Wednesday, June 7, 2017

पाण्याची साठवणूक

     शेतकर्यांचा संप सुरू आहे. मुंबई,पुणे या मोठ्या शहरांकडे जाणारा भाजीपाला,दूध संपाची धार तीव्र रोखण्यात आला. दूध,भाजीपाला रस्त्यावर टाकण्यात आला. त्यामुळे संपाचे हत्यार चांगलेच यशस्वी झाले आहे. महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी इतिहासात पहिल्यांदाच होत असलेल्या शेतकर्यांच्या संपाची दखल सरकारला घ्यावी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी करताना त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यादे सुतोवाच केले आहे. अर्थात सरकारला कर्जमाफी ही द्यावीच लागणार आहे. फक्त ती आता कि नंतर हाच प्रश्न आहे. शेतकर्यांचा संप सुरू असतानाच मान्सून पावसाचे आगमन झालेले आहे. राज्यात कुठे कुठे पावसाची दमदार इंट्री झाली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आता सार्यानीचा पाण्याच्या साठवणुकीसाठी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.उन्हाळा कसा गेला याची कल्पना सार्यांनाच आली आहे. दुष्काळी भागातील जनतेला सरकारला टँकरने पाणी पाजावे लागले आहे.नव्हे अजून पाजावे लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, टँकर सुरू करावे लागतात. ही तात्पुरती मलमपट्टी थांबणार कधी? महाराष्ट्र टँकरमुक्त मागे युती शासनाच्या काळातच झाला होता. मात्र पुन्हा पाण्याचे टँकर सुरू करावे लागले आणि आता भाजप-सेना युतीसह अन्य पक्षांच्या सरकारच्या काळातही ते सुरूच आहेत. जलयुक्त शिवारसारख्या योजना काही प्रमाणात यशस्वी होत असल्या तरी अजूनही पल्ला फारच लांब आहे. अर्थात पाण्याचा दुष्काळ हटवण्याची जबाबदारी एकट्या सरकारची नाही. प्रत्येक माणसाची, समाजाची आहे. या सगळ्यांनीचा आपापल्या परीने पाण्याचा दुष्काळ हटवण्याकामी प्रयत्न करण्याची गरज आहे.

       दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जलशिवार, जलपुनर्भरण अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. अनेक सामाजिक संघटना अगदी आमिर खान, अक्षयकुमार यांसारखे अभिनेतेदेखील दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीचा हात पुढे करून सरसावले आहेत. यंदा जलसंधारणाची कामे बर्यापैकी या सगळ्यांच्या माध्यमातून झाली असल्याचे विविध माध्यमातून आलेल्या बातम्यांमधून दिसत आहे. मात्र सामाजिक संस्थांनी आणि सरकारने सुरू केलेल्या योजनांमध्ये पाण्याची साठवणूक किती होते हे या पावसाळ्यात दिसूनच येणार आहे. यंदा पाऊसमान चांगले असल्याचा हवामानखात्याचा अंदाज दिलासा देणारा आहे. वास्तविक पावसाळा चारच महिने असतो आणि सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाळा संपल्यानंतर पाण्याची चणचण भासू लागते. ती भासणार नाही याची किती खबरदारी सरकारी पातळीवर घेतली गेली आहे हे सप्टेंबरनंतरच समजणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस एकसारखा पडत नाही. कधी तो ओढ देतो, कधी जोरदार बरसतो. त्यामुळे जलशिवार योजनेतून जास्त पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकरी आणि लोकांना शेतीसाठी, तसेच पिण्यासाठी राज्यातील छोट्या आणि मोठ्या धरणांवरच नेहमीसारखे अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे पाऊस चांगला झाला तर जनता आणि सरकार यांचे नशीबच; पण जर पावसाने ओढ दिली किंवा विदर्भ, मराठवाड्यासारख्या पश्चिम भागातील दुष्काळी भागात यंदाही कमी पाऊस झाल्यास पुन्हा एकदा पाण्यावरून जनसंघर्ष भडकेल आणि तेथेच सरकारची कसोटी लागणार आहे.
     ही सगळी परिस्थिती पाहता पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा,मुरवण्याचा प्रयत्न सर्वच पातळीवर झाला पाहिजे. लोकांनी छतावरचे पाणी अडवून आपल्या घराच्या परिसरात,विंधनविहिरीत जिरवले पाहिजे. पावसाच्या पाण्याचा उपयोग करत लोकांनी मिळेल त्या जागेवर,गच्चीवर भाजीपाला वैगेरेची लागवड केल्यास त्याचा चांगलाच उपयोग होईल. महत्त्वाचे म्हणजे यंदा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून त्यांच्या संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे हाती घेतले पाहिजे. झाडे जगली पाहिजेत,हा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे. केवळ फोटो आणि बातम्यांसाठी झाडे लावण्याचा कार्यक्रम होता कामा नये. खरे तर सरकारने वृक्षलागवडीचे अॅडीट करायला हवे. म्हणजे यातून झाडे लावली किती आणि जगली किती,याचा अंदाज येईल. झाडे जगवणार्या व्यक्तींना ,संस्थांना सरकारकडून प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याला उत्साह येईल.

No comments:

Post a Comment