Friday, October 21, 2011

बालकथा अधिकार्‍याची लबाडी

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मगध देशातल्या एका गावातले बहुतांश लोक चोर्‍या-मार्‍या करत. दरोडे घालत. अधिकार्‍याला लाच देऊन शिक्षेपासून स्वतः चा बचाव करत. दुर्लक्षामुळे गावात सगळीकडे अस्वच्छता पसरली होती. दुर्गंधी वाढली होती. चोर आणि गावची अवकळा यामुळे गावाची सार्‍या पंचक्रोशीत बदनामी झाली होती.
याच गावात माघ नावाची एक व्यक्ती राहत होती. गावातल्या लोकांना सन्मार्गाला लावण्याचा त्याने संकल्प केला. पहिल्यांदा कुणाचीच मदत न घेता, सारा गाव स्वच्छ करून टाकला. गावात सावली देणारी झाडे लावली. गाव लख्ख , चकचकीत पाहून लोकांनासुद्धा मोठा आनंद झाला. त्याची नि: स्वार्थ सेवा पाहून त्याच्याकडे काही तरुण आकृष्ट झाले. ते सगळे माघच्या नेतृत्वाखाली गावची सेवा करू लागले. एकाला एक करत सगळा तरुण वर्ग यात सामिल झाला. माघच्या कष्टाला, जिद्दीला फळ आले. गावची परिस्थिती सुधारली. गावाने विकासाची वाट धरली. रोगराई पळून गेली. लोकांची मानसिकता बदलली. त्यांनी चोर्‍या-मार्‍या  सोडून दिल्या. गावात सुख-शांती नांदू लागली.
माणसे सुधारल्याने अधिकार्‍याची पंचाईत झाली. वरकमाई बंद झाली. त्याने माघचा काटा काढण्याचे ठरवले. त्याने राजाकडे  जाऊन तक्रार केली. " माहाराज, आमच्या गावात अराजकता माजली आहे. माघ  नावाच्या दरोडेखोराने तरुणांना फूस लावून  आपल्या नादी लावले आहे. या  तरुणांनी सार्‍या गावात धुमाकूळ घातला आहे. हातात हत्यारे घेऊन गावभर हिंडतात व दहशत पसरवात. त्यांच्यामुळे लोकांचा जीव आणि माल  धोक्यात आला आहे. तुम्हाला सुचित करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून कानावर घालायला आलो आहे."
राजाने त्यांना बंदी बनवून  हत्तीच्या पायाखाली देण्याचे फर्मान सोडले.प्रत्यक्षात हत्ती त्यांना काहीही न करता लांब जाऊन उभा राहिला. राजाला  कळल्यावर त्याला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. त्याने त्यांना दरबारात हजर करण्याचे आदेश दिले. माघसह सगळे दरबारात हजर झाले.
" सांगा, हत्ती तुम्हाला का घाबरला ?  तुम्ही कुठला जदूटॉणा जाणता? की मंत्र-तंत्र जाणता ?  सांगा, नाही तर इथेच सार्‍यांचा शिरच्छेद केला जाईल. " राजा संतापून म्हणाला.
माघ पुढे झाला. आणि म्हणाला, "  होय महाराज, आम्ही एक मंत्र जाणतो. आम्ही प्राण्यांची हिंसा न करण्याचा मंत्र जाणतो. कुणाशी वाईट वागत नाही.  प्रेमाने वागतो. दान करतो, रस्ते बनवतो. तलाव खोलतो. हीच आमची शक्ती, हाच आमचा मंत्र."
उत्तर ऐकून राजा बुचाकाळ्यात पडला. त्याने विचारले, " आम्ही ऐकलंय की तुम्ही वाटसरूंना लुटता. हत्यारे दाखवून दहशत माजवता. संपत्ती लुटता. "
" महाराज, आपण कुणाच्या तरी सांगण्यावर विश्वास ठेवला आहात. मात्र त्यातली सत्यता पडताळली नाहीत. " माघ म्हणाला.
" तुमच्याकडे हत्यारे पाहिली गेली आहेत. त्यामुळेच चौकशीची गरज भासली नाही. " राजा म्हणाला.
माघ समजावणीच्या सुरात म्हणाला," महाराज, कुर्‍हाडीने आम्ही रस्त्याच्या दुतर्फा माजलेली झाडे-झुडपे हटवतो. रस्ते बनवतो. तलाव खोदतो. घरे बांधतो. यासाठी लागणारी आवश्यक साधने आमच्यासोबत असतात."
राजाने अधिक चौकशी केल्यावर समजले की अधिकारी स्वतः च गुन्हेगार आहे. त्याने अधिकार्‍याला शिक्षा देण्याचे आदेश दिले. राजा तरुणांकडे वळून म्हणाला," जा, तुमच्या गावचा कारभार तुम्ही स्वतः पहा." सोबत जाताना त्याने त्यांना तो हत्तीसुद्धा भेटीदाखल देऊन टाकला.  - मच्छिंद्र ऐनापुरे, जत 

No comments:

Post a Comment