज घेऊन मिरवणे, ही गोष्ट निराळी.
     आपल्या देशात ही नवी पण तितकीच 'व्हीआयपी संस्कृती' बनली आहे. 'व्हीआयपी' हा असा शब्द केवळ अडाणीच नव्हे तर शेंबडं पोरगं समजू लागला आहे. कारण याचा जागोजागी प्रत्यय येत असतो. या संस्कृतीची आपल्याला इतकी सवय लागली आहे की, याचे आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. स्वत; ला 'व्हीआयपी' समजणाराही याला सरावला आहे. कुणालाच याविषयी काही बोलावसं वाटत नाही. इतका हा लाचारीपणा आपल्या रक्तात भिनला आहे.  ही संस्कृती पुरान्या सामंत, नवाबाच्या युगापासून आणि  इंग्रजाच्या राजवटीपासून चालत आलेली आहे. इंग्रजाच्या देशात स्वीकारार्ह नसलेला राजा-महाराजांसारखा थाटमाट आणि लवाजमा तत्कालीन   भारतातले व्हाईसराय आणि इंग्रज अधिकारीसुद्धा गुलामगिरीच्या बाळगून राहत होते. खरे तर लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांमधून लोकांच्या कल्याणासाठी निवडून दिलेला असतो. त्याने लोकांचा सेवक म्हणून त्यांच्यात मिसळून लोकांसाठी काम करावयाचे असते. इथे लोक हेच सर्वस्व असतात. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन चालवणारा नोकरवर्ग यांची निवड किंवा नेमणूक लोकांच्या कल्याणाकरता केलेली असते. पण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात नेमकी उलटी परिस्थिती आहे. निवडून दिलेले 'दादा', 'बाबा' होऊन बसतात तर नोकरवर्ग लोकांनाच 'नोकर' समजून त्यांना वागणूक देत असतो. लोप्रतिनिधींचा यांचा थाटच वेगळा असतो. एकदा निवडून गेला की त्यांचा आणि लोकांचा संबंधच तुटतो. त्यांच्यात मोठी दरी निर्माण होते. ज्यासाठी त्यांना निवडून दिलेले असते, त्यांच्यापासूनच ते दूर जातात. हा प्रकार लोकशाही भावनेदृष्टीने  मोठा घातक ठरत आहे.
     युरोपातल्या नॉर्वेसारख्या आणखी एका देशातला पंतप्रधान सामान्य नागरिकांसारखा गल्लीतल्या सर्वसामान्य घरात राहतो. इतरांसारखाच बाजारहाटही करतो. जवळपास ५० वर्षांपूर्वी समाजवादी नेते डॉ. राममोहन लोहिया यांनीसुद्धा ब्रिटनमधल्या हॉटेलमधल्या महिला वेटरशी चर्चा आनि मुलाखत केल्यानंतरचा एक किस्सा लिहून ठेवला होता. त्यांना त्या महिलेच्या भारताबाबतची माहितीने, विद्वत्तेने चकित करून टाकले होते. यावर त्यांनी संबंधित महिलेला विचारल्यावर तिनं सांगितलं की ती भारतात राहिलेल्या इंग्रज उच्चाधिकार्‍याची पुत्रवधू आहे. एका उच्चाधिकार्‍याच्या घराण्यातली एक  सदस्या  एका रेस्टारंटमध्ये वेटरचे काम करतेहा प्रश्नच पचनी पडत नाही. असल्या गोष्टीची आपल्या देशात याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण तिथे ही गोष्ट सामान्य आहे. या किश्श्यावरून लोहिया यांनी भारतातल्या जातीव्यवस्था, सामंतशाही वृत्तीगरीब- श्रीमंत,  व श्रम याबाबतचा प्रचंड विरोधाभास परखडपणे मांडला होता.
     आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ६०-६५ वर्षे उलटली. पण भारतातली लाचारीची मनोवृत्ती बदललेली  नाही. उलट ती आणखीणच बिकट बनत चालली आहे. या सगळ्या वागणुकीतून आम्ही लोकशाहीतले नवे नवाब तयार करत आहोत. देश कितीही प्रगती करीत असला तरी याबाबतीत आम्ही पुढे न जाता मागे मागे जात आहोत. 

No comments:

Post a Comment