Tuesday, June 13, 2017

गाईच्या शेणापासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती

     पर्यावरक्षणासाठी काहीजणांची धडपड सुरूच आहे.पण त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि महत्त्वाचे म्हणजे गाई वाचवण्यासाठी काहीजण अगदी मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारण्याचा व त्या वितरीत करण्याचा प्रयत्न यंदाच्या वर्षीपासून गणेशोत्सव काळात केला जाणार आहे. यासाठी सांगली जिल्ह्यातील औदुंबर (ता. पलूस) येथील गोपालनंदन गो शाळेचे प्रमुख सुहास पाटील यांनी गुजरातमधून तब्बल 10 हजार गणेश मूर्ती आणल्या आहेत.

      अलिकडच्या काळात देशी गाईंची संख्या कमी झाली आहे.परंतु, भाजप शासन काळात गाईला पुन्हा महत्त्व प्राप्त झाल्याने गाईच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे पुन्हा देशी गाईला मागणी वाढली आहे. यासाठी काही खास गो-शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. आता गाईंच्या संवर्धनाबरोबरच त्याचा पर्यावरणरक्षणाची जोड देण्याचा प्रयत्न करताना गाईच्या शेणापासून गणेश मूर्ती साकारणाच्या प्रयत्न सुरू झाला आहे. गुजरातमधील कियाडा (जि.राजकोट) येथील देवीमाँ गोमाई ग्रामीण महिला उद्योग या संस्थेने एक चांगला पर्याय काढत गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात केली आहे. इथून या गणेश मूर्ती यंदाच्या गणेशोत्सवासाठी सांगली जिल्ह्यात आणण्यात आल्या आहेत. दहा हजारावर इको फ्रेंडली गणेश मूर्तींचे वितरण यावर्षी केले जाणार आहे. अर्थात हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून राबवला जाणार आहे.
     पर्यावरण रक्षणाबरोबरच, शेतकर्‍यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि गाई वाचविण्यासाठी टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी पर्याय म्हणून शाडूच्या किंवा मातीच्या गणेशमूर्ती बनविल्या जातात; पण यासाठी उपलब्ध साधनसामग्री, बनविण्यासाठी लागणारा वेळ व येणार खर्च, या सर्व बाबी कलाकार आणि भाविकांना न परवडणार्‍या आहेत. त्यामुळे  या सर्वांना एक चांगला पर्याय शोधला आहे. भारतीय वंशाच्या देशी गाईच्या शेणाचा वापर करून मोठ्या कल्पकतेने गणेश मूर्ती बनविल्या आहेत. 
     वजनाला हलक्या, सहज हाताळता येतील अशा व आपणास पाहिजे तशा रंगविता येणार आहेत.तीन इंचापासून तीन फुटापर्यंत विविध आकारात या मूर्ती तयार केल्या असून, विसर्जन केल्यानंतर त्या लगेचच विरघळतात. गाईचे शेण पाण्यात विरघळल्यानंतर पाणी स्वच्छ करीत असल्याने जलप्रदूषणही होणार नाही. पर्यावरणाच्या रक्षणासाठी दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. गोसेवा म्हणून नाममात्र मूल्य आकारून या इकोफ्रेंडली गणेश मूर्तींचे राज्यभर वितरण करण्यात येणार आहे. गेली पाच वर्षे हा प्रयोग सुरू असून, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लता मंगेशकर आदींसह विविध मान्यवरांना या मूर्ती भेट दिल्या असून, त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे, असे गोपालनंदन गोशाळेचे प्रमुख सुहास पाटील सांगतात.
     श्री.पाटील म्हणाले की, भाकड गाईंचे पालनपोषण करणे शेतकर्‍यांना परवडत नाही, म्हणून गाईंची रवानगी नाईलाजास्तव कत्तलखान्यात केली जाते. गुजरातमध्ये गाईचे शेण पन्नास रुपये प्रतिकिलो दराने विकत घेऊन इको फ्रेंडली गणेशमूर्ती घडविल्या जातात. भविष्यात विविध शोभेच्या वस्तू बनवून देशभर त्या वितरित करण्याचे नियोजन आहे. यामुळे शेतकरी व महिला बचतगटांना आर्थिक फायदा मिळेलच, शिवाय दुधापेक्षाही शेणाला दर मिळाल्याने गाईंचा सांभाळही होईल.


No comments:

Post a Comment