Sunday, August 19, 2012

बालकथा लक्ष्मी येती घरा.

      जंगलाजवळच असलेल्या  एका गावात एक गरीब म्हातारा लाकूडतोड्या राहात होता. त्याला पाच मुलगे होते. म्हातार्‍याची बायको वारली होती. तो आपल्या मुलांसोबत जंगलात लाकडे तोडत असे आणि राजाच्या भांडारात जमा करत असे. बदल्यात प्रत्येक व्यक्तीच्या हिशोबाने शेरभर धान्य मिळत असे. ते रोज चने घेत. घरी आणून भाजून खात. त्यातून जे थोडफार शिल्लक राहत असेते सकाळी न्याहरी म्हणून खायचे. ते इतके आळशी होते की,  अधिक मेहनत करून अधिक कमवावे, हे त्यांच्या गावीही नव्हते. 
     मोठ्या मुलाचे लग्न झाले होते. पण सून माहेरीच होती. गावातले लोक म्हातार्‍याला म्हणायचे," सुनेला का घेऊन येत नाहीस? तुमचे खाय-प्यायचे आबाळ तर थांबतील."
     म्हातारा म्हणायचा," आम्ही इतकी मेहनत करतो तरी आम्हाला पोटभर मिळत नाही. त्यात सुनेला आणून तिला काय खायला घालायचे?"
     परंतु, सुनेच्या घरच्यांनी सारखा तगादा लावल्याने शेवटी म्हातार्‍याला तिला घरी आणणे भाग पडले. सूनबाई घरी आली.  इथली गरिबी पाहून ती फार निराश झाली. घरा- अंगणाचा निव्वळ उकिरडा झाला होता. दारात तण माजले होते. तिथेच सहा चुली मांडल्या होत्या. ते सगळे आपापल्या हिश्शातले चने स्वतः भाजत, कारण दुसर्‍याला आपल्या हिश्शातले जाऊन नये.
     सूनबाईने म्हातारा आणि त्याची मुले जंगलात गेल्यावर सारे अंगण झाडून स्वच्छ केले. गवत-बिवत काढून टाकले. झोपडी झाडून - सावरून लख्ख केली. एक चूल ठेऊन बाकीच्या चुली  तोडून टाकल्या. म्हातारा आणि मुले परत आली तेव्हा घराची साफसफाई पाहून खूश झाले. पण चुली तोडलेल्या पाहून ते संतापले. सगळे ओरडले," चने एका चुलीवर भाजायला किती वेळ लागतो माहित आहे का? तो पर्यंत आम्ही भुकेने मरून जाऊ."
     सूनबाई समजावत म्हणाली," स्वयंपाक मी बनवीन. त्याच्याशी तुमचा काही संबंध नाही. तुम्ही सगळे जाऊन त्या तलावावर अंघोळ करून या. तोपर्यंत जेवण तयार होईल."
     नाईलाजाने चने तिच्या हातात देऊन सगळे तलावावर अंघोळीला गेले. ते क्वचितच कधी सणावाराला अंघोळ करीत. त्यांना उशीर झाला. तिकडे सूनबाईने चने भाजले आणि शेजारणीच्या जात्यावर दळून आणले. त्याचा सातू बनवला.
     म्हातारा आणि मुलगे घरी परतले, तेव्हा सूनबाईने त्यांच्या पानांवर सातू वाढला. भाजलेल्या चन्याच्या जागी सातू पाहून  त्यांना आनंद झाला. पाण्यात सातू मिसळून ते  तिखट्-मिठासह खाल्ल्याने त्यांना त्याची चव फार छान लागली. ते रोज जितके चने फस्त करायचे, त्याच्या निम्मेही ते सातू खाऊ शकले नाहीत. त्यांचे पोट भरले.
 राहिलेला सातू तिने ठेऊन दिला आणि सकाळी पुन्हा खायला दिला. त्यातूनही थोडा सातू शिल्लक राहिला.  दुसर्‍यादिवशी सगळे काम करून आल्यावर त्यांना लगेच खायला मिळाले. कारण सातू तयार होता. त्या दिवशी रोजगारातून  मिळालेल्या चने सूनबाईने दळून आणले.
     तिसर्‍यादिवशी तिने आजूबाजूच्या शेतातून भाजीपाला तोडून आणला. चन्याचे पीठ मळून त्याच्या भाकर्‍या बनवल्या. भाजी बनवली. मग काय त्यांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. सगळ्यांनी मनसोक्त भाजी-भाकरी खाल्ली.
     दुसर्‍यादिवशी कामावर जाताना सूनबाईने म्हातार्‍याला विचारले," दररोज तुम्हाला राजाच्या भांडारातून  फक्त चनेच मिळतात का?" म्हातारा म्हणाला," नाही. आम्हाला कुठलंही शेरभर धान्य मिळू शकत. पण आम्ही आमच्या सोयीसाठी चने आणतो."
     सूनबाई म्हणाली," तर मग आज तुम्ही निम्मे धान्य आणि निम्मे चने घेऊन या." संध्याकाळी येताना त्यांनी साळी आणि चने आणले तेव्हा सूनबाईने शेजार्‍यांकडील ऊखळीत साळीचा भात  कुटून घेतला. त्याचा भात बनवला. आणि त्यांना भाताबरोबर बेसनाची कढी वाढली. भात-कढी खाऊन सगळे तृप्त झाले. त्यांना सूनबाई देवीसमान वाटू लागली. रोज नवनवीन पदार्थ खायला मिळाल्याने त्यांच्या तब्येतीतही सुधारणा होऊ लागली.            
     त्यांना वाटत होते की, सूनबाई आल्यावर आपल्याच पोटावर गदा येईल. आपल्या हिश्श्याचे खाईल आणि आपल्याला उपाशी ठेवले. पण झाले उलटेच. घरसुद्धा साफ-सुतरे राहू लागले. आणि तिच्या भीतीने सगळे रोज अंघोळ करून टापटिप राहू लागले.
     सूनबाई कधी कधी मसूर, कधी साळी तर कधी गहू आदी मागवत असे. आणि रोज त्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालत असे. कधी भाजी- भाकरी, कधी डाळ्-भात तर कधी कढी-भात. आयुष्यात पहिल्यांदा त्यांना चांगल्या ढंगाचं जेवण मिळू लागले.  ते खूप आनंदी होते.  सूनबाईच्या सांगण्यावरून  ते आता रोज घरासाठीही  लाकडे तोडून आणू लागले. सूनबाई उरलेली लाकडे एकत्रित करत असे. ते आठवड्यातून एकदा बाजारात जाऊन विकत असे आणि त्यातून तेल, तिखट-मीठ आणत असे. हळूहळू तिने काही भांडी, ऊखळ, जाते. पाटा-वरवंटा आदी वस्तू खरेदी करून आणल्या. बघता-बघता घर समृद्धी आली.
     सूनबाई  रोज थोडे थोडे धान्य बाजूला काढून ठेवत होती. एक दिवस ती म्हातार्‍याला म्हणाली," मामंजी, तुमचं वय झालं आहे,  आता हे लाकडे तोडायचे काम बंद करा."
     त्यावर म्हातारा म्हणाला," मग सगळ्यांची पोटे कसे भरणार?"
     "तुम्ही धान्याच्या दुकानावर बसत जा." सूनबाई म्हणाली.  म्हातारा आश्चर्याने म्हणाला,"  दुकान थाटण्याएवढी पुंजी माझ्याकडे कुठे आहे?"
     सूनबाई म्हणाली," मी बरेच धान्य जमा  केले आहे. तेच बाजारात जाऊन विका."
     म्हातार्‍याला गोष्ट पटली. गावात एका कोपर्‍याला  रोज बाजार लागत असे.  तोही तिथे एका झाडाखाली बसून भात, गहू, चने, ज्वारी, वाटाणा, लाकूडफाटा आदी चिजा लावून विकू लागला. रोज चांगली विक्री होऊ लागली. घराच्या समृद्धीत आणखी भर पडू लागली. आता ते सूनबाईची प्रत्येक गोष्ट वेदासमान मानू लागले.
     एकदा राजाच्या खजिन्याची चोरी झाली. चोरांनी खुपसे धनहिरे-जवाहार लुटले.  चोरी करून जंगलात पळून जाण्याचा त्यांचा इरादा होता. जाताना म्हातार्‍याच्या गावात आले. गावाबाहेर असलेल्या म्हातार्‍याच्या झोपडीत एकटी महिला पाहून ते झोपडीत शिरले. तिला धमकावत म्हणाले," खबरदार, जर आरडाओरडा केलीस तर! गप्प राहा, नाही तर इथेच मारून टाकू. आम्हाला भूक लागली आहे. भोजन बनवून दे, आम्ही तुला बक्षीस देऊ आणि निघू जाऊ."
     सूनबाईने मुकाट्याने भात कढी, भाजी बनवली. तिने भाजीच्या बहाण्याने  पुष्कळशी  धोतर्‍याची फुले तोडून आणली. ती तिने भाजीत मिसळली.  एकटी महिला  काय प्रतिकार करणार? असे वाटल्याने दरोडेखोर बिनधास्त होते.  त्यांना भूक लागल्याने ते भरपेट जेवले. जेवणही स्वादिष्ट झाले होते. मात्र  धोतर्‍याच्या नशेमुळे ते तिथेच कोसळले. सूनबाईने सगळ्यांचे हातपाय करकचून बांधले. घराला कुलूप लावले आणि धावत धावत राजाच्या महालात गेली. ओरडून तिने राज्याचे लक्ष  वेधून घेतले आणि सगळा प्रकार राजाला सांगितला.
     राजा स्वतः सैन्यासह म्हातार्‍याच्या घरी आला. दरोडेखोर अजूनही नशेत धूत पडले होते. सगळ्यांना सैनिकांनी ताब्यात घेतले.  आपल्या खजिन्यातला माल सुरक्षित पाहून राजा खूश झाला. त्याने सुनेचे कौतुक करीत तिला एक किंमती हार बक्षीस  दिला. पण सूनबाई हात जोडून  म्हणाली,"महाराज,  हा किंमती हार घेऊन मी काय करू. याबदल्यात मला थोडी फार जमीन द्या. त्यावर आम्ही राबून खाऊ."
     राजाला सूनबाईचे मोठे कौतुक वाटले. त्याने तिला दहा एकर जमीन लिहून देण्याचा आदेश गावच्या प्रमुखाला दिला. शंभर मोहराही बक्षीस म्हणून दिल्या. शिवाय तिच्या नवर्‍याला दरबारात नोकरीही दिली. आणि मग पकडलेले दरोडेखोर आणि खजिना घेऊन तो सैन्यासह निघून गेला. सगळा प्रकार पाहून अचंबित झालेला म्हातारा आपल्या सुनेला  हात जोडून म्हणाला," सूनबाई, तू माझी फक्त सून नाहीस तर माझ्या या घराची साक्षात   लक्ष्मी आहेस."                                                                                            

No comments:

Post a Comment