Sunday, August 19, 2012

बालकथा चिमणीचे घरटे

     एका राजाच्या महालात त्याच्या वडिलांच्या तस्वीरीमागे एक चिमणी आपले घरटे बांधत होती.  ती दिवसभर काट्याकुट्या गोळा करायची. आणायची. तिची सारखी आत-बाहेर धडपड चालली होती. शिवाय तोंडाने सारखी 'चिव चिव' चालायची. तिच्या सततच्या 'चिव चिव' मुळे  राजाची झोप मात्र होत नव्हती. शेवटी त्याने वैतागून नोकरांना घरटे काढून फेकून द्यायला सांगितले. चिमणीला राजाचा राग आला. तिने राजाला धडा शिकवण्याचे ठाणले. ती फणकारतच 'चिव चिव' करत उडाली आणि जंगलात निघून गेली.
     चिमणीला आरडत- ओरडत आल्याचे पाहून  दोघा उंदरांनी तिला कारण विचारले. तिने सारा प्रकार सांगितला. त्यावर उंदीर म्हणाले," आम्ही तुला मदत करू. राजाला धडा शिकवू. त्याने तुझे घरटे मोडले, आम्ही त्याचा महाल तोडू. त्याचा महाल पायासकट ढासळून टाकू."
     चिमणीला आयडिया पसंद पडली. उंदरांनी आपल्या बांधवांना हाक दिली. जंगलातले सारे उंदीर चिमणीच्या मदतीला धावून आले. राजाच्या विरोधात मोर्चा निघाला. वाटेत मधमाशा भेटल्या. म्हणाल्या, चिमणीताई, आम्हीही येणार तुझ्याबरोबर.!" चिमणी म्हणाली," हां, तर चला मग." मग काय खूप सार्‍या मधमाशा तिच्या मागून चालू लागल्या. मोर्चा निघाला. वाटेत मुंग्या, मुंगळे, साप, कुत्री, घोडे, उंट, हत्ती सगळे सामिल झाले. चिमणी सगळ्यांना राजाने घरटे तोडल्याचे सांगायची आणि म्हणायची," मी घमेंडी राजाचा महाल पाडायला निघाले आहे." जंगलातले  सारे प्राणी तिच्यासोबत निघाले. सगळ्यांनी तिला हिंमत दिली.
     चिमणी सगळ्यांना सोबत घेऊन निघाली. जंगल संपल्यावर राजाचा महाल दिसू लागला. चिमणीने आपला दूत म्हणून पोपटाला राजाकडे पाठवले. पोपट राजाला धमकावत म्हणाला," राजा, तू ज्या प्रकारे चिमणीचे घरटे मोडलेस, त्याचप्रकारे आता आम्ही तुझा महाल पाडणार. आमच्याशी सामना करायला तयार हो."
     राजा मोठमोठ्याने हसू लागला. त्याने पोपटाला एक दगड भिरकावून उडवून लावले. तेवढ्यात राजाच्या महालावर कावळे, घारी, गिधड घिरट्या घालू लागले. मग मात्र सारा प्रकार राजाच्या लक्षात आला.  आपल्या सैन्याला   त्याने सगळ्यांना मारून टाकण्याचे आदेश दिले. राजाचे सैन्य अजून पुढे सरकणार तोच त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला चढवला. त्यातच मुंग्यांनी, सापांनी राजाच्या सैन्याला घेरून टाकले. कुत्री त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या अंगाचे लचके तोडू लागले.  हत्ती झाडे उखडून सैन्यावर फेकू लागले. सैन्यांना चिरडू लागले. या जोरदार हल्ल्याने सैन्य घाबरून माघारी पळू लागले. राजाला कळून चुकले, आता याम्च्यापुढे आपला निभाव लागणार नाही. राजा पांढरे निशाण दाखवत त्यांना शरण गेला. चिमणीने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला. राजाला बंदी बनवण्यात आले. राजा भीतीने थरथर कापत होता. त्याने चिमणीची माफी मागितली. म्हणाला," माझ्याकडून चूक झाली. यापुढे तू म्हणशील, तसे करीन."
     चिमणी म्हणाली," माझे घरटे होते तिथे बांधायला सांग." राजाने सैनिकांना आदेश दिला. चिमणी पुढे म्हणाली," माझ्यासोबत आलेले माझे सर्व सखे- सोबती  आता इथेच राहतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था कर." राजा म्हणाला," ठीक आहे. करतो सारी व्यवस्था."
     मग काय चोहोबाजूंनी चिमणीचा जयजयकार सुरू झाला. राजाने पक्ष्यांसाठी फळा-फुलांची झाडे लावली. घोड्यांसाठी तबेल्यांची व्यवस्था केली. हत्ती, उंट सार्‍या प्राण्यांसाठी राहण्याचा बंदोबस्त केला गेला. कुत्र्यांनीही आपल्या राहण्याची व्यवस्था केली. 
     झाले,  तेव्हापासून प्राणी-पक्षी, जीव-जंतू शहरांमध्ये आणि गावांमध्ये राहायला लागले.    

No comments:

Post a Comment