Friday, August 24, 2012

हास्यबहार - मॉर्निंग वॉक? छे छे !

     अलिकडच्या दिवसांत 'मॉर्निंग वॉक' ला जायचा योग आला नव्हता. कसा येणार? सारखा कुणी ना कुणी पाव्हणा-रावळा या न त्या निमित्ताने किंवा निष्कारणाने घरी टपकायचा. खरं सांगू का? एकाच शहरात लग्न कधी करू नये. ऊठ-सुठ बायकांकडल्या मंडळींचा राबता आपल्या घरात. शिवाय काही बोलायची सोय नाही. अवघड जागेचं दुखणं. नुकसानीलाही काही परिसीमा नाही. सगळ्या बाजूनं 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार' सोसायचा. आणि त्यातूनही विरोधाचा एकादा जर 'शब्द' चूकून- माकून अर्थात वैतागाचा कडेलोट झाल्यावर तोंडातून गेला तर आपल्या सात पिढ्यांचा उद्धार झालाच म्हणून समजा. तेवढ्याने निभावले तर नशीब म्हणायचे. नाही तर खाण्या-पिण्यापासून अनेक संकटं चालून आलीच म्हणायची!
     पण आज संधी मिळाली होती. सकाळी सकाळी गजाननराव येऊन धडकले. त्यांनी बाहेरच्या बाहेर अक्षरशः मला ओढून नेलं. आम्ही आमच्या गृहमंत्र्यांनाही सांगू शकलो नाही. तसे आम्ही गजाननरावांना इशार्‍याने सांगितलेही, पण त्यांनी आमच्याकडे आमची खिल्ली उडविण्याच्या दृष्टीनं असं काही पाहिलं कीजणू काय एवढे मर्द असून बायकोला घाबरता! आम्ही मुकाट्याने त्यांच्याबरोबर निघालो. पार्कात गेल्यावर मात्र चोहोबाजूला सृष्टीचा हिरवा गालिचा पांघरलेला पाहून मन कसं प्रफुल्लित झालं. गार वार्‍यासवे झोके घेऊ लागलं. लहान पोरांसारखं हुंदडावं वाटलं, पण हाय रे हमारी किस्मत! त्यानं ५५ व्या वर्षीच आमच्या गुड्घ्याची हवा काढून टाकली होती.
     जाऊ दे, बागेत सगळंच हिरवं-हिरवं होतं. हिरवी, टवटवीत फुलपाखरंही बागेत घिरट्या घालत होती. मुलं-बाळंही टोळी टोळीनं क्रिकेट खेळत होती. गजाननराव म्हणाले," या खेळाइतका खुळचट खेळ कुठला नसेल. कापडं बडवणार्‍या थापीनं चेंडू मारा आणि त्याच्या मागे धावा. आणि यासाठी आकराच माणसं का बरं जीव धोक्यात घालतात कळत नाही. आणि यातनं पडून झडून उद्भवलेल्या आजारांची नावं तर किती विचित्र! टेनीस एल्बोचंच  उदाहरण घ्या. गडी खेळतात क्रिकेट आणि आजार टेनीसचा. "
     आम्ही उभ्या उभ्याच क्रिकेटबद्दलच विचार करत होतो, तेवढ्यात आमच्या डोळ्यांसमोर काळाकुट्ट अंधार पसरला. कुणी तरी विजेचा 'शॉकद्यावा, तसा जोराचा झटका बसला. तोंड धरून आम्ही आमच्या अस्पष्ट डोळ्यांनी पाहिलं की पार्कमधली माणसं आमच्याकडे धावत येत आहेत. आम्ही धाडकन खाली कोसळलो. 'काय झालं... काय झालं...? ' असं काही तरी कानावर आलं आणि आम्ही मूर्च्छित झालो.
     शुद्ध आली तेव्हा पाहिलं तर समोर गृहमंत्र्यांचा काळजी भरलेला चेहरा. आमच्याविषयीची चिंता आम्ही आमच्या उभ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. मनोमन सुखावलो. पण आमचे डोळे उघडताच त्यांनी महिषासुरमर्दिनीचा अवतार धारण केला. डोळ्यांत विस्तव फुलला.    
     गृहमंत्री कडाडल्या," कितीदा बजावलं, आता तुमचं वय हिंडण्या-फिरण्याचं  नाही म्हणून. कुणाला तरी संगतीला घेऊन जायचं. पण नाही! स्वतः ला काय अजून धर्मेंद्र समजता. आणि काय हो! जिथं मुलं खेळत होती, तिथं कशाला तडमडायला गेला होता? तरी बरं, तिथं गजाननभाऊजी 'वॉकिंग' करत होते. त्यांनीच तुम्हाला रिक्षाने घरापर्यंत आणलं."
     आता आम्ही यापुढं काय बोलणार? कसं सांगणार गजाननराव आमच्यासोबत होते. काही सांगितलं असतं तर आमच्या कडकलक्ष्मी त्यांच्यापुढे  जाऊन काही तरी जिव्हारी लागणारं कडाडल्या असत्या.  आम्ही ताडलं, तोंड बंद ठेवण्यातच आपला शहाणपणा आहे.
     पण आता यापुढं पुन्हा कधी आम्हाला 'मॉर्निंग वॉक'ला जाता येईल, असं वाटत नाही.     

No comments:

Post a Comment