Saturday, September 29, 2018

महात्मा गांधीजींचे कुटुंब


     भारताला स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण करणार्या महात्मा गांधीजींबद्दल नव्या पिढीच्या मनातही प्रचंड कुतूहल आहे. अहिंसा, सत्याग्रह याबद्दल जितकी जिज्ञासा लोकांना आहे, तितकीच किंबहुना त्याहून जास्तच त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल, त्यांच्या कुटुंबियांबद्दल ही जिज्ञासा आहे. गांधी कुटुंबातील माणसे कोण कोण आहेत? ते सध्या कुठे आहेत? काय करत आहेत? त्यांच्या कुटुंबातील पुढची पिढी कुठे राहते, काय काय करते. याची उत्सुकता लोकांना प्रचंड आहे. कारण इतक्या महान व्यक्तीच्या पुढच्या पिढीबाबत जास्त बोललं, ऐकलं जात नाही आणि ऐकायलाही येत नाही. आज त्यांचा जन्मदिवस जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो, त्या गांधीजींबद्दल आपल्या देशातच विविध मत-मतांतरे आहेत. त्यांचे जीवन म्हणजे एक गुढ आहेच तसे त्यांच्या कुटुंबियांबद्दलही गुढता कायम राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांबद्दल इथे चर्चा करावी, असे वाटल्याने एवढा लेखन प्रपंच करत आहे.
manilal
      महात्मा गांधीजी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांना चार मुलगे होते. सर्वात मोठा मुलगा म्हणजे हरिलाल. हरिलाल यांचा जन्म महात्मा गांधीजी इंग्लंडला शिकायला जाण्यापूर्वीच झाला होता. हरिलाल भारतातच कस्तुरबांसह आजोबांकडे राहिले. भारतातच मॅट्रिक झाले. तेव्हाच्या रिवाजानुसार वडिलांच्या एका मित्राच्या मुलीबरोबर-गुलाबबरोबर त्यांचा विवाह त्यांच्या लहान वयातच ठरविण्यात आला होता.गांधीजी आणि कस्तुरबा अफ्रिकेत गेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत इकडे तो विवाह झाला. गांधीजींना खरे तर ते अजिबात आवडलेले नव्हते. पण मग गांधीजींनी आपल्या मुलाला आणि सुनेला आफ्रिकेत बोलावून घेतले. करिलालही आफ्रिकेत गांधीजींच्या कार्यात इतका समरस झाला होता की, लोक त्यांना छोटे गांधी म्हणून बोलवत होते. हरिलाल आफ्रिकेत असताना सहा वेळा तुरुंगात गेले होते. संधी आलेली असतानाही गांधीजींनी हरिलाल यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवले नाही. यामुळे ते आपल्या वडिलांवर म्हणजेच बापूंवर नाराज होते.
     1915 मध्ये गांधीजींसोबत हरिलालही भारतात परतले. पुढे ते कोलकात्याला राहायला गेले. तिथेच त्यांचा आणि त्यांच्या पत्नीचा त्या महानगरी जीवनात शेवट झाला. त्यांचा दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार होता. त्यातला एक लहानगा रसिक हा फारच कुशाग्र बुद्धीचा होता.पण टॉयफाईडचे निमित्त झाले आणि त्यातच तो वारला. हरिलाल यांचा दुसरा मुलगा क्रांती. क्रांती डॉक्टर आहेत आणि सेवानिवृत्तीनंतर लोकसेवा नावाचे ट्रस्ट चालवतात. पुण्याजवळ ग्रामीण भागात त्यांनी क्षयरोग्यांसाठी एक हॉस्पीटलही काढले होते. त्यांची पत्नी सरस्वती या केरळच्या. त्यांना दोन मुले आहेत. शांती डॉक्टर आहेत. अमेरिकन पत्नीसोबत अमेरिकेतच राहतात.
गांधीजींच्या मणिलाल, रामदास आणि देवदास या तीन मुलाम्चे जन्म आफ्रिकेतच झाले. ही मुले आफ्रिकेत गांधीजींनी स्थापन केलेल्या आश्रमातच लहानाची मोठी झाली. गांधीजींनी स्वत: च त्यांना शिकवलं. आश्रमाचं वातावरण गुरुकुलासारखं होतं. मनिलाल आफ्रिकेतील सत्याग्रहात भाग घेऊन जेलमध्ये गेले होते. तिथे रामदासदेखील अगदी लहान वयात तुरुंगात गेले होते. देवदास मात्र आफ्रिकेत असताना अगदीच लहान वयाचे होते. आश्रमीय जीवनशैली तिघांनीही लहानपणापासूनच आत्मसात केली होती. तरीही त्यांना क्रिकेट खेळायला फार आवडत असे.
ramadas
1915 मध्ये गांधीजी कुटुंबासह भारतात आले. त्यानंतर धाकट्या दोन मुलांना त्यांनी शिक्षणासाठी सहा महिने शांतीनिकेतनमध्ये तर तीन-चार महिने बनारसच्या अॅनी बेझंट यांच्या संस्थेत पाठवले होते. मणिलाल हे गांधीजींचे दुसरे चिरंजीव पुढे आफ्रिकेतच राहिले. शेवटपर्यंत वर्णभेद लढ्यातही सहभागी होते. मणिलाल यांचा विवाह मश्रुवाला परिवारातील कन्या सुशिला यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली झाल्या सीता आणि इला. दोघीही आफ्रिकेतच आपल्या कुटुंबासह राहतात. आपल्या क्षमतेनुसार जनाअंदोलनात त्यांचा सहभागही असे. मणिलाल यांचे पुत्र अरुण यांनी महाराष्ट्रीयन मुलीशी विवाह केला. त्यांना तुषार आणि अर्चना अशी दोन मुले आहेत.
     गांधीजींचे तिसरे पुत्र रामदास स्वातंत्र्यलढ्यात होतेच. शिवाय बार्डोलीच्या आश्रमाची व्यवस्थाही तेच पाहात असत. ते फार शांत,सज्जन गृहस्थ होते. गांधीजींच्या एका डॉक्टर मित्राच्या मुलीसोबत म्हणजे निर्मलासोबत त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. दोन्ही मुलींना समाजसेवेत आवड आहे. एक मुलगी सुमित्रा कुलकर्णी अहमदाबाद येथे असते. तिलाही राम आणि कृष्णही जुळी मुलं व सोनाली ही मुलगी आहे. रामदास यांची दुसरी मुलगी उषा हरिश गोकाणी मुंबईत असते. अंध व्यक्ती आणि चाइल्ड वेल्फेअरचे काम करते. तिची दोन मुलं आनंद हा डॉक्टर आणि धाकटा वाणिज्य शाखेचे  शिक्षण घेतले आहे.रामदास यांचा एकच मुलगा कनू. तो अॅटोमिक सायंस्टिस्ट आहे. सध्या ते अमेरिकेत असतात. 1969 मध्ये रामदास यांचे निधन झाले. त्यावेळी गांधीजी शताब्दी होती. त्यांच्या पत्नी प्रखर गांधीवादी आहेत आणि सेवाग्राम आश्रमातच त्या राहतात.
harilal
devadas
गांधीजींचे सर्वात धाकटे पुत्र देवदास पत्रकार होते. त्यांनी दक्षिण भारतात दक्षिण भारतात हिंदी प्रचार आणि प्रसाराचं खूप मोठं काम केलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला आहे. त्यांचा विवाह राजगोपालचारींच्या धाकट्या मुलीबरोबर (लक्ष्मी) झाला होता. त्यानम्तर त्यांनी दिल्लीच्या हिंदुस्थान टाइम्सचे काम सांभाळले. हिंदुस्थान टाइम्सला त्यांनी भारतातले एक प्रमुख वर्तमानपत्र म्हणून दर्जा प्राप्त करून दिला.बातम्या पुरवणारी पीटीआय ही संस्था त्यांनीच उभारली. त्यांना तीन मुलगे आणि एक मुलगी. मुलगी तारा भट्टाचार्य आता इटलीत असतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. देवदास गाम्धी यांचा मोठा मुलगा म्हणजे राजमोहन गांधी. तेही पत्रकार आहेत. हिम्मत नावाचे साप्ताहिक चालवत. ते संसद सदस्यही होते. त्यांची पत्नी सिंधी आहे. देवदास यांचे दुसरे पुत्र डॉ. रामचंद्र गांधी आणि त्याम्ची पंजाबी पत्नी इंदू दोघेही दिल्ली विद्यापीठात फिलॉसॉफी शिकवित. देवदास यांचे सर्वात धाकटे पुत्र गोपालकृष्ण गांधी तामिळनाडूत आयएएस अधिकारी होते. त्यांच्या पत्नीही तामिळच्या. त्यांना मुलगी आहे. देवदास यांचा मृत्यू थोडा लवकर झाला. त्यांच्या पत्नी चेन्नईला मुलाजवळ असतात.
     गांधीजींच्या चार मुलांपैकी आता एकही हयात नाही. त्यांची नातवंडे आहेत. त्यांना वाटते की, सामाजिकदृष्ट्या आमच्या कुटुंबातील सदस्यांनी  महात्मा गांधीजींइतके वैशिष्ट्यपूर्ण काही केले नसेल,तरीही त्यांची निदान प्रतिमा लमिन होईल, असे काही केले नाही. सगळे संस्कारीत जीवन जगले. आणि काहीजण जगत आहेत.


No comments:

Post a Comment