Sunday, October 14, 2018

भारताची भूकबळीच्या दिशेने वाटचाल


     ग्लोबल हंगर इंडेक्स 2018 (जीएचआय) चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात आपल्या देशाला भूकबळी करण्यात अपयश आल्याचेच दिसत आहे.यानिमित्ताने  मोदी सरकार देशातील भूकबळी कमी करण्यासाठी उपाययोजना करू शकले नाही, हे यातून उघडपणे दिसत आहे. कारण 2014 मध्ये भारत भूकबळी संपवणार्यांच्या 119 देशांच्या यादीत 55 व्या स्थानावर होता, आता म्हणजे 2018 मध्ये 103 व्या स्थानावर आहे. याचाच अर्थ भारतातल्या बहुतांश लोकांना अजूनही पोटभर खायला अन्न मिळत नाही. त्यात महागाईने तर कहरच केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती तर सातत्याने वाढत आहेत. या किंमत वाढीचा परिणाम अन्य घटकावर होतो आणि साहजिकच अन्य वस्तू, पदार्थ, घटक यांच्या किंमती भडकतात. सध्या हेच सुरू आहे. मोदी सरकार भूकबळींची संख्या कमी करण्यासाठी  नेमकी कोणती भूमिका घेत आहे, हेच कळायला मार्ग नाही.

     नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून भूकबळींची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. भूकबळी संपविणाऱया देशांच्या या यादीत 2014 साली भारत 55 व्या स्थानावर होता. तो  2015 मध्ये या स्थानावरून  80 व्या स्थानापर्यंत पोहचला. पुढे 2016 मध्ये 97 आणि 2017 मध्ये 100 व्या स्थानावर  अशी घसरण भारताची झाली आहे. मात्र, यंदा म्हणजेच 2018 मध्ये भारत या यादीत 103 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जवळपास पन्नास टक्के आपल्या देशाची घसरण ही मोठी लाजिरवाणी गोष्ट  म्हटली पाहिजे. या यादीत आपल्या शेजारचा पाकिस्तान 106 व्या क्रमांकावर आहे. पण, या देशाबरोबरच स्पर्धाच होऊ शकत नाही. ज्या देशासोबत भारत स्पर्धा करतो आहे, तो चीन या यादीत 25 व्या स्थानावर आहे. ही फार मोठी तफावत आहे. अशाने आपला भारत देश महासत्ता बनू शकणार आहे का? या महासत्तेच्या आजूबाजूलाही कोणी फिरकू देणार नाही.
    ही आपल्या देशाची निराशजनक कामगिरी आहे. भूकबळींची संख्या आपण कमी करण्यात कमी पडलो आहे, हे स्पष्ट दिसत असताना मोदी सरकार यावर काय उपाययोजना करते आहे, ही आपल्याला दिसत नाही. ग्लोबल हंगर इंडेक्सकडून आलेल्या अहवालानुसार जागतिक, राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावरील भूकबळीचे आकलन करण्यात येते. या संस्थेकडून 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या किती चिमुकल्यांचे वजन आणि उंची त्यांच्या वयापेक्षा कमी आहे. तसेच यामध्ये बालमृत्यू दर किती, हेही तपासले जाते. त्यानुसार 119 देशांच्या यादीत भारत 103 व्या स्थानावर आहे.गतवषी या यादीत भारत 100 व्या स्थानावर होता. त्यामुळे भुकबळी कमी करणाऱया देशांच्या यादीत भारत मागे पडत चालला आहे.
    केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार देशातील भूकबळींचे आव्हान स्वीकारणार आहे की नाही? का अशीच देशाची घसरण चालू ठेवणार आहे? आपल्या देशात उद्योगपती आणखी गब्बर होत चालले आहेत आणि जनता आणखी गरीब चालली आहे. याच्याने देशात शांतता कशी नांदेल? देशात लूटमार, चोर्या-मार्या होत आहेत. यातील बहुतांश गुन्हे हे पोटासाठीच आहेत. लोकांची त्यांच्या पोटाची शमली की, अशा प्रकारचे गुन्हे निश्चितच कमी होतील. पण मोदी सरकारला गरिबांपेक्षा श्रीमंत उद्योगपतींचा कळवळा अधिक येत असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे. मोदी सरकारने खरे तर यावर तातडीने उपाययोजना करायला हवी आहे.नाही तर अशीच भारताची घसरण होत राहिली तर देशात आराजकता माजल्याशिवाय राहणार नाही.  

No comments:

Post a Comment